श्री सुधीर करंदीकर
मनमंजुषेतून
☆ आज सगळेच कसे वेगळे? ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
आज सगळेच वेगळे दिसत होते, कां? ते मात्र माहीत नाही – – “
आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. दार उघडून बाहेर आलो आणि समोरच गेटवर भारद्वाज पक्षी बसलेला दिसला आणि आज काहीतरी शुभ घडणार असा संकेत मिळाला. त्याला हात जोडून मी नमस्कार केला आणि फिरायला बाहेर पडलो.
मेन रोड लागल्यावर, नेहमीचे दृश्य असते, की रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात / कचरा पडलेला असतो / कागदाची खोकी पडलेली असतात. आज मात्र रस्ता एकदम चकाचक दिसत होता. काही जण कार चालवत असतात / स्कुटर चालवत असतात आणि काहीतरी खात असतात. खाऊन झाले कि कागद / प्लॅस्टिक पिशवी रस्त्यावर टाकतात. आज कुणीच कचरा फेकलेला दिसत नव्हता.
कां? ते मात्र माहीत नाही.
सिटी प्राईड च्या रस्त्यावर आलो, की तिथे, कुत्री घेऊन फिरणारे स्त्री-पुरुष नेहमीच दिसतात. रस्त्यावर कुठेही कुत्र्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे त्यांचे शी – शू करणे सुरू असते. कुत्रे फिरवणाऱ्याला मात्र त्याचे काही देणे घेणे नसते. आज पण कुत्र्याला घेऊन हिंडणारी मंडळी दिसत होती. फुटपाथवर एका ठिकाणी एका कुत्र्यानी शी केली, आणि मालकाने लगेच प्लास्टिकच्या पिशवीत शी गोळा केली. आणि आश्चर्य म्हणजे आज कुत्री फिरवणाऱ्या सगळ्यांच्याच हातात प्लास्टिकच्या पिशव्या दिसत होत्या. हा बदल कशामुळे घडला? ते मात्र समजत नव्हते.
पुढे मेन रोडला आलो. नेहमीचा देखावा म्हणजे, हॉर्नचे कर्कश आवाज, काही चौकांमध्ये सिग्नल सुरू असतात, काही ठिकाणी बंद असतात. सिग्नल पाळणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच असतात. सगळ्याच गाड्या बेफाम वेगाने धावत असतात. झेब्रा क्रॉसिंग वर रस्ता ओलांडणारे जीव मुठीत घेऊन धावत असतात. काहीजण उलटी कडून वेगाने येत असतात. काहीजण फुटपाथवर गाड्या घालत असतात.
आज मात्र सगळेच बदललेले दिसत होते. सगळे सिग्नल चक्क सुरु होते. कोणी हॉर्न वाजवत नव्हते. सिग्नल तोडून जाणारी एकही गाडी दिसत नव्हती. झेब्रा क्रॉसिंग वरून पादचारी आरामात रस्ता ओलांडत होते. सगळ्या गाड्या २० – ३० च्या वेगाने जात – येत होत्या. उलटी कडून येणारी किंवा फुटपाथ वरून जाणारी एकहि टु व्हीलर दिसली नाही. वळणारी प्रत्येक गाडी चक्क साईड इंडिकेटर देत होती.
हा बदल बघून, मी माझे फिरणे विसरलो, आणि ट्रॅफिकचा हा नवीन रंग बघण्यात रममाण झालो. काहीतरी कारणामुळे माझी तंद्री मोडली आणि मी पुढे निघालो. ट्रॅफिक मध्ये एकदमच ही सुधारणा कशामुळे झाली, ते मात्र काही समजत नव्हते.
पुढे मारुती मंदिर लागते, तिथे फुटपाथवर नेहमीच लोक कबुतरां करता धान्य टाकत असतात. त्यामुळे कबुतरांचे थवे कायम तिथे असतात. कबुतरांमुळे काही आजार पसरतात, त्यांना रस्त्यावर धान्य टाकू नका, असे बरेच वेळा पेपरमध्ये आपण वाचतो. पण त्याची दखल कुणीच घेताना दिसत नसते. आज मात्र फुटपाथ वर कोणीही धान्य टाकले नव्हते. त्यामुळे आज एकही कबूतर दिसत नव्हते. हा बदल कशामुळे? हे मात्र समजत नव्हते.
थोडं पुढे गेलं की मृत्युंजयेश्र्वर मंदिर आहे. रोज मी बाहेरून दर्शन घेतो आणि पुढे जातो.
आज मात्र मी दर्शन घेण्याकरता चक्क मंदिराच्या आत गेलो. माझ्यामधे हा बदल कशामुळे झाला याचे उत्तर मात्र नक्कीच माझ्याकडे होते.
एक म्हणजे, इतका सुंदर बदल घडवून आणल्याबद्दल मला देवाचे आभार मानायचे होते आणि आणि नंबर दोन म्हणजे असाच बदल कायम ठेव अशी मला देवाकडे प्रार्थना करायची होती.
© श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





