श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “विकसित भारत २०४७” – लेखक : डॉ. शरद कुंटे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : “ विकसित भारत २०४७”
– – सुखी, समृद्ध, समरस, संघटित, समर्थ, अखंड भारत
लेखक: डॉ. शरद कुंटे
पृष्ठः २८५
मूल्य: ३५०₹
भारताने स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतासमोर अजूनही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक आणि पायाभूत विकासाची अनेक आव्हाने आहेत. २०४७ हे भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष आहे. त्या टप्प्यापर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून उभे करण्याची कल्पना आज राष्ट्रीय विकासाच्या चर्चेचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली, तरीही अजून भारतातील जनता आपल्या मूलभूत समस्या सोडवण्यातच गुंतलेली आहे. युरोप आणि अमेरिकेतील अनेक देश विकास प्रक्रियेमध्ये आपल्या कितीतरी पुढे जाऊन पोचलेले आहेत.
जगातील सर्व प्रगत देशांची बरोबरी करण्यासाठी भारताला अजून बरीच मोठी मजल मारावी लागणार आहे. 2022 च्या 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली, की आगामी २५ वर्षांमध्ये भारत एक विकसित राष्ट्र बनेल व आज असलेल्या युरोप अमेरिकेतील विकसित देशांच्या मांडीला मांडी लावून बसेल! प्रत्यक्ष हा पल्ला गाठण्यासाठी भारताला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये किती वेगाने प्रगती करावी लागेल याचा आराखडा करण्याचे काम आता देशभर सुरू झालेले आहे. आपल्या हाताशी असलेल्या साधनसामग्रीचा, आपल्या देशात असलेल्या बौद्धिक कौशल्याचा व देशाचा विकास घडवून आणण्यासाठी युवकांमध्ये जागृत झालेल्या ऊर्जेचा उपयोग करून घेऊन आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कशाप्रकारे प्रगती करता येईल याची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.
जागतिक बँकेने विकसित देशाचे जे आयाम निश्चित करून दिलेले आहेत, ते सर्व आयाम 2047 पर्यंत पूर्ण करण्यासाठी भारताला कशाप्रकारे वाटचाल करावी लागेल, याचा प्रत्येक आयामानुसार आराखडा या पुस्तकांमध्ये संग्रहित केलेला आहे. विकासाची वाटचाल तर प्रत्यक्ष सुरू झालेली आहे व आपण अपेक्षित असलेला प्रगतीचा हा टप्पा निश्चितपणे गाठू असा आत्मविश्वास राज्यकर्त्यांना, देशातील शास्त्रज्ञांना, उद्योजकांना व शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना निश्चितपणे वाटतो आहे. आज देशाच्या विकासासंबंधी असलेली वस्तू स्थिती व आगामी काळात आपल्याला करावयाचा प्रवास यासंबंधीचे या पुस्तकात आलेले विवेचन देशातील वाचकांना प्रेरणादायक ठरेल असा मला विश्वास वाटतो.
हे पुस्तक केवळ भारताच्या विकासाचे स्वप्न मांडत नाही; तर विकसित राष्ट्राची वैशिष्ट्ये आणि भारताला त्या दिशेने कोणत्या प्रकारची वाटचाल करावी लागेल, याचा विषयवार विचार करते. पुस्तकात भारताच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, मानवी कौशल्य, राष्ट्रीय सामर्थ्य आणि विविध विकासपरिमाणांचा विचार करण्यात आला आहे. “सुखी, समृद्ध, समरस, संघटित, समर्थ, अखंड भारत” ही या पुस्तकाच्या विचारांची व्यापक दिशा आहे
या पुस्तकातील प्रमुख विषय – –
– विकसित भारत २०४७ची संकल्पना
– आर्थिक विकास आणि समृद्धी
– शिक्षण व ज्ञानाधारित समाज
– विज्ञान आणि तंत्रज्ञान
– बौद्धिक संपदा आणि नवोन्मेष
– उद्योग आणि उत्पादनक्षमता
– युवकशक्तीचा विकास
– शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास
– पायाभूत सुविधांची आवश्यकता
– सामाजिक समरसता आणि संघटन
– भारताचे राष्ट्रीय सामर्थ्य
– जागतिक स्तरावर भारताची भूमिका
– २०४७ पर्यंतच्या भारतासाठी दीर्घकालीन विचार
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





