सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ रफू… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
☆
गावातल्या जुन्या बाजारपेठेत एक छोटंसं दुकान होतं — ‘रफूवाला’.
दुकान इतकं छोटं की आत उभं राहिलं की बाहेरचं जग विसरून जावं.
भिंतीवर टांगलेले जुने कोट, फाटलेल्या शाली, झिजलेले स्वेटर्स… आणि टेबलावर एक छोटं भिंग.
दादाभाईचं काम एकच — रफू.
.. .. रफू म्हणजे फक्त सुई-दोऱ्याचं काम नाही.
रफू म्हणजे फाटलेलं इतकं जपून जोडणं की फट कुठे होती हेही दिसू नये.
.. .. पण हे काम सगळ्यांना जमत नाही.
कारण फक्त सुई-दोरा असला म्हणून रफू होत नाही.
त्यासाठी लागतात — वर्षांचा अनुभव, संयम, आणि कपड्याची भाषा समजणारे डोळे.
त्या दिवशी दादाभाईच्या दुकानात एक तरुण आला. हातात त्याने एक जुना स्वेटर धरला होता.
“भाई… हे रफू होईल का?”
भाईने भिंग लावून स्वेटर पाहिला. फट मोठी होती.
ते शांतपणे म्हणाले, “रफू होईल… पण वेळ लागेल.”
तरुण थोडा चिडून म्हणाला, “इतका वेळ कशाला? दोन टाके मारले की झालं ना?”
भाई हलकंसं हसले.
“बाबा… दोन टाके मारणं म्हणजे शिवण.
पण रफू म्हणजे जखम लपवणं.”
दुकानात एक वृद्ध माणूस बसलेला होता.
तो सगळं ऐकत होता. त्याने हळूच विचारलं ,
“भाई… कपड्याला रफू असतो…
पण नात्यांना असतो का?”
.. .. दुकानात क्षणभर शांतता पसरली.
त्या वृद्धाचं नाव होतं दत्ताभाऊ.
त्यांचा एक जिवलग मित्र होता — गणेश.
शाळेत एकत्र, कॉलेजात एकत्र, लग्नात एकमेकांच्या बाजूला.
लोक म्हणायचे,
“हे दोघे मित्र नाहीत…एका आत्म्याचे दोन भाग आहेत.”
पण आयुष्यात एक दिवस आला.
व्यवसायात पैसे आले.
पद, प्रतिष्ठा, सत्ता आली.
आणि त्याच्यासोबत आली —
.. .. अहंकाराची बारीक फट.
सुरुवातीला ती फट दिसलीच नाही. मग गैरसमज वाढले. एकमेकांवर शब्द झडले.
आणि एक दिवस…
.. .. नातं फाटलं.
दत्ताभाऊ हळू आवाजात म्हणाले,
“सुरुवातीला वाटलं… दोन फोन केले की सगळं ठीक होईल. पण अहंकाराचा दोरा खूप घट्ट असतो.”
वर्षं गेली.
.. दोघेही आपापल्या आयुष्यात मोठे झाले.
पण आत कुठेतरी एक जागा रिकामी राहिली.
भाई शांतपणे रफू करत होते.
ते म्हणाले,
“दत्ताभाऊ… कपडं फाटलं की लोक लगेच आणतात.
पण नातं फाटलं की लोक थांबतात.
अहंकार सुकू देतात… जखम खोल जाऊ देतात… .. आणि मग रफू करायला येतात तेव्हा…”
ते स्वेटर उचलून दाखवत म्हणाले,
“दोरा जुळत नाही… रंग जुळत नाही… आणि फट जास्त मोठी झालेली असते.”
दत्ताभाऊंच्या डोळ्यात पाणी आलं.
ते म्हणाले, “भाई… मग उपाय काय?”
भाईने सुई हळूच ठेवली.
.. “उपाय एकच… रफू लवकर करायचा.”
“फट दिसली की लगेच बसायचं.
दोरा संयमाचा, सुई समजुतीची, आणि गाठ माफीची.”
.. .. स्वेटर तयार झाला. फट कुठे होती हे ओळखूही येत नव्हतं.
तरुण आश्चर्याने म्हणाला,
“भाई… खरंच दिसत नाही!”
दादाभाई म्हणाले,
“कारण मी फक्त टाके मारले नाहीत.
कपड्याच्या धाग्यांतूनच धागा काढून रफू केला.”
दत्ताभाऊ उठले. त्यांनी फोन काढला. खूप वर्षांनी एक नंबर डायल केला.
फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला…
“हॅलो…?”
दत्ताभाऊंचा आवाज थरथरला.
“ गण्या, आपल्या मैत्रीला थोडा रफू करायचा आहे. वेळ आहे का?”
त्या दिवशी दादाभाई दुकान बंद करताना हळूच पुटपुटले , “कपड्याचा रफू मी करू शकतो. पण नात्यांचा रफू माणसांनी स्वतः करायचा असतो…
कारण –
– – फाटायला एक क्षण लागतो, पण रफू करायला कधी कधी संपूर्ण आयुष्य लागतं.”
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : गौरी गाडेकr
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





