डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “ते शेवटचं गळणारं पान…!!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

खूप वर्षांपूर्वी वाचलेली एक कथा, आज मुद्दाम इथे सारांश देत आहे…

एक लहान मुलगी दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळून असते, ती काहीच दिवसांची सोबती आहे, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं.

पानगळीचा ऋतू येतो, मुलीला खिडकीतून दूरवर एक झाड दिसत असतं, या झाडाची एक एक करून रोज पानं गळून पडत असतात.

का कोण जाणे, पण या लहान मुलीला वाटतं, गळणाऱ्या या एकेक पानाप्रमाणे माझं आयुष्य सुद्धा एक एक दिवसांनी कमी होत आहे. जेव्हा या झाडाची संपूर्ण पाने गळून पडतील तेव्हा माझा सुद्धा मृत्यू झालेला असेल.

मुलीचे आई वडील सुद्धा मुलीसाठी दररोज झुरत असतात…

एके दिवशी “तो” दिवस येतो, झाडाची सर्व पानं गळून आता फक्त एकच पान शिल्लक राहिलेलं असतं…

मुलीला वाटतं माझा सुद्धा एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे. झाडावरचं हे शेवटचं पान आता उद्या सकाळी गळून पडणार आणि त्याचबरोबर मी सुद्धा…!

या विचाराने, ती खचून जाते, आई-वडील आणि हे सर्व जग आपण कायमचं सोडून जाणार या विचाराने अस्वस्थ होते… तळमळते… खचून जाते, धाय मोकलून रडते…!

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मुलगी झाडाकडे पाहते, पान गळून पडलेलं नसतं, ते तिथंच असतं. पान गळून पडलं नाही म्हणजे आपण अजून जगणार… या विचाराने तीच्या मनातल्या आशा आणि जगण्याची उमेद प्रफुल्लित होते…

पुढे दुसरा तिसरा चौथा पाचवा… दिवसांवर दिवस जात असतात, परंतु शेवटचं ते पान कधीच गळून पडत नाही…

मुलीचा जगण्याचा उत्साह वाढतो…

कित्येक महिने जातात, निसर्ग नियमाप्रमाणे झाडाला पुन्हा पालवी फुटते, नवीन पानं येतात… पुन्हा पानगळ होते, तरीही शेवटचं ते पान गळून पडत नाही…

जितकी नवीन पानं फुटली आहेत, तितक्या दिवसांचं माझं आयुष्य मला पुन्हा मिळणार, असा विचार मुलगी करायला लागते… पानगळीनंतर जशी नवीन पाने फुटली, तसे माझ्याही आयुष्यातले दिवस वाढतील, या एका विचाराने मुलगी पुढे अनेक वर्ष आई-बाबांबरोबर जगली…

मुलीच्या आईने एके दिवशी मुलीच्या बाबांना प्रश्न केला, ‘हा चमत्कार घडला कसा? शेवटचं ते पान पानगळीत सुद्धा गळून पडलं नाही आणि इतक्या वर्षानंतर, जीर्ण होऊन सुद्धा झाडावर अजून कसं टिकून आहे?

“बाप” नावाचा तो “माणूस” उलगडा करतो…

शेवटचं ते पान राहिलेलं असताना, मुलगी रडून झोपी गेल्यानंतर, भल्या पहाटे तो त्या झाडाजवळ जातो, झाडाला मनापासून नमस्कार करतो. आणि शेवटचं जे एक पान राहिलेलं असतं, त्या पानाला तो फांदीला डिंकाने चिटकवून टाकतो, सुतळीने घट्ट बांधून टाकतो, अशाप्रकारे की ते पान कधीही पडू नये…!

दोघेही मग एकमेकांच्या गळ्यात पडून हमसून रडायला लागतात…!

कथा इथे संपते… कथा वाचून आपलेही डोळे भरून येतात…!

कथा इथे संपते परंतु विचार चक्र सुरू होतात…

आपण फक्त श्वास, अन्न आणि पाण्यावर जगत नाही, तर जगण्यासाठी लागते एक आशा – उमेद नावाची ज्योत…!

पराभूत होणं, म्हणजे हरणं नसतं…!

लढायच्या आधीच माघार घेणं, म्हणजे हरणं…!!

पडल्यानंतर उठून उभंच न राहणं, म्हणजे हरणं…!!!

प्रत्येकाच्या आयुष्यात पानगळ येते, आणि ते शेवटचं गळणारं पान सुद्धा…

अशावेळी गळणाऱ्या पानाबरोबर आपण गळून जायचं नसतं…

आपल्यासाठी सुद्धा कोणीतरी येऊन पान फांदीला चिटकवेल याची वाट न पाहता, गळणारं ते पान, स्वतःच उठून, फांदीला चिटकवून, हसत हसत जगायचं…!

परंतु आशा आणि उमेद हरवलेल्या, दुसऱ्याचं गळणारं ते पान मात्र पुढे होऊन आपणच चिटकवायचं… आणि एका क्षणी बाप होऊन जायचं… कुणासाठी आपणच आनंदाचं झाड व्हायचं…!!!

आपण ते दर वेळीच करता, दरवेळी आपणही कुणाचे तरी आईबाप होता… आनंदाचे झाड होता… मी अशा घटनांचा फक्त साक्षीदार असतो.

आपण सर्वांनी मिळून केलेल्या आणि मी प्रत्यक्ष पाहिलेल्या या घटना लेखाजोखाच्या स्वरूपात आपणास सविनय सादर!

  1. या महिन्यात अनेक गंभीर रुग्णांबरोबरच, त्याहून गंभीर असणारे दोन तरुण… या सर्वांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. दोघांपैकी एकाला मदर तेरेसा होम मुंबई येथे काही दिवसांकरिता आरामासाठी (Recovery) ठेवले आहे, दुसऱ्याला त्याच्या मूळ गावी सोलापूर जिल्ह्यात पाठवले आहे.

त्यातला एक जण बऱ्यापैकी शिकलेला आहे, आश्रमात पोहोचल्यावर तो म्हणाला, ‘डॉक्टर आता बरा झालो की माझा बोजा मी तुमच्या डोक्यावर ठेवणार नाही… ‘

त्याला म्हणालो, ‘तू माझा बोजा किंवा भार कधीच नव्हतास, हां, तुझी जबाबदारी मात्र माझ्या डोक्यावर होती. ‘

‘भार आणि बोजा लादलेला असतो, जबाबदारी मनापासून स्वीकारलेली असते…! ‘

  1. रस्त्यावर भेटलेल्या, हातापायाने अधू झालेल्या आई-वडिलांना कमरेचे – मानेचे पट्टे, औषध गोळ्या, कुबड्या, काठ्या, वॉल्कर अशी सर्व वैद्यकीय साधने देऊन उपचार केले आहेत.
  2. घरातून बाहेर काढल्या गेलेल्या किंवा त्रासाला कंटाळून स्वतःहून बाहेर पडलेल्या अनेक प्रौढ आणि वृद्ध मावश्यांना एकत्र करून त्यांच्याकडून अस्वच्छ भागाची स्वच्छता करून घेत आहोत, अशा सर्वांची आम्ही टीम तयार केली आहे या टीमला “खराटा पलटण” असं नाव दिलं आहे. या महिन्यातील सणवार लक्षात घेता, स्वच्छता करणाऱ्या या लोकांच्या मुखी काहीतरी गोडधोड जावे, या भावनेने प्रत्येकाला पाच पाच किलो साखर दिली आहे.
  3. या वेळच्या पावसाने धरणं भरली, तसे अनेकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी भरलं… रस्त्यावरचे अनेक संसार उध्वस्त झाले. अशा अनेकांना आपल्या सर्वांच्या वतीने किराणा, तसेच छत्री आणि रेनकोट दिले आहेत.

वर सांगितलेल्या लोकांच्या आयुष्यात जशा अवघड वेळा आल्या तशा, आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अशा अवघड वेळा, कधी ना कधी येतच असतात. त्याच्या घटना – प्रसंग – स्वरूप – गांभीर्य वेगवेगळं असू शकतं.

आयुष्यात आलेली ही अवघड वेळ “काट्यासारखी” खुपते… पण आलेली ती वेळ मात्र त्यावेळी मारून न्यायची असते…

कारण सर्वात जास्त घाई कुणाला असते तर ती वेळेला…

“वेळ” कधीच खूप वेळ थांबत नसते, मग ती चांगली असो की वाईट…!

वेळ दाखवणाऱ्या घड्याळात सुद्धा फुलं नाही, तर “काटेच” असतात… हे जळजळीत सत्य आहे…

म्हणजे वेळेला सुद्धा “काटे” चुकलेले नाहीत…!

आणि म्हणून… आती रहेंगी बहारे… असं गुणगुणत, पुढं फुलंही वाटेत भेटतील, या आशेनं, काट्यासारखी खुपणारी तेव्हढीच ती वेळ, निभावून न्यायची बस्स…!

  1. या महिन्यात डॉ. सलीम शेख सर म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय डॉ APJ अब्दुल कलाम सर यांचे नातू (त्यांच्या बंधूंच्या मुलाचे चिरंजीव) यांची अत्यंत जवळून आणि भावपूर्ण अशी भेट झाली. या भेटीचा सविस्तर वृत्तांत ग्रुप वर अगोदरच दिला आहे.
  2. या महिन्यात, मधूनच शाळा सोडलेल्या तीन मुला मुलींना त्यांच्या पालकांशी संवाद साधून पुन्हा शाळेत घातलं आहे. यातील एका मुलीला नर्सरी मध्ये घातलं आहे. शाळेत जाताना ही चिमुरडी, हसत हसत जाते. शाळेत जाताना कायम रडा रड करणारा मला मात्र मी आठवतो.
  3. याच महिन्यात अनेक जीवाभावाच्या वृद्ध व्यक्ती कायमच्या सोडून निघून गेल्या. आयुष्य हे भाड्याची खोली आहे, कधीतरी खाली करावीच लागणार…! हे वारंवार सिद्ध होतं…

मरणाने सुटका केली… जगण्याने छळलं होतं…!!!

या ओळी जणू यांच्यासाठीच लिहिल्या गेल्या…

पण पोटच्या लेकराप्रमाणे त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, माया केली, मी त्यांना कधी विसरू शकणार नाही…

 “काळ, जात” राहील… मात्र “काळजात” कायम राहतील, त्यांच्या त्या सुगंधी आठवणी…!

  1. ज्यांना भारताचा नागरिक सोडाच, माणूसही समजलं जात नाही, अशांना एकत्र करून, आम्ही सर्वांनी 15 ऑगस्ट रोजी ध्वजाच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता करून, ध्वजाला वंदन केले.

देश प्रेमाची ही ज्योत त्यांच्याही मनात अखंड तेवत राहील.

खरंतर आमच्याकडच्या या सर्व लोकांना रस्त्याकडेचे दगड धोंडे समजलं जातं, हरकत नाही…

झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याला एक मधुर नाद असतो, पण हा नाद निर्माण होतो, झऱ्यात असलेल्या त्या दगड धोंड्यांमुळेच…!

  1. रस्त्याकडेला जे पडून होते त्या सर्वांना रोज जेवण दिले आहे. अति गरीब रुग्ण ज्यांना डबा आणून देणारं कोणीही नाही अशा सर्वांना हॉस्पिटलमध्ये जाऊन जेवण दिलं आहे.

असो,

कुणाला तरी सोडणं, कुणाला तरी ढकलून पाडलं हा “क्षणाचा खेळ” आहे…!

पण कुणाला तरी जोडणं, कोणालातरी उचलणं हा “आयुष्याचा मेळ” आहे…!!

ज्यांना कधी पाहिलेही नाही, अशा सर्व बांधवांसाठी आपण आपल्या घासातला घास काढून देत आहात, त्यांना हात देत आहात. खऱ्या अर्थाने आपण आयुष्याचा मेळ घातला आहे!

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted