सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “पोकळ बांबू आणि पावा – –” ☆ सुश्री शीला पतकी ☆
काल परवाच एक पोस्ट वाचनात आली. बेगर्स डॉक्टर… खूप छान लिहितात मुख्य म्हणजे अनुभव त्यांचे स्वतःचे सकस आहेत. त्यात एक वाक्य फार छान होतं. त्यांनी एका त्यांच्याकडे आलेल्या म्हाताऱ्या बाईला म्हटलं, ” म्हातारे तुझं तुला होईन हे कशाला दुसऱ्याचं घोंगड अडकून घेतलं “… सवतीचा पांगळा पोरगा ती वाढवत होती आणि आपल्याला नसलेल आई पण मिळाले म्हणून धन्य मानत होती. त्यावर तिनं दिलेलं उत्तर खूप छान आहे. ती म्हणाली, ” आयुष्याच्या पोकळ बांबूला जरा संकटांना कष्टाने त्याला भोकं पडली त्यांन ती सोसली तर त्याचा पावा (मुरली) होतोय ना डॉक्टर! मग पोकळ बांबू होऊन मरण्यापेक्षा पावा होऊन जगाव की चार गोड सूर ऐकायला मिळतील काहीतरी चांगलं होईलच की. ” केवढं मोठं तत्वज्ञान ना? … पोकळ बांबू होण्यापेक्षा पावा व्हा.
त्या अडाणी बाईच्या तत्त्वज्ञानाचे चार शब्द माझ्या चार दिवस डोक्यात घोळत होते. हे असं जगायला माणूस मोठाच असावा लागतो असं नाही. आपल्यापुढे असंख्य मोठमोठ्या कर्तृत्ववान माणसांची चरित्रे असतात आपण ती वाचतो आणि आपल्याला वाटतं छे! आपण इतकं मोठं होऊ शकतच नाही… मग त्यांच्या विचाराचा कदाचित आपण अवलंब करीत नसू पण अशी अनेक छोटी छोटी माणसं आहेत त्यांची उदाहरणे समाजापुढे आली पाहिजेत. तेव्हा माणसाला वाटेल अरे मी सुद्धा काहीतरी करू शकेन की आणि माझ्या डोळ्यासमोर अशी लहान थोर माणसं उभी राहिली. काही जगाला ज्ञात असलेली.. काही नसलेली…!
आमच्या कॉलनी जवळपास 40 वर्षापासून एक बाई काम करतात त्या जवळ झोपडपट्टीत राहतात तिथली दोन पोरं घेऊन यायच्या त्यांची एक मुलगी आणि ती दोन पोर सतत बरोबर. त्यांना खाऊ पिऊ घालायच्या. मी त्यांना नेहमी म्हणायची… तुमच्या खाण्यापिण्याचे वांदे अन लोकांची पोरं कुठे सांभाळताहेत त्या दोन पोरांचे आईबाप भांडून घर सोडून गेलेले बाप भंगार विकायचा आणि आई कुठेतरी कामाला जायची. ते गेले पण दोन पोरं अनाथ झाली मग हिनेच आपल्या आसऱ्याला त्यांना ठेवलं सगळ्यांच्या आलेल्या भाजी भाकरी घेऊन तिथे ती पोरांना जेवायला घालत असे. मी म्हणायचे आपल्यातली अर्धी भाकरी देणे हा संस्कार पण इथे तर लोकांनी दिलेली आपल्यातली अर्धी भाकरी आधी समोरच्याला खाऊ घालायची याला फार मोठेपण लागतं मनाचं! अशी अनेक पोरं तिने झोपडपट्टीतली सांभाळली होती आणि खूप खूप काही काही… नवरा वारला दोन पोरं होती तरी सासून हाकलून दिलं झोपडपट्टीत एकाच्या आसऱ्याने राहिली त्याच्याशी लग्न केलं एक मुलगी झाली पण दुर्दैवानं तिला लग्ना नंतर एड्स झाला ती वारली आता नाती ना उत्तम शिक्षण दिल आहे नौकरी आहे. त्या चांगली कमाई करतात तिने आपल्या आयुष्याच्या पोकळ बांबूचा पावा केला.
माझ्या माहितीतली आणखीन एक बाई… पन्नास वर्षांपूर्वी नगरपालिकेत कामाला होत्या सफाई कामगार. स्वतःच्या पोटी पोर नाही एकदा कचऱ्यात एक पोर सापडलं तेच आपलं म्हणून वाढवलं अर्थात मुलगी होती तिला चांगलं शिकवलं पण नवरा गेला म्हणून पटकन पोरीचं लग्न लावून टाकलं जावयाचा खूप थाटमाट केला जावई वाईट निघाला एका पोरासह पोरीला आणून सोडले. बाई हरली नाही तिने तिला शिक्षण दिलं नोकरीला लावलं त्या मुलीने त्या बाईचा शेवटपर्यंत सांभाळ केला. तिचे म्हातारपण सुखाचे केले. तिच्या मुलीने एकदा सांगितले बाई ही माझी आई नाहीये मी हिला कचऱ्यात सापडले पण हिने ते मला कधीही सांगितलं नाही आणि जाणवू दिलं नाही पण मला हे माहिती आहे हे तिला माहित नाही. सगळ्यांचीच कमाल होती. लेकिने जाणीवपूर्वक आईचं म्हातारपण जपलं दोन्हीही बांबूच्या पोकळ देहाचे बासरीत रूपांतर झाले तिच्या आईच्या जीवनाचे सार्थक झाले तिला आई पण मिळाले आणि कचऱ्यात टाकलेल्या लेकीला आईची माया आणि एक सन्मानाच आयुष्य! आयुष्याचे गोड स्वर नक्कीच त्यातून निघालेत…! ही अज्ञात उदाहरण आहे पण अनेकांना ज्ञात असलेले एका मोठ्या विदूषी चे उदाहरण माझ्यासमोर आहे ते म्हणजे आदरणीय स्वर्णलता भिशीकर…! सर्व आयुष्य एका संस्थेसाठी, समाजामध्ये काही चांगला बदल घडवावा, अनेक विद्यार्थी घडवावेत या भावनेने केलेले लता ताईंचे अथक प्रयत्न मी पाहिलेत. आपलं संपूर्ण आयुष्य एका चांगल्या कामासाठी झोकून देऊन आपल्या कुटुंबापासून दूर राहून लोकसेवेत त्या मग्न झाल्या होत्या. असंख्य लोकांच्या अंतःकरणात या तेजस्वी भगिनीने एक खास जागा निर्माण केली आहे सामान्य माणसे ज्याला सुख म्हणतात त्यापासून किती तरी कोस त्या लांब होत्या आणि समाज घडवण्याच्या कामातच त्यांनी समाधान मानले. त्यांचे ते प्रयत्न मी खूप जवळून पाहिले होते. आयुष्याच्या पोकळ बांबूचे बासरीत रूपांतर झाले आणि सप्तसुरांनी एक अवीट गाणे तयार झाले… समर्पणाचे! ! त्या अडाणी बाईच्या जीवनाचे सूत्र… * आपल आयुष्य म्हणजे काय एक पोकळ बांबू त्याची बासरी करायची का पोकळ बांबू म्हणूनच मरून जायचं हे आपण ठरवायचं* केवढे सुंदर तत्वज्ञान… साधं सहज आणि सोपं…! पूर्वी आपल्याकडे म्हणायचे अगं चार कष्ट केले दुसऱ्यांसाठी तर भोक पडत नाहीत अंगाला…! ते वेगळ्या अर्थाने खरच आहे लोकांसाठी जगताना चार भोकं अंगाला पडली तर त्याचा पावा होतो बर का…!
मग काय मंडळी काय व्हायचंय ते ठरवा निदान विचार तरी करा… पोकळ बांबू होऊन मरायचं का दुसऱ्यासाठी चार कष्ट करून… संकटांना झेलून.. निस्वार्थीपणे जगून आयुष्याच्या जीवनाला चार भोकं पाडून घ्यायची आहेत… ज्यातून मधुर स्वर येतील आणि सारच गोड होईल नाही का…?
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





शीला ताई फार सुंदर चिंतन!