श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “मनातले श्लोक…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
हे माझ्या किंवा आमच्या घरातले मनातले श्लोक आहेत. या श्लोकांची आणि श्री. समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकांची कोणतीही तुलना नाही. बरोबरी तर मुळीच नाही.
रामदास स्वामींचे श्लोक मराठी मनावर जेवढे आरुढ झालेले आहेत, त्याचप्रमाणे हे मनातले श्लोक भाषांची बंधन सोडून बऱ्याच जणांच्या मनातले असू शकतात.
मनाचे श्लोक काल प्रभावी होते, आज आहेत, आणि उद्याही राहतील. आमच्या मनातल्या श्लोकांची अवस्था तेवढीच बळकट आहे. त्यांचा प्रभाव पडतोच. किंवा पडावा या साठीच प्रयत्न असतो.
मनाच्या श्लोकांचे संदर्भ तसेच असतील. आमचे मनातले श्लोक मात्र त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार बदलतात. त्यांचे संदर्भ सुध्दा बदलतात. मागच्या काही घटनांसह अगदी नजीकच्या काळात घडलेल्या गोष्टींचा प्रभाव त्यात असतो. ब्रेकिंग न्यूज सारखं ते बिंबवले जातात. आणि तो भाव चेहऱ्यावर दिसतो. त्यातल्या भावना प्रखरपणे मांडल्या नाहीत तरी नेहमी प्रखरच असतात. म्हणजे काही वेळा त्या इतक्या प्रखर असतात की भावना मांडल्या आहेत का सांडल्या आहेत हाच प्रश्न पडतो.
मनाच्या श्लोकात आचरण कसं असावं याबद्दल सांगितलं आहे असं म्हटलं, तर आमच्या मनातल्या श्लोकात त्यावेळी आचरण कसं होतं याचच विस्तृत, सखोल, संसदर्भ स्पष्टीकरण असतं. या आचरणाचा उल्लेख काहीवेळा बेताल वागणं असाही होतो.
मनातले श्लोक हे सहसा मनाच्या श्लोकांसरखे तालात आणि मोठ्याने म्हटले गेले नाहीत तरी नुसत्या पुटपुण्यावरुन त्याच गांभीर्य लक्षात आल्याशिवाय रहात नाही. आणि ते पुटपुटणं कोणत्या स्थितीत आहे हे हालचालीवरून लक्षात येतं.
बऱ्याचदा मनातल्या श्लोकात मनाच्या श्लोकांच्या काही ओळी, पंक्ती आम्ही जशाच्या तशा उचलतो आणि त्याचा अर्थ सद्य परिस्थितीत लावण्याचा प्रयत्न करतो.
मना श्रेष्ठ धारीष्ट जीवी धरावे।
हि ओळ आठवली की आम्ही याचा अर्थ फक्त धारीष्ट दाखवण्यासाठी घेत थोडं धारीष्ट दाखवतो आणि मनातल्या श्लोकाचा आवाज थोडा वाढतो. आणि मग मधल्या काही ओळी सोडून पुढच्या काही पंक्ती आमच्या मनातल्या श्लोकांच्या पंगतीत बसवतो. आणि परत म्हणतो…
न होता मनासारिखें दु:ख मोटें
आणि गप्प बसतो.
हे मनातले श्लोक कधी ऐकावे लागतात, तर कधी ऐकवले जातात. कधीकधी तर जुगलबंदी सुध्दा होते. कधी श्रावणसरींसारखे असतात. अचानक येतात आणि थांबतात सुध्दा.
अर्थात परिस्थिती नुसार जयपराजय हा कोणाचा यावर विचार नसतो. पण त्यामुळे परत एका शीतयुद्धाच्या किंवा सर्जीकल स्ट्राईक सारख्या गोष्टींची पुसट कल्पना येते.
कधी कधी या मनातल्या श्लोकात काही वस्तूंचा नाद भर घातात.
हां… पण हे श्लोक कोणते? … कशासाठी? आणि… किती? … ते मात्र सांगितल्या शिवाय सुध्दा तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल… आणि आला नसेल तर ते माझ्या मनातले आहेत असं म्हणून सोडून द्यावे…
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




