गौरी गाडेकर
मनमंजुषेतून
☆ पिशव्यांची पिशवी!… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆
☆
मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्यं असतात – – –
.. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं.
.. घरात कुठेतरी एक डबा असतो, ज्यात स्क्रू, खिळे, रबरबँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट असतात.
आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते— पिशव्यांची पिशवी!
तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं.
…… भाजीची पिशवी आली—आत.
मेडिकलची आली—आत.
कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन—
“ही ठेव हं. चांगली आहे!”
आता आपल्या घरात ‘चांगली पिशवी’ ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही, ती चांगली!
कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुगते की दारामागून बाहेर डोकावू लागते.
…. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो,
“एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? ”
त्यावर उत्तर येतं,
“तुला काय त्रास होतोय? राहू दे. कधी तरी लागतील!”
मध्यमवर्गीय संसारात ‘कधी तरी’ या दोन शब्दांनी जेवढी जागा व्यापली आहे, तेवढी बहुधा फर्निचरनेही नाही.
दहा वर्षांपूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्टसुद्धा इतिहासजमा झाला—पण चार्जर आहे.
दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे. त्यात मिठाई नाही. सध्या काहीच नाही. पण डबा फेकायचा नाही… कारण? “चांगला आहे!”
आणि एक शर्ट आहे. तो सध्या बसत नाही.
पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही.
“पाच किलो कमी झालं की होईल!”
तो शर्ट कपडा नसतो. तो आशावादाचा पुरावा असतो!
मला कधीकधी वाटतं, आपण वस्तू साठवतच नाही.
आपण ‘कधी तरी’ साठवत असतो.
.. कधी तरी लागेल.
.. कधी तरी उपयोग होईल.
.. कधी तरी वेळ मिळेल.
.. कधी तरी मी पुन्हा तसा होईन.
आणि मग एक दिवस जाणवतं—
आपल्या मनातसुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे.
.. दहा वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे.
.. पाच वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे.
.. एक निर्णय चुकीचा घेतला होता, तो आहे, त्याचं गिल्ट आहे.
.. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं, त्याची अपेक्षा आहे.
.. आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय!
…. कशासाठी?
.. बहुधा…“कधी तरी लागेल!”
भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात—
विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥
“माझं’ म्हणून प्रत्येक गोष्ट घट्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही, तोच शांततेकडे जातो.
गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही.
…. ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते.
कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते.
…. मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं.
…. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा—सगळंच ‘कधी तरी लागेल’ म्हणून जपून ठेवलं, तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे?
कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे. तर कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं, हे ठरवता येणं.
.. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली, तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया.
.. मनातली पिशवी |
…. उपयोगाचं असेल ते ठेवू… शिकण्यासारखं असेल तेही ठेवू.
बाकीचं?
सरळ टाकून देऊ.
…… कारण प्रत्येक गोष्टीला—
“कधी तरी लागेल!”.. असं म्हणत राहिलो, तर एक दिवस *आज* ठेवायलाच जागा उरणार नाही.
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





