श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ६ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
पण, लक्षात कोण घेतो?
सामान्य मनुष्याला एक सवय असते. तो नेहमी आपल्या चुकांचे खापर फोडायला काहीतरी अथवा कोणीतरी निमित्त शोधत असतो… तो कधी परिस्थितीला दोष देईल, तर कधी एखाद्या व्यक्तीला दोष देईल तर कधी देवाला…
पण त्याला असे कधीही वाटतं नाही किंवा त्याच्याकडे मी चुकू शकतो हे मान्य करण्याचे धैर्य नसतं असे आपण म्हणू शकतो… माझा मुद्दा आपल्या लक्षात येत असेल…?
आज मनुष्य अनेक गोष्टी स्वतःला आवडते म्हणून करीत नाही, तर सध्याचा *”ट्रेंड* पाहून करतो असे म्हणावे लागते…
बरं यातील बरेचसे ट्रेंड हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाणारे आहेत, असे आपल्या लक्षात येईल…! काळानुरूप सभ्यतेचे मापदंड बदलत असले तरी नीतीचे मोजमाप मात्र कोणत्याही काळात बदलत नसते…! आणि कोणत्याही ट्रेंडपेक्षा नीती कधीही उच्च असणारच, राहणारच आहे, त्यामुळे मनुष्याने त्याचा विचार आधी करायला हवा, नाही का?
पोशाख संस्कृतीचा निदर्शक मानला गेला आहे…! पोशाखामध्ये हे विशिष्ट शास्त्र दडलेले असते…! उदा. उष्ण कटिबंधात सैलसर पोशाख प्रामुख्याने आढळतो, तर शीत कटिबंधात घट्ट पोशाख आढळतो…! पण सध्या अंधानुकरण हा स्थायीभाव झाल्याने मनुष्य विवेक न करता अनुकरण करत आहे, पटतंय ना?
आपल्या प्रकृतीला, आपल्या संस्कृतीला, आपल्याकडील भौतिक परिस्थितीला तसे आचरण करणे उचित आहे का? याचा विचारच नाही. आपल्याकडे साधारण मे महिन्यात लग्नाचा हंगाम असतो. रणरणत्या उन्हात, जिथे पंख्याची सोय करणे शक्य नाही, अशावेळी नवरदेव सुटबुट घालून घामाने थबथबून विवाह वेदीवर उभा रहात असतो… (कदाचित म्हणून त्या जागेला वेदी म्हणत असावेत…) वर वर्णन केलेले चित्र नजरेसमोर आणून पाहावं…
लग्नाच्या नावावर अतिरिक्त खर्च, सध्या निघालेले विवाहपूर्व छायाचित्रीकरण, आणि इतर अनावश्यक खर्च आणि दैनंदिन जीवन जगताना आपण करीत असलेले अंधानुकरणहे वेताळ नव्हेत?
यातून आपण बाहेर पडायला हवे.
पटतंय ना?
– लेख क्र. ६
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर




