पुष्पा चिंतामण जोशी
☆ जीवनरंग ☆
☆ चौफुला… – भाग – २ – ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆
(आत्ताच्या जमान्यात आपण हौसेने घेतलेली मग मोठी तांब्या पितळेची भांडी निरुपयोगी आहेत हे तर खरंच. नूतनचीही आता साठी होईल. तिची सून सुजाता अगदी टापटीपीची आहे. नूतनचा नातूच आता वर्षाचा होईल.) – इथून पुढे – –
सुजाताचं नाव निघाल्यावर मागच्या वर्षीचा प्रसंग आठवून त्या तिघी हसू लागल्या. सुजाताच्या डोहाळे जेवणासाठी म्हणून वत्सला नूतनकडे गेली होती. डोहाळे जेवणाच्या दुसऱ्या दिवशी जरा पाय मोकळे करायला, देवळात जायला म्हणून वत्सला बाहेर गेली तर वेड्यावाकड्या उंच स फुटपाथ वर अडखळून पडली. हाताला थोडं फ्रॅक्चर झालं. नातवानं आजीला घराजवळ असलेल्या नर्सिंग होम मध्ये दाखल केलं होतं. डॉक्टर ओळखीचे होते या ८० च्या जवळ आलेल्या आजींच्या हाताला प्लास्टर घालायचा आधी केलेल्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्याच पाहून डॉक्टरांनीच आजींचं अभिनंदन केलं होतं. चार दिवस तिथे नर्सिंग होम मध्येच राहायचं ठरलं.
वत्सला पुढे म्हणाली, हॉस्पिटलमध्ये चार दिवस आणि नूतनकडे जेमतेम चार-पाच आठवडे काढून प्लास्टर काढल्यावर नूतनला इकडेच पोचवायला लावलं मला. आपल्याच मठीत बरं वाटतं ग!तुम्ही तिघी आणि बाकी इथली नेहमीची सगळी माणसं होती मदतीला. छान बरी झाले लवकर. एक सांगू का आपल्याच दुखण्याचा बाऊ करत बसायचं नाही. सोशिकपणे गुपचूप झोपून चांगली विश्रांती घ्यायची. आपलं आपल्याला आतून बरं करण्याची उमेद धरायची म्हणजे चटकन बरं वाटतं. मुक्या जनावरांच्या दुखण्याखुपण्याला कोण असतंय? त्यांची ती नैसर्गिक बरी होतात. तसंच!
हो ग अगदी बरोबर बोललीस. आणि खरं सांगू का आता आपल्याला एकटं स्वतंत्र राहायची सवय झालीय. ते सकाळी उठून भांड्यांचे आवाज, कुकरच्या शिट्ट्या, लहान मुलांचे हट्ट, रडणं काऽऽही नको वाटतं आता. इंदू म्हणाली.
पण आता दोन-तीन वर्ष तरी म्हणजे हे नवीन बांधकाम होईपर्यंत आलटून पालटून मला सुरेश आणि साधनाकडे राहावं लागेल. ती दोघं आणि त्यांच्या घरची अगदी अगत्यानं करतात आणिआता आपलं तरी काय? आपल्यानंतर ही नवी जागा आपल्या वारसांनाच मिळणार आहे. पन्नास वर्षांपूर्वी या जागेसाठी किडूकमिडूक विकून शिल्लक खर्ची घालून इथे पैसे भरायचा धीर केला म्हणून हे दिवस दिसत आहे. आपण दोघींनी लाडू पोळ्या करून विकल्या. सुशीनं कॉलनीतील नोकरी करणाऱ्या लेकीसुनांची मुलं सांभाळली म्हणून आपल्या मुलांचे शाळा कालेज क्लासेस सारं निभावलं. बाबी तर काय वधू वर मंडळ, महिला मंडळ, सगळे उत्सव, साऱ्यांमध्ये मदतीला तत्पर! मुलं-मुली चांगली निघाली हे मात्र आपलं नशीब.
तेवढ्यात फोन वाजलाच. सुशील तिच्या पंचाहत्तरीची तारीख सांगितली. मग लता म्हणजे सुशीची मुलगी बोलली. या तिघी मावशींनी आठ दिवस तिच्याकडे राहायचं आमंत्रण दिलं. आणि सांगितलं की तुमच्यासाठी सिंगापूर ट्रीपची चौकशी करून आले. आता तुम्हाला बिल्डरकडून ॲडव्हान्स भाडं मिळेल. जरा मजा करून या चौघी मैत्रीणी. वत्सला तिला म्हणाली, अगं तुझी कल्पना छान आहे पण झोपेलाना आम्हाला ते सगळं, तो विमान प्रवास ?
झकास झेपेल. आयुष्याचा प्रवास कणखरपणे केलात. आता ही मजेची ट्रीप करून या चौघी मैत्रिणी. लता म्हणाली. वत्सलानाने बाबीजवळ फोन दिला. तर बाबीने खुसूखुसू हसत, बरं बघूया तिकडे आल्यावर. असं म्हणून फोन बंद केला.
अगं काय झालं, काय म्हणत होती लता या दोघींच्या उत्सुक प्रश्नावर बाबी म्हणाली लता म्हणते ट्रिपमध्ये तुम्ही पंजाबी ड्रेस घाला. त्याचीही खरेदी करूया इकडेच. इंदू म्हणाली, अगं बाकी सगळ्या पॅन्टीत असतील मग आपण कशाला काकुबाई राहायचं असं वाटत असेल तिला. आठवतंय ना आपण नऊवारीतून सहावारीत आलो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला आणि बाकीच्यांनाही अवघड वाटत होतं मग झाली सवय आणि आता नाटक सिनेमाला जाताना, गाण्याच्या, व्याख्यानांच्या कार्यक्रमाला जाताना तेच बरं वाटतं.
आणि रात्री घालायला गाऊन घ्यायचे का? फार धुणंपाण्याची कटकट नको. मागच्या वर्षी माझं हाताचं ऑपरेशन झालं ना तेव्हा नूतनन गाऊनच दिले होते घालायला. बरं वाटतं सुटसुटीत आणि मोकळं.
समोरून निर्मलाला येताना पाहून त्या तिघी बोलायचं थांबल्या. तिच्याजवळच्या पिशवीतून डब्यातल्या बटाटेवड्यांचा खमंग वास येत होता. आजी आज इकडे कशा बसलात? घेता का बटाटेवडा? झकास झालाय बघा.
एकच प्लेट पुरे. काल रात्री जरा पोटात खुटखुटत होतं. घेतला लगेच ओवा आणि गरम पाणी इंदू म्हणाली. आणि हे तेलकट आत्ता खाल्लं की रात्री घशाशी येतं बाबी म्हणाली.
आता बारा रुपये प्लेट केली बरं का आजी. सगळ्या वस्तू खूप महाग झाल्या आहेत पैसे घेऊन निघताना आ निर्मला म्हणाली. बघते अजून थोडं फिरून. थोडेच उरलेत वडे.
निर्मलाला या चौघींबद्दल कृतज्ञ आदर होता. त्यांनीच निर्मलाला हा मार्ग सुचवला होता. शिवाय पुरणपोळी, मोदक यासारखे पदार्थ निगुतीने करायलाही शिकवले होते. आता त्या कॉलनीत निर्मलाला ऑर्डर्सना तोटा नव्हता. नवऱ्याच्या साध्या नोकरीला ही जोड मिळाली. तोही जमेल तशी मदत करीत असतो. शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन्ही मुलांच्या क्लासेसची फी भरायला आता निर्मलाला जड जात नव्हतं. या आजींची तिला शिकवण होती की कॉलनीत सगळेच ओळखीचे पण व्यवहाराला पक्कं रहायचं. अगदी आमच्याकडूनसुद्धा त्याच भावाने पैसे घ्यायचे. पदार्थाची चव आणि रंग छान पाहिजे. बाजार भाव पाहून त्यापेक्षा थोडी कमी किंमत ठेवायची हा गुरूमंत्र निर्मला कसोशीने जपत होती. निर्मलाकडून घेतलेली वडा प्लेट चविष्टपणे खाता खाता पुन्हा तिघींची चर्चा सुरू झाली.
पुण्याला जायला टॅक्सी सांगायची ना आपल्या कॉलनीतल्या निलेशची? इंदूने विचारले. हो चालेल. पण मला वाटतं लता म्हणते म्हणून एखादा ड्रेस घ्यावा. बाकी आपल्या छान छान साड्या नेसूया. ड्रेसची सवय नाही आपल्याला. उगीच अवघडल्यासारखं वाटून ट्रीपची मजाच जायची.
खरंय तुझं! बाबी म्हणाली. आपण असं करू. सिंगापूरहून आल्यावर दुसऱ्या ट्रिपला जायच्या आधी पंजाबीची प्रॅक्टिस करू. बाबीच्या या मिश्किल बोलण्यावर तिघी हसत उठल्या. काळोख पडायला लागला होता. सांजवात लावून स्तोत्र म्हणेपर्यंत टीव्हीवरच्या त्या रोजच्या मालिका सुरू होतील. मग उद्या नेहमीच्या बाकावर बसून आल्यागेल्याशी बोलताना कुठल्या मालिकेला कुणाला नावाजायचं आणि कुणाला नावं ठेवायची ते ठरवता येईल. रात्रीसाठी एखादं थालीपीठ करावे की दोन आंबोळ्या कराव्या की डाळ तांदुळाची खिचडी करावी याचा विचार चालता चालता त्यांच्या मनात घोळत होता.
— समाप्त —
© पुष्पा चिंतामन जोशी
कोथरूड, पुणे
मो ९९८७१५१८९०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





