मुक्ता महेश अभ्यंकर
☆ “अशीही एक वटपौर्णिमा…” ☆ मुक्ता महेश अभ्यंकर ☆
हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.
माझ्या लग्नानंतर आम्ही पवना नगरला राहत होतो तेव्हा माझी लग्नानंतरची वटपौर्णिमा होती. अगदी मराठी सिनेमात दाखवतात तशी मी आठ दहा सुवासिनीं बरोबर वडाची पूजा केली होती.
त्या नंतरच्या वर्षी माहेरी वटपौर्णिमेला जायचा योग आला. नुकत्याच लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणी बरोबर गणपती मंदिरात वडाची पूजा करायला गेले.
मंदिरात पूजेसाठी खूप बायका आल्या होत्या. मंदिरा बाहेर पाच फळांचा वाटा घेऊन विक्रेते व फुलवाले बसले होते.
मंदिराच्या आत पूजेसाठी खूप सारे गुरुजी होते.
मंदिराच्या परिसरातील वडाच्या झाडाभोवताली भरजरी साड्या नेसून असतील तेवढे दागिने घालून सुवासिनींनी गर्दी केली होती.
काही सुवासिनी गुरुजींच्या सल्ल्याप्रमाणे पूजा करत होत्या. नंतर नंतर वडाभोवती पांढरा धागा गुंडाळायला गोंधळ उडाला. आपला धागा कुठला हे ही कळेनासे झाले होते. हातात येईल तो धागा बायका वडा भोवतली गुंडाळून कशीबशी प्रदक्षिणा पूर्ण करत होते. पूजेसाठी इतकी गर्दी झाली की नंतर नंतर मोठ्या रांगा कराव्या लागल्या व फावल्या वेळेत बायकांच्या गप्पा सुरू झाल्या.
त्या मोकळ्या वेळेत बायका आपल्या घरच्यांबद्दल बोलू लागल्या. खूप जणी घरात होणाऱ्या मतभेदांबद्दल सांगत होत्या. त्यातील काही जणी आपल्या सासरी होणाऱ्या त्रासा बद्दल सांगत होत्या.
काही जणींना आपल्या पती कडून योग्य मान ही मिळत नव्हता तरीही त्या पूजेसाठी आल्या होत्या. एक जन्म ही ज्याच्या बरोबर सुखाने राहू शकत नाही त्याच्या बरोबर सात जन्माची सोबत मिळण्याची पूजा करायला आल्या होत्या. सुवासिनी एकमेकांना जी फळे देत होत्या ती फळे खूप कोवळी आणि खाण्यालायक ही नव्हती.
पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर जायला मिळायचे नाही पुजेच्या निमित्ताने बाहेर जाऊन लोकांना भेटणे ह्या उद्देशाने सण वार साजरे करण्यात यायचे.
हल्ली पण वडाची फांदी तोडून सुवासिनी एकत्र जमून पूजा करतात तर काही वडाचे रोप लावून वटपौर्णिमा साजरा करतात. पण आता त्याच्या कडे एक इव्हेंट म्हणून बघितले जाते. रिल्स बनवणे स्टेट्स सारा दिखावा.
खरं तर नवरा-बायकोचे नाते विश्वास, आदर, प्रेम आणि मैत्री या पायावर आधारित असावे. दोघांनीही एकमेकांच्या भावना समजून घेऊन, सुख-दुःखात एकमेकांना खंबीरपणे साथ देणे हे एक सुखी वैवाहिक आयुष्याचे गमक आहे. असे झाले तर खरी वटपौर्णिमा साजरी झाली असे म्हणता येईल असे मला वाटते.
© मुक्ता महेश अभ्यंकर
साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे
संपर्क : सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.
फोन : ७५०६२४३०५०
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




