श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ पेपर फुटी आणि त्यावर उपाय – – – ☆ श्री सुनील देशपांडे

 – – – पेपर फुटी आणि त्यावर उपाय खरेच हवे आहेत का?

आज-काल पेपर फुटीचा जमाना दिसतो आहे दरवर्षी कुठे ना कुठेतरी पेपर फुटी झालेले ऐकू येते. किमान आरोप तरी होत असतो. यावर्षी ती मोठ्या प्रमाणात झाली आणि गाजते ही आहे.

शिक्षणाचे व्यापारीकरण झाल्याचा हा परिणाम आहे हे उघडच आहे. व्यापारीकरण करण्यासाठी जबाबदार कोण आहे? तर सरकारच आहे हे सुद्धा उघड आहे. खरं म्हणजे शिक्षणाचं सरकारीकरण होणं आवश्यक आहे. त्याऐवजी ते व्यापारीकरण झालं आहे.

६०/६५ वर्षांपूर्वी आम्ही शालेय शिक्षण घेत होतो त्यावेळी पेपर फुटीचा कधी विषय ऐकला नव्हता. त्यावेळी आमच्या शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांच्या घरी शिकवणीला बोलवीत असत. परंतु कोणत्याही शिक्षकाने अशा शिक्षणासाठी वेगळी फी घेतल्याचे निदान आमच्या बाबतीत तरी झाले नव्हते. (कदाचित आम्ही ग्रामीण भागात शिकलो म्हणूनही असेल) आम्ही शाळेमध्ये इंग्रजी, हिंदी, संस्कृत इत्यादी बाह्य शैक्षणिक परीक्षा दिल्या होत्या. त्याही शिक्षकांनी आमच्याकडून कोणतीही फी न करता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या त्या परीक्षांसाठी वेगळे क्लास घरी घेतले होते. कोणत्याही पैशाशिवाय. ड्रॉइंगच्या परीक्षा आम्ही दिल्या त्या शिक्षकांनी सुद्धा काही किरकोळ पैसे कारण त्यासाठी बोर्ड, कागद, रंग वगैरे वगैरे साहित्य लागत असे तेवढ्यापुरते अगदीच नॉमिनल दोन चार रुपये फी घेतल्याचे आठवते. जे शिक्षक शाळेमध्ये आम्हाला शिकवत असत तेच प्रश्नपत्रिका सुद्धा तयार करीत असत. तरी सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला प्रश्नपत्रिकेतले एक अक्षर सुद्धा कधी समजले नव्हते.

सातवीची व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा, स्कॉलरशिपच्या परीक्षा आणि एसएससी ची परीक्षा एवढ्याच परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळाबाह्य कुणीतरी तयार करत असत. बाकी सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आम्हाला शिकवणारे शिक्षकच तयार करीत होते आणि तरीही पेपर फुटत नव्हते. बहुधा त्यावेळेला शिक्षक पैशाला हपापलेले नसावे. जे काही शिक्षक कधीतरी शाळाबाह्य शिकवणारे काही फी घेत होते ते सुद्धा इतकी क्षुल्लक रक्कम घेत होते असे अजूनही लक्षात येते. त्यांची थोडीशी आर्थिक गरज असेलही परंतु तेवढ्यापुरतीच त्यांची अपेक्षा असावी. गरज म्हणून पैसे मिळवणे आणि हाव म्हणून पैसे मिळवणं यामध्ये खूप फरक आहे. हाव ही कधी न संपणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याला मर्यादा नसते. ही हाव मनुष्याला दुष्कृत्य करण्यास भाग पाडते. गरज म्हणून पैसे मिळवणं आणि हाव म्हणून पैसे मिळवणे यामध्ये खूप फरक आहे.

मला आठवते जोगळेकर म्हणून गणिताचे शिक्षक होते परंतु ते एसएससी नंतर अजिबात गणित शिकलेले नव्हते. कुणाच्यातरी गणित क्लासेस वाल्या एका चांगल्या शिक्षकाकडे नोकरी करीत असताना त्यांनी ते ज्ञान आत्मसात केले. नंतर पोटाची गरज म्हणून स्वतःचे क्लासेस सुरू केले. शिकवण्याची हातोटी उत्तम आणि वक्तृत्व सुंदर. समोरच्या विद्यार्थी समूहाला संपूर्ण समजले आहे का नाही याची काळजी घेणे हा खूप मोठा गुण. त्यामुळे त्यांचे क्लासेस गर्दी खेचू लागले. कराड सांगली कोल्हापूर अशा तीन ठिकाणी दोन दोन दिवस क्लास घेत असत. त्याकाळी चार चाकी गाडी बाळगणारे खूप थोडे लोक होते त्यापैकी ते एक. परंतु ते म्हणत माझे ध्येय संस्कृत घेऊन एम ए आणि पीएचडी होणे आणि प्राध्यापक म्हणून नोकरी लागणे हे आहे. त्याप्रमाणे ते हा व्यवसाय चालू असताना संस्कृत घेऊन एम ए पी एचडी होऊन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले आणि क्लासेस बंद केले. हाव म्हणून पैसे मिळवणे आणि गरज म्हणून पैसे मिळवणे यामधील फरक तेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहिला.

त्यामुळे आता सध्याची परिस्थिती पाहता माणसांमधील विश्वासार्हता शिल्लक राहिली नाही. परंतु आता तांत्रिक पद्धतीने बिनचूक परीक्षा पद्धती घेता येईल का याचा विचार केल्यास मला काही गोष्टी सुचवाव्या वाटतात.

– – सध्याच्या परीक्षा पद्धतीत सर्व विद्यार्थ्यांच्या साठी एकच प्रश्नपत्रिका असणे ही गरजेची आहे का?

– – हा पहिला प्रश्न.

साधारण क्वेश्चन बँक म्हणजे प्रश्नसंच तयार केलेल्या असतात.

समजा शंभर प्रश्नांचा एक प्रश्नसंच असेल तर त्याच्या वेगवेगळ्या अनुक्रमाने दहा प्रश्नपत्रिका तयार करता येतील. जेवढी विद्यार्थ्यांची संख्या असेल तेवढ्या संचांमध्ये त्या सर्व प्रश्नपत्रिका विविध पाकिटामध्ये बंद करून ती सर्व पाकिटे परीक्षा केंद्रावर ठेवणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने त्यातील एक पाकीट कोणतेही उचलून घेऊन जाणे ती त्याची प्रश्नपत्रिका. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटणे हा प्रकार शिल्लक राहणार नाही. प्रश्नपत्रिका आधीच फुटलेले असतील कारण त्या प्रश्नांच्या बाहेरील प्रश्नपत्रिका असणारच नाहीत. यामुळे आणखी एक फायदा असा की कोणताही चॅप्टर म्हणजेच अभ्यासाचा भाग ऑप्शनला टाकणे हा प्रकार बंद होईल आणि संपूर्ण सिलॅबस चा अभ्यास करणे प्रत्येक विद्यार्थ्याला भाग पडेल.

कॉम्प्युटरचा वापर करून सुद्धा या पद्धतीने परीक्षा घेता येतील. कॉम्प्युटरला सर्व प्रश्न फीड करून ठेवणे आणि परीक्षा गृहात जाताना प्रत्येक विद्यार्थ्याने बटन दाबताच त्याला कोणत्याही रँडम सिलेक्शन मेथडने दहा प्रश्न असलेली एक प्रश्नपत्रिका प्रिंट करून मिळेल. ती त्याची प्रश्नपत्रिका असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रावर सुद्धा एकाचा पेपर बघून दुसऱ्याला कॉपी करता येणार नाही. किंवा बाहेरून कॉपी पुरवणे या प्रकारचे कोणतेही उद्योग करता येणार नाहीत. फक्त यामध्ये एकच भीती आहे किती टक्के निकाल लागेल? 

– – – याच भीतीपोटी अनेक विद्यार्थ्यांना पास करणे आणि त्यासाठी नैतिकता नष्ट करणे हे प्रकार अधिकृतपणे चालू आहेत का? शिक्षण क्षेत्राचे वाटोळे करण्याचा हा पद्धतशीर प्लॅन केला असेल का अशी शंका घेण्यासाठी पुरेसा वाव आहे असे मला वाटते? आणि तसे नसेल किंवा तसे नको असेल तर परीक्षा पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल करणे अत्यंत गरजेचे आहे असे मला निक्षून सांगावेसे वाटते.

– – शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल करायचा आहे असे म्हणत म्हणत मागील पानावरून पुढे चालू हेच चालू आहे. खरोखरीच विद्यार्थ्यांची कसोटी घेणाऱ्या परीक्षा भविष्यात पाहायला मिळतील का?

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted