सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ५० – पपा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

पपा

मी लहान असतानाची एक गोष्ट. .

त्या दिवशी रविवार होता. पपा सकाळी दूध घेउन राजाभाऊ भागवतांकडे थीआॉसाॅफीच्या मीटींगला गेले.

पपा गेले अन् काही वेळाने आईने दूधाचं भांडं पुन्हा काढलं आणि ती एकदम ओरडली. आम्ही सारे आईभोवती जमलो तेव्हां कळलं, दूधात पाल पडली होती.

मी तशीच धावत रा. स. भागवतांकडे गेले. तिथे विचारवंतांची चर्चा बरीच रंगली होती. मी दरवाजातून डोकावून पाहिले. मला पपा दिसले. पपांनीही मला पाहिले अन् ते थोडे त्रासिक वाटले. मी त्यांना तरीही खुणावलं तेव्हां ते बाहेर आले.

“पपा तुम्ही दूध घेतलं त्या भांड्यात पाल पडली होती. तुम्ही बरे आहात ना? “

पपा शांतच होते.

“हे बघ! मृत्यु यायचा असेल तर तो येईलच पण आता इथे ही सारी विद्वान मंडळी बसली आहेत. एका गहन विषयावर चर्चा रंगलेली आहे. तेव्हां तू घरी जा. नंतर पाहू. . “

मी निमुट घरी आले. आम्ही सारे इतके अस्वस्थ होतो!

पपा नेहमीच्या वेळेवर घरी आले. अमंगल, अशुभ असं काही घडलं नाही. पपांनीही त्या गोष्टीला फारसे महत्व दिले नाही. कदाचित दैवयोगाने दुधात पाल पडण्यापूर्वीच पपांने दूध प्यायले असेल.

असे बेडर, मृत्युला न घाबरणारे पपा. सतत कार्यरत राहणारे, कामात रमणारे, कष्टांत आनंद मानणारे.

आळशी माणसं त्यांना आवडायची नाहीत. उगीचच गॅलरीत कुणी नखं कुरतडत उभी असलेली व्यक्ती पाहिली की ते विनोदाने म्हणत,

“या माणसाने निदान समोर पसरलेले डोंगर तरी पहावेत. आकाशातले तारे मोजावेत. डोळे असून ही माणसं डोळे उघडे ठेवून पहात नाहीत. नुसता नखं कुरतडत बसलाय्! “

पपांची हळहळ अगदी आंतरिक असायची.

असे आमचे पपा. श्री. ज. ना. ढगे. गाढे तत्त्वचिंतक, कलाप्रेमी, रसिक व्यासंगी.

हाडाचे शिक्षक आणि ढगे मास्तर ही त्यांची जनमानसातली आदरणीय ओळख.

आम्ही त्यांच्या पाच मुली. मुलगा नाही म्हणून त्यांना कधी दु:खी कष्टी झालेलं पाह्यलं नाही. आम्ही मात्र खूप शिकावं असं त्यांना वाटायचं. त्याकरिता ते स्वत: कष्ट घेत. नाना तर्‍हेची पुस्तकं आम्हाला वाचायला लावत.

एकदा आठवतंय्, पाठ्यपुस्तकातल्या मोरोपंतांच्या आर्यांचा अर्थ मी विचारला. तर ते संपूर्ण मोरोपंत घेऊन माझ्याजवळ बसले. त्यातले पृथ्वी वृत्त, यमकं, अवघड अलंकार त्यांनी मला शिकवले.

“परिक्षेपुरताच अभ्यास करु नकोस. संपूर्ण मोरोपंत वाच कधीतरी. त्यातली गोडी अवीट आहे. “

त्यांना असा तेव्हढ्यापुरताच गाईड वापरून, मार्कांसाठी केलेला अभ्यास आवडायचा नाही. त्यांचा अभ्यास, व्यासंग खूप होता आणि आम्हीही कुठलाही विषय खोलात जाउन आत्मसात करावा अशी त्यांची इच्छा असायची.

जीवनाबद्दल त्यांना अपार श्रद्धा होती. ते सारं जीवनच तन्मयतेनं जगले. आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यांनी रसिकतेनं टिपला. खरं म्हणजे तसं एकरंगी आयुष्य नव्हतंच त्यांचं. . इंद्रधनुष्यासारखं सात रंगी जीवन होतं त्यांचं. ते उत्तम उद्योजक होते, गणितज्ञ, संगीतप्रेमी निसर्गप्रेमी, कवी, लेखक, उत्कृष्ट वक्ते होते. अभ्यासक आणि बुद्धीवादी होते पण रुक्षता त्यांच्यात नव्हतीच.

साहित्य हा नुसता छंदच नव्हता तर उत्तम साहित्यिक म्हणून त्यांची प्रतिमा होती. ते हाडाचे शिक्षक होते.

. इंग्रजी आणि संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांना ज्योतिषविद्या अवगत होती. गणित या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. ”जरा डोके चालवा” आणि “मेंदुला खुराक” ही त्यांची पुस्तके आजही उत्कृष्ट पुस्तके म्हणून उल्लेखली जातात.

ते विद्यार्थ्यांमधे खूप रमायचे. हु शार विद्यार्थ्यांना ते नेहमी अहो जाहो संबोधायचे.

मात्र बुद्धीमंद मुलाला गंमतीने म्हणायचे,

“तुला टांगा तरी हाकता येईल का रे.? “पण तरीही

शिक्षणाच्या प्रवाहात त्याला आणण्यासाठी त्यांची धडपड असायची.

त्यांच्या व्यक्तीमत्वांत जशी विविधता होती तसे काही विरोधाभासही होते. त्यांना पुस्तकं वाचताना टिपणं करायची सवय होती. आम्हालाही ते काही नाविन्यपूर्ण वाचलं की लिहून ठेवायला सांगत. त्यांच्याजवळ ज्ञानाचा असा मौलीक साठा होता पण व्यावहारिक दृष्टीने ते संचयी वृत्तीचे नव्हते. हिशोब ठेवणे, आलेला पैसा काटकसरीने वापरुन गंगाजळी सांठवून ठेवणे वगैरे गोष्टीत त्यांना मनापासून रस नसायचा. ते नेहमी म्हणत,

“गेली ती गंगा अन् राहिलं ते तीर्थ. . . “

काही हरवलं फुटलं तर म्हणत,

“आनंद आहे! आपल्याला दुसरे नवे मिळेल. . . “

आता आठवलं की मनात येतं, पपा प्रपंचातही विरक्त वृत्तीने वावरले. फारसं गुंतवून नाही घेतलं त्यांनी.

आमचायावर त्यांनी सुंदर संस्कार केले.

पपा पहाटे लवकर उठत. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या गात. त्यांचा आवाज मधुर होता. वाणी स्पष्ट होती. संत तुकारामाचे अभंग ते लयीत गात. लहानपणापासून आमच्या कानावर पडलेल्या या संतवाणीने कळत नकळत आमची वृत्ती घडवली. ते आम्हाला बायबल कुराणातल्या गोष्टी सांगत. शेवटी म्हणत,

“धर्माची शिकवण एकच असते. संपूर्ण मानवजातीचा

धर्म म्हणजे सत्य. तुम्ही सत्याची चाड राखा. म्हणजे जीवनात निर्भय व्हाल. “

आणि आता वाटतं, खरोखरच आमच्या अंगी जी निर्भीडता, जो आत्मविश्वास, आवश्यक असलेला बेडरपणा आहे तो केवळ पपांच्या शिकवणीमुळेच.

त्यांना अंधश्रद्धाळु माणसांचा फार तिटकारा होता.

मनुष्यानेच निर्माण केलेल्या, वर्णभेदांवर ते संतापाने बोलत.

त्यांना स्वत:लाही कुणी,

“तुमची जात कोणती? “हे विचारलं तर मनस्वी चीड यायची. ते ताडकन् उत्तर द्यायचे. ,

“या देहाला मानव म्हणतात. माझी जात माणूस. . . . “

पपा जितके रागीट, परखड बोलणारे होते, तितकेच ते हळवेही होते. त्यांचं मन फार संवेदनशील अन् कोमल होतं. रामायण महाभारतातल्या कथा सांगताना, कधीकधी अक्षरश: ते गहीवरुन जात.

सीतात्यागाचा प्रसंग सांगताना त्यांच्या डोळ्यात आसवांची नदी वहायची.

कृष्ण हे त्यांचं आवडतं कॅरॅक्टर होते.

आम्ही माहेरी आलो की त्यांना विलक्षण आनंद होई. पण परततांना त्यांचे डोळे डबडबायचे.

“चिमण्या आल्या चिमण्या गेल्या. ” असं म्हणायचे.

प्राण्यांवरही ते प्रेम करत. आमच्याकडे एक मांजर होतं.

आम्ही ते पाळलेलं नव्हतं तरीही त्याचं वास्तव्य आमच्याकडेच असायचं. पपा ऑफीसमधून आले की ते त्यांच्या पायात घुटमळायचं. पपाही पायानेच त्याला हलके हलके गोंजारायचे. ते मांजर चोरुन दूध प्यायचं पण पपांनी कधीही त्याच्या पाठीत काठी घातली नाही.

झाडापानांचंही त्यांना विलक्षण वेड होतं. १९७०साली पपांनी ठाण्यात बंगला बांधला. बंगल्यात रहायला गेल्यावर आम्ही सारे तर्‍हेतर्‍हेचे फर्नीचर करुन बंगला सजवण्याचा विचार करत असू पण पपांनी मात्र नवीन बंगल्यात रहायला गेल्यावर प्रथम खरेदी केली ती, कुदळ, फावडं, खुरपणी, नाना तर्‍हेची खतं यांची.

अनेक झाडांच्या फांद्या जमवल्या. ते स्वत: कुदळीने खड्डे खणून झाडे लावत. आईचा अन् त्यांचा त्यावरुन खूप वाद व्हायचा. आईचे म्हणणे, पपांनी स्वत: कष्ट न करता माळ्याकडून ही कामं करुन घ्यावीत. . 

पण पपा म्हणायचे,

“माझी बाग मीच फुलवेन. “त्यांना कष्टाचं वावडं नव्हतच. तो तर त्यांचा महान आनंद होता.

शिवाय ज्या विषयात रस घेतला, त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याकडे कल होता. स्वत:ची बाग सुंदर असावी म्हणून त्यांनी झाडे लावण्यावरची अनेक पुस्तकं विकत घेउन वाचली. बागायतीचं तंत्र शिस्त मात्र त्यांना फारसं नाही जमलं तरी त्यांतूनही त्यांना मिळालेला आनंद खूप मोठा होता. त्यांनी लावलेल्या जांभुळ, फणसाची मधुर फळे जेव्हांआम्ही खात असू तेव्हा, घामाने निथळलेले हाफ पँटमधले, मातीने पाय लडबडलेले उघडेबंब पपा नजरेसमोर येत.

पण त्यांनी लावलेल्या प्रत्येक झाडांनी भरपूर फुलं. , फळं दिली. तो त्यांचा परमानंद होता. एक प्रकारे निसर्गाशी जडलेलं ते नातं होतं.

ते गेले तेव्हां बागेतलं प्रत्येक झाड फळाफुलांनी बहरलं होतं. . जणू त्या वृक्षवल्लींनी आपल्या कष्टाळु माळ्याला दिलेली ती भावपूर्ण श्रद्धांजली होती.

पपांबरोबर आम्ही अनेक प्रवास केले. त्यांच्याबरोबर प्रवास करणे म्हणजे पर्वणीच असायची.

त्यांनी कथन केलेल्या कथा, किस्से, विनोद कोट्या सहप्रवाशांची मनं रमवत. शिवाय जिथे जाऊ तिथे नैसर्गिक सौंदर्याचा आकंठ ऊपभोग घेण्याची त्यांची वृत्ती होती. . त्यांना मंदीरात जाऊन रांगेत उभं राहून, काही ठिकाणी तर ड्रेस कोडही असायचा. . अशा पद्धतीनं देवदर्शन घेणं कधीच मान्य नव्हतं. . . त्याऐवजी ते भोवतालच्या परिसरांत रमत. देवळाच्या बाहेर बसलेल्या शहाळी विक्रेत्याशी गप्पा मारण्यात आणि भरपूर शहाळी पिण्यांत त्यांना आनंद वाटायचा. डोंगर माथ्यावरुन पलीकडच्या क्षितीजावर डुबणार्‍या सूर्याच्या दर्शनात त्यांना त्यांचा देव दिसायचा. मंदीरातल्या देवापेक्षा त्यांना या नैसर्गिक शक्ती अधिक प्रबल अधिक पवित्र, मंगलमय वाटायच्या.

त्यांच्याबरोबर आम्हीही धुक्यातून चाललो. आकाशातले अगणित तारे पाहिले. अनेक सूर्योदय, अनेक सूर्यास्त पाहिले. प्रत्येक सूर्योदय नवा असतो हा विचार त्यांनीच आमच्यात रुजवला.

खळखळत्या धबधब्यात भिजलो. काश्मीरसारख्या ठिकाणी फेसाळ, अथांग वाहणार्‍या नद्यांत पाय डुंबून बसलो. जीवनात पपांनी आम्हाला अपार सौंदर्यदृष्टी दिली.

निसर्ग हा माणसाचा सोबती असतो. ढोंगी, व्यवहारी जगापासून सावरणारा हा भोवतालचा अफाट निसर्गच खराखुरा परमेश्वर आहे हे त्यांनी आमच्यावर फार लहानपणीच बिंबवलं.

 आता निळ्याशार आकाशात विरत जाणारे ढग पाहिले की, पपांची आठवण येते. ते अनंतात विलीन झाले.

ते आमचे पिता होते, गुरु होते. ते आमचे मित्र होते. ते मित्रत्वाच्या नात्याने आमच्याशी गप्पा मारत. आमच्या अडीअडचणी, आमची विवीध प्रकारची सुखदु:ख ते आस्थेवाईकपणे ऐकत. त्यांत समरस होत.

आमच्या सुखात ते हसले. आमच्या दु:खात त्यांनी सोबत केली. आमच्या चुका त्यांनी सांभाळून घेतल्या. त्याबद्दल त्यांनी पितृत्वाच्या अधिकाराने शिक्षा केल्या नाहीत.

पपा जे. कृष्णमूर्तींचे अनुयायी होते. त्यांच्या तत्वज्ञानाचा पपांच्या मनावर पगडा होता. त्यामुळेच असेल, पपांनी त्यांची मते आमच्यावर कधीच लादली नाहीत. उलट भरपूर स्वातंत्र्य देउन चांगलं वाईट स्वत:च ठरवण्याचं एक आत्मिक बळ आमच्यात निर्माण केलं. .

पपांची थोर शिकवण हीच आमची शिदोरी.

आणि त्याचा योग्य वापर हीच त्यांना वाहिलेली 

खरीखुरी श्रद्धांजली. . . . . .!!!!!

 ३१ मे १९८२ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आमच्या जगण्यातल्या ऐकेका क्षणावर त्यांच्या अस्तित्वाचा ठसा मात्र कधीही न पुसून जाणारा आहे.

 – क्रमशः भाग ५०.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted