श्री तुकाराम दादा पाटील
विविधा
☆ गंमत… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
माणसाचं मन जीवसृष्टीतल एक अजब रसायन आहे ते कधी कुणात एकजिनसी होऊन मिसळून एकरूप होऊन जाईल आणि कुणाशी बेइमानी करून कुणापासून कशासाठी फारकत घेऊन विभक्त होईल याचा काही नेम नाही. कारण ते चंचल अस्थिर, चपळ, चालाख आहे. याचा सर्वानी अनुभव घेतलेला असेलच. मना मुळेच मानवजातितील विवीधता, मतभिन्नता आवडीनिवडी, नितीमानता, आणि संतानी सांगितलेल्या शड्ररिपुंची देहावरची मजबूत पकड ठेवण्याच्या मनाच्या अफाट शक्तीचे धोरण सूक्ष्म निरीक्षणाने ध्यानात येते. मग माणूस आपल्यातला खरा माणूस शोधू लागतो. तो कोणाला किती सापडतो हे शोधणारालाच माहिती पडतं. पण ते सापडणं इतरांना सविस्तरपेणे सांगता येईल ही बाबही तशी अवघडच.
कारण जो तो मनाच्या या फाजील पणामुळेच आपल्याला राज समजून वागताना दिसतो राजासारखा पण जगतो चिंताग्रस्त माणसा सारखा. कारण त्याच मन त्याची कशी कधी फसगत करील हे त्यालाच माहीत नसतं. असलं हे लबाड, ढोंगी, आपमतलबी. निगरगटृठ, दिलदार, कपटी, रानटी, अडेलतट्टू, अशी बिरुदावली मिरवणार मन महा डांबीस असतं. ते ओढाळपणा करत माणसाला समाधनान निवांतपणे जगूच देत नाही. आणि स्वतःही मरत नाही. ते आपलं अधाशी बुभुक्षित स्वरूप एकवटून चिकाटीन जगतच रहातं. म्हणुनच माणसाला देवाने दिलेला शाप म्हणजे मनच आहे असं वाटू लागतं. तो शाप तहहयात सोसण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माणसा पुढं. याच्या कचाट्यातून सुटण्याची बुद्धी माणसाला फारफार उशीरा सुचते तेव्हा सुटण्याची वेळ निघून गेलेली असते. मग आपली हतबलता लपवत माणूस आपल्याला आल़ेला अनुभव आपलं तत्वज्ञान म्हणून दुसऱ्यांना आग्रहान सांगत बसतो. ते ऐकणाराही तेव्हा त्याचं आवर्तनातून जात असतो. हीच खरी तर गंमत आसते जगण्यातली
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





