श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ संवाद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
खोटा विचार आहे ह्या राजकारण्यांचा
त्यानीच मांडला हो बाजार माणसांचा
मग्रूर आणि लोभी झालेत हे पुढारी
केलाय आज त्यानी कचराच कायद्य्यांचा
*
का ही निमूट झाली जनता इथे कळेना
डोळे मिटून बघते अन्याय बावळ्यांचा
या आंधळ्या प्रजेला येईल जाग तेंव्हा
उडवील बोजवारा सगळ्याच धोरणांचा
*
कमजोर लोकशाही होतेय रोज येथे
उरलाच धाक नाही कुठल्याच संस्कृतीचा
पैसा कुठून कोठे पळतोय ते कळेना
देवासही तडाखा बसलाय चोरट्यांचा
*
अंधार दाटलेले दिसते भविष्य येथे
होईल रोज सौदा आभाळ चांदण्यांचा
शास्त्रौक्त वेद तेव्हा धरतील मौन सारे
होईल काय सांगा उपयोग मांत्रीकांचा
*
स्वातंत्र्य मिळवलेले जपणे जरूर आहे
ठेवा विचार ध्यानी आता नव्या पिढ्यांचा
सांभाळण्यास त्याना घेऊ जबाबदारी
त्यांच्या सवे करूया संवाद जीवनाचा
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





