सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “अनुभवाचे लेणं…” ☆ सुश्री शीला पतकी 

‘अनुभवाचे लेणं’ हे एका पुस्तकाला दिलेल नाव वाचलं. त्यावर एकांची प्रतिक्रिया होती की लेणं म्हणजे महिलेसाठी असलेले सुंदर सुंदर आलंकार… अनुभव हे जणू अलंकारच आहेत! आपण स्रिया, असलेले अलंकार तर आपण घालतोच पण त्याशिवाय बहिणीचे, मावशीचे, आईचे, सासूबाईंचे, वेगळपण दाखवणारे अलंकारही अंगावर चढवतो आणि आपल सौंदर्य खुलवतो… अनुभवाचे सुद्धा तसच आहे… सगळे अनुभव आपलेच असावे लागतात असं नाही. आपल्यात एक म्हण आहे “पुढच्याच ठेच मागचा शहाणा “म्हणजे इतरांच्या अनुभवावरून आपण काही शिकत असतो… मागच्या पिढीचे अनुभव हे पुढच्या पिढीला वारसा हक्काने मिळत असतात… आता त्यातून त्यांनी शहाण व्हायचे का नाही ते ठरवायचं असतं.. पण हे अनुभव नक्कीच कामी येतात.

आता या अनुभवांना स्वयंपाक घरात टिप्स म्हणतात… उदाहरणार्थ भाजीला मीठ जास्त झालं की बटाटा घाल असं आईने आपल्याला कितीदा तरी सांगितलेलं असतं आणि ती युक्ती आपल्याला कामी येते तो तिचा अनुभव असतो. जीवनात अशा कितीतरी टप्प्यावर अशा अनुभवांचा आपल्याला फायदा होतो. प्रत्येक अनुभव आपणच घेतला पाहिजे असं नसतं. लहान मुलाला सुद्धा आपण गरम असलेला तवा पोळतो हे सांगतो कधीतरी त्याला चुकून बिचाऱ्याला पोळलेले ही असेल आणि त्यावरून ते शहाणं होतं आणि गार तवा सुद्धा ते मुल ऍक्शन करून सांगतो हा sssआहे… पोळतं…!

इथूनच अनुभव शिकायला सुरुवात होते. मग आपण आपल्या जीवनात अनुभव घेत राहतो. अनुभव हा वसा एकाने दुसऱ्याला द्यायचा. दुसऱ्याने तो टाकायचा का सांभाळायचं हे त्यांनीच ठरवायचे… माझ्या व्यवसायातला किस्सा आहे मी मुख्याध्यापक असताना एका शिक्षकाच्या वर्गावर लेसन पाहायला गेले त्यांनी गणित वगैरे सोडवलं आणि एके ठिकाणी लिहले ए छेद बी a/b जिथे बी बरोबर नाही शून्य आणि ते पुढे गणित सोडवत गेले एका मुलीने त्यांना विचारले b बरोबर नाही शून्य म्हणजे काय ते म्हणाले ते तसंच असतं नियम आहे… तो लेसन संपल्यावर मी माझ्या ऑफिसमध्ये त्यांना सांगितलं सर ए छेद बी अपूर्णांक संख्या आहे त्याचा अर्थ काय असतो ए अंशात आहे बी छेदात आहे समजाA 4 आहे आणि b5 आहे म्हणजे4/5 याचा अर्थ काय असतो तर एका वस्तूचे पाच भाग केले चार भाग घेतले पण त्या ऐवजी4/0 असे असेल तर त्याचा अर्थ शून्य भाग केले आणि चार भाग घेतले. मग त्याचे भाग केलेच नाही त्याचे भाग घेणार कुठून? यासाठी हे बी बरोबर नाही शून्य असे लिहितात त्यांनी मान डोलावली ते म्हणाले मी असेच गृहीत धरून चाललो होतो बर झाला एक नवीन गोष्ट तुमच्याकडून शिकलो.

कदाचित आम्हीही चुकलो असू पण अनुभवानी शिकलो आणि ते अनुभवाने समृद्ध झाले एक गोष्ट ते नव्याने शिकले हे असे आपण सगळ्याच गोष्टींमध्ये शिकत राहतो आणि मग या अनुभवांचं लेणं होतं आपल्याजवळ.. आपलं सौंदर्य परिपक्व होऊन खुलत राहत! आपण आपल्या आई आजीचे जुने अलंकार त्याला ओल्ड फॅशन म्हणत नाही तर त्याला अलीकडे अँटिक म्हटलं जात त्याचं मूल्य अधिक वाढला आहे तसंच आपल्या आई आजी यांच्या अनुभवाचे मोल आहे ते खरोखरच अमूल्य आहेत. “आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक “ही आपली जुनी कविता मला आठवते. त्या कवितेतली ती आजी किती अचूक वेळा सांगत असते. कुठलंही घड्याळ तिच्याजवळ नसतं पण अनुभवाने ते घड्याळ तीने आत्मसात केलेले असते. कवी घड्याळ हुडकण्यासाठी तिची सगळी गाठोड हुडकतो पण त्याला घड्याळ सापडत नाही. फार सुंदर कविता होती. हे अनुभवाच्या गाठोड्यातलं तिचं घड्याळ किंवा आपल्या आई आजीचे अनुभवाचे ही गाठोडे ही फार मौलिक ठेव आहे.

पक्षी झाडाच्या कुठल्या भागावर घरटी करतो त्यावर यंदा पाऊस किती पडणार हे अनुभवाने सांगणारी मंडळी नेहमीच बरोबर ठरतात. याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. अनुभव आहे हा. हवामान खात्याचे अंदाज वगैरे सुरू झालं पण पूर्वी अनुभवी माणसांच्या सांगण्यानुसार शेती होत होती.

मुंबईमध्ये घडलेला हा किस्सा आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे एक बाई म्हणाली मी सगळे दागिने घालून प्रवास करते बघू कसे चोरतात… तिने सगळे खोटे दागिने घातले होते पण ते अगदी खरे वाटणारे होते ती मुंबईतून प्रवास करून लोकल मधून वगैरे आली आणि म्हणाली बघा काही झालं नाही कोणी माझ्या अंगाला हात लावला नाही की चोरीच्या उद्देशाने कुणी मला काही केलं नाही. त्यावर त्या दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं बाई जरा गळ्यावर बघ हातावर बघ तुझे सगळे दागिने तपासून घेतलेले आहेत खुणा आहेत आणि खरोखरच तिच्या मानेवर हातावर किंचित सूक्ष्म ओरखडे होते ते दागिने खोटे आहे ते चोराने तपासून घेतले होते हे ज्या माणसाने सांगितले तो अट्टल चोर होता आणि ते त्याच्या अनुभवाचे बोल होते.

हा किस्सा विनोदी असला तरी खरा आहे. प्रत्येक धंद्यात अनुभव गुरु असतोच ना.. खानावळीतला तुपाचा चमचा कधीही खोलगट नसतो किंवा मग खोलगट चमच्याला मारून मारून तो सपाट केलेला असतो कारण तो नुसता बुडवायचा आणि धरायचा, जास्त तूप पडता कामा नये हे ती मंडळी अनुभवाने शिकली. एका लग्नात व्याही मंडळी लाडूसकट सर्व गरम स्वयंपाक पाहिजे म्हणून अडून बसली. आचारी म्हणाले.. ‘काळजी करू नका ‘.. सगळा स्वयंपाक त्यांनी गरम केलाच होता. त्यानी मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवले त्याच्यावर एक मोठा झारा टाकला, त्या झाऱ्यावर एक कापड ठेवले आणि त्या कापडावर दोन दिवसांपूर्वी केलेले लाडू बुंदीचे ठेवून दिले आणि एक पाच मिनिट त्याला वाफ दिली. ते त्यांनी काढले आणि दोन बायकांना ते नुसते दाबून वळायला बसवले. लाडू सकट गरम जेवण सर्वांना दिले. हा त्याच्या अनुभवाचा भाग होता आणि त्यावर लग्नातला संघर्ष टाळला.

अनुभव हा ज्येष्ठ गुरु आहे हेच खरे.. म्हणून वयस्कर माणसांच्या आपण पायावर डोके ठेवतो त्यावेळेला त्याच्या शिक्षणाचा विचार केला जात नाही, त्याच्या अनुभवाचा विचार केला जातो… 

– – म्हणून अनुभव घ्या.. अनुभव सांगा.. अनुभव वाटा.. आणि अधिकाधिक अनुभव गोळा करून समृद्ध व्हा…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted