श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “कशाला उगीच!!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी निघालेलो. कन्फर्म तिकीट असल्यानं निवांत होतो. बारा तासाचा रेल्वेप्रवास सहप्रवासी चांगले मिळाले तर बहार येईल असं मनात आलं. बॅग ठेवून बसलो. काही वेळातच एकजण समोर बसला. नजरा नजर झाल्यावर दोघांचे चेहरे पडले. तो सुऱ्या होता. एकेकाळचा घट्ट मित्र पण आता…. ज्याचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही असा माणूस. कडाक्याचं भांडण झाल्यापासून आमच्यात बोलचाल बंद होती. तीन वर्षांनी समोरासमोर आलेलो. सुऱ्याला पाहून डोक्यात तिडिक गेली. मागचं सगळं आठवलं पण शांत बसलो. गाडी फुल असल्यानं सुऱ्याचाही नाईलाज झाला. समोरासमोर असलो तरी मुद्दामच बघणं टाळत होतो. खूप विचित्र अन अवघडलेली अशी अवस्था. सहन होईना अन सांगता येईना असा प्रकार. मोबाइलमध्ये तोंड खुपसलं पण मन बेचैन होतं. एकदोनदा लक्ष गेलं नेमकं तेव्हा सुऱ्या माझ्याकडं पाहत होता. असं सारखं व्हायला लागलं. पुन्हा एकदा नजरानजर झाल्यावर दोघंही हसू रोखू शकलो नाही.
“ए भाxxx, अजून कितीवेळ माज दाखवणारेस”न राहवून सुऱ्यानं तोंड उघडलं.
“साxx, माज मी दाखवतोय की तू? ”
“दोघंही”म्हणत सुऱ्यानं टाळीसाठी हात पुढे केल्यावर मी प्रतिसाद दिला.
हुssश!!
मनावरचा ताण एकदम हलका झाला. काही क्षण पुन्हा शांतता. भरून आलं म्हणून दोघांनी मान फिरवली. एकदम माझा हात हातात घेत सुऱ्या म्हणाला. “किती दिवसांनी भेटतोयेस. कसायेस”
“मी मस्त. तुझं सांग”
“ठीक. रुटीन लाईफ. यार, त्यादिवशी खरंच वाटलं नाही की प्रकरण एवढं मोठं होईल. ”सुऱ्या.
“तू असं बोलशील असं वाटलं नव्हतं. मनाला खूप लागलं आणि प्रचंड राग आला म्हणूनच…. ”
“माफ कर मित्रा!! चूक झाली. ”
“भेटत नव्हतो पण तू डोक्यातून जात नव्हता. रोज आठवण यायची. ”
“मला पण”सुऱ्या
“मग फोन करायचा ना”
“कुठल्या तोंडानं करणार. वाट्टेल ते बोललो म्हणून तर आपल्यात फाटलं ना. ”सुऱ्या.
“जे झालं ते झालं. परत तो विषय नको. ”
“नाही रे. बोलू दे. मनात खूप साचलयं. अनपेक्षितपणे आज चान्स मिळालाय. थॅंक्स टु रेल्वे”
“ऐकणार नाहीस. अजून तसाच आहेस. स्वतःला पाहीजे तेच करणार”
“हम नही सुधरेंगे. ”
“हम भी…… लहानपणापासून तुझ्याच संगतीत आहे. ”
“तरीसुद्धा माझ्या नादी लागतोस. माहितीये ना. डोकं फिरलं की स्वतःवर कंट्रोल राहत नाही. ”
“चांगलचं माहितीये. हजारवेळा भांडलो. अगदी अंगावर धावून गेलो. एकमेकांच्या गचांडया पकडल्या आणि शिव्या शिवाय तर बोलणं नाही.
यालाच तर जिवलग मैत्री म्हणतात. ”
“आपल्यात वाद नवीन नाहीत पण यावेळी तू बोलणचं बंद केलं. ”
“कारणही तसंच होतं ना. ”
“मी चुकलोच. पुढाकार घेऊन समेट करण्याऐवजी एकदम संबंध तोडून तीस वर्षाची मैत्री संपवलीस. ”
“सुऱ्या, याचा त्रास मलाही झाला पण नाईलाज होता. आपल्यात घडू नये ते घडलं. त्यादिवशी मैत्रीच्या नात्यातली मर्यादा ओलांडली गेली. ”
“तू इतकं चिडशील असं वाटलंच नाही. ”
“त्यालाही कारण आहे. जसा तुला अभिमान आहे तसाच मलाही आहे. याआधीही चार-पाच वेळेला चेष्टेनं बोललास तेव्हा दुर्लक्ष केलं पण त्यावरून पुन्हा पुन्हा होणारा उल्लेख खटकला. त्यादिवशी तर तू डायरेक्ट जिव्हारी लागेल असं बोललास. आतापर्यंत तुझ्याकडून असं ऐकलं नव्हतं. ”
“डोकं ठिकाणावर नव्हतं. टेन्शनमध्ये होतो. ”
“उगीच काहीही कारणं देऊ नकोस. सोशल मीडियावर काय वाचतोस. कोणाला फॉलो करतोस सगळं माहितीय. मनात प्रचंड राग, चीड होती आपल्यातल्या भांडणाच्या निमित्तानं ती मळमळ बाहेर पडली. कट्टर अभीमानी आहेस. ”
“ते तर अजूनही आहे. ”
“काहीच हरकत नाही. सगळेच आहेत. एवढंच सांगायचयं की विचार, स्वभाव, वागणं वेगवेगळं असूनही आपली मैत्री टिकली. एकमेकांना चांगले ओळखतो तरीही तू एकदम माझ्या जातीवर घसरलास. नको त्या शब्दात उद्धार केलास. गरज नसताना टोमणे मारलेस. ”
“जाऊ दे ना. माझी जीभ घसरली. ”सुऱ्या
“ते काहीही असो. आपल्यात ‘जात’ कुठून आणि का आली. ”
“भावनेच्या भरात बोललो. माफ कर ”
“प्रश्न माफीचा नाहीये. तू असं बोलशील हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याचाच धक्का बसला. आपण मैत्री ‘जात’ बघून केली नाही. “
“माहितीये”
“एक सांगतो, ‘जात’ प्रत्येकाच्या मनात असतेच. कोणी दाखवतं तर कुणी लपवतं. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो. त्यात वावगं काही नाही मात्र त्यासाठी इतरांना कमी लेखू नये. मैत्रीसारखी नाती निरपेक्ष असतात. तिथं तर हे नकोच. ”
“सगळं मान्ययं. हे आधी का बोलला नाहीस. त्याचवेळेस चार शिव्या देऊन कानफाडलं असतंस तरी चाललं असतं. तुला तेवढा अधिकार नक्कीच आहे ”
“त्यावेळी तू बिथरलेला अन मी दुखावलेला. काही बोललो असतो तर वाद वाढला असता म्हणून गप्प बसलो. तुझ्या लक्षात येईल असं वाटलं पण…. ”
“संतापाच्या भरात काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर फार वाईट वाटलं. स्वतःचा खूप राग आला. माफी मागण्यासाठी फोन केला. मेसेज केले पण तू रिपलाय दिला नाहीस. ”
“तरी तुला सांगत होतो. सोशल मीडियाच्या नादी लागू नकोस. भावना भडकवणाऱ्यांपासून सावध रहा. काहीच साध्य होणार नाही फक्त नाती तुटतील. संधीसाधू लोक वापरून फेकून देतील. ”
“अगदी खरंय. अनुभव आल्यावर डोळे उघडले. मनापासून सॉरी यार!! ”
“यापुढं काळजी घे. जातीवरुन कोणाला कधीही काहीच बोलू नकोस. फार भावनिक आणि संवेदनशील विषय आहे. असो… आपल्याला मैत्री अजून पन्नास वर्ष टिकवायचीय. “
“शंभर टक्के!! , यापुढं कानाला खडा. आता बट्टी!! ”लहानपणी करायचा तसं दोन बोटं पुढं करत सुऱ्या म्हणाला तेव्हा मोठ्यानं हसायला आलं. सुऱ्याच्या बोटाला बोट टेकवत म्हणालो…..
…. “बट्टी!! , मैत्रीत जात लांब ठेवू. गंमतीत सुद्धा उल्लेख नको. आपलं इतकं छान नातं असताना कशाला उगीच!!
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




