श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सैनिकांना जगवणारे सैनिक-धन्वंतरी!” ☆ श्री संभाजी बबन गायके

लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू.

(भारतीय सैन्याच्या The Army Medical Corpsचा स्थापना दिन ३ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला! त्यानिमित्ताने विशेष लेख)

जेंव्हा दोन देश एकमेकांचे शत्रू म्हणून समोरासमोर उभे ठाकतात… तेंव्हा केवळ दोन सैन्यदलं लढत नाहीत… तर दोन व्यवस्था, दोन मनोवृत्ती युद्धभूमीत दोन हात करीत असतात… आणि जिंकते तेच सैन्य ज्याच्यातील प्रत्येक घटक देशप्रेमाने ओतप्रोत भरून गेलेला असतो… आणि हिंदुस्तान असाच एक देश आहे!

आपल्यासाठी तळहातांवर प्राण घेऊन लढणा-या सैनिकांच्या पाठीशी अनेक यंत्रणा कार्यरत असतात… त्यात अगदी रणभूमीवर स्वत:चे प्राण संकटात टाकून उभे असतात ते डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंटस… हे जणू स्टेथोस्कोपधारी सैनिकच!

वर्ष १९९९. १९८९ मध्ये पुण्याच्या The Armed Forces Medical College मधून एम. बी. बी. एस. चे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून देशाच्या विविध सीमांवर intern म्हणून अनुभव घेतल्या नंतर लखनौ येथील Officers’ Training College मध्ये the Medical Officers’ Basic Course हा एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधीत लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. या प्रशिक्षणात पी. टी. , संचलन, लष्करी कायदे, लष्करी जीवनपद्धती, शस्त्र चालवणे इत्यादी सर्व शिकावे लागते… एखाद्या सैनिकासारखे. कारण सेनेत फिल्ड हॉस्पिटल्स अर्थात प्रत्यक्ष युद्धभूमीवर तात्पुरत्या उभारल्या गेलेल्या रुग्णालयांमध्ये तैनात डॉक्टर्स सैनिकांच्या सदैव जवळपास असतात… हे परिपूर्ण सैनिकी डॉक्टर्स असतात!

१९९९ वर्ष सुरु होते. लेफ्टनंट डॉक्टर अरूप यांना काश्मिरात कारगिल भागातल्या एका छोट्या गावात स्थित असलेल्या एका सैनिकी फिल्ड हॉस्पिटलमध्ये रुजू होण्याचा आदेश प्राप्त झाला होता. इथले सर्जन काही महिन्यांच्या रजेवर जात होते, त्यांच्या जागी अनुभवी सर्जनची आवश्यकता होती. डॉक्टरसाहेब सर्जरीमध्ये तज्ज्ञ होते… या छोट्या हॉस्पिटलमध्ये आपल्या कर्तृत्वाला कितीसा वाव मिळेल?  अशी त्यांना शंका होती. ते रुजू झाले मात्र कंटाळून गेले. तिथे अन्य काही डॉक्टर्स, नर्सिंग असिस्टंस होतेच, पण सर्जन असे ते एकमेवच होते. शिवाय इथं आधुनिक असं फारसं काही नव्हतं. आपले इतर सहाध्यायी शहरांमध्ये, अत्याधुनिक रुग्णालयांच्या सुसज्ज शस्त्रक्रियागृहांत सर्जरी करीत असतील आणि इथं आपण या दुर्गम भागात आपले सर्जरीमधले कौशल्य सराव नसल्याने गमावून बसू की काय असं डॉक्टर बसू यांना वाटणं स्वाभाविकच होतं! शिवाय काश्मीर पुस्तकातील वर्णनात अगदी सुंदर, छान, आल्हाददायक असले तरी सीमेवर प्रचंड थंडी असते, रस्ते धोकादायक आणि वातावरण तसे नीरस… शिवाय अतिरेक्यांचा धोका तर चोवीस तास!

काहीही कितीही कारणे सांगितली तरी भारताच्या डोळ्यांत माती उधळीत पाकिस्तान भारताच्या सीमेत अगदी खोलवर घुसून बसला आहे, हे संरक्षण यंत्रणेच्या लवकर लक्षात आलं नाही! आणि याची किंमत जीवाच्या आकडेवारीच्या संख्येत सांगायची झाल्यास ५२७ मृत आणि १३६३ जायबंदी एवढी प्रचंड आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आर्थिक नुकसान मोठे असणार यात शंका नाही!

पाकिस्तानने ताब्यात घेतलेली सैन्यठिकाणे, सैन्यचौक्या परत मिळवायला सैनिकांना उंच पर्वत चढत जायला लागले… आणि पाकिस्तानी सैन्य नेम धरून गोळीबार करायला मोकळे होते… मोक्याच्या जागी सज्ज होते!

लेफ्ट. डॉक्टर बसूंच्या रुग्णालयात आता थंडी-तापाचे रुग्ण येत नव्हते… तर शरीरात गोळ्या घुसलेले, रक्तबंबाळ आणि मृत्यूच्या मुखात जाण्याच्या बेतात असलेले रुग्ण येऊ लागले! सुरुवातीला रोज रात्री दोन, चार नंतर नंतर तीस-चाळीस. पंधरा-वीस खाटांचे ते रुग्णालय. गोळीच्या जखमा म्हणजे शस्त्रक्रिया अत्यावश्यक. उपलब्ध यंत्रसामग्री आवश्यकतेच्या मानाने तोकडी!

सैनिक दिवसा उजेडी पहाड चढत होते, लढत होते… जखमी होत होते! त्यांना दिवसाउजेडी खाली आणणे म्हणजे खाली आणणा-या लोकांच्या जीवाला मोठा धोका. कारण पाकिस्तानी गोळीबार दिवसा तर अगदीच अचूक होणार! मग आपल्या सैन्याच्या बहुतांश मोहिमा रात्रीच्या अंधाराचा आडोसा घेत सुरु झाल्या. आता जखमी सैनिक रात्रीच्या वेळीच रुग्णालयात आणले जाऊ लागले. सैनिक रात्री जखमी झाला, आणि त्याला खाली रुग्णालयात हलवताना दिवस उजाडला की रात्रीचा अंधार पडेपर्यंत काहीही हालचाल करता येणे शक्य नसे… कारण तेच… पाकिस्तानी गोळीबार!

डॉक्टर साहेब आणि त्यांचे सहकारी संपूर्ण रात्र या जखमी सैनिकांवर उपचार करण्यात घालवीत… संख्या वाढत चालली होती म्हणजे… युद्धात आपली अजून सरशी होत नव्हती! प्रत्यक्ष समोरासमोर लढण्यापूर्वीच आपले सैनिक शत्रूने लपून केलेल्या हल्ल्यात जायबंदी होऊन खाली परतत होते… सैनिक मनातून हताश होते आरंभी! भारतीय वायुसेना युद्धात उतरली आणि भारतीय सैनिक वेगाने पुढे जाऊ लागले… पण युद्धभूमी अजूनही शत्रूवरच मेहरबान होती!

२९ मे, १९९९. स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा साहेबांचा देह अशाच एका रात्री रुग्णालयात आणण्यात आला! आहुजा साहेबांना पाकिस्तान्यांनी अनन्वित छळ करून मारले होते… उत्तरीय तपासणीत सारं स्पष्ट होतं! … युद्ध पुढं सुरूच होतं… रात्री जखमी सैनिक रुग्णालयात आणले जात होते… डॉक्टर आणि इतर सेवेकरी अपु-या साधनांच्या सहाय्याने पूर्ण प्रयत्न करून त्यांना अत्यावश्यक उपचार देत होते… आणि त्यांना हेलिकॉप्टरमधून पुढे उपचारार्थ नेले जात होते… प्राणांतिक जखमांवर आरंभीच्या Golden Hour मध्ये उपचार मिळणे गरजेचे असते… ते डॉक्टर बसू आणि त्यांचे सहकारी महत्प्रयासाने देत होते.

डॉक्टर साहेब जखमी सैनिकांशी संवादही साधत होते. त्यांनी सांगितलेले अनुभव वहीत टिपूनही ठेवत होते… अशा अनेक गोष्टी ज्या कुठेही नोंदवल्या गेलेल्या नव्हत्या. कित्येक दिवस उपाशी राहिलेले सैनिक, केवळ बर्फ चघळत जिवंत राहून सातव्या, आठव्या दिवशी रूग्णालयापर्यंत पोहोचू शकलेले सैनिक, युद्धातील प्रचंड संहार पाहून मानसिक संतुलन गमावलेले सैनिक… प्रत्येकाची कहाणी वेगळी!

इथल्या रुग्णालयात सर्जरी करण्याची संधी मिळणार नाही म्हणून निराश झालेले डॉक्टर बसू आता रोज चार, पाच सर्जरी करीत होते… मात्र यात त्यांना आनंद नव्हता… तरुण सैनिक असे घायाळ झालेले त्यांना पाहवत नव्हते…! पण काळजावर दगड ठेवीत तहान-भूक विसरून काम सुरु होते!

रुग्णांना रुग्णालयात हलवण्यासाठी तयार केलेल्या Helipad पर्यंत शत्रूचे तोफगोळे येऊन आदळत होते… त्याही स्थितीत पायलट उड्डाणे करीत होते! डॉक्टर्स रुग्णावर उपचार करीत आहेत आणि त्यांच्या पासून केवळ काही मीटर्सवर गोळा आदळतो आहे… अशीही स्थिती होत होती… रुग्नालां सोडून पळून दूर जाताही येत नव्हतं. सैनिक म्हणत होते… ”डॉक्टर साहेब, आमच्यावर गोळा पडला आणि आम्ही जखमी झालो तर आमचा जीव वाचवायला इथं तुम्हीच आहात… तुमच्यावर गोळा पडला आणि तुम्हीच जखमी झालात तर आमचं कसं होईल? ” सैनिकांचं बरोबर होतं… पण त्याला काही इलाज नव्हता. रुग्णालयाच्या छतावर तोफगोळ्यांचे तुकडे आदळत असताना डॉक्टर बसू आणि सहकारी डॉक्टर्स सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या मोठ्या कौशल्याने बाहेर काढीत त्यांच्या जखमा शिवत होते… त्यांना मृत्यूमुखातून बाहेर आणीत होते. यांपैकी काही तर पुन्हा लढायला निघूनही गेले… this is Indian Army!

९ जून, १९९९. कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या साथीदार सैनिकांचे मृतदेह रुग्णालयात आणले गेले… उत्तरीय तपासणीसाठी! नृशंस शब्दाला जर समानार्थी शब्द द्यायचा झाल्यास या हुतात्म्यांचे देह दाखवावेत अशी परिस्थिती! हे देह पाहून, त्यांच्यावरच्या जखमा पाहून रुग्णालयात जखमी होऊन पडलेले जातिवंत सैनिक म्हणत होते… ”आम्हांला लवकर बरे करा… आम्हांला परत लढायला धाडा… आता आम्ही शत्रूच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय परतणार नाही! ” पेटून उठलेल्या सैनिकांनी पुढे इतिहास घडवला. भारतीय वाघांनी अंगावर आलेल्या कोल्हया-कुत्र्यांच्या नखांचे ओरखडे सहन करीत त्यांची नरडी फोडली!

वाघ रक्तबंबाळ झाले, काही कामी आले… पण सरशी झाली ती वाघांचीच. ज्याला लोक सशस्त्र संघर्ष म्हणतात ते युद्ध त्यात लढलेल्या सैनिकांसाठी महायुद्धच होतं… अत्यंत विपरीत परिस्थितीत लढावं लागणं म्हणजे महायुद्धच. यात कामी आलेले सैनिक कोवळ्या वयातले, तरणेबांड होते… शेकडो मातांनी त्यांचे एकुलते एक मुलगे गमावले. वीरपत्नी सुद्धा संख्येने भरपूर झाल्या… फार मोठी किंमत म्हणजे हीच! ज्यांची मुले, ज्यांची सौभाग्ये गमावली गेली… त्यांच्यासाठी जग बुडाले!

ऑपरेशन विजय त्यावेळेपुरते संपले! डॉक्टर साहेबांची सर्जिकल ऑपरेशन्ससुद्धा संपली तात्पुरती. ३०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झाल्या त्या ५६ दिवसांत. वरिष्ठ डॉक्टर्स लोकांनी डॉक्टर बसू यांचे नामकरण केले… The Kargil Surgeon! यातील दोन सैनिकांना डॉक्टर वाचवू शकले नाहीत… कारण त्यांच्या जखमाच जीवघेण्या होत्या… आणि दिवसा त्यांना रुग्णालयात आणता आले नव्हते… उशीर झाला होता!

हे सारे अनुभव लेफ्टनंट डॉक्टर अरूप रतन बसू यांनी पुढे शब्दबद्ध केलेत… The Kargil War Surgeon’s Testimony हे या पुस्तकाचे शीर्षक असून ते मी विकत घेतले आहे. याचे भाषांतर करायला मिळाले तर भारी होईल. असो.

या पुस्तकात आकडेवारी, लष्करी व्यूहरचना यात नाहीत… यात अनेक प्रश्न आहेत… ज्याची उत्तरे कुणाकडेही नसतील! पण देश युद्ध कुणाच्या रक्ताच्या बलिदानाने जिंकतो हे मात्र समजू शकते. रणांगणात आपल्या देशाचा ध्वज रोवल्याशिवाय आपण युद्ध जिंकले आहे असे होत नाही… आणि हे करणारा पायदळाचा साधा सैनिकच असतो! असं डॉक्टर बसू म्हणतात!

प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैनिकांच्या मागे सावलीसारखे राहून, प्रसंगी जीवाचे बलिदान देत भारतीय सैन्याचे वैद्यकीय कर्मचारी एक प्रकारचे युद्धच लढत असतात, हे खरेच. Army Medical Corps च्या स्थापनादिनाचे औचित्य साधून त्या सर्वांना अभिवादन करूयात. महाराष्ट्राच्या कन्या लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर साहेबा यांनी या दलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. कर्नल डॉक्टर राजेश आढाव यांनी तर कारगिल युद्धात प्रत्यक्ष पहाडांवर जाऊन जखमी सैनिकांचे जीव वाचवले आहेत… स्वत: शत्रूवर गोळ्या झाडलेल्या आहेत. भारतीय सैन्यात अशा मराठी सैनिक-धन्वंतरींची संख्याही मोठी आहे!

© श्री संभाजी बबन गायके.

न-हे, पुणे,  मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments