सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ तसली… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
(“मी …अशा माणसाबरोबर…आयुष्य काढू शकत नाही. मोडतेय…मी…हे लग्न. ही घ्या…तुमची अंगठी. ”
बोटातली साखरपुड्याची अंगठी काढून मी त्यांच्या दिशेने भिरकावली. त्या घरात क्षणभरही थांबणं मला शक्य नव्हतं. मी तडक बाहेर पडले.) – इथून पुढे —-
घरी आले आणि आईच्या कुशीत शिरून मी ओक्साबोक्शी रडू लागले.
“अगं, काय झालं? बरी आहेस ना तू?रडतेयस कशाला? झालं तरी काय असं?”
“अगं, बसू दे तिला जरा. मग काय त्या चौकश्या कर. सतीश, तिला पाणी आणून दे आधी, ” बाबांनी सांगितलं.
पाणी प्यायल्यावर माझ्या जीवात जीव आला.
“ मी…म्हणजे…मी लग्न मोडलं, ”कसेतरी तोंडून शब्द बाहेर पडले.
“अरे देवा!”
“काय केलंस हे?”
“असं झालं तरी काय?”
तिघांच्याही चेहऱ्यावर, आवाजात जबरदस्त टेन्शन.
मला पुन्हा एकदा उमाळा आला. आईही रडत होती. बाबा, दादा चक्रावून गेले होते. अगोदर दादा सावरला.
“हे बघ, लता. तू रडणं थांबव आणि काय झालं नक्की, ते नीट सविस्तर सांग. तोंड धुवून ये आधी. म्हणजे शांत वाटेल, ”दादा म्हणाला.
तोंडाला थंड पाणी लागल्यावर थोडं हलकं वाटलं. तोंड पुसून मी बाहेर आले.
“हं. बोल आता. आई, बाबा, तुम्ही शांत व्हा. ”
जे घडलं ते नक्की कसं सांगावं – तेही आई, बाबा आणि दादाला – तेच मला कळेना.
“बोल ना. ”
“कसं सांगू, तेच मला कळत नाहीये. ”
“सुरुवातीपासून सरळ सांगत जा. वाटल्यास माझ्याकडे, आईबाबांकडे न बघता बोल. ”
“ते…. ते एकटेच आले. आई-बाबा येणार, असं सांगितलं होतं. पण ‘त्यांना काम निघालं, ’ म्हणाले. ”
“काम असेलही. चार दिवसांवर लग्न आलंय म्हटल्यावर – आपलीही धावपळ चालू आहेच की!” बाबा म्हणाले.
“घर खरंच घेतलंय ना?”दादाने विचारलं.
“घर आहे. चांगलं आहे. ” थोडं थांबून मी शब्द गोळा केले आणि त्यांचा उच्चार करायला धीरही.
“बेडरूममध्ये गेल्यावर त्यांची माझ्याकडून वेगळीच अपेक्षा होती. ”
आई, बाबा, दादा – तिघांनीही आ वासला.
मी पुन्हा स्फुंदून स्फुंदून रडू लागले.
“मी…मी…त्यांना सांगितलं…आपलं…अजून…लग्न झालेलं नाहीय…पण त्यांना…त्यात काहीच गैर वाटलं नाही…मी…मी…अशा माणसाबरोबर…जन्म…नाही काढू शकणार. अशा माणसाला…मी…माझा नवरा…कसं मानू?”
तिघंही अजूनही अवाकच होते.
“मी सरळ…अंगठी काढून त्यांच्या तोंडावर फेकली…आणि…त्यांना सांगितलं…. ’हे लग्न मोडलं’ म्हणून. ”
थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही.
“प्रदीप असा निघेल, असं वाटलं नव्हतं. दिसताना सभ्य दिसतो, ”दादा म्हणाला.
आई डोक्याला हात लावून बसली होती. ती बोलायला लागली, “अरे देवा! काय झालं हे! उद्या सकाळी ताईची मंडळी येतील. दुपारी बाबांची भावंडं येणार. त्यांना कसं सांगायचं, लग्न मोडल्याचं? पत्रिका वाटून झाल्यायत. लोकांना काय कळवणार? आणि कोणी विचारलं, तर कारण काय सांगणार?”
“बरोबर आहे आईचं. हे कारण कसं सांगू शकणार आपण लोकांना?”दादा म्हणाला.
“शिवाय प्रदीप थोडाच गप्प बसणार आहे?त्याने हिच्याविषयी भलतंसलतं पसरवलं तर?” बाबांच्या म्हणण्यात तथ्य आहे, हे जाणवल्यामुळे आई पुन्हा रडायला लागली, “लोक चार तोंडांनी बोलणार. मग माझ्या पोरीचं दुसरीकडे लग्न जमायचीही पंचाईत. कुमुदसारखी अवस्था होईल तिची. लता, तू आज कुमुदला बोलली होतीस घराचं? तिचीच दृष्ट लागली असणार. ”
“हे बघ. तू आधी शांत हो. आपण सगळेच शांतपणे विचार करूया, ” बाबा म्हणाले.
थोडा वेळ सर्वांनी विचार केला.
“मी विचार केलाय. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, ” मी सांगितलं.
एकदम उत्तर सापडल्यासारखे बाबा बोलायला लागले, “मी काय म्हणतो, लता, तसं काही घडलं नाही ना?”
“नाही.”
“नक्की?”
“नक्की.”
“मग काय बिघडलं?”
“मी काय म्हणतो, बाबा, काही घडलं नाही म्हटल्यावर तर काही बिघडलंच नाही;पण समजा, घडलं असतं, तरी काय फरक पडतोय? चार दिवसांनीच तर लग्न होणार. तेव्हा घडणार, ते आता घडलं म्हणायचं आणि गप्प बसायचं…” दादाचं हे बोलणं आई-बाबांना पटलं.
“पण त्यांचे हे विचार, हे वागणं…”मी माझी बाजू मांडायचा प्रयत्न केला.
“जाऊ दे गं. वयाचा दोष म्हणायचा, ” दादा माझी समजूत घालायला लागला.
‘म्हणजे तूसुद्धा तुझ्या बायकोशी असाच वागशील?’ तोंडात आलेले शब्द ओठाआड अडवायला मला कष्ट पडले.
“हो. वय असतं, वेळ असते. होते माणसाला एखाद्या वेळी दुर्बुद्धी, ” बाबांनी दादाला दुजोरा दिला, “तू लहान आहेस, लता, अजून. जग नाही बघितलंयस तू. ”
“जाऊ दे. डोक्यातून काढून टाकूया सगळं. मन शांत करूया, ”आईने जाहीर केलं.
ही बाब एवढी दुर्लक्ष करण्यासारखी वाटते यांना?समजा, मी खरोखरच मोहाला बळी पडले असते, तर या लोकांनी, ‘चार दिवसांनी होणारच आहे लग्न, ’ म्हणून हे सगळं सहजासहजी नजरेआड केलं असतं?
आणि माझं स्वतःचं लग्न, माझं स्वतःचं आयुष्य याविषयीचा निर्णय घेण्याचा हक्क मला नसावा?की शेवटी नीती-अनीती, आपल्या मुलीच्या भावना, विचार यांपेक्षा समाजाची भीती जास्त महत्त्वाची ठरते?
आई, बाबा, दादा ही जिवाभावाची माणसंही मला परकी वाटू लागली. आपण एकट्याच आहोत या जगात, या कल्पनेने मला अजूनच रडू फुटलं.
तेवढ्यात बेल वाजली. दादाने दार उघडलं. सासू-सासरे आले होते.
आई-बाबांच्या पोटात गोळा आला.
“जा लवकर. तोंड धुऊन ये, ”आई कुजबुजली.
“सॉरी! आम्ही असे उशिरा आलो. पण प्रदीप म्हणाला, ‘आजच जा. ’ सूनबाईला घर आवडलं की नाही?” सासऱ्यांनी विचारलं.
त्यांचं बोलणं, चेहऱ्यावरचे भाव बघून ते सहजच आल्यासारखे वाटत होते.
त्यांच्या प्रश्नाला सासूबाईंनीच उत्तर दिलं, “अहो, आवडलंच असणार. त्याशिवाय का ती झाडझूड करत होती? अगं, तू अंगठी प्रदीपकडे ठेवायला दिली होतीस ना? त्याला घरी गेल्यावर आठवलं. तो म्हणाला, ‘आत्ताच देऊन या. ’ मी दिलीपला पाठवत होते. दमले होते हो मी, दिवसभर फिरून. तर प्रदीप हट्टच धरून बसला, ‘तुम्हीच जा, ’म्हणून. ”
आता कुठे आई-बाबांचा जीव भांड्यात पडला.
ते गेल्यावर आईने माझी दृष्ट काढून टाकली. मीठ-मोहऱ्या जळल्याचा वास आला. लगेच आई म्हणाली, “ बघितलंस ना? केवढी कडकडीत दृष्ट लागली होती त्या कुमुदची?”
आई तशी वाईट नाही;पण परिस्थितीनुसार माणसाचे विचार बदलतात ना!
कुमुदविषयी कळलं, तेव्हा आईला खूप वाईट वाटलं होतं. मुद्दाम प्रयत्न करून ती तिच्यासाठी स्थळंही शोधायला लागली.
मला यांचा होकार आल्यावर कुमुद म्हणाली, “ नीट चौकशी करा हं. पटकन होकार दिला तो. ”
मी हे आईला सांगितलं, तेव्हा पहिल्यांदाच तिच्या मनात किंतू आला, “लते, ती सहजच म्हणाली, की तिला हेवा वाटला तुझा? नोकरी लागून दोन महिनेसुद्धा झाले नाहीत आणि लग्न ठरलं, म्हटल्यावर हेवा वाटणं साहजिकच आहे.”
“कुमुद हळदीला येणार आहे का गं?”आईने विचारलं.
“नाही. ती बाहेरगावी जातेय तीन-चार दिवसांसाठी. लग्नालाही नाही येणार. अहेराचं पाकीट आजच देऊन टाकलं तिने मला. ”
“बिचारी! सबब असणार ही, ” आई म्हणाली, “एकीकडे हुरहूर वाटते, ती येणार नाही म्हणून आणि दुसरीकडे बरंही वाटतं. ”
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पाहुणे यायला सुरुवात झाली. घर भरून गेलं.
देवकार्य, हळद…. सगळं उत्साहात चाललं होतं.
माझं मन मात्र कशातच नव्हतं. ‘कसं निभावणार आहोत आपण, या असल्या माणसाबरोबर?’
मंगलाष्टका सुरू झाल्या.
‘बघ. अजूनही वेळ गेलेली नाही. नीट विचार कर, ’ मी स्वतःला सांगत होते, ‘कसला विचार आणि कसली वेळ?आई-बाबांच्या दृष्टीने तर चार दिवसांपूर्वीच वेळ निघून गेलेली होती. आत्ता या क्षणी जर मी सांगितलं, की ‘मला हे लग्न करायचं नाही’, तर प्रलयच होईल. ’
“शुभ मंगल साssवधाssन!”
अंतरपाट बाजूला झाला. मी यांत्रिकपणे माळ घातली.
आता मात्र खरोखरच वेळ निघून गेली होती. नंतरचे विधी सुरू झाले.
बाप रे! माझ्या मनात कसलं युद्ध चाललंय आणि इथे सात जन्मांचे वायदे!
आजूबाजूला सगळे आनंदात दिसत होते.
माझ्या मनातल्या वादळाची कल्पना नसणारच, तरीही यांना एवढा आनंद होण्याचं कारण काय?
या लग्नाने बदलून जाणार होतं माझं आयुष्य, यांचं आयुष्य आणि थोडंफार दोघांच्या घरच्यांचं आयुष्य. बाकीच्यांना काय फरक पडणार होता माझं लग्न होण्याने, न होण्याने आणि अर्थात मोडण्यानेही?
पण तरीही सगळे, अगदी सगळे आनंद साजरा करत होते. हसत होते, गप्पा मारत होते. बायका-मुली नटूनथटून आल्या होत्या. ठेवणीतले कपडे घालून.
कपडे! कपाटातल्या कपड्यांविषयी मी आई-बाबांना सांगितलं होतं की नाही, तेच मला आठवेना.
कदाचित नसावं. नाहीतर त्यांनी माझ्या म्हणण्याचा विचार केला असता.
असं कसं राहून गेलं सांगायचं?
पण आता काहीच फरक पडणार नव्हता.
गर्भाधान वगैरे विधी व्हायचे असल्याने त्या रात्री प्रश्नच आला नाही.
दुसऱ्या दिवशी सगळे विधी वगैरे आटोपून संध्याकाळी आम्ही बाहेरगावी जायला निघालो. घरातल्या उत्साही मंडळींनी चिडवून खऱ्या अर्थाने हैराण केलं.
“माथेरान, महाबळेश्वर कॉमन झालंय. एक नवीन ठिकाण कळलंय. तिथे जाऊया हनिमूनला?” यांनी आधीच विचारलं होतं. आधी म्हणजे ही भानगड व्हायच्या काही दिवस आधी. त्यावेळी मी ‘चालेल’ म्हटलं होतं.
– क्रमशः भाग दुसरा
© सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





