मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

चुकले ते एकाच ठिकाणी… शरणागती ही कृती नाही, ती अवस्था आहे. पाया पडणे ही शरणागतीची सुरुवात असेल, पण ती शरणागती नाही. शरणागती म्हणजे माझे मला कळत नाही, माझ्या मनाचा मला भरवसा नाही, माझ्या बुद्धीची मर्यादा मला माहीत आहे आणि म्हणून मी आता तुमच्यावर सोडतो. हे ओठांवरी येणे सोपे पण मनाने म्हणणे हेच खरे कठीण आहे. कारण आपला अहंकार हे म्हणणे देत नाही. तो म्हणतो अरे, आपण काय कमी आहोत? आपण स्वतः करू.

दत्त महाराजांच्या परंपरेत एक गोष्ट नेहमी सांगितली जाते सद्गुरू हे आपल्याला नको त्या गोष्टी देत नाहीत, पण हव्या त्या गोष्टी आपल्याला तयार केल्याशिवाय देत नाहीत. म्हणजे काय? म्हणजे असे की आपण जेव्हा खऱ्या अर्थाने शरण जातो, तेव्हा सद्गुरू आधी आपल्या आतील अनावश्यक प्रश्न गोष्टी साफ करायला सुरुवात करतात. आणि हे साफ करणे सुखाचे नसते. जुन्या सवयी जातात, जुने आधार सुटतात, जे माझे वाटत होते ते एकेक करून निघून जाते. हे सुरू झाले की माणूस घाबरतो अरे, हे काय होतेय? मी शरण गेलो तर आणखी त्रास?

पण हाच तो क्षण असतो जेव्हा सद्गुरू खरे काम करत असतात. कुंभाराने मडके बनवताना आधी माती मऊ करावी लागते, चांगली तुडवावी लागते, मग आकार द्यावा लागतो, मग भट्टीत टाकावे लागते तेव्हा कुठे ते मडके पाणी धरायला तयार होते. आपले आयुष्यही असेच असते. सद्गुरूच्या हाती स्वतःला सोपवणे म्हणजे त्या मातीसारखे होणे जी स्वतःचा आकार विसरते आणि कुंभाराच्या हातात स्वतःला झोकून देते.

शरणागतीनंतर जे होते ते शब्दांत सांगणे कठीण आहे पण एक गोष्ट नक्की होते. भीती कमी होते. जी माणसे, जी परिस्थिती आधी असह्य वाटायची त्यांच्याकडे बघण्याची नजर बदलते. हे का झाले माझ्यासोबत? हा प्रश्न हळूहळू यातून मला काय शिकायचे आहे? असा होतो. हा बदल लहान वाटतो, पण हाच सर्वात मोठा बदल आहे. कारण प्रश्न बदलला की उत्तर बदलते, उत्तर बदलले की जगणे बदलते.

सद्गुरूला शरण गेल्यावर माणूस परिपूर्ण होतो असे नाही. चुका होतात, अडखळणे होते, मन पुन्हा भरकटते. पण फरक एकच असतो आता एकट्याने भरकटत नाही. सद्गुरू सोबत असतात. अंधारात चालताना दिवा हातात असेल तर वाट चुकत नाही असे नाही पण पडलो तरी उठता येते, कारण काय झाले ते दिसते. सद्गुरू हा असा दिवा आहे जो विझत नाही, जो थकत नाही, जो माघार घेत नाही… अगदी खरं आहे..

संकल्प करायला काय हरकत आहे मी आजपासून सद्गुरूवर विश्वास ठेवतो. माझ्या समजुतीपेक्षा त्यांची कृपा मोठी आहे. इतकेच पुरे आहे. बाकी सारे सद्गुरू पाहतात ना…

ll श्री गुरुदेव दत्त ll

ll दत्तरुप ll

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “राजे आणि दुसरं घर..!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “राजे आणि दुसरं घर..!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

अवघ्या त्रेपन्न वर्षांचा एक सत्पुरुष..

पंचतत्त्वात विलीन झाला आणि…

चित्रगुप्ताच्या दरबारात हजर झाला..

चित्रगुप्तानं बसायला मानाचं आसन दिलं,

अन् राजांना अपमान झालेला तो दरबार आठवला..

दोघांनीही त्यावर स्मितहास्य केलं.

 

चला राजे, तुम्हांला स्वर्गाच्या दारापर्यंत

सोडायची जबाबदारी माझी आहे.

आयुष्यभर पायाला भिंगरी लावून फिरलात,

आता जरा उसंत घ्यावी.

चित्रगुप्त अंमळ हुशारीने म्हणाला.

 

राजे जागचे हलले नाहीत, अन् तो चिंताक्रांत झाला.

चलावं महाराज, याचसाठी तर असतो मानव जातीचा अट्टहास.. यावेळी स्वरात जरा अजीजी होती.

 

नको देवा, अर्ध्यातच बोलावलंस न विचारता,

अन् ह्या स्वर्गाचा आग्रह नव्हताच कधी मनात.

श्रींच्या इच्छेचं स्वराज्य तर झालं,

सुराज्यासाठी तू वेळ कुठे दिला..

इथे स्वर्गात गेलो तर देवत्व मिळेल,

आणि खाली मूर्ती आणि टाक होतील माझ्या.

मला मानवच राहू देत आणि राहिलेला अर्धा डाव पूर्ण करु दे.

 

भाग्य लिहीलं गेलंय राजे, आता बदल नाही.

या दरबारातून थेट स्वर्गात, याला पर्याय नाही.

 

राजे पुन्हा हसले,

देवा, माझी वही नीट तपासलीत ना,

तुरी द्यायची कला अवगत आहे मला.

 

स्वर्ग सोडून राजाने पृथ्वीचाच हट्ट धरला

आता मात्र चित्रगुप्ताचा नाईलाज झाला.

जगत्पिता ब्रह्मदेवाशी बोलणी करुन,

राजांसोबत महाराष्ट्रातील गर्भवतींच्या स्वप्नात दाखल झाला.

 

गर्भवती १

देवी, हे मूल देतोय तुला, तेजस्वी आहे.

राजकारणात जाईल, सुराज्य देईल.

नको देवा, शिकून सवरुन नोकरी करेल,

असंच मूल हवंय मला. दुसरं घर बघ.

 

गर्भवती २

देवी, हे मूल देतोय तुला.संस्कारी आहे,

रांझ्याच्या पाटलाचे हात तोडेल, शत्रूकडच्या स्त्रीलाही सन्मान देईल.

नको देवा.आपण भलं आणि आपलं घर भलं,असं मानणारंच मूल दे मला, दुसरं घर बघ.

 

गर्भवती ३

देवी, हे मूल देतोय तुला, परोपकारी आहे,

रयतेचं हित बघेल, कुणाला उपाशी ठेवणार नाही,

प्रसंगी धनिकाकडून घेईल व गरीबाला देईल.

नको देवा, भौतिक सुखांची सवय झालीय मला,

असं उपद्व्यापी मूल नकोय मला, दुसरं घर बघ.

 

गर्भवती ४,५,६…..

देवींनो, होऊ घातल्या मातांनो,

इतिहास बदलू शकणारं एक मूल कूस मागतंय,

स्वर्गाचा दरवाजा सोडून, चंद्रमौळी अंगण मागतंय,

सुराज्याच्या राहिलेल्या स्वप्नासाठी,

स्वतःच निर्मिलेल्या राज्यात,

पुनर्जन्मासाठी एक जिजामाता शोधतंय..

कुणीतरी या पुढे आणि आपल्या उदरात

सामावून घ्या हा सूर्य.

 

देवा, कितीदा सांगावं तुला,

जे आहे ते सहन करावं, जे होईल ते स्वीकारत जावं,

निगुतीनं वागावं अन् स्वतःचं पहावं, हेच अंगात भिनलंय आता.

अन्याय बिन्याय, सत्यासाठी लढा, वगैरे वगैरे म्हणजे

लष्कराच्या भाकरी आहेत रे, नाही भाजायच्या आम्हांला.

हे सूर्याचं तेज सांभाळणारी जिजाऊ शेजारच्या घरात आहे बहुतेक.

आमचा पिच्छा सोड देवा आणि कृपा करुन दुसरं घर बघ.

 

हताश झालेल्या स्वरात चित्रगुप्त म्हणाला,

राजे, उणीपुरी तीनशे चाळीस वर्ष फिरवताएत मला.

एव्हाना तुमचा देव केलाय हो लोकांनी,

मणभर सोन्याचं सिंहासन, आणि रुप्याचे टाक झालेत तुमचे आणि मूर्तीही विसावल्यात देव्हा-यात.

पुतळे तर तुम्ही न पाहिलेल्या, न जिंकलेल्या प्रदेशातही उभारलेत. 

तुमचा पुनर्जन्म हा तर तुमचं नावं घेऊन मनमानी करणा-यांनाही घात ठरेल. त्यांनाही नकोसा असेल हा पुनर्जन्म. आता तरी स्वर्गात चला.

 

देवा, असा हताश झालो असतो तर,

चार मित्र घेऊन भवानीसमोर शपथ घेतलीच नसती,

कोवळ्या पोराला घेऊन आग्र्याहून सुटलोच नसतो,

सर्व काही गमावलेल्या तहातून उभा राहिलोच नसतो,

अमर्याद सागराशी पैज घेतलीच नसती,

दक्षिणेचा दिग्विजय मिळवलाच नसता,

स्वराज्यासाठी आदर्श आज्ञापत्रे लिहीलीच नसती,

आणि..

माझ्यानंतरही चालणारं राज्य निर्माण केलंच नसतं.

एकदा सुराज्य येऊ दे देवा, तुम्ही म्हणाल तेथे येईन.

तोपर्यंत…?

तोपर्यंत,

राजांचा आत्मा न मागितलेल्या देवत्वाच्या माळेत गुंफलेला राहणार,

आणि

मावळ्यांचे हात केवळ ढोल-ताशांच्या गजरात गुंतलेले राहणार..!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कसे घडले हे ?…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “कसे घडले हे ?…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

भारताच्या संयुक्त कुटुंब प्रणालीला तोडण्याची कटकारस्थानं:

“कुटुंबं तुटली, की बाजार फुलतो” — हा केवळ एक विचार नाही, तर एक संपूर्ण नीती आहे.

आधुनिकतेकडे वाटचाल की लपवलेली गुलामी?

भारताची खरी ताकद काय होती?

मुघल आले, ब्रिटिश आले, अनेक परकीय आक्रमणकर्ते आले — पण एक गोष्ट अखंड राहिली — आपली संयुक्त कुटुंब प्रणाली.

हीच होती आपली खरी “Social Security”

ना पेन्शनची गरज, ना एकटेपणा, ना मानसिक आजारांचा कहर.

मग पाश्चिमात्य जगाला ही व्यवस्था का नकोशी वाटू लागली?

पश्चिमी देश म्हणजे वसाहतवादी — त्यांचा सर्वात मोठा धर्म म्हणजे बाजार.

पण भारतासारख्या देशात, जिथे लोक सुख-दुःख सामायिक करतात, कमी खर्च करतात, आणि सामूहिक विचार करतात— इथे त्यांचे उत्पादने विकली जाऊ शकत नव्हती.

मग एक हुशार योजना आखली गेली:

“कुटुंबं फोडा, माणसं एकटी करा, आणि प्रत्येकजण ग्राहक होईल. “

हा हल्ला कसा झाला?

माध्यमांनी संयुक्त कुटुंबांना दाखवलं:

* “भांडखोर”,

* “ओझं”,

* “प्रगतीला अडथळा”,

तर लहान कुटुंबं (nuclear families) दाखवली:

* “स्वातंत्र्य”,

* “आधुनिकता”,

* “स्वबळावर उभं राहिलेली”.

लक्षात ठेवा:किती TV मालिकांमध्ये सासू-सुनांच्या भांडणांचा शेवट “वेगळं होणं” हाच उपाय म्हणून दाखवला जातो?

 ग्राहकवाद (Consumerism): 

जेव्हा प्रत्येक जोडपं वेगळं राहायला लागलं:

* 1 कुटुंब = 4 घरे

* 1 TV = 4 TV

* 1 स्वयंपाकघर = 4 स्वयंपाकघरे

* 1 कार = 4 स्कूटर + 2 कार

बाजार तेजीत आला, पण समाज ढासळला.

या “सांघिक हल्ल्याचे” भारतात परिणाम काय झाले?

सामाजिक अधोगती:

* ज्येष्ठ मंडळी आता “ओझं”

* मुले एकटी (आणि स्क्रीनमध्ये हरवलेली)

* नातेवाईक “उपलब्धच नाहीत”

* संस्कारांचं स्थान आता “इन्फ्लुएन्सर्स” ने घेतलं आहे

मानसिक आरोग्याचा संकोच:

* पूर्वी आजी-आजोबांशी जे बोललं जातं, ते आता “काउंसलर” कडे जातं

* जेव्हा प्रेमातून एकटेपणा सुटायचा, तो आता उपचारांनी कमी करावा लागतो

 बाजाराचे फायदे:

* प्रत्येक समस्येसाठी एक प्रॉडक्ट

* प्रत्येक भावनेसाठी एक अ‍ॅप

* प्रत्येक सणासाठी “ऑनलाईन ऑर्डर”

“सबस्क्रिप्शनने संस्कारांची जागा घेतली आहे. “

 आजचा प्रश्न — आपण काय होत आहोत?

 “आधुनिकतेच्या” नादात आपण:

 * संयुक्त कुटुंबं म्हणालो “जुनाट”

* आईवडील झाले “अडथळे”

* कुटुंबं झाली “नको असलेली भावना”

* नातेसंबंध झाले “अनफॉलो”

 पण विचार केलाय का?

 * Amazonला फायदा होतो तेव्हा तुम्ही दिवाळीत एकटे खरेदी करता, कुटुंबासोबत बसत नाही.

* Zomato कमावतो तेव्हा तुम्ही आईच्या हातचं अन्न टाळता.

 * Netflix चालतो तेव्हा तुम्ही आजीच्या गोष्टी टाळता.

 

 उपाय: अजूनही वेळ गेलेली नाही

 संयुक्त कुटुंबं “ओझं” नाहीत, ती “मूल्यवान संपत्ती” आहेत.

* मुलांना ग्राहक म्हणून नव्हे, तर संस्कारित माणूस म्हणून वाढवा.

* ज्येष्ठांना घराबाहेर काढू नका — त्यांचा अनुभव Google पेक्षा श्रेष्ठ आहे.

* * सण “खरेदीसाठी” नव्हे, तर उत्सवासाठी साजरे करा.

अ‍ॅप्स नव्हे, प्रेम वाढवा— म्हणजे एकटेपणा आपोआप कमी होईल.

 

  निष्कर्ष:

 “पश्चिम जगाने व्यापारासाठी कुटुंबं फोडली, आणि आपण ‘आधुनिक’ होण्यासाठी आपली ओळख विकली. “

 आता थांबण्याची, विचार करण्याची आणि आपल्या संस्कारांकडे परतण्याची वेळ आली आहे — नाहीतर पुढची पिढी ‘संयुक्त कुटुंब’ म्हणजे काय, ते समजून घेण्यासाठी Google वापरेल.

 कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मानसशास्त्राची पदवी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मानसशास्त्राची पदवी… – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

वर्गात प्राध्यापकांनी मानसशास्त्राचा तास घ्यायला सुरुवात केली होती. तेवढ्यात मागून एका मुलाने शिट्टी वाजवली. प्राध्यापकांनी शिट्टी कोणी वाजवली, असं विचारल्यावर संपूर्ण वर्ग शांत बसला. मात्र कोणीच नाव सांगितलं नाही.

सरांनी हातातला खडू खाली ठेवला आणि म्हणाले, ”आपला आजचा तास इथेच संपतो आहे. पण राहिलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तुम्हाला कालच रात्री घडलेला एक किस्सा सांगतो. “

किस्सा ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कान टवकारले.

“काल रात्री उशिरापर्यंत मला झोप येत नव्हती. वेळ काढायचा म्हणून गाडीत पेट्रोल भरून येऊ, असा विचार माझ्या मनात आला म्हणून गाडी काढून मी पेट्रोल भरून घेतलं. पेट्रोल भरल्यावर सहजच मी एका शांत रस्त्यावर गाडी वळवली. रस्त्याच्या कोपऱ्यावर एक अतिशय मादक, सुंदर ललना उभी होती. मी गाडी तिच्याजवळ थांबवून तिला विचारलं की मॅडम, मी आपली काही मदत करू शकतो का? हो, मला घरापर्यंत सोडू शकलात तर फार बरं होईल. गाडीचा दरवाजा उघडून मी तिला आत घेतलं आणि तिच्या घराच्या दिशेने गाडी वळवली. वाटेत आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो. सौन्दर्यासोबतच बुद्धिमत्तेची देणगी लाभलेल्या निवडक स्त्रियांमध्ये मी तिचा समावेश करेन.

तिच्या घराशी पोहचल्यावर तिने लाजत लाजत कबूल केले की माझ्या सहृदय वागण्यामुळे ती माझ्या प्रेमात पडली आहे. मी ही तिच्या सौन्दर्याची आणि बुद्धिमत्तेची तारीफ करत तिच्या प्रेमात पडल्याची कबुली तिला दिली. एकमेकांशी बोलताना मी तिला माझ्या पेशाबद्दल सांगितलं. निरोप घेताना आम्ही फोन नंबरची अदलाबदल केली. अगदी शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं की तिचा भाऊ मी शिकवत असलेल्याच महाविद्यालयात शिकतो, त्यामुळे होणारा दाजी या नात्याने मी त्याची काळजी घ्यावी. मी तिला त्याचं नाव विचारलं. त्यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही त्याला त्याच्या खास सवयीवरून लगेच ओळखाल…

‘तो अतिशय उत्तम शिट्टी वाजवतो. ‘

प्राध्यापकांच्या या वाक्यावर अख्खा वर्ग मगाशी शिट्टी वाजवलेल्या विद्यार्थ्यांकडे बघायला लागला.

प्राध्यापक महाशय त्या विद्यार्थ्याकडे बघून हसून म्हणाले, ” माझी मानसशास्त्राची पदवी / ज्ञान मी विकत घेतलेलं नाही तर स्वकष्टाने अर्जित केलं आहे.

निघ बाहेर वर्गाच्या… “

*

लेखक:अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पती-पत्नी : आयुष्याचे शेवटचे सोबती” – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “पती-पत्नी : आयुष्याचे शेवटचे सोबती” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

लग्न म्हणजे फक्त फोटोमध्ये हसणाऱ्या दोन चेहऱ्यांची गोष्ट नाही. ती एका घरात राहणाऱ्या दोन व्यक्तींची कहाणी आहे, ज्या हजारो वेळा तुटतात, पण जगाला न कळता पुन्हा स्वतःला जोडून घेतात.

पती-पत्नीच्या नात्यात फक्त प्रेमच नसते. त्यात राग असतो, अहंकार असतो, दुःख असते. असेही दिवस येतात की दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. पत्नीच्या मनात वेदना असते की, “हे कधीच बदलणार नाहीत. ” तर पतीच्या मनात खंत असते की, “ही मला कधीच समजून घेत नाही. ”

पण गंमत बघा…

तोच पती उशिरा घरी आला की पत्नी दाराच्या आवाजाने जागी होते. आणि तोच पती रागात असला तरी पत्नी जेवली नाही, हे कळल्यावर तिच्यासमोर ताट वाढतो.

यालाच विवाह म्हणतात.

मुलं लहान असताना घर गजबजलेलं असतं. आई-वडील स्वतःला मुलांच्या शिक्षणात, लग्नात, नोकरीत, नातवंडांत पूर्णपणे झोकून देतात. पण एक दिवस मुलं आपापल्या आयुष्यात रमून जातात. हळूहळू घर रिकामं होतं.

आणि मग फक्त दोघेच उरतात.

एकेकाळी त्रासदायक वाटणारे घोरणे, एखाद्या दिवशी ऐकू आले नाही तर डोळे पाणावतात. “इतकं बोलू नकोस, ” म्हणून ज्याला रागावलं होतं, तो आवाज कायमचा शांत झाला तर घराच्या भिंतीसुद्धा ओसाड वाटतात.

एखादा माणूस गेल्यावर सांत्वनासाठी अनेकजण येतात. पण रात्री पलंगावरील रिकामी जागा कोणी भरून काढू शकत नाही. औषध देणारा हात, “जेवलास/जेवलीस का? ” असे विचारणारा आवाज, रागामागे दडलेली काळजी दाखवणारे डोळे — हे सगळं परत आणता येत नाही.

म्हणून लक्षात ठेवा…

सर्वोत्तम जोडपे ते नसते, जे कधीच भांडत नाही.

सर्वोत्तम जोडपे ते असते, जे भांडणानंतरही एकमेकांची साथ सोडत नाही.

 वैवाहिक जीवनात प्रेमापेक्षा समजूतदारपणा मोठा असतो.

समजूतदारपणापेक्षा संयम मोठा असतो.

आणि संयमापेक्षाही मोठं असतं ते मन, जे शेवटपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतं.

खोडकरपणा, लाज, भांडणं, शांतता, संघर्ष, आनंद, अश्रू, हसू, तडजोड — या सगळ्यांनी मिळून विवाह पवित्र बनतो.

आपला जोडीदार जिवंत असतानाच त्याची किंमत ओळखा. कारण जिवंतपणी दिलेला सन्मान हा मृत्यूनंतर गाळलेल्या अश्रूंहून अधिक पवित्र असतो.

हे नेहमी लक्षात ठेवा…

आयुष्यात परिपूर्ण जोडीदार कधीच मिळत नाही. पण तुमच्या अपूर्णता स्वीकारून शेवटपर्यंत तुमची साथ देणारा जोडीदार मिळणे, याहून मोठे भाग्य दुसरे नाही.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संक्रमण..  – कवी – ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – ज्योत्स्ना तानवडे ☆

ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ संक्रमण..  – कवी – ड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सूर्योदय तो पूर्वेला अन्

 पश्चिमेस तो अस्त असे

सृष्टीचा हा नियम मानवा

 त्रिकालाबाधित सत्य असे ।

 *

रवि जरासा अवखळ भारी

 एका जागी स्थिर नसे

 एका जागी नित्य उगवणे

 हेच तया मंजुर नसे ।।

 *

वदे रवि तो ब्रह्मापाशी

 जरा मोकळीक द्या मजला

उगवुन येण्या एक ठिकाणी

 मजला येईल कंटाळा ।।

 *

आज येथुनी उद्या तेथुनी

 उगवलो तर होईल छान

रोज नव्या देशाला देईन

 पहिला बघण्याचा हो मान ।।

 *

ब्रह्मदेव ही हसले किंचीत

 हट्ट पाहुनी सुर्याचा

दिवस कुठे अन् कुठे रात्र

 हा मेळ कसा साधायचा ।।

 *

मान राखुनी परी रविचा

 ब्रह्मदेव वदले त्याला

उगवताना पूर्व दिशा अन्

 पश्चिमेस जा अस्ताला ।।

 *

परी उगवता पूर्व दिशेला

 उत्तरेकडे सरकत जा

सहा मास सरताच मागुता

 दक्षिण अंगे उगवत जा ।।

 *

सूर्य तोषला रचना ऐकून

 उदय आणिक अस्ताची

दिशा जरी ती एक परंतु

 जागा बदले नित्याची ।।

 *

उत्तर अंगे उगवत जाता

 उत्तरायनी सूर्य असे

दक्षिण अंगे तोच उगवता

 दक्षिणायनी तोच दिसे ।।

 *

संक्रमणाने फुलते जीवन

 गती लाभते जगण्याला

म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो

 नभांगणातुनी दिवसाला ।।

 *

जगी चिरंतन टिकून राही

 बदल तयाचे नाम असे

असे बदल, परी मार्ग सुनिश्चित

 हे देवाचे दान असे ।

कवी – ड .समीर आठल्ये

प्रस्तुती – ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चिऊताई, दार उघड…” – लेखक : दत्ता कुकडे ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “चिऊताई, दार उघड…” – लेखक : दत्ता कुकडे ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

बाल्कनीत बसून सकाळचा चहा घेत होतो. बाहेर पाऊस रिमझिम सुरू होता. समोरच्या वायरवर एक कावळा बसला होता. अंगावर पडलेले थेंब झटकत तो इकडे तिकडे पाहत होता. त्याला पाहताच अचानक बालपणात ऐकलेली गोष्ट आठवली.

“एक होती चिऊ, एक होती काऊ… “

मोठा पाऊस आला. चिऊचे घर मेणाचे होते, काऊचे घर शेणाचे. पावसात काऊचे घर वाहून गेले. मग ती चिऊच्या दाराशी आली.

“चिऊताई, चिऊताई, दार उघड… “

आणि मग चिऊचे नेहमीचे उत्तर…

“थांब गं, माझ्या बाळाला अंघोळ घालते. “

थोड्या वेळाने…

“थांब गं, माझ्या बाळाला जेवू घालते. “

पुन्हा थोड्या वेळाने…

“थांब गं, माझ्या बाळाला झोपवते. “

लहानपणी ही गोष्ट गोड वाटायची. चिऊ शहाणी आणि काऊ थोडी भोळी, एवढाच तिचा अर्थ वाटायचा. पण आज त्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहावेसे वाटते.

आता मला चिऊचे घर मेणाचे वाटत नाही. ते सिमेंट-काँक्रीटचे, मजबूत घर वाटते. आणि काऊचे घर म्हणजे एखादी मातीची झोपडी वाटते. पाऊस आला की चिऊच्या घरातील माणसे खिडकीतून पाऊस पाहतात. काऊच्या घरातील माणसे मात्र आकाशाकडे पाहत काळजी करतात.

चिऊ म्हणते, “माझ्या बाळाला अंघोळ घालते. “

मला प्रश्न पडतो, काऊला बाळ नसते का?

चिऊ म्हणते, “माझ्या बाळाला जेवू घालते. “

काऊची पिल्ले उपाशी नसतात का?

गोष्ट पुढे जाते आणि एक वाक्य येते, “कोणत्या पोत्यात बसशील? “

लहानपणी हे वाक्य गंमतीशीर वाटायचे. आज त्याचा अर्थ वेगळा जाणवतो. ज्याच्या घरात पोती आहेत, धान्याचा साठा आहे, त्यालाच हा प्रश्न पडू शकतो. ज्याच्याकडे दोन दिवसांपुरतेही धान्य नाही, त्याला पोत्याचा पर्यायच नसतो.

कदाचित ही गोष्ट नकळत समाजाचे चित्र दाखवत असावी.

एकीकडे सुरक्षित घरे, बँकेतली बचत, विमा, साठवणूक आणि उद्याची चिंता कमी असलेले लोक.

दुसरीकडे रोज कमावून रोज खाणारे, पावसाने काम बंद झाले की चूल विझणारे लोक.

पाऊस मात्र दोघांच्या छपरावर सारखाच पडतो.

निसर्ग भेदभाव करत नाही. पण माणसांची परिस्थिती मात्र सारखी नसते.

या गोष्टीतला खरा प्रश्न चिऊ वाईट आहे की काऊ भोळी आहे हा नाही. खरा प्रश्न असा आहे की काऊ दाराशी आली तेव्हा चिऊने तिची भीती, तिचे दु:ख, तिची असुरक्षितता समजून घेतली का?

आज आपल्या सभोवताली अनेक “काऊ” दिसतात. पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, बेघर, बेरोजगार, संकटात सापडलेले लोक. आणि अनेक “चिऊ” देखील दिसतात. ज्यांच्याकडे साधनसंपत्ती आहे, सुरक्षितता आहे, साठा आहे.

प्रश्न एवढाच आहे की काऊ दाराशी आली तर आपण तिला किती वेळ थांबवणार?

कारण शेवटी माणुसकीचा अर्थ एवढाच असतो की आपल्या घराचे दार बंद करून सुरक्षित बसणे नव्हे, तर संकटात सापडलेल्या दुसऱ्यासाठी ते दार उघडणे.

बालपणीची ती साधी गोष्ट आजही कानात घुमते…

“चिऊताई, चिऊताई, दार उघड… “

आणि वाटते, प्रत्येक पावसाळ्यात हा आवाज पुन्हा एकदा ऐकायला हवा. संपत्तीची खरी परीक्षा साठा किती आहे यावर होत नाही; दार किती उघडे आहे यावर होते.

 “लहानपणी आपण चिऊचे कौतुक करतो, मोठे झाल्यावर काऊचे दु:ख समजू लागते, आणि आयुष्याचा खरा धडा तेव्हा मिळतो जेव्हा आपण स्वतः चिऊ असूनही काऊसाठी दार उघडतो. “

लेखक: दत्ता कुकडे

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई की पत्नी…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई की पत्नी…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

एकदा पत्नीने मला सहज विचारले…

“सांगा ना, जर कधी अशी वेळ आली की तुझी आई किंवा मी… आमच्यापैकी एकीचीच निवड करावी लागली, तर तू कोणाला निवडशील?”

 

प्रश्न साधाच होता…

पण उत्तर देताना अनेक नात्यांचे ओझे मनावर येऊन बसले.

 

मी काही क्षण शांत राहिलो…

आणि मग हळूवार पणे म्हणालो,

“मी… माझ्या आईची निवड करीन.”

 

क्षणात तिचा चेहरा उतरला.

ती हळव्या आवाजात म्हणाली..

“ज्याच्यासाठी मी माझे माहेर सोडले…

आई-वडील, भाऊ-बहीण सोडले…

सगळे आयुष्य तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या घरी आले…

त्याच माणसाच्या आयुष्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे…?”

 

तिच्या डोळ्यांतील दुःख मला दिसत होते.

मी तिचे हात हातात घेतले आणि शांतपणे म्हणालो…

“अगं वेडे… माझे उत्तर तुझ्यावरच्या प्रेमाचे मोजमाप नाही.

ते माझ्या संस्कारांचे प्रतिबिंब आहे.

आज जर मी माझ्या पत्नीसाठी माझ्या जन्मदात्या आईला दूर केले…

तर, उद्या आपला मुलगाही त्याच्या पत्नीसाठी स्वतःच्या आईला… म्हणजे तुलाच… दूर करणे योग्य समजेल.

आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यांतले अश्रू मी कधीच पाहू शकणार नाही.

म्हणून मला माझ्या मुलांना एवढेच शिकवायचे आहे—

आईचा सन्मान करताना पत्नीचा अपमान करू नका…

आणि पत्नीवर प्रेम करताना आईला विसरू नका.

कारण प्रेम म्हणजे कोणाला जिंकणे नाही…

तर प्रेम म्हणजे कोणालाही न हरवता सगळ्यांना जपणे.”

 

हे ऐकून तिच्या डोळ्यांतले अश्रू अलगद ओघळले…

पण त्या अश्रूंमध्ये पराभव नव्हता…

होता तो माझ्या विचारांचा स्वीकार…!

आणि दोन्ही नात्यांचा सन्मान करणाऱ्या एका घराचा सुंदर पाया…!

 

लक्षात ठेवायला हवे…

आई ही जीवनाची सुरुवात आहे…

पत्नी ही जीवनप्रवासाची साथ आहे…

 

एकीने जन्म दिला…

दुसरी आयुष्याला अर्थ देते…

या दोघींपैकी कोण मोठे? कोण जवळचे? कोण अधिक प्रेमाचे? हे प्रश्नच चुकीचे आहेत.

 

कारण घर तेव्हा स्वर्ग बनते, जेव्हा तिथे तुलना नसते…

अहंकार नसतो…

तर असतो फक्त परस्परांचा आदर, प्रेम आणि जपणूक.

 

खरा पुरुष तो नाही जो एका नात्यासाठी दुसरे नाते तोडतो…

खरा पुरुष तो आहे, जो दोन्ही नात्यांना न्याय देतो, दोघींच्या डोळ्यांत विश्वास ठेवतो आणि पुढच्या पिढीला नात्यांचा खरा संस्कार देतो.

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वारी…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “वारी…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

 पंढरपूरचा विठु काल

 अचानक आला घरी

आणि म्हणाला, आवर लवकर बयो

निघालेत वारकरी ।।

 

मी म्हणाले निघते हं विठु घरचं एकदा बघते।

शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते।।

 

लगबग माझी सुरू झाली

नवऱ्याचे कपडे बघू की

मुलांसाठी खाऊ करु

एवढया कमी अवधीत

सगळं कसं आवरू ?

 

शेवटी एकदाची तयार झाले

आणि उंबऱ्यापाशीच थबकले ।

 

काळजातली गलबल लपवु पाहत होते।

डोळ्यांमधले अश्रु थोपवू पाहत होते ।।

 

नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी।

मीच मला समजावत होते परोपरी ।

 

घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला,

यंदा असु दे,बघु पुढे केव्हातरी ।।

 

माझा एक पाय आत,एक पाय बाहेर।

वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर ।।

 

आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना।

मला सोडून मग त्याचाही पाय निघेना।।

 

मी म्हणाले, सोपं नसतं रे विठु हे दुहेरी जगणं।

संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं ।।

 

उपाय खूप सांगितलेत रे, मीच पडते कमी।

तूच आता काहीतरी दे बाबा हमी।।

 

कुणी म्हणतं ममत्व सोड ।

कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड ।

 

गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे ।

गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे।।

 

एकच भीती वाटते विठु,

प्रवाहात पोहताना एकदिवस अचानक

तुटून जाईल ही श्वासाची दोरी ।

आणि कधीच घडणार नाही रे,

तुझ्या पंढरपूरची वारी ।।

 

माझ्या डोळ्यातले अश्रु त्याने अलगद पुसले ।

त्याच्याही डोळयांत कुठेतरी मला ते दिसले।।

 

माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला,

संसार सोडू नकोस,एक फक्त कर

श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव।

चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव ।।

 

इंद्रियांना करू देत त्यांचं काम ।

मनावर मात्र घाल चांगला लगाम ।।

 

मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही।

प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही।।

 

तुझ्या हृदयातला माझाअंश ,त्याला ठेव साक्षी

 त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता ।

 

मग बघ मन, बुद्धी, चित्त, अहंकार..

हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता ।।

 

हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल।

हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल ।।

 

अहंकार गेला की ममत्वही सुटेल ।

रज-तमाचं कवाड एक एक करून मिटेल ।।

 

 हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश ।

हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश ।।

 

 निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल।

आणि विश्वास ठेव पोरी!

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

 

 जय हरि

         

कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मी कोण? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

मी कोण?

नोकरी संपली,

दिनक्रमही गेला,

घरातली गजबजही थांबली,

आणि शांततेच्या प्रतिध्वनीत

मी स्वतःला शोधायला लागलो.

 

मी कोण?

बंगलो बांधले,

फार्महाऊस उभारले,

मोठी-लहान गुंतवणूक केली,

आणि आता?

चार भिंतीत अडकून पडलोय.

 

सायकलवरून मोपेड,

मोपेडवरून मोटार,

मोटारीतून गाडी,

गती आणि स्टाईलच्या मागे धावलो,

पण आता?

हळूहळू पाय रेंगत रेंगत

आपल्या खोलीतच फिरतोय.

 

निसर्गाने विचारलं—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी म्हणालो,

“मी… फक्त मीच.”

 

राज्य, देश, खंड फिरलो,

पण आज

माझे प्रवास

हॉलपासून स्वयंपाकघरापर्यंतच.

 

संस्कृती, परंपरा जाणून घेतल्या,

पण आता माझ्या कुटुंबाने

मला समजून घ्यावं

अशी इच्छा आहे.

 

निसर्ग हसून म्हणाला—

“कोण आहेस रे मित्रा?”

मी उत्तर दिलं,

“मी… फक्त मीच.”

 

पूर्वी वाढदिवस,

लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटात केले,

पण आज

फक्त छान झोप लागली,

भूक लागली,

हेच साजरं करतो.

 

सोने, चांदी, हिरे, मोती

सगळं बँकेत गप्प बसलंय.

सूट-बूट कपाटात लटकलेले.

आता फक्त मऊ सुताचे कपडे,

साधेपणातला आराम.

 

इंग्रजी, फ्रेंच, हिंदी शिकलो,

पण आता

माझ्या मायबोलीतच

सुख मिळतं.

 

व्यवसायासाठी

जगभर धावलो,

नफा-तोट्यांची गणितं केली,

पण आज

फक्त आठवणींमध्ये हिशोब करतो.

 

व्यवसाय सांभाळला,

कुटुंब जोडलं,

खूप नाती केली,

पण आता?

शेजारचा साधा-सोपा माणूसच

माझा जिवलग सोबती आहे.

 

नियम पाळले,

शिक्षण घेतलं,

पण आता कळतंय—

खरं महत्त्वाचं काय आहे.

 

जीवनाचे चढउतार अनुभवून,

शांत क्षणी

माझ्या आत्म्यानेच मला सांगितलं:

 

“पुरे झालं आता…

तयार हो प्रवासी,

अंतिम प्रवासासाठी…”

 

निसर्ग पुन्हा हसून विचारतो—

“कोण आहेस रे मित्रा?”

 

मी हळूच म्हणतो:

“अरे निसर्गा,

तूच मी…आणि मीच तू.

एकेकाळी आकाशात झेपावलो,

आता जमिनीलाही

प्रेमाने स्पर्शतो.

मला माफ कर…

एकदा पुन्हा जगू दे मला—

पैशाच्या यंत्रासारखा नव्हे,

तर खराखुरा माणूस म्हणून—

मुलांसह, कुटुंबासह, आणि प्रेमासह.”

 

वरिष्ठ नागरिकांना समर्पित

 संपत्ती एका झटक्यात,

सौंदर्य एका आजारात,

आणि प्रतिष्ठा एका चुकीत

नष्ट होते,

म्हणूनच या तिन्ही गोष्टींचा

कधीही गर्व नको ..!

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares