सुश्री सुरेखा चिखलकर
मनमंजुषेतून
☆ ताकद शांततेची – – ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆
माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे वळण येते जिथे शब्दांच्या तलवारीने काळजावर वार केले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आपला सतत अपमान करते तेव्हा सुरुवातीला मनात संताप येतो मग वेदना होते आणि हळूहळू आपण स्वतःच्याच नजरेत स्वतःला कमी लेखू लागतो. पण खरं सांगू का?अपमान हा देणाऱ्याचा स्वभाव असतो पण तो स्वीकारायचा की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. जेव्हा समोरची व्यक्ती वारंवार कटू शब्द बोलते तेव्हा ती प्रत्यक्षात तिच्या स्वतःच्या मनातील गोंधळ मत्सर किंवा न्यूनगंडाला वाट करून देत असते. आपण मात्र ते शब्द एखाद्या ओझ्यासारखे आपल्या खांद्यावर वाहत राहतो.
खरंतर समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्यावरील खडकावर आदळून परत फिरतात तसाच आपला स्वभाव असायला हवा. खडक शांत असतो स्थिर असतो आणि लाटांच्या आदळण्याने त्याचे अस्तित्व संपत नाही. आपली शांतता हेच अशा अपमानाला दिलेलं सर्वात सडेतोड उत्तर असतं. कारण आपण जेव्हा प्रत्युत्तर देतो तेव्हा आपण नकळत समोरच्याच्या पातळीवर उतरलेलो असतो. कधीकधी हा अपमान आपल्याला खूप काही शिकवून जातो. ज्यांनी आपल्याला कमी लेखलं ज्यांनी आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं तेच लोक कळत-नकळत आपल्याला प्रगतीची जिद्द देऊन जातात. अपमान पचवणं सोपं नसतं पण जो तो पचवून त्याचं रूपांतर ऊर्जेत करतो तोच इतिहासाच्या पानात स्वतःचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहितो.
जगातील मोठ्या क्रांती या बहुतेक वेळा कोणाचे तरी हसे उडवल्यामुळे किंवा कोणाचा तरी घोर अपमान झाल्यामुळेच घडल्या आहेत. अशा वेळी स्वतःला दोष देणं थांबवा. तुमच्या सौंदर्याची तुमच्या बुद्धीची किंवा तुमच्या कर्तृत्वाची किंमत एखाद्या व्यक्तीच्या शब्दांवरून ठरत नाही. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्यापासून हळूच दोन पावलं मागे होण्यातच शहाणपण असतं. स्वतःचा आदर करायला शिका कारण जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हा जगातील कोणताही शब्द तुम्हाला जखम करू शकत नाही. तुमचं मौन इतकं प्रगल्भ असू द्या की समोरच्याला स्वतःच्या शब्दांच्या पोकळपणाची जाणीव व्हावी. शेवटी सूर्याला कोणी कितीही दूषणं दिली तरी त्याचा प्रकाश कमी होत नाही तसंच तुम्ही तुमच्या तेजाने तळपत राहा अपमान करणाऱ्यांचे शब्द आपोआप हवेत विरून जातील. तुमच्या शांततेत इतकी ताकद असू द्या की, समोरच्याच्या शब्दांना स्वतःचीच लाज वाटली पाहिजे.
“मित्रांनो;काळजी घ्या… “
☆
© सुरेखा चिखलकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




