सुश्री प्राची जोशी
वाचताना वेचलेले
☆ कॉल हिम एडी… लेखिका : सुश्री कल्याणी बापट केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्राची जोशी ☆
सुश्री कल्याणी बापट केळकर
काल वर्तमानपत्रात एक बातमी वाचली आणि मनात तो विषय दिवसभर सतत घोळत होता. त्या बातमीत सांगितले होते की संवादाला आसुसलेली एक सिनियर सिटीझन व्यक्ती कुठलेही आकडे जुळवत फोनवर डायल करीत कुठलाही अनोळखी नंबर वर फोन करीत संभाषण वाढवून बोलणे वाढवत बसायचे. त्यातील बरेच जण उद्वेगाने फोन ठेऊन द्यायचे पण काही जण मात्र आत्मीयतपूर्वक संवाद साधायचे. हे एवढे एकच टॉनिक ह्या व्यक्तीसाठी तो दिवस घालवायचा एक नामी उपाय होता.
बरेच जण म्हणतील त्या व्यक्ती मध्ये दोष असेल त्याने माणसे जोडून ठेवली नाही. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी होती. खूप जास्त दीर्घायुष्य त्या व्यक्तिला शाप वाटत होतं. त्यांची आपली जवळची माणसे, जवळचे नातेवाईक आपापल्या कामात व्यस्त असायचे, वयोमानामुळे डोळे काम करीत असल्याने वाचन, टीव्ही पण बराच कमी झाला होता. ह्यावरून ही समस्या किती मोठी आहे हे लगेच लक्षात आले. ह्यावरून मला ह्या विषयावरची एक पोस्ट आठवली आज तीच पोस्ट परत एकदा.
काही पुस्तके ही कितीदाही वाचली, किंवा काही चित्रपट, शॉर्ट फिल्म ह्या कितीदाही बघितल्या तरी परत परत वाचावेसे वा बघावेसे वाटतात. युगंधर, मृत्युंजय, श्रीमानयोगी, ययाती ह्यासारखी पुस्तकं तरं कायम जवळ हवी अशी वाटतात, जेव्हां वेळ मिळेल तेव्हा हवे ते पान काढून वाचत बसावं. अंगुर हेराफेरी ह्या सारखे विनोदी चित्रपट केव्हाही फ्रेश करुन टाकतात.
अशीच एक शार्टफिल्म परत बघावीशी वाटली. यु ट्यूब. वर “काँल हीम एडी” नावाची ही एक खूप छान शाँर्टफिल्म परत काल बघितली. आजकाल एकापेक्षा एक उत्कृष्ट शाँर्टफिल्म बघायला मिळतात, आणि ते पण अगदी घरबसल्या. आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल.
ह्या फिल्ममध्ये मध्यवर्ती भुमिकेत संजय सुरी आणि ईशा चोप्रा हे दोघेही कसलेले कलाकार चमकले आहेत. संजय सुरी ह्यांचा अभिनय नेहमीसारखाच दर्जेदार परंतु नवोदित ईशा त्यांच्यापुढे कुठेही कमी किंवा फिकी पडली नाही हे ह्या फिल्मचे वैशिष्ट्यं.
ह्या फिल्मची संपूर्ण संकल्पना “टू कडल्” म्हणजे “कुशीत घेणे”ह्यावर आधारलेली आहे. संपूर्ण फिल्मचा भर हा भावनांचा निचरा होणे किती अत्यावश्यक आहे हे समजविण्यावर बेतलेला आहे.
संजय सूरी हा एका मोठ्या पदावरील अतिशय मानाच्या नोकरीमधून निवृत्ती घेतो आणि कडलिंग म्हणजेच समोरच्या व्यक्तीचा भावनात्मक ताबा घेऊन त्याला कुशीत घेऊन त्याच्या मनात साठलेल्या भावनांना मोकळी वाट करून देऊन समोरच्या व्यक्तीच्या दुःखाचा निचरा करणे हाच त्याचा प्रमुख उद्देश असतो. अर्थात हे काम तो पूर्णपणे व्यावसायिक तत्वावर करतो आणि ह्या कामात तो प्रचंड यशस्वीपण होतो. हा त्याचा एक उपचारांचाच भाग असतो. तो समोरच्याला विश्वासात घेऊन समजावून सांगतो की ह्या मागे त्याच्या मनात कुठलीही वैषयिक भावना अजिबातच नसणार.
आपल्याकडे जुन्या परंपरांचा बराच पगडा असल्याने कोणत्याही एका स्त्री पुरुषाची जवळीक, मिठी, हस्तांदोलन, मैत्री ही फक्त आणि फक्त वैषयिकदृष्टीकोनातूनच त्या विशिष्ट नजरेने बघितली जाते. प्रत्येक देशात, प्रातांत काही चांगले, काही वांगले ह्याची सरमिसळ असते. त्या मुळे स्त्रीपुरुष मैत्रत्वाचे संबंध ह्या बाबीवर पाश्चात्य देशामध्ये बराच अभ्यास झालेला असल्या कारणाने तिकडे ह्याकडे निव्वळ वैषयिक भावनेने न बघता सहानुभूती, प्रेम, मनाशी जुळलेले मनाचे चिवट धागे ह्याचा विचार करून मग कुठल्याही निष्कर्षाप्रत ती मंडळी पोहोचतात.
ह्या फिल्ममध्ये संजय सूरी हा वयाची तरुणाईचा भर ओसरल्यावर ह्या व्यवसायात पूर्ण अभ्यासाच्या ताकदीने उतरल्याने तो मनात कुठलेही विकल्प न धरता प्रामाणिकपणे उपचाराचा हा टप्पा तो यशस्वीरित्या पार पाडीत असतो.
“जहाँ न बुलबुल नगमे गाये जहा न फसले बहारा” ह्या ओळींप्रमाणे आयुष्यातील एक सुरवातीच्या वयाचा टप्पा ओलांडल्यानंतर वैषयिक भावना जाऊन त्याची जागा फक्त मानसिक, भावनिक प्रेम, सहानुभूती घेतं ह्यावर दुर्दैवाने आपल्याकडे विचारच होत नाही, कदाचित झापड लावल्यासारखी सब घोडे बारा टक्के ह्या नुसार त्याकडे ह्याच नजरेने बघण्याची आपल्याला सवय लागलेली असते. असो तर ह्या उपचारांवर विशेष विश्वास नसलेली एक पत्रकार म्हणजेच ईशा चोप्रा ही सुरींची मुलाखत घेण्यासाठी येते. ह्या थेरपीवर विश्वास नसल्याने तिची सुरवातीची स्थिती ही खूप अवघडल्यासारखी असते. नंतर हळूहळू एडी तिला विश्वासात घेउन तिच्याशी मनमोकळं बोलून आणि तीला मनमोकळं बोलायला लावून आपल्या भावना उलगडवायला कुशीत मिठीत घेऊन, सहानुभूती, प्रेम ह्या जोरावर कसे आश्वस्त करतो हे खरतर प्रत्यक्ष बघण्यासारखेच. हेच ह्या फिल्मच्या यशाचे गमक आहे. अप्रतिम. रंगवलाय हा प्रसंग दोघांनीही. उपचारांमध्ये ईशा स्वतःच्या वडीलांचा केलेला रागराग आणि त्यांच्याकडे एकाच अँगलने बघून वडीलांना कायम दोषी, अपराधी मानत आलेली ईशा त्यांच्या मृत्यू नंतर मात्र स्वतः ला दोषी मानायला लागते. आणि हे गिल्ट च तिला भावनांचा निचरा न झाल्याने नीट जगूही देत नाही आणि मरु ही देत नाही. मात्र मुलाखती बरोबरच चाललेला हा उपचारांचा प्रयोग कमालीचा यशस्वी होऊन ईशा आपल्या भावनांना वाट करुन देऊन मोकळी होते.
दुर्दैवाने संजय सूरी जे ह्या उपचारांनी सगळ्यांना ह्या मानसिक नैराश्यातून बाहेर काढत असतात त्यांना स्वतः ला हा भावनांचा निचरा करायला जवळच कोणीही नसतं. ते शेवटी आपल्या मृत पत्नी व मुलाच्या कबरीपाशी जाऊन स्तब्ध होतात असा शेवट होतो.
म्हणजेच काय तर प्रत्येकाच्या मानसिक गरजा ह्या खूपच वेगवेगळ्या असतात. कोणाला मानसिक आधाराची खूप गरज असते तर काही एकटे पण हा प्रसंग कोणाच्याही मदतीशिवाय तोलू शकतात. पण एक नक्कीच अशी सरसकट अभ्यासपूर्ण मदत आपल्याकडे सर्रास मिळेल तेव्हा आत्ता सारख्या आत्महत्या करण्याचे प्रमाण बरेच कमी होईल.
लेखिका : सुश्री कल्याणी बापट (केळकर)
बडनेरा, अमरावती
प्रस्तुती : सुश्री प्राची जोशी






