शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ चारचौघे – त्यांची गोष्ट ☆ शीला पतकी ☆
☆
तुम्ही खूप छान लिहाल हो.. चार लोकांनी वाचलं पाहिजे ना? हां बरोबर आहे… चार लोक फार महत्वाचे असतात. चार या संख्येला अत्यंत महत्त्व आहे. ते चारधाम चार वेद हे मी सांगणार नाही माझा विषय जरा वेगळा आहे आणि वेगळा विषय मांडला ही आपली खासियत आहे. चार याबद्दल आपण काय काय बोलतो बघा
लहानपणी आपण ऐकत होतो… अरे चार मुलं बघ ती कशी वागतात तस आपण करावं वागावे वर्गामध्ये चार चांगल्या मुलांची संगत धर… चार चांगली पुस्तकं…
वाच चार बुक शिकला तर जीवनाचे कल्याण होईल
नाही समजलं तुला तर चार लोकांना विचारवं
इथपासून प्रवास सुरू होतो मग कधी कधी असं ऐकायला लागतं
चार चौघा जणांसारखा वाढवलं नाही तुम्हाला पाहिजे ते प्रत्येक वेळी देत गेलो म्हणजे यांनी खूप थाटात वाढवले आपल्याला…
लक्षात घ्या पुढे आपण हळूहळू मोठे मोठे होत जातो
अरे घरात गोष्टीत लक्ष घाल तुला काय स्वातंत्र्य दिलय का? … चार माणसाची चर्चा करावी चार माणसांचा विचार घ्यावा मग पुढे पाऊल टाकावं… कुठल्यातरी चार फालतू मुलांमध्ये हिंडू नकोस…
अजून एक सूचना चार चार दिवस घराबाहेर जातो जातोस कुठे?
अरे बापरे हे मात्र अवघड आहे बर का… “अहो चार दिवस झाले मी ओरडते तुम्हाला गॅस संपतआलाय, संपत आलाय गॅसला नंबर लावा… तुमचं महिला कुठे लक्षात नसतं घरात मेलीने मी एकटीने मरायचं”
अगं कशी चालली आहेस… लग्नाला चाललीस ना… अंगावर दागिने घालावेत… चार लोक आम्हाला नाव ठेवतील…
चार माणसात कसं उठवून दिसायला पाहिजे आमची मुलगी चारचौघेत ऊठून दिसेल अशी आहे ईति वधू पिता अर्थात हे पूर्वी होतं…
चार हात कामाला लागले तर बघता बघता कामा संपतात एकमेका साहाय्य करू हा मंत्र…!
“चार माणसात आमची अब्रू काढू नका म्हणजे झालं” वैतागलेली घरची मंडळी!
“चारदा सांगून झालं पण ऐकलं तर खरं ना… “… टोमणा
दोनाचे चार हात झाले की सुटले बाई मी एकदाची… वैतागलेली आई!
घरात भांडण झाल्यावर समजूतीच्या चार गोष्टी सांगताना, “चार भिंतीच्या आत गोष्टी आहे तोवर बरं असतं लोकांना काय त्या भिंतीनाही कान लावून लोक ऐकतात लक्षात ठेवा “अनुभवी सूचना
घरातल्या कर्त्याची सूचना तुझ्यापेक्षा चार पावसाळी जास्त पाहिलेत आम्ही… धाक! कार्ट बेरकी ते म्हणाल ते सगळे दुष्काळी होते.
चार पैसे कमवून आणायची अक्कल नाही निघालेत आम्हाला सांगायला पैसे मागितले की सुरुवात म्हणून मिळेल ते काम बघून पैसे कमवावे स्वतःच्या दोन पायावर उभे राहावे
आयुष्यात चार माणसे जोडून घेता आली नाहीत कुणाशी न पटलेल्या माणसाबद्दल बोलताना हे वाक्य
हमखास
चार चाकी गाडी घ्यायचे माझे स्वप्न होते ते माझ्या मुलाने पूर्ण केले हो मध्यमवर्गीय कृतार्थ बाप
आजी… अग हातात चार बांगड्या घालाव्यात बाळा बाईच्या जातीला असे भुंडे हात शोभत नाहीत.
भाऊसाहेब रिटायर झाला पण सगळं देऊन बसू नका चार पैसे आपल्या कनवटीलाठेवा… नटसम्राट सल्ला
एकत्र कुटुंब पद्धतीतला घरातला मोठा माणूस काका वगैरे… “चारचौघात आमचं नाक कापलं जाईल असं काही करू नका म्हणजे झालं शिकायला हरकत नाही पण नको ती थेर घरात नकोत.
काही परदेशात वगैरे जायला नको चार चौघासारखा आयुष्य जगा समाधानाने आपल्या देशात राहा वडीलकीचा सल्ला
एकदा एका सुनेला सासू म्हणाली अगं चार बायकां सारखं रहावं आपण..! हे असले कपडे… कुंकू न लावणं… मंगळसूत्र मनगटाला बांधायला शोभत नाही…! त्यावर सून म्हणाली, “सासुबाई मी पाचवी बाई आहे ती आता जरा समजून घ्या चाराच्या पलीकडे जरा जाऊ द्या ना गाडी हाय का नाही गंमत
शेवटी चार माणसे येतील एवढे तरी चांगलं वागा बाबांनो एक सामाजिक वाक्य
बाहेर चार माणसं तर विचारतात का आणि घरात आमच्या डोक्यावर मिरे वाटतात मनातल्या मनात म्हणाले जाणारे वाक्य
काळजी आणि प्रेमापोटी पण वैतागलेला मुलगा… “बाबा चार लोकात जा जरा बसा बरं वाटेल तुम्हाला. घरात काय वाचता टीव्ही बघता… इत्यादी इत्यादी
असो अशा अनेक गोष्टी आहेत यामध्ये चार चा उल्लेख असतो तो का हे मला खूप दिवस कळले नव्हते आता तुम्हाला उत्सुकता मग आता कळले आहे का? थोडे पुढे जाऊयात
मी गणिताची शिक्षिका… एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. दोन बिंदूतून एकच रेषा जाते. तीन बिंदू एक प्रतल निश्चित करतात म्हणजे सपाट पृष्ठ भाग… या साठी एसएससी बोर्डाच्या पेपर मध्ये पूर्वी आठवा प्रश्न टॅलेंट क्वेश्चन म्हणून असायचा त्यामध्ये विचारलं होतं सायकल ला स्टॅन्ड का लावतात? त्याचं उत्तर असं होतं की गोल चाकाचा टेकलेला एक एक बिंदू अधिक त्याच एक बिंदू दोन नुसत्या चाकावर सायकल उभी राहू शकत नाही पण स्टॅन्ड लावला की तिसरा बिंदू मिळतो आणि प्रतल निश्चित होते आणि स्टॅन्ड वर सायकल उभी राहते म्हणजे प्रतल निश्चितेसाठी तीन बिंदू लागतात.. इत्यादी इत्यादी… पण प्रतल निश्चितीसाठी तीन बिंदू लागत असले तरी ते बॅलन्स होण्यासाठी चार बिंदू गरजेचे असतात म्हणजे पलीकडच्या बाजूला जर अजून एक स्टॅन्ड लावला तर सायकल तिरकी उभी राहणार नाही ती सरळ उभी राहिल. मग सायकल सरळ उभी राहण्याचे स्टॅन्ड सुद्धा बाजारात मिळत होते ते पाठीमागच्या टाका चाकाला पायाने सरकून लावायचे असावयाचे. म्हणजे चार मुळे समतोल साधला जातो.
याचे एक उदाहरण मी एका मुलाखतीचा ऐकलं होतं मुलाखत होती सलीम जावेद या सुप्रसिद्ध लेखकाच्या जोडी पैकी सलीम यांची त्यांनी सांगितले की डायलॉग लिहिताना त्या वाक्यांमध्ये शब्दांचे समतोल साधणे अत्यंत गरजेचे असते तरच ते डायलॉग ठळकपणे लोकांच्या लक्षात राहतात याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले होते की दिवार मधला डायलॉग
मेरे पास माँ है… हा लिहिताना त्यांनी लिहिले होते मेरे पास गाडी है बंगला है तुम्हारे पास क्या है? इती अमिताभ… मेरे पास मा है शशी… मेरे पास मा है याला वजन येईना मग त्यांनी ऍड केलं… “मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है तुम्हारे पास क्या है? “मग शशी कपूर शांतपणे म्हणतो, ” मेरे पास माँ है” प्रेक्षकांची शिट्टी आणि टाळ्या!
एका बाजूला तीन शब्द एका बाजूला एक त्या चार शब्दांमुळे त्या संपूर्ण डायलॉग ला वजन आलं आणि तो अजरामर झाला तर असं शब्दांना वजन आम्हाला द्यावं लागतं त्याचा बॅलन्स साधावा लागतो. हे सलीमजीने अनेक उदाहरण देऊन फार छान सांगितलं होतं
*
मला वाटतं हे चार माणसं काय म्हणतील? चार लोकांचा विचार घ्या… , चार माणसे तरी शेवटी येणार का? इथे सुद्धा बॅलन्सच असावा म्हणून नेहमी आपण चार आकडा वापरतो असे मला वाटते… बघा ना तुम्ही म्हणून बघा… सहा माणसं काय म्हणतील? … पाच माणसं तरी येतील का? … आठ माणसात आमच्या अब्रू घालू नको… मजा नाही यात… जे चार मध्ये आहे! अशा खूप गोष्टी आहेत. आठवा बघा आणि लिहा. चार माणसं वाचतील अशा अपेक्षांनी लिहले आहे पटलं तर घ्या आणि चार जणांना पुढे पाठवा…!
© शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





