सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “कानगोष्ट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

राष्ट्र सेविका समितीच्या शाखेत ” कानगोष्ट ” हा खेळ प्राची फडकेने घेतला. दोन गट केले होते. लाईन मध्ये उभ्या राहीलो. प्रत्येक ओळीत पंधरा जणी होत्या.

पहिलीच्या कानात प्राचीनी एक वाक्य सांगितले. ते तिनी शेजारचीच्या कानात सांगायचे. असं करतं करतं… शेवटपर्यंत एकमेकींना ते वाक्य सांगायचे. असा तो खेळ सुरू झाला.

जी शेवटी उभी असेल तिने पुढे येऊन ते वाक्य सांगायचे. एकीकडून दुसरीकडे जातं जातं त्या मूळ वाक्याचे निराळेच वाक्य तयार झाले होते.

लहानपणी हा खेळ खेळताना पण असेच व्हायचे. आणि खूप हसू यायचे. तसेच आजही झाले. सगळ्याजणी हसत सुटल्या.

मैत्रेयी ताईंनी समजाऊन सांगितले,

” समजा तुम्हाला एखादा संदेश किंवा मेसेज दिलेला असेल.. तर तो जसाच्या तसा दुसऱ्या पर्यंत पोचवायचा. आणि तो तसाच दिला जावा ही जबाबदारी तुमची आहे. या खेळाचा असा अर्थ आहे.”

आज आमच्या खेळातले वाक्य असे होते…

” कोल्हापूरच्या भारत डेअरीची स्फूर्तीदायक उत्पादने श्रीखंड आम्रखंड बासुंदी तूप.. “

शेवटी जी ऊभी होती तिने वाक्य ऐकले… आणि पुढे येऊन सांगितले ते होते..

” कोल्हापूरच्या डेअरीची उत्तम उत्पादने श्रीखंड आणि बासुंदी “

हे जाहिरातीतले एका कंपनीचे वाक्य होते. त्यातील त्यांचा स्फूर्तीदायक हा महत्त्वाचा शब्द होता तोच गायब झालेला होता. तसेच त्यांच्या उत्पादनाच्या यादीतील शब्दही कमी झाले होते. त्यामुळे त्यांचा जाहिरातीचा उद्देश सफल होणार नव्हता.

अर्थात हा आमचा खेळच होता… त्यामुळे प्रश्न नव्हता.

हे उदाहरण सांगण्याचे तात्पर्य तुमच्या लक्षात आले असेलच.

एकीकडून दुसरीकडे जाताना शब्दांची मोडतोड होते. भरीसभर म्हणजे नकळत… दुसरे शब्द त्यात घातले जातात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.

मतितार्थ काय तर…

एखाद्याने आपल्या कानावर काही घातले तर त्यावर लगेच विश्वास ठेवायचा नाही. त्याची शहानिशा करायची. चार जणांना विचारून खात्री करून घ्यायची.

लहानपणी खेळताना हसून सोडून देत होतो. ती नुसती गंमत होती…

पण रोजच्या जीवनात वावरताना सत्य काय आहे…

 हे पडताळणी करून तपासून बघायचे. नाही तर आपण फसवले जाऊ शकतो. या बाबतीत सागधगिरी बाळगायला हवी आहे.

अनेक संस्थात बिहेव्हियरल सायन्सच्या (बी एस) ट्रेनिंग मध्ये हा खेळ एक्झरसाइज म्हणून घेतला जातो.

यावरून आपल्या” कानगोष्टी “या पारंपारिक खेळाचे किती महत्त्व आहे हे लक्षात घ्या.

व्यवहारातही एखादा आपल्याला सावध करण्यासाठी म्हणतो,

” बघ बाबा माझ्या तर हे कानावर आलेले आहे. म्हणून तुझ्या कानावर घालून ठेवले आहे. “

 म्हणजे पुढे काय करायचे ते तुझे तू बघून घे.

 अशावेळी शांतपणे विचार करायचा. लगेच निर्णय घ्यायचा नाही. कारण खेळातल्या कानगोष्टी सारखी ती गोष्ट बदल होऊन त्याच्यापर्यंत आलेली असू शकते.

म्हणून पुढची कृती विचारपूर्वक करायची.

कोणी काही सांगितले की ताबडतोब व्यक्त व्हायची, मतं, प्रतिक्रिया द्यायची आपली सवय असते.

काही वेळेस आपण घाईघाईत लगेच त्यावर काहीतरी कृती पण करून बसतो. त्याचे दूरगामी घातक परिणाम होऊ शकतात.

खरंतर ही अगदी छोटी गोष्ट वाटेल… पण यातूनच शिकायला मिळते.

योग्य तऱ्हेने वागण्याचे भान येते सकस विचार मनात रूजतात.. हळूहळू शहाणपण येत जाते..

नाहीतरी आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो…

हे लिहिताना शाखेतील गीत आठवले.

” मंत्र छोटा रीत नई आसान हमने पायी है 

छोटे छोटे संस्कारोंसे से बात बडी बन जाती है”

यातील दुसरं कडवं असं आहे

” शाखा में हम ऐसे खेले जिससे प्रेम उमडता हो

कुछ बौद्धिक हो गीत गान हो धर्म ग्यानकी चर्चा हो

भगवा ध्वज हो नित्य सामने त्याग भावना पलती है”

किती सुरेख शिकवण आहे ना…

शाखेत सर्वांची चांगली ओळख झालेली आहे.. आता आपण सगळ्याजणी मैत्रिणी झाल्या आहोत. एकमेकींबद्दल आत्मीयता प्रेम निर्माण झालेले आहे.

– – खेळ खेळता खेळता अशा अनेक गोष्टी शिकत राहू. त्यातूनच आपल्यावर चांगले संस्कार होत राहतील.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted