? इंद्रधनुष्य ?

☆ प्रामाणिकपणा रक्तातच असावा लागतो… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी छत्रपती संभाजी महाराज नगरमधे  येतो…!!

एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकते का? 

या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल. 

मात्र औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची.. 

सध्या केनियाचे रहिवासी असलेले रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबादेत होते. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल ३० वर्षांनी परत आले. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून औरंगाबादच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण औरंगाबादेत झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते औरंगाबादेत एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायची. रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डना  काशिनाथकाकांनी मदत केली आणि त्यांना रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही ते काशिनाथकाकांच्या दुकानातूनच घ्यायचे. १९८९ मध्ये त्यांनी औरंगाबाद सोडलं त्यावेळी काशिनाथकाकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती. रिचर्ड मायदेशी परतले. तिकडे राजकारणात जाऊन त्यांनी मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्यांना कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथकाका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्यांना होती. गेली 30 वर्ष त्यांना भारतात यायला जमलं नाही, 

मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांची पावलं आपसूकच औरंगाबादकडे वळली आणि त्यांनी शोध घेतला तो काशिनाथकाकांचा. तब्बल दोन दिवस त्यांनी काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून ते रडायला लागले. खरंतरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं. ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही ते आवर्जून सांगतात. 

“ काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं. मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या.” 

‘ अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होते, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डना आनंद आहेच, मात्र मलाही अभिमान असल्याचं’  रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. “काशिनाथकाकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होता, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला.’  नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात.

काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्यांनी काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

प्रामाणिकपणा कोणी कोणाला शिकवू शकत नाही, तो रक्तातच असावा लागतो, हेच खरं. 

लेखक : अज्ञात

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted