मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “तुझ्यासारखा तूच मित्रा.. ”  ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

यावर्षी ३० जुलै आणि २ ऑगस्ट अशा दोन दिवशी “ मैत्रीदिन “ साजरा केला गेला. तसा बरेचदा तो असाच दोन वेळा जगात साजरा केला जातो, आणि याचे कारण असे की ३० जुलै ही तारीख “ UN International Day of Friendship “ म्हणून जागतिक पातळीवर ‘मैत्रीदिन’ म्हणून साजरी केली जाते. तर दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी.. जो यावर्षी २ ऑगस्ट रोजी होता.. भारत, अमेरिका, आणि यू. के. मध्ये ‘ मैत्रीदिन ‘ साजरा केला जातो.

… दरवर्षीप्रमाणे यंदाही, उपलब्ध असलेल्या सर्व सामाजिक माध्यमांवरून या दोन्ही दिवशी शुभेच्छांचा मुसळधार पाऊस पडला आणि मैत्रीला चिंब भिजवून गेला… आनंद आणि समाधान दोन्ही भरभरून देऊन गेला.

… वाचता वाचता सहजच असं लक्षात आलं की अशा बहुतेक सर्व शुभेच्छा “ मैत्री “ चे महत्व, प्रत्येकाच्या आयुष्यात तिची असणारी आवश्यकता, आणि अर्थातच त्यामागची कारणं, ‘मैत्री’ या शब्दाशी मूलतःच जोडल्या गेलेल्या भाव-भावना, आणि त्या भावनांबद्दल व्यक्त करावीशी वाटणारी कृतज्ञता … हेच सगळं ठळकपणे सांगणाऱ्या होत्या.. नेहेमीसारख्याच…आणि यात आक्षेप घेण्यासारखं खरोखरच काहीच नाही.

पण एका सुहृदाने मात्र मला एक हिंदी कविता पाठवली होती जी फक्त मैत्रीबद्दल न बोलता, स्वतःच्या एका जिवलग मित्राला उद्देशून लिहिलेली होती…भावना त्याच पण व्यक्त करण्याची पद्धत वेगळी.. आणि त्यामुळे अर्थातच ती मनाला फार भावली … त्या मित्राच्या आपल्या आयुष्यात असण्याबद्दल.. व्यक्तिशः त्याच्याबद्दल वाटणारा विश्वास आणि त्याच्याबद्दल मनात सतत असणारी कृतज्ञतेची भावना ठळकपणे व्यक्त करणारी ती कविता … आणि म्हणूनच त्या कवितेचे हे वेगळेपण मनाला थेट भिडले.

…. आणि त्या कवितेचा स्वैर भावानुवाद करण्याचा मोह टाळताच आला नाही.

हिंदी कवी श्री. विजय सिंह चौहान यांच्या.. ।। तुमसा कोई नहीं ।।.. या हृद्य कवितेचा हा स्वैर भावानुवाद ……

☆ तुझ्यासारखा तूच मित्रा.. ☆

भेटण्यासाठी कुठलंच कारण नको 

अन गप्पा मारण्यासाठी एखादा विषयही नको 

शब्दांचं अवडंबर नको… बस् फक्त तुझा आपलेपणा पाहिजे 

बाकी काहीच नको रे मित्रा …

 

मन जेव्हा मनाशी जुळतं..

नातं आपसूकच विणलं जातं 

मग कितीही वर्षं का उलटेनात..

मनात उजळणारे स्नेहाचे दिवे विझू शकतच नाहीत रे मित्रा …

 

भेट कितीही दिवसांनी होवो..

डोळ्यात तो पूर्वीचाच विश्वास असतो 

मग काही न बोलताही खूप काही बोललं जातं 

मनातल्या मधुर संवेदना एकमेकांच्या मनाला लगेच जाणवतात मित्रा …

 

कुठलाही स्वार्थ नाही.. कसलीच अपेक्षाही नाही 

फायदा- नुकसान याचा हिशोब तर नाहीच नाही 

तूच तो मित्र जो सदैव सोबत उभा असतोच असतोस 

प्रत्येक सुखाचे वा दु:खाचेही उत्तर तूच देऊ शकतोस मित्रा …

 

अशा तुझ्या सुंदर पवित्र मैत्रभावनेला माझा मनापासून सलाम मित्रा 

माझ्या मनातल्या मनात तुझा सततच सन्मान मित्रा 

हे आपलं मैत्रीचं घट्ट नातं आयुष्यभर असंच दरवळत राहू दे..

माझा-तुझा स्नेह अविनाशी आणि विश्वास असाच अतूट राहू दे मित्रा… 

खरंच.. तुझ्यासारखा फक्त तूच मित्रा…

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted