संगीता कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ पाऊस आला गं… ☆ संगीता कुलकर्णी ☆
पावसाळा म्हटलं की मला प्रथम आठवतो तो मन धुंद करणारा मृद्गंगंध… ! पहिल्या पावसाची गोष्टच काही वेगळी… ! त्याचे आणि माझे नाते खरंतर जिव्हाळ्याचे.. पाऊस आला की मी खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलू लागते त्याचा थंडगार वारा मनाला सुखावून जातो आणि शब्द उसळ्या मारू लागतात… शब्दांना पूर घेऊन एक वेडा पाऊस आला… !
आला आला
पाऊस आला
मला भिजवून ओलेचिंब करुन गेला
पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसू लागल्या की येणार्या मृगाची चाहूल लागते.
सर्वच या सृजन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात.. पहिल्या पावसाची आतुरता या सृष्टीतल्या प्रत्येक न् प्रत्येकाला ही असतेच ना.. !
पहिल्या पावसाच्या वेळी जेव्हा आकाश भरून येते तेव्हा सृष्टीची किमया डोळे उघडे ठेवून बघत रहावी अशीच…
पावसाची सर
कोसळत होती
भिजताना सृष्टी
उमलत होती
चिंब भिजलेल्या सृष्टीचा किमया मी मनात रेखाटत होते.. निळेभोर दिसणारे आभाळ एकदम काळेसावळे होते… ढगांची गर्दी… ढगांचा एकमेकांवर आदळणारा आवाज..
तो आवाज ऐकला की टाळ मृदुंगाशी स्पर्धा करतो की काय असा भास मला होतो.. चिंब भिजलेल्या सृष्टीचा अप्रतिम सुंदर
देखावा मनात रेखाटत मी पावसाकडे बघत होते… सृष्टीतील त्या चैतन्याचा तो सोहळा डोळ्यात भरून घ्यावा आणि कानात साठवून ठेवावा एवढा नादमय… पाऊस म्हणजे अख्या सृष्टीला वेड लावणारा अद्भूत सोहळा… !
आसुसलेली धरणी
मिलनासाठी
दोन हातांचे पंख
पसरून उभी
पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाने धरणीला स्पर्श होताच पावसाचे ते अगणित थेंब मातीत जेव्हा मिसळतात तेव्हा माती गर्भवती राहून तिच्या कुशीतून बीजाला कोंब फुटतो. तुकारामांच्या भैरवीतली “तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी” हा संदर्भ मातीला या काळात तंतोतंत लागू पडतो.
मातीचा तो धुंद वास…त्याने सुखावत होती.
हसताना मृद्गंगंध पसरवीत होती..
बहरत होती… लाजत होती आणि लाजून चिंब चिंब होत होती.
तो मृद्गंगंध श्वासात किती आणि कसा भरून घ्यावा… !
हा पाऊस आसमंतात एक नवं चैतन्य फुलवतो, सर्वांची तहान भागवितो, मातीत थेंब पडल्यावर पसरणारा तो मृदगंध अगदी उरात साठवावासा वाटतो..
वातावरणात विलक्षण गारवा येतो.
मृगाच्या पावसाचे आणि सृजनाचे एक विलक्षण असे नाते आहे. वळवाचा पाऊस आणि मृगाच्या पावसात तसा जमीन आसमानाचा फरक … वळवाचा पाऊस एकदा लागून गेला की तो नुकसानच करून जातो पण मृगाचा पाऊस तो आला की सगळ्यांना सुखावून जातो… सृष्टीतील सर्वांना तो वेड लावतो. पहिला पाऊस नवीन चैतन्य घेऊन येतो. मनाला जगायला नवीन उभारी देतो.
आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे जगण्याचे क्षण पहिला पाऊस मिळवून देतो.
माझ्यासाठी प्रत्येक नव्या क्षणी येणारा पाऊस हा पहिलाच असतो कारण मला तो दरवेळी एक नवी कविता देऊन जातो. मला त्या पावसात गुंतून राहणं आवडत.. जमतं… तो स्वत:हून मला भावना देतो… मला आशय पुरवतो. पाऊस सोबत केवळ गार हवा किंवा चिंब सरीच घेऊन येतो असं काहीच नाही तर पाऊस त्याही पलीकडे जाऊन प्रीत, विरह, आनंद यांसारख्या बऱ्याच भावना सोबत घेऊन येतो… पहिल्या पावसात त्याने मला भिजत असलेली पाहून जो मनमुराद आनंद लुटला त्या क्षणाची तुलना किंचीतच दुसऱ्या क्षणाशी होईल… मला बेधुंद जगताना पाहून त्यालाही पावसात भिजायची इच्छा झाली होती… पहिल्या पावसाचे ते थेंब अलगद ओठांनी चुंबूनी घ्यावेसे वाटतात…
पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे फरक फक्त इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी कायम मनाला… ! या हृदयाचे त्या हृदयी अशी अवस्था… छळणारा, जाळणारा तरीही हवाहवासा वाटणारा पाऊस…!
© संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे मो. 9870451020
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





