श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ बाबा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

प्रल्हाद दिगंबर पिंपुटकर – माझे बाबा.

मी शाळेत असतानापासून आठवतात ते कडक शिस्तीचे बाबा. संध्याकाळ झाली की देवासमोर दिवा प्रज्वलित करणारे आणि व्हरांड्यात फेऱ्या मारत शुभं करोति, रामरक्षा म्हणणारे, आणि त्यांच्याबरोबरीने मला म्हणायला लावणारे.

फार देव देव करायचे नाहीत ते खरंतर, पण नित्य पूजा आवर्जून करायचे, मालाडला बाबा बेलसरे यांच्याकडे अधून मधून जायचे, आईबरोबर पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या माधवबागेतही जाणं व्हायचं त्यांचं, पण नित्यनेम असा काही नसायचा, कोणते गुरू वगैरे केले नव्हते त्यांनी. पण धार्मिक नक्की होते ते. मला अथर्वशीर्ष त्यांनीच शिकवलं, त्यांच्या मित्रांकडे सहस्त्रावर्तनासाठी अनेकदा जायचो.

आपल्या आई वडिलांवर, गावावर निस्सीम प्रेम करणारे. आजी कॅन्सरमधून बरी होऊन घरी आली, गोरेगावच्या अरुंद जिन्यातून स्ट्रेचर येऊ शकतं नव्हता. कोणाची वाट न पहाता, अक्षरश: लहान बाळासारखं आजीला कडेवर उचलून घेऊन घरी आले होते ते.

तितकंच प्रेम होतं गावच्या जमीनीवर. आर्थिक कारणांनी त्यांना मुंबईत नोकरी करावी लागली, पण निदान मी तरी शिकून गावी जावं, शेती करावी हे त्यांचं स्वप्न. आणि म्हणूनच, मला शेतकी कॉलेजात – हॉस्टेलमध्ये पाठवण्याची जोखीम उचलली त्यांनी. दहावी, बारावी झालं तरीही तसा बालच होतो मी, कदाचित एकुलता एक असल्याने adjustment करणं मला माहित नव्हतं, तापट होतो. पण मी शेती विषय शिकलो तर आधुनिक शेती करू शकेन, या ध्येयाने त्यांनी मला शेतकी कॉलेजला धाडलं.

… पुढे मी शेती विषयातच MSc न करता, म्हैसूरला अन्न प्रक्रिया शिकायला जाणार म्हटल्यावर आधी खट्टू झाले ते, पण मग त्याच वेळी globalisation चे वाहणारे वारे, केंद्र सरकारमध्ये ministry of food processing ची झालेली स्थापना आदि गोष्टींनी ते सुखावले.

त्यानंतर त्यांच्या बँकेतील जीवलग सहकाऱ्याने इंग्लंडमध्ये शेती व अन्नप्रक्रिया क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी रोटरीच्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती आणली, आणि त्यांच्या स्वप्नांना नवीन पंख फुटले.

रुखरुख एवढीच की दापोली आणि म्हैसूरच्या कॉलेजप्रमाणे, आईबाबा इंग्लंडला माझ्या कॉलेजला नाही आले. इंग्लंडला शिक्षण पूर्ण केल्यावर माझ्यापेक्षा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि त्याहून जास्त खुश ते झाले जेव्हा मी उंबरगावला शेती करू लागलो तेव्हा.

… त्यांच्या हयातीत ती शेतजमीन विकून पैसा करण्याच्या अनेक ऑफर्स आल्या त्यांना, पण जी वस्तू मी विकत घेतली नाही, जी वस्तू माझ्याकडे वडिलोपार्जित चालत आली आहे, ती विकण्याचा मला हक्क नाही – असं साधंसोपं तत्वज्ञान अंगिकारलेल्या त्यांनी जमीन विकण्याचा विचारदेखील कधी केला नाही.

ते प्रचंड उद्यमशील होते. शनीवारी बँकेची नोकरी अर्धा दिवस असायची, घरी आले की काहीतरी खुडबुड करत रहायचे. आरामखुर्चीच्या जुन्या कापडाच्या पिशव्या करतील, पाण्याच्या गळक्या टाकीला रंग देऊन तिचा shoe rack म्हणून उपयोग करतील, ब्रासोने कडी कोयंड्यांना पॉलिश करत राहतील.

गावी आले तर अंगण झाडून काढतील, हे दुरुस्त कर, त्याला रंग दे, शेतावर चक्कर मार, तिथं तण काढत बस, रोपांना पाणी दे.. सतत काहीतरी काम करत रहायचं.

मी ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेत खजिनदार म्हणून काम केलं त्यांनी, पण त्यामुळे शिक्षकांनी माझ्या चुकांवर पांघरूण घालावं, हे ना त्यांना अपेक्षित होतं ना मंजूर होतं.

प्राथमिक शाळेत नलावडे बाई, कऱ्हाडकर काका, कापरेकर काका या सगळ्यांशी त्यांचं छान जमायचं. मग प्राथमिकच्या पाच पन्नास मुलांना, मुंबईपासून दीडशे किलोमीटर दूर उंबरगावला ते रेल्वेने शाळेची सहलही घेऊन आले होते, मुलांसाठी स्वयंपाकही करू लागले होते, आणि या सगळ्या वानरसेनेला समुद्रात मनसोक्त भिजूही दिलं होतं.

रिझर्व्ह बँकेत ऑफिसर होते ते, पण त्याचा ना कधी त्यांनी माज केला ना कधी गवगवा. कोणाला स्वतःहून कधी सांगितलंही नाही त्यांनी त्याबद्दल.

ते स्वतः संघ स्वयंसेवक होते, अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा मदतीचा हात असायचा, पण श्रेय घेण्याची वेळ आली की मात्र ते सोयीस्कररीत्या गायब झाली असायचे. त्यांच्या प्रोत्साहनाने शाळेतील एक शिपाई परीक्षा देऊन शिक्षक झाला, तेव्हा त्यांच्या डोळ्यातले हसू पाहण्यासारखे होते.

… नातेवाईकांकडच्या मंगलकार्यांपासून आजारपणापर्यंत “प्रल्हाद”चं असणं लोकांना आधार असायचं.

मनस्वी स्वभावाचे होते ते. एखाद्याची एखादी गोष्ट जर पटली नाही, किंवा एखाद्याबद्दल त्यांना वाईट अनुभव आला, की ते तुकडाच तोडायचे, त्या माणसाशी संबंधच तोडायचे.

त्यांच्या काही खोडी – सवयी मात्र अनाकलनीय होत्या. सणासमारंभाला, लग्न प्रसंगाना अथवा कोणाकडे जाताना ते नवे कपडे घालत नसत. “याच्याकडे चांगले कपडे नव्हते, म्हणून ऐनवेळी याला नवे कपडे घ्यावे लागले” असं लोकं म्हणतील, असं सांगून ते जुनेच कपडे घालून कार्यक्रमांना जायचे.

जेवणाखाण्याचे असे त्यांचे काही शौक नव्हते. कावीळ झाल्यानंतर तर मसालेदार, तेलकट खाणं ते कटाक्षाने टाळायचे. फक्त कधी फणसाची भाजी असेल, अथवा डाळिंब्यांची उसळ असेल तर आवर्जून लसणाची फोडणी दिलेलं तेल त्यात ओतून घ्यायचे.

माझं लग्न ठरलं त्या वेळची गोष्ट. जास्वंदीच्या आई बाबांना उंबरगाव, पिंपुटकर हे सर्वथा अपरिचित होतं. ज्या गावात, ज्याला मुलगी द्यायची त्याची नीट चौकशी करावी, म्हणून जास्वंदीच्या बाबांनी उंबरगावात संघाचे प्रचारक राहिलेल्या सुमंतराव “अण्णा” घायाळ यांना माहिती काढायला सांगितलं. त्यांनी गावातील जुने स्वयंसेवक बाबा भागवत यांच्याकडे पृच्छा केली… आणि पट्कन उत्तर आलं, “मकरंद कसा आहे हे माहीत नाही, शिक्षणामुळे तो फारसा उंबरगावला कधी आलाच नाही. पण त्याचा बाप – प्रल्हाद, तो मात्र अतिशय सज्जन आहे. त्याच्या मुलाला तुम्ही डोळे झाकून मुलगी द्या. ” 

माझं लग्न झालं, सूनबाई शेतीत आणि गावात रमणाऱ्या असल्याने सून आणि सासऱ्यांची छान गट्टी जमली. जास्वंदीला, माझ्या बायकोला M80 चालवता यायची, त्यामुळे, बाबा उंबरगावी आले की ती त्यांना रेल्वे स्टेशनवर घ्यायला जायची. मग बाबा, संकोचाने, M80 वर अंग चोरून बसायचे, सुनेला अहो जाहो संबोधायचे. सून आणि सासऱ्यांनी शेतात फुलबाग बहरवली होती.

कॉलेजात गेल्यावर, शिंगं फुटल्यावर अनेकदा वाद व्हायचे माझे त्यांच्याबरोबर. पण मग मी जसा मोठा होत गेलो, अनुभव येत गेले, त्यांच्या सांगण्याची प्रचिती येत गेली, तसे ते कसे माझे बेस्ट फ्रेंड आहेत हे जाणवू लागलं. आणि आता या फ्रेंडबरोबर जास्त मजा येईल अशी स्वप्नं मी पाहू लागलो.

… पण तसं होणार नव्हतं.

… आयुष्यभर नियम पाळणाऱ्या माझ्या वडिलांचा रेल्वे रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू व्हावा हा दैवदुर्विलास. त्यांनी किती माणसं जोडली होती, हे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकर्षानं जाणवलं. त्यांच्या संपर्कात आलेले असंख्यजण येऊन भेटून गेले, त्यांच्या आठवणी सांगून गेले.

“नोकरीच्या मागे लागू नकोस, स्वतःचा काहीतरी व्यवसाय कर, चार जणांना तू नोकरी दे, त्यांचा संसार उभा करायला हातभार लाव, ” ते नेहमी सांगायचे.

… आपण जे सांगतो, preach करतो ते आणि आपली प्रत्यक्ष वागणूक यात तफावत असली, तर लोकं ती पटकन् जाणतात, आणि त्यानुसार आपली किंमत करतात. बाबांना हा प्रश्न कधीच भेडसावला नाही. त्यांची उक्ती आणि कृती यात कधीच अंतर नव्हतं.

लेख खूप मोठा झालाय, पण बाबाही तसेच मोठे होते. मोजक्या चार शब्दांत त्यांना गवसणी घालणं अशक्य आहे.

… आजही कोणी फणसाच्या भाजीत लसणाच्या फोडणीचं तेल घालून खाताना पाहिलं की डोळे ओले होतात, फोडणी जास्तच उग्र झाली असते बहुधा. पण अशी प्रेमाची फोडणी मोजक्याच जणांच्या नशिबात असते. आणि मला अभिमान आहे, अशा भाग्यवंतांपैकी मी एक असल्याचा.

(१२/१२ हा ती. बाबांचा वाढदिवस, त्यानिमित्त आठवणींना उजाळा)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted