डॉ. मधुवंती कुलकर्णी
☆ क्षण सृजनाचा ☆ शेतकऱ्यांच्या मनातील गुंता ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆
ही जुनी गोष्ट आहे.माझं लग्न 7 जून 1987ला झालं आणि मी सासरी म्हणजे बहुले, ता.पाटण,जि.सातारा इथं आले.सहा महिन्यांनी 31 डिसेंबर आला.त्यावेळी आम्ही घरातील सह्याद्री दूरदर्शनवरील कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत असायचा तो पहात असू.दोनच राष्ट्रीय चॅनल त्यावेळी होते.
सासरी सतरा एकर शेती घरीच करत असल्यामुळे गडी माणसांचा राबता होता.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायही होता.घरात कॅलेंडर कुठेतरी असायचे.पंचांगाचा वापरच सर्रास होत असल्याने सणवार,तिथी सर्व व्यवस्थित कळायचे.साजरे व्हायचे.गाव हे तसं स्वयंपूर्ण होतं.म्हणजे माळी,सुतार,लोहार,न्हावी ,शिंपी इ.यांनी काम केले की त्यांना धान्य, भुईमूग शेंगा असं दिलं जायचं.अशिक्षित लोकांना वेळेला सावकार लोक असायचे.त्यामुळे बॅंक व्यवहार त्यांना क्वचित माहित होते.
ही कविता या पार्श्वभूमीवर सुचली.31 डिसेंबरचा कार्यक्रम पाहून झाला.एक तारीख गेली.दोन तारखेच्या सकाळी गावाला गेलेला एक गडी रघू परत आला.तो धारा काढायला मदत करायला येत असे.त्याला मी “Happy New year रघू “असं म्हणाले.तो क्षणभर बघतच राहिला.त्याला वाटलं वहिनींनी काही तरी काम सांगितले आहे पण कळलं नाही म्हणून म्हणाला”वहिनी,काय म्हनला तुम्ही कळलं न्हाय” मी पुन्हा Happy New year म्हणाले.तो म्हणाला” ते काय असतं ?”मला हसायला आले.सगळे हसायला लागले.मग मी म्हणाले.”अरे, नविन वर्ष सुरू झालं ना काल.ते सुखाचे जावो असं म्हणलं.”मग तो म्हणाला “काकांनी पंचांगात बगून(माझे सासरे)तसं कायबी सांगितलं नाय.”
मग मी त्याला सर्व माहिती सांगितली.त्यावर त्यानं दिलेलं उत्तर”आवं रोजची कामं काल बी हुती,आज बी हायत, उद्या बी असनार.कशाचं नवीन वरीस आन् काय.हां पुरनपोळी करायची हाय काय मंग हिला सांगतो करायला .”उत्तर साधं होतं. पण मी मात्र त्यांवर विचार करायला लागले .आजही ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.शेतकर्यांना आजही हा जल्लोष वगैरे माहित नाही.त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते त्यामुळे विचार क्षेत्रही.त्याचा विस्तार व्हायला हवा.हे उत्तर मी कवितेत शब्दबद्ध केले आहे.
☆
काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं
म्या गेलो गोठ्यात.श्यान भरलं,टाकलं
गुरास्नी चारा टाकला.न्याहरी केली.
शेतात गेलो बैलं घेऊन कोळपलं.
*
काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं
म्या गेलो गोठ्यात धारा काढल्या
किटल्या भरल्या,वैरन टाकली.
कारभारणीला घेऊन शेत भांगललं.
*
काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं
म्या दूध घालून परत आलो
कारभारणीनं केलेला च्या पिला
घेतला ईळा काढली वैरन
*
काल नवीन वरीस सुरू झालं म्हनं
दिस मावळायला आला
गुरास्नी चारा पाणी झालं
ढगाआड सुर्व्या लपला
काल बी असंच,उद्या बी असंच,
आज येगळं काय झालं?
*
तिकडं बी परदेशात अंधार झालाच की
समदी कामावरनं घरला आलीत की
काल,आज, उद्या त्यास्नी राबायचं हायच की
घरात बाहेर कुटबी काम्पुटर हायच की
*
मंग नवीन वरस सुरू झालं म्हनं मंजी काय झालं?
आज, उद्या आन् परवा धारा हायत्याच की.ईळा बी हाय.भांगलायचं बी हाय.
आन् गुरास्नी वैरन ती कुटं जाती?कापायची हायच की.
भाकर तुकडा हायच की.झाडाखाली सुखानं पडायचं हायच की
*
मंग नवीन वरीस सुरू झालं मंजी काय झालं? काय आलं आनि काय गेलं?
मंजी काय झालं?
☆
© डॉ. मधुवंती कुलकर्णी
जि.सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





