शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मनोगत रुख्मिणीचे! ☆ शीला पतकी 

पांडुरंगापुढची लोट गर्दी, पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झालेली पूजा… रुक्मिणी बाई जरा नाराज झाल्या म्हणाल्या… तीन वाजता कोणी उठून आंघोळ घालता का? यांची झोप अर्धवट होते… लोक या माणसाला(देवाला) झोप घेऊ देत नाहीत… बर झोप नाही ते नाही… आंघोळ तरी काय.. दही घाल… दूध घाल पाणी घाल.. मग पंचाने पूस मग तो पोशाख तो टिळा ते चंदन आणि केवढी मोठी ती तुळशीची माळा… तयार करून उभं करतात झालं…! म्हणजे हे उभेच आहेत! मी तेव्हाच म्हणलं होतं देवाला अहो नको खाली जायला नको खाली जायला पण म्हणाले “अगं अगणित भक्त आहेत आपले खाली त्याना दर्शन नको द्यायला? … आणि खरं सांगू रुक्मिणी मी दर्शन देत नाही ग मी त्यांना पाहतो… “आता या वाक्यावर काय बोलावे या माणसाला… नवरे कधी बायकोच ऐकून घेतोयत…?

खाली आलो तर एका भक्तांना वीट टाकून उभं केलं त्याच्यावर यांना. त्याची मातृ-पितृसेवा संपेना मग तेवढ्याशा विटेवरी उभे. मी म्हणल ऊभरहायला चांगली जागा तरी बघा… ते म्हणाले, ” बाई तू माझ्या फंदात पडू नकोस तू पलीकडे जा आता या विटेला तू वीट समजतेस तो त्याच्या भक्तीचा पाया आहे आणि श्रद्धा आणि विश्वासाच्या सिमेंटनं ती वीट जमिनीवर घट्ट करून ठेवली मी इथून हलू शकत नाही… “. अहो पण 28 युग झाली आपण तिथेच आहात तुम्हाला असे एवढ्याशा विटेवर उभ राहिलेले पाहून मला मोकळ चाकळ हिंडता येते का? ” तर म्हणतात कसे… ” तुझा काय कमी थाट आहे का तुझी सुद्धा पूजा नित्यनियमानं चालली आहे भरगच्च दागिने अंगावर आहेत मला खाऊ पिऊ घालण्याची जबाबदारी नाही स्वयंपाकाची कटकट नाही “मग मी फणकार्यान म्हणाले, ” तुम्हाला नाही कळायचं आम्हाला बायकांना वाटत असतं आपल्या हातून काहीतरी छान करावं आणि आपल्या नवऱ्याला बसून खाऊ घालावं… त्याने मग केलेल्या पदार्थाचं कौतुक करावं… माझ्या नशिबी मेले हे सुख नाहीच रोज परातभर गोड पदार्थाचा तो नैवेद्य कंटाळा येत नाही का हो तुम्हाला खाऊन… कधी मेल तुम्हाला माझ्या हातच खावस वाटतच नाही… “त्यावर म्हणतात कसे, “अगं ते भक्तीभावने एवढं करताय मग आपण नको का खायला? “… “अहो पण मग माझी बायको म्हणून काही भक्ती नाही का? … याना मुळी माझी किंमतच नाही” असं म्हणलं की हसतात फक्त! … मग काय बोलणार आठ दहा दिवस काही बोलायचं नाही..! एवढा मोठा प्रवास करून येणारा तो गरीब बिचारा वारकरी पाहिला की माझं मन द्रवतं मग म्हणतात कसे द्रवतं ना तुझं सुद्धा मन मग झालं तर आपल्या भक्तांसाठी एवढी तोशिश आपल्याला घ्यायलाच पाहिजे.

मला मेलीला एक काम करू लागले नाहीत कधी पण त्या जनीला दळू लागले.. कांडू लागले.. पाणी भरू लागले.. कोणाची तरी गुरं राखू लागले.. त्या सावत्याला येणं जमणार नाही म्हणून त्याच्या शेतावर गेले. दर्शन द्यायला..! हे सगळं जमतं या माणसाला पण बायकोला वेळ देणं अजिबात जमत नाही. म्हणून मी गेले एकदा रुसून आणि जाऊन चिंचबनात बसले… मग मात्र जरा यांचं धाब दणाणल… मग विनवणी केली त्यांनी मला म्हणाले… चल बाई चल शेजारी उभी रहा तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे ग… तुझ्या जीवावर तर मी एवढ्या भक्तांवर प्रेम करतो. भक्तांवरचं त्यांचं प्रेम पाहिलं ना.. लंगडी खुळी पांगळी अतिशय गरीब घरी डोक्यावर छप्पर सुद्धा पुरेसं नाही अशी माणसं खांद्यावर पताका घेऊन यांच्या ओढीने… पायात चप्पल सुद्धा नसते… एवढा रस्ता चालत येतात… ते माझ्या पतीला भेटायला…! आणि मला पटतं माझ्या आधी माझ्या नवऱ्यावर त्यांचा हक्क आहे…! मग म्हणते उभे राहा उभे राहा आणि द्या सगळ्यांना दर्शन…! आशीर्वाद द्या त्यांना… आता तुम्ही त्यांचे बाप झाला की मला आई होण भागच आहे. अर्थात तुमच्यामुळे हे भाग्य मला मिळते याची मला जाणीव आहे अहो रुसले रागवले म्हणून काय झालं आपल्या नवऱ्यावर प्रेम करणारी जगातली इतकी अफाट माणसं आहेत हे पाहून कोणत्याही बाईला अभिमानच वाटतो… पण देवा मी पण तुमची भक्त असं समजून मला थोडा वेळ द्या एवढी बायको म्हणून विनंती आहे तुम्हाला…! ऐकेल ना अहो ऐका ना…!

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted