मंजुषा सुनीत मुळे
☆ “लाहोर की मिट्टी.. ” – लेखक : श्री अमरनाथ सिंग ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆
माझी आई पंजाबी ड्रेस घालायची. साडी किंवा लुगडं नेसणाऱ्या बायांमध्ये ती वेगळीच दिसायची. मला ते खूप खटकायचं. असं वेगळं दिसणं मला अजिबात आवडायचं नाही. मी लहान असतांनाची ही गोष्ट. मी लाडीगुडी लावायचो, कधी कधी हट्ट करायचो, साडी नेस म्हणून. तिला काही ते जमलं नाही.
○
तिचं लग्न झालं तेव्हा ती घागरा-कुर्ता घालायची. हरियाणाचा हा पारंपरिक वेश आहे. तिकडे गावी सोनिपतला असतांनाची ही गोष्ट. लग्नात माझ्या नानांनी तिला अकरा किलो चांदीचे दागिने दिले होते. घागरा-कुर्त्यासह एव्हढे दागिने अंगावर ती कसे वागवत असेल या विचारांनी आम्ही अचंबित व्हायचो. मग जेव्हा इकडे आली महाराष्ट्रात, तेव्हा पंजाबी ड्रेस घालू लागली. तिला मग त्याचीच सवय झाली. नंतर तिला पेहराव बदलणं जमलंच नाही. आयुष्यात एकदाही तिने साडी नेसली नव्हती.
○
महाराष्ट्राचे परिधान नाही पण भाषा मात्र तिने पुरेपूर आत्मसात केली होती. घराबाहेर तिचा सगळा जीवनव्यवहार मराठीतच चालायचा. नंतर सगळ्या बहिणींच्या बाबतीतही अगदी असंच घडलं.
○
आईच्या मैत्रिणी सगळ्या मराठी बोलणाऱ्या बाया होत्या. ती त्यांच्याशी उत्तम मराठीत बोलायची. नर्सरीत कामाला जायची. ही नर्सरी (नाशिक जिल्ह्यात) वैतरणा धरणाच्या जवळ होती. ७२च्या दुष्काळात आईची पाटबंधारे खात्यातील नोकरी गेली. वडिलांच्या एकट्या नोकरीवर घर चालणे कठीण होते. दोन बहिणी लग्नाच्या होत्या. नर्सरीत रोजंदारीवर ती जाऊ लागली.
○
मी दुसरीत असेन. तिच्या सोबत कधी कधी नर्सरीत जायचो. दुपारी सगळ्या बाया रिंगण करून जेवायला बसायच्या. सगळ्यांच्या पुरचुंड्या आणि डबे मधोमध मांडले जायचे. ज्वारी-बाजरी-नाचणीच्या भाकऱ्या, लसणाची चटणी, बेसन, ठेचा, कांदा, मुळा, मेथी, कांद्याची पात, भाजलेले शेंगदाणे… त्या सगळ्या गप्पा मारता मारता आवडीने जेवायच्या. कष्टकरी समूहाचे एकमेकांशी वाटून खाण्याचे ते दृश्य माझ्या मनावर कायमचे कोरलं गेलं आहे.
○
धृपताबाई आईची मैत्रीण. दोघी शनिवारी नाशिकला जाऊन फळं आणि भाज्या आणायच्या. रविवारच्या आठवडे बाजारात दोघी ते विकायच्या. शेजारी-शेजारी जमिनीवर दुकान मांडली जायची. सगळा व्यवहार मराठीत चालायचा. एक काष्टेवाली आणि एक पंजाबी ड्रेसवाली अशा या मैत्रिणी सगळ्यांच्या खूप परिचयाच्या होत्या.
○
सकाळी लक्ष्मीबाई दूध घालायला यायची. लुगड्यातली लक्ष्मीबाई, तिच्या कपाळावरील भलं मोठं कुंकू, नाकातील नथ आजही ठळक आठवते. सगळ्यात शेवटी ती आमच्याकडे यायची. किटली-कळशीत शिल्लक असलेलं सगळं दूध बळंबळं घालून जायची. आई तिला कप-बशीत चहा द्यायची. एका हाताने हळूच नथ बाजूला सारून बशी ओठाला लावून ती जोरात फुरका मारायची. फुरक्याचा तो आवाज अजूनही कानात गुंजतो. चहा झाला की त्या दोघी सुख-दुःखाच्या गोष्टी करत घटकाभर बसायच्या.
○
माझा जन्म इथे महाराष्ट्रात झाला. इथेच वाढलो. आसपास मराठी वातावरण होतं. आम्ही सगळी बहीण-भावंडं मराठी माध्यमातून शिकलो. त्यामुळे आम्ही सगळे उत्तम मराठी बोलू लागलो. आज मी सगळं वाचन-लेखन मुख्यतः मराठीतच करतो. हे मला आपसूकच मिळालं आहे. आसपासच्या वातावरणातून.
○
आश्चर्य वाटतं मला आईचं. तिचा जन्म लाहोरचा. फाळणीनंतर उसळलेल्या दंगलीत जीव वाचवून त्यांचं कुटुंब इकडं आलेलं. फाळणीच्या काळात आई अकरा वर्षांची असेल. तसं कळतं वय होतं तिचं. तेव्हा तिला दोन भाषा यायच्या, घरात बोलली जाणारी हरियाणवी आणि आसपास मोहल्ल्यात बोलली जाणारी पंजाबी.
○
पुढे दहा बारा वर्षे हरियाणात गेली. नंतर तिचं लग्न झालं अन रोजगाराच्या शोधात ती वडिलांसोबत महाराष्ट्रात आली. अंगावरच्या कपड्यानिशी ते आले होते. हरियाणवी आणि पंजाबीशिवाय त्यांना इतर कोणतीही भाषा येत नव्हती. मराठीचा एक शब्दही त्यांनी ऐकलेला नव्हता.
○
त्यांचा पहिला ठिकाणा नगर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातला घोडनदी प्रकल्प. पाटबंधारे खात्यात रोजंदारी कामगार म्हणून लागले. पुढे सेवेत पर्मनंट झाले. तिथे जवळपास एक दशक राहून बदली होऊन ते आले नाशिक जिल्ह्यात वैतरणानगरला. तिथे आणखी एक दशक राहिले. मग परत बदली झाली ठाणे जिल्ह्यातील सुर्याप्रकल्पावर. तिथे २००० साली ती सेवानिवृत्त झाली. तिथून पुढचा काळ देहूरोडला. २०१५ ला पुण्यात माझ्याकडे असतांना तिचा मृत्यू झाला.
○
अर्ध्या शतकाचा हा महाराष्ट्रातला तिचा रहिवास. या काळात अगदी पहिल्या टप्प्यातच तिने मराठी आत्मसात केली. वडील सुद्धा चांगलं मराठी बोलायचे. पण आईसारखं अस्खलित नाही.
○
आईने मराठी कशी आत्मसात केली असेल. तिला प्रेरणा नेमक्या कशा मिळाल्या असतील. ती पूर्ण निरक्षर होती. नवी भाषा शिकण्याची प्रक्रिया तिच्या अंतःकरणात नेमकी कशी घडली असेल, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा मला ती गेल्यानंतर निर्माण झाली. आयुष्याच्या धावपळीत बरेच तपशील असेच सुटून जातात. नंतर त्याचं महत्व जाणवतं. मग जीव हळहळत राहतो.
○
भाषा आत्मसात करतांना नेमकं काय घडलं होतं आईच्या बाबतीत? आज ते कसं कळणार? आता केवळ आठवणी उरल्या आहेत. मी आठवणींचा धांडोळा घेऊ लागतो. मागे मागे जाऊ लागतो. मला तिचे शब्द आठवतात.
○
ती म्हणायची,
“बेटा, जिस मिट्टी में उगा अन्न खाते हैं,
जहां का पाणी पिते हैं,
वहां की बाणी (भाषा)
म्हारी नस नस में बस जाणी चेईये. ”
अशी नाळ जुळली होती मायची अन मराठीची!
○
जवळपास पन्नास वर्षे महाराष्ट्रात राहून ती खऱ्या अर्थाने मराठी मातीची लेक बनली होती. शेवटी या मातीत ती सामावली.
○
आम्ही तिचं अस्थी विसर्जन देहूगावला इंद्रायणी नदीत केलं.
#लाहौर_की_मिट्टी
#इंद्रायणी_के_जल_में_समा_गयी
–
☆
लेखक : अमरनाथ सिंग
प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







