उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ वेगळ्या वाटेने चालणारी बंडखोर, बेडर साहित्ययात्री! ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर ☆
नीलम माणगावे
नीलम माणगावे या लक्षवेधी साहित्यिका म्हणून प्रसिद्ध आहेत. कथा, कविता, ललित, वैचारिक, माहितीपर, समीक्षणात्मक, संशोधनात्मक लेख, कादंबरी, संकीर्ण, बालसाहित्य इ. विविध प्रकारचे विपुल लेखन त्यांनी केलय. आत्तापर्यंत त्यांची 69 पुस्तके प्रकाशित झालीत. केवळ ‘ विपुल ‘ एवढेच विशेषण त्यांच्या लेखनासाठी पुरेसे नाही. कारण त्यासाठी त्यांनी निवडलेले विषय आणि त्यातील आशय यातील वेगळेपणामुळे त्यांचं लेखन ‘ लक्ष्यवेधी ‘ ही ठरत गेलं. त्यांनी लिहीलेल्या प्रत्येक पुस्तकाला.. मग तो कविता संग्रह असो, कथासंग्रह असो, कादंबरी असो.. कुठला ना कुठला पुरस्कार मिळालेलाच आहे.
नुकताच त्यांना २००५ मधील कसदार बालवाङ्मयाच्या लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘शांताबाई आणि बाबुराव शिरोळे’ पुरस्कार प्राप्त झाला. तूच आमचा हीरो, चिंगळी, आक्कुबाईचं तळं यासारखे त्यांचे कथासंग्रह मुलांना खूप आवडतील, असे आहेत. त्याशिवाय, बिलोरी कवडसे, आणि माठ हसला, पळ सोने पळ यासारखे त्यांचे ५ विज्ञान कथासंग्रह आहेत. बालवाङ्मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणजे ‘गाथा उत्क्रांतीची’.. हे सचित्र दीर्घ काव्य आहे. तिची प्रयोगशील वृत्ती यातून दिसून येते. याशिवाय, ‘परीराणी आणि छान छान गाणी’, ‘अंगणगाणी आणि रिंगण गाणी’, ‘गड्डम् गड्डम् गाणम् बडबडम्’ यासखे अनेक कविता संग्रह त्यांचे मुलांना आवडतील असे आहेत. नीलमताई शाळाशाळातून आणि वेगवेगळ्या संमेलनातून कथाकथन आणि कवितावाचन करतात म्हणजे आणि थेट मुलांशी संवाद साधतात.
नीलमताईंच्या साहित्याचा अभ्यासक्रमात, पाठयक्रमातही समावेश झालेला आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड इ. ५वी (लोअर मराठी) ‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेचा समावेश. याच कवितेचा कर्नाटक राज्यच्या ८ वीच्या पाठ्यपुस्तकात, (थर्ड लँग्वेज) समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूरच्या एम. ए. – भाग १ पार्ट १मध्ये ‘पळ सोने पळ’ या बालकथेचा अमावेश झाला आहे.
लवाङ्मयाच्या त्यांच्या एका वेगळ्या प्रकारच्या पुस्तकाचा उल्लेख करायचा झाला तर, ‘डॉलीची धमाल’या कादंबरिकेचा उल्लेख करायला हवा. ‘डॉली समवयस्क मुलांशी खेळणारी एक मुलगी. सर्वांना ती हवीहवीशी वाटते. एकदा ती सर्वांचा निरोप घेते. कादंबरीच्या शेवटी रहस्य उलगडते. ‘डॉली हे मुळी मुलगीच नसते. ती असते रोबोट॰ आता तिची बॅटरी संपत आलेली असते. नवीन तंत्रज्ञानाचा किती सुरेख वापर करून घेतला आहे इथे. या बालकादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
म. सा. प. चा नीलमताईंना मिळालेला हा पहिला पुरस्कार नाही. त्यापूर्वी त्यांना एकंदर कविता लेखनासाठी ‘ना. घ. देशपांडे’ पुरस्कार मिळाला होता.
विषय-वैविध्याबरोबर आशयातील वेगळेपणा, नाविन्य, कल्पकता, प्रयोगशीलता ही त्यांच्या कवितांची काही ठळक वैशिट्ये सांगता येतील. त्यांच्या ‘खचू लागली भुई ‘ या कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
‘पैंजण’ ही नीलमताईंची अतिशय गाजलेली कविता. कविता चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे…
… आजी जड, वजनदार पैंजण घालून आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.
… आईने जड, वजनदार पैंजण वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.
… तिसर्या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ हे सगळं सहन केलं.
… आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊ देत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी… ’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.
– – स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी ’ असं म्हणणारी माझी मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.
– – ही कविता मुक्तछंदात आहे. प्रत्येक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची… ’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं, ’ तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको… ’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले, नव्हे. तसं नव्हेच ! आपोआप लेखणीतून उतरत गेले असणार.
… २०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे… महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भारतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.
नीलमताईंचं, ‘जसं घडलं तसं’ हे आत्मकथन मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. च्या भाग १ साठी पाठ्यपुस्तक म्हणून लावण्यात आले आहे. त्यांच्या एकूण कवितांवर एक प्राध्यापक एम. फील. करत आहेत. तर, दुसरे प्राध्यापक त्यांच्या एकूण कथांवर एम. फील. करत आहेत.
नीलमताईंच्या अनेक कवितांना प्रयोगशीलतेचा स्पर्श आहे. उदा. सरोगेट मदरवरील कविता ‘भांडवली ज्ञान’,
– – पण तिची अलीकडे प्रकाशीत झालेली ‘बापूजी तुम्ही ग्रेटच!’ आणि ‘सूर्याला कोंडता येत नाही. ’ ही दोन पुस्तके म्हणजे तिच्या प्रयोगशीलतेचा आगळा-वेगळा आविष्कार म्हणावी लागतील. मुक्तछंदात लिहिलेले काव्यात्म संवाद यात आहेत. ‘बापूजी तुम्ही ग्रेटच!’ मध्ये बापूजी आणि त्यांचा चरखा यातील काव्यात्म संवाद आहे. तर, ‘सूर्याला कोंडता येत नाही. ’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बोधीवृक्ष यांच्यातील संवाद आहे. सध्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती याच्या अनुषंगाने हे संवाद आहेत. संवादांच्या विषयात साम्य आहे, पण दोन्हीतील आशय वेगवेगळा आहे.
लेखिकेच्या प्रयोगशीलतेचे आणखी एक उदाहरण सांगायचं, तर तिने ‘खेळखंडोबा’ नावाची एक लघु कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत तिने हत्तींच्या माध्यमातून अनेक महत्वाचे प्रश्न, विशेषत: धर्माबद्दलचे प्रश्न उपस्थित केलेत.
नीलमताईंच्या आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचा इथे उल्लेख करावासा वाटतो. ‘निर्भया अजून लढते आहे. ’ हा त्यांचा दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला कथासंग्रह. या संग्रहातील सर्वच कथांचे ‘बलात्कार’ हे सूत्र आहे. यात बलात्काराचे वर्णन कुठेच नाही. त्यामागची कारणमीमांसा, मानसिकता, तशी मानसिकता निर्माण होण्यामागची विशिष्ट परिस्थिती याचे दर्शन या कथांमधून लेखिकेने घडवले आहे. वृत्तपत्रातून आपण बलात्काराच्या बातम्या वाचतो, टी. व्ही. वरून ऐकतो. क्षणभर हळहळतो. मग सोडून देतो. लेखिकेने ती बीजे आपले विचार, मनन-चिंतन यांचे खत-पाणी घालून जोपासली. आपल्या कल्पक रचना कौशल्याच्या निगराणीने, त्यातून सशक्त झाडे निर्माण केली. जोपासली.
– या संग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला.
नीलमताई एक प्रतिभासंपन्न, यशस्वी लेखिका आहेत, तशाच त्या बंडखोरही आहेत. सत्य, शिव, सुंदर या मूल्यांवर त्यांचा विश्वास आणि निष्ठा आहे. त्यांची जिथे पायमल्ली होताना दिसते, तिथे त्यांची बंडखोर वृत्ती उफाळून येते.
नीलमताई स्वत: जैन धर्मीय. तरीही जैन धर्मातील चुकीचे रीतिरिवाज, वा परंपरा, वाईट चाली-रीती, काही अनुयायांचे बेताल वर्तन, भ्रष्टाचार यावर त्यांनी आपल्या लेखनातून टीका केली. ही त्यांची मोठीच बंडखोरी म्हणायला हवी… कधी लेखाच्या, कधी कवितेच्या, कधी कथेच्या माध्यमातून. उदा. ‘शांते तू जिंकलीस. ’ ही कथा. इथे शांता मंदिरासाठी पट्टी द्यायला नकार देते. म्हणून गाव तिच्यावर बहिष्कार टाकतो. तिला वाळीत टाकतो. पुढे तिच्या मुलाचा मृत्यू होतो. त्याचे अंत्यसंस्कार करायला कुणीच येत नाही. तेव्हा ती आणि तिची सासू चादरीची झोळी करून त्यातून त्याला स्मशानाकडे नेऊ लागतात. नंतर ते पाहून हळूहळू गाव त्यात सामील होतो. – – याच शीर्षकाच्या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला.
नीलमताईंच्या या धर्मावर टीका करणार्या लेखनाने समाजातील अनेकांची अस्मिता दुखावली. आपल्याच धर्माविरुद्ध ती असं कसं लिहू शकते? समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी तिने यापुढे असं लेखन करायचे थांबवावे, असा तिला समज दिला. इतकेच नाही, तर असं काही यापुढे लिहिलं, तर तुमच्या घरावर आम्ही दगडफेक करू, अशी त्यांना धमकीही देण्यात आली. पण त्या आपल्या जागी अढळ राहिल्या. जे मनाला पटेल, योग्य वाटेल, ते अव्याहतपणे लिहीत गेल्या. या सर्व प्रकरणात त्यांचे जोडीदार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मुळात ते स्वत: अं. नि. स. चे कार्यकर्ते. वैचारिकदृष्ट्या ते त्यांच्याशी सहमत होते.
नीलमताईंच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष नित्यश: बहरत, फुलत, दरवळत राहोत. त्याने वाचकांना आनंद मिळो. त्यांचे भोवतालचे भान जागृत करो, संवेदनशीलता निर्माण करो… या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
☆
© उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






