सौ. अर्चना देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆
☆ व्हॅलेंटाईन डे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
१४ फेब्रुवारी हा जगभर “व्हॅलेंटाईन डे “म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात.
पण प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज काय? . त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना केल्या जातात, वेगवेगळे कार्यक्रम आखले जातात. , प्रेम व्यक्त केले जाते. रोमान्स ताजा ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातो. सगळेजण करतात म्हणून आपण हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो. सर्वजण लॉन्ग ड्राईव्हला जातात म्हणून आपण जातो, कॅन्डल लाईट डिनर करतो, निष्कारण इतरांचेअनुकरण करतो. काहीतरी गिफ्ट द्यायचे म्हणून खिशाला परवडत नाही तरी एखादी वस्तू खरेदी करतो. कमीत कमी एखादं ग्रीटिंग उधार उसनवारीने आणतो आणि पैसे परत करावे लागणार म्हणून दुःखी होतो. ५रुपयाला मिळणार फूल २५रू. खरेदी करतो पण ह्या सगळ्याची खरंच गरज आहे का? कशासाठी पाश्चात्त्यांचे अनुकरण करायचे? ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम आहे ते पैशातच व्यक्त केले पाहिजे असे कुणी सांगितलंय.
“प्यार करने के लिये पैसा नहीं लगता.. और प्यार में कोई सही, गलत मी नहीं होता.. प्यार सिर्फ प्यार होता है”या उक्तीप्रमाणे त्याला किंवा तिला जे आवडते ते केले तर आनंद द्विगुणित होईल. एखादा मित्र अनेक वर्षे भेटला नसेल तर त्याची भेट घडवून आणता येईल, आवडीचा पदार्थ पोटभर खाऊ घालता येईल. आपल्या मनातील भावना कागदावर लिहून देता येईल ज्यामुळे त्याला किंवा तिला आनंद मिळेल. एखादया भांडण झालेल्या मित्र -मैत्रिणींशी पुन्हा समेट घडवता येईल. मागील वादाबद्दल सॉरी म्हणून दिलगिरी व्यक्त करता येईल. आपल्या मध्ये असणारी एखादी वाईट सवय कायम सोडतोअसा वादा करता येईल त्यामुळेत्याचे किंवा तिचे जीवन बदलून जाईल. हीच खरी प्रेमाची कसोटी ठरली आणि हेच गिफ्ट आयुष्यभर पुरेल. या गोष्टी केल्या तर खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल असे मला वाटते.
© सौ अर्चना देशपांडे
पुणे
मो.नं ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




