श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“आधुनिक संताजीराव… धनाजीराव… – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

कश्यप साहेब आणि कौशलेन्द्र साहेब

 २१, स्पेशल फोर्सेसची दोन वाघनखं ! 

युद्ध कथा रम्य असतात, हे खरेच आहे. पूर्वीची युद्धं आणि आधुनिक जगातील युद्धं यांत जमीन-आस्मानाचा फरक आहे, हेही तेवढंच खरे आहे. राजे-रजवाड्यांच्या काळात सैन्य एकमेकांवर चालून जाई, मोकळ्या मैदानात जणू एखादा खेळ खेळावा, तशी युद्धं लढली जात. पुढे दोन देशांमधील युद्ध म्हणजे एका देशाने दुस-या देशाची सीमा ओलांडून तो देश काबीज करणे. विमानांच्या वापराने ही आक्रमणे अधिक खोलवर आणि धारदार होत गेली. भारत-पाकिस्तान यांच्यात झालेली युद्धंही याला अपवाद ठरली नाहीत. परंतू १९८० च्या दशकापासून भारताचे अभिन्न अंग असलेल्या जम्मू-काश्मीर राज्यात भारतीय सैन्याला पाकिस्तानी, अफगाणिस्तानी घुसखोर भाडोत्री सैनिक आणि स्थानिक अतिरेकी यांचा सामना खूप मोठ्या प्रमाणात करावा लागला… आणि आजही हीच परिस्थिती आहे. अर्थातच हे पारंपारिक युद्ध नाही. त्यामुळे आपले सैनिक या भागांत नेमक्या कोणत्या परिस्थितीला सामोरं जात आहेत, हे जनतेला माहीत असणे गरजेचे होते. पण जनतेला ही माहिती होण्याचे मोजकेच स्रोत होते. एक चित्रपट आणि दुसरा स्रोत म्हणजे पुस्तके… जी बहुतेक वेळा इंग्रजी भाषेत लिहिलेली असतात. या स्रोतांच्या मर्यादांमुळे नेमके चित्र उभे राहत होतेच असे नाही.

पण विडीओ मुलाखती, खाजगी वाहिन्या यांमुळे प्रत्यक्ष संबंधित व्यक्तींच्या तोंडून युद्धाची वर्णने ऐकून परिस्थिती ब-यापैकी स्पष्टपणे समजून घेता येते आहे.

युद्धकथा समाजाला आवडतात. त्यामुळे हल्ली त्या मोठ्या प्रमाणावर सांगितल्या जात आहेत. यांतून तरुणांना प्रेरणा मिळते, ही चांगली गोष्ट आहे. पण याचे व्यापारीकरणही मोठ्या प्रमाणावर झालेले दिसते. पण त्याला इलाज नाही. मुलाखती घेणारे या क्षेत्राशी संबंधित असण्याचे प्रमाणही पूर्वी कमी होते. त्यामुळे अनेकवेळा हास्यापद प्रश्न विचारले जात. पण प्रत्यक्ष युद्धात, मोहिमांमध्ये सहभागी होऊन शौर्य गाजवलेले काही लोक या क्षेत्रात आलेले आहेत, हे खूप छान होते आहे. यांत भारतीय सैन्यातील काही सेवानिवृत्त अधिकारी आहेत. यांत सर्वांत प्रभावी काम दिसते आहे ते The Monks And The Warriors हे podcast चालवणा-या दोघां तरुण, शूर आणि अनुभवी निवृत्त लष्करी अधिका-यांचे! 

यातील एक आहेत कर्नल कौशल कश्यप (निवृत्त), शौर्य चक्र विजेता आणि दुसरे आहेत लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) सेना मेडल विजेते. कर्नल कौशल कश्यप साहेबांनी मणिपूरमध्ये अनेक अतिरेकी ठार मारले… त्यासाठी त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. तर लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग यांनी सहा सहा दिवस जंगलातून पायी प्रवास करीत अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. हे दोघेही MARATHA LIGHT INFANTRY मधून निर्माण केल्या गेलेल्या 21, PARA SPECIAL FORCES या सैन्यविभागाचे मोठे शूर अधिकारी. यांनी निवृत्तीनंतर सेनेतील अधिकारी, सैनिक यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्या PODCASTच्या माध्यामातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य सुरु केले आहे.

 नुकतीच या जोडगोळीने ब्रिगेडीअर सुनील भानोत (सेवानिवृत्त) साहेबांची अतिशय रोमांचक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या आरंभी त्यांनी एक विशेष कृती करून त्यांच्यातल्या जिवंत सैनिकांची जणू ओळखच करून दिली.

 २१, स्पेशल फोर्सेस वाघनख दलाचे आराध्य दैवत म्हणजे आपल्या सर्वांचे भाग्यविधाते छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब. शिवरायांनी अफझल खानास मातीत घालण्यासाठी वापरलेलं वाघनख हे हत्यार या दलाचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले आहे. हे चिन्ह स्वीकारले जावे यासाठी कर्नल व्ही. बी. शिंदे (निवृत्त) साहेबांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे शिवरायांचा अश्वारूढ पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आसाममध्ये स्थापित झाला आहे. हा पूर्णाकृती पुतळा पुण्यातील श्री. विराज खटावकर (शिल्पकार) यांनी बनवून दिला आहे. आणि पुण्यातून आसामपर्यंत या पुतळ्याचा गौरवशाली प्रवासही प्रसिद्ध झाला आहे.

 कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांनी MARATHA LIGHT INFANTRY तून २१ स्पेशल फोर्सेसची निर्मिती करताना देशासाठी मोठे योगदान दिले. या स्पेशल सैनिकांनी मणिपूर आणि संबंधित राज्यांत खूप मोलाची कामगिरी बजावली आहे. पण देशाला याबाबत फारशी माहिती आहे, असे दिसत नाही. कारण जम्मू-कश्मीर, चीन सीमा यांबाबत जास्त लिहिले, बोलले जाते. असो.

 कर्नल कौशल कश्यप (निवृत्त), शौर्य चक्र विजेता आणि लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) सेना मेडल विजेते यांनी त्यांच्या स्टुडीओमध्ये ठेवण्यासाठी शिवरायांची एक प्रतिमा खास बनवून घेतली आहे. या PODCAST ची सुरुवात करताना भानोत साहेबांसारख्या वीर अधिका-याच्या हस्ते महाराजांच्या या अर्धाकृती पुतळ्याचे साधेसे, औपचारिक अनावारण करून घेतले व महाराजांना पुष्पे अर्पण केली. त्यांची ही कृती आपल्यासाठीही खूप अभिमानास्पद ठरावी. याप्रसंगी त्यांनी थोडक्यात शिवरायांची महती सांगितली जी ऐकण्यासारखीच आहे. महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलेल्या आसाममध्ये कार्यरत सैनिकांनी आपल्या महाराजांच्या शिकवणुकीचा अंगीकार करीत देशाच्या शत्रूला नामोहरम केले… गनिमी कावा वापरीत मोठा पराक्रम गाजवला… हे किती विशेष आहे.

 अतिशयोक्तीचा दोष स्वीकारून असे म्हणावेसे वाटते की, कश्यप साहेब आणि कौशलेन्द्र साहेब हे दोघे अधिकारी जणू स्वराज्याचे संताजीराव-धनाजीराव म्हणूनच कार्य आहेत. हे कार्य सैनिकांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आहे. हे दोघे ज्यांना सैन्यात भरती व्हायचे आहे, त्यांना मार्गदर्शनही करतात. अत्यंत उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले हे अधिकारी इतरांच्या मुलाखती घेताना स्वत:च्या अनुभवाच्या जोरावर नेमके प्रश्न विचारत वक्त्यांना बोलते करतात, त्यांचा योग्य तो सन्मान राखतात. हे काम अतिशय महत्त्वाचे आणि अभिनंदनीय असेच आहे. तरुणांनी THE MONKS AND WARRIORS VIDEO PODCST जो YOUTUBE वर दिसतो, तो जरूर पहावा… प्रेरणादायी आहे.

खरं तर भारतीय सैन्यदलाने स्वत:ची अशी खास PODCASTS केली पाहिजेत. यासाठी या दोघा अधिका-यांची मदत घेता येईल. कारण सैन्याची बाजूही जनतेला प्रभावीरीत्या समजली पाहिजे.

 मी यांच्यापासून प्रेरणा आणि माहिती घेऊन सैन्यकथा दर रविवारी लिहिण्याचा उपक्रम सुरु केला आहे. मराठीत सुद्धा असे PODCAST होणे गरजेचे आहे… फक्त व्यावसायिकीकारण टाळले गेले पाहिजे. महाराष्ट्रात तर सैन्यकथांची अजिबात वानवा नाही.

धन्यवाद, कश्यप साहेब, धन्यवाद कौशलेन्द्र साहेब! बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! २१, स्पेशल फोर्सेसची दोन वाघनखं! 

आधुनिक संताजीराव-धनाजीराव! 

क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments