डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ तिसरा अंक… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
बेल वाजली म्हणून वसुधा हळूहळू हॉल मधून बाहेर आली.अलीकडे गुडघे फार दुखत तिचे.
वय झालं आता सत्तरच्या पुढेआणि अविनाशही झालाच की शहात्तरचा.
आले आले म्हणत वसुधा दाराजवळ गेली.
तिचे दोन नातू बाहेर उभे होते.वय दहा आणि सात.बहुधा केट त्यांना सोडून गेली असावी. हं म्हणत सुस्कारा सोडत तिने त्यांना आत
घेतले.हाय ग्रँडमा, खायला दे ना.
फर्ड्या अमेरिकन अँक्सेन्टमध्ये बोलत मुलं आत घुसली.
फ्रीज उघडून आत काय आहे ते बघायला लागली.
वसुधाला खरं तर राग आला पण बोलणार कोण? आता ही मुलं संध्याकाळ पर्यंत इथे असणार.आजी हे दे आजोबा टी व्ही लावा,इंटरनेट जोडून द्या हे सुरू होईल.मग सहा वाजता केट किंवा अमर त्यांना घेऊन जातील.
वसुधाला आज हे अगदी नको वाटत होतं.जरा आराम करावा, थोडं पडून रहावं असं वाटत होतं तिला.उद्या तिची जवळची मैत्रीण भारतातून लेकीकडे आली होती,
तिला वसुधाने जेवायला बोलावलं होतं.त्या माणसांचा स्वयंपाक करायचा होता.
मुलाशेजारी घर घेतल्यापासून हा नवीनच त्रास सुरू झाला होता.
रोज सकाळी ही मुलं येत आणि संध्याकाळीच जात.शाळा असली की निदान दुपारी त्यांचे आईवडील येऊन घेऊन जाईपर्यंत तरी ती असतच… वसुधाला मागचे दिवस आठवले.
भारतातून अगदी फार कमी लोक तेव्हा अमेरिकेत येत. एक बॅगआणि बरोबर मोजकेच डॉलर्स.वसुधाचा नवरा अविनाश या पहिल्या काही लोकांपैकी एक होता. भारतातून घेतलेली डॉक्टरीची डिग्री आणि हे डॉलर्स याव्यतिरिक्त हातात काहीही नव्हतं.
अविनाशने न्यूयॉर्कला राहून पुन्हा मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.उत्तम मार्क्स मिळवत, जॉब करत मास्टर्स पूर्ण केलं. निष्णात जनरल सर्जन होता तो. त्याचा जम चांगलाच बसला. वयाची तिशी जवळ आल्यावर आई म्हणायला लागली,अरे अवी तू लग्न कधी करणार?
त्याकाळी भारतातल्या मुली अमेरिकेला जायला पटकन तयार होत नसत. अवीचा जीव ल्यूसीत गुंतला होता. पण ते फारसं पुढे गेलं नाही. ल्यूसी म्हणाली माझं माझ्या दुसऱ्या कलीगवर प्रेम आहे.मी त्याच्याशीच लग्न करणार आहे.सॉरी अवी.
अवीने कष्टाने आपला जीव तिच्यातून सोडवून घेतला आणि आईला सांगितलं,तू मुली बघून ठेव.मी पुढच्या चार महिन्यात येऊन लग्न करूनच जाईन.
अवी मुंबईला आला.आईने बघितलेल्या मुलींपैकी वसुधा बरी वाटली त्याला. तिचं करिअर फारसं नव्हतं.दिसायला चांगली होती.पण आईच्या ओळखीची होती ती फॅमिली.जास्त चिकित्सा न करता अवी वसुधाला हो म्हणाला. त्या दोन महिन्यात लग्न करूनच दोघेही अमेरिकेला गेले.
अविनाशला आता खूप चांगल्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला.
वसुधाला नोकरीची फारशी आवड नव्हती. तरी ती जवळच्या एका लायब्ररीत पार्ट टाइम जॉबकरायला लागली.
वसुधाला तीन वर्षात दोन मुलगे झाले.अभय आणि अमर. वसुधाची आई दोन्ही वेळा सहा सहा महिने राहिली.
त्याकाळी अमेरिकेत डाळी, पीठे साबुदाणे कुठे मिळत? आई हे सगळं वसुधाला बोटीने पाठवायची.
फार कठीण होते ते दिवस.आपली माणसं फार तुरळक दिसायची त्यांना. साधी कोथिंबीर मिळाली तरी या शेजारणी बायका एकमेकींना आवर्जून देत…
वसुधाची मुलं मोठी होऊ लागली.अतिशय उत्तम सांपत्तिक परिस्थिती असलेल्या अविनाशने मुलांना प्रचंड फी देऊन प्रायव्हेट स्कूल मध्ये घातले. त्या काळात डोळे फाटतील अशी फी होती ती.
मुलं पूर्ण अमेरिकनाईज्ड झाली.,
त्यांना मराठी शिकवायचे वसुधाचे सर्व प्रयत्न फोल ठरले. आपण मागायचाअवकाश. सर्व काही आपल्या हातात पडतं हे मुलांना माहीत झालं. आपले डॅडी समाजातल्या अतिशय उच्च स्थरात आहेत हे समजायला त्यांना उशीर लागला नाही. वसुधाने त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला पण सदैव अविनाश त्यांना पाठीशी घालत असे.
काळ पुढे सरकत गेला. दोन्ही मुलं अविनाशसारखी डॉक्टर काही झाली नाहीत पण उत्तम शिकली.कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दूरच्या युनिव्हर्सिटीत प्रवेश घेऊन लागोपाठ घर सोडून गेली. उरले हे दोघे.
मोठं घर,त्याहून मोठं,त्याहून मोठं असं करत हा प्रचंड व्हिलाअविनाशने विकत घेतला.
आता अमेरिकेत खूप लोक भारतातून नोकरी धंद्यासाठी येऊ लागले होते. वसुधा आली त्यावेळची परिस्थिती आता बदलायला लागली.
आता मराठी लोकांची नाटके, मराठी प्रोग्रॅम्स घेऊन महाराष्ट्रातून प्रथितयश नाटके घेऊन नट येऊ लागले.त्यांचे प्रयोग झाले की मोठ्या कौतुकाने अविनाशकडे हे लोक उतरत.
त्यांचे सगळे होस्टिंग हे जोडपे फार हौसेने करतअसे.
मग तो गाण्याचा प्रोग्रॅम असो किंवा दहा लोक आलेले असोत.
तो भव्य दिव्य व्हिला, ते लेकजवळचं मोठं घर बघून लोकांचे डोळे विस्फारत. अविनाशला हेच हवं असायचं.त्यांच्या डोळ्यातलं कौतुक हेवा. एक मराठी माणूस शून्यातून हे उभं करतो हे लोकांनी बघावं,हीच सुप्त इच्छा असायची त्यांना बोलावण्यामागेअविनाशची..
लोक येतजात राहिले,पार्ट्या झडत राहिल्या. लोकांचे कौतुक झेलून तेही आता जुने झाले.
आता असे अनेक लोक त्यांच्या शहरात यायला लागले.खूप शिकलेले, पैसे मिळवणारे आणि अविनाशसारखेच उच्च रहाणारे सुद्धा. तरीही अविनाश धडपडत राहिला. सगळ्या प्रोग्रॅमध्ये भाग घेत राहिला.लोकांना बोलावत राहिला. दरम्यान दोन्ही मुलांनी आपापल्या मैत्रिणी असलेल्या अमेरिकन मुलींशी लग्ने केलीआणि नोकरीनिमित्त ती खूप दूरच्या शहरात निघून गेली.लांबूनच हाय डॅडी, ममी,कशीआहेस?इथपर्यंत संबंध ठेवून राहिले दोघेही.
मध्यंतरी वसुधा पाय घसरून बागेत पडली.नशिबाने पायाला दुखापत झाली नाही पण हात मात्र चांगलाच दुखावला तिचा. अविनाशने त्यातल्या त्यात जवळ असलेल्या मुलाला बोलावलं.
“सॉरी डॅडी. मला नाही येता येणार.माझे सुट्टीवर जायचे वेगळे प्लॅन्स आहेत.मी चार दिवसातच जातोय ट्रीपला. टेक् केअर.”. मुलगा निघून गेला.
अविनाशने वसुधाची सगळी काळजी घेतली.तिचे लांबसडक केस तिला पार्लरमध्ये नेऊन कापून घेतले.शोल्डर कट करून घेतला.
“बघ कशी मस्त मॉडर्न दिसतेस की नाही?”
वसुधाने डोळ्यातलं पाणी लपवत हसून होकार दिला.
“अविनाश, आपण भारतात जाऊया का रे?इथे आता जीव गुदमरतोय बघ माझा.कसली रे ही मुलं आणि कसल्या या सुना. आपल्या माणसात जाऊया ना रे, निदान म्हातारपणी तरी.?इथे राहिलो की रे जवळजवळ चाळीस वर्षे. पुरे ना आता.मला नाही आता इथं रहावंसं वाटत.” वसुधा कळवळून म्हणाली.
अविनाश म्हणाला, “छे ग.आपलं तिकडे कोण आहे सांग?ना घर ना दार.डोकं टेकायलासुद्धा एकही ठिकाण नाही आपलं. तिकडे जाऊन तरी काय करणार आपण?असेच एकटेपण तिकडेही असणारच. बरंय इथेच. मी विचार करतोय, अमरच्या घराजवळ वेगळं थोडं लहान घर घ्यावं.त्यातल्या त्यात तो आणि केट आपल्याला जरा लागून आहेत, थोडे तरी प्रेम करतात.अभय खूपच दूर आहे.मनानेही ते आपल्यापासून खूप लांब गेलेत. मागच्या महिन्यात अमर म्हणत होता,तुम्ही हे मोठं घर विकून टाका डॅडी.आमच्या गावात जवळ घर घ्या.मलाही माझ्या मुलांसाठी गरज आहे तुमची.आणि तुम्हालाही म्हातारपणी मी जवळ असलेला बरा.” बघ.काय म्हणतेस तू?
विचार करून वसुधाने होकार दिला.नाहीतरी या प्रचंड मोठ्या घराची उस्तवार आता त्यांना होईनाशी झाली होती. त्यांना ती दुरुस्ती ते सगळं मधेच निघायला लागलेलं दुरुस्तीचं काम आता कटकटीचं होऊ लागलं.
वसुधा म्हणाली “अविनाश,घेऊया आपण अमरच्या जवळ घर..म्हणजे तरी फार जवळ नसणारच.असेल चार लेन टाकून.पण हाक मारली तर येईल अशी आशा करूया.
– – आणि अविनाशने तो भव्य महाल. मन घट्ट करून विकून टाकला.अमरच्या गावात त्याच्या घराजवळ घर मिळालं त्याला. फार जवळ नव्हतं पण तरी चार लेन्स टाकून म्हणजे जवळच.
सुरवातीला वसुधा बेचैन झाली.या वयात नवीन गाव नवीन वातावरणाशी जुळवून घेणं तिला अतिशय जड गेलं.पूर्वीच्या मैत्रिणी दूर राहिल्या. अविनाशचीही परिस्थिती वेगळी नव्हती.रिटायर झाल्यावर वेळ खायला उठायचा त्याला. आता तो पूर्वीचा रुबाब राहिला नव्हता. लोकांचं येणं जाणं कमी झालं.या घरात पूर्वीसारखे होस्टिंग करणं अशक्यच होतं.
.. सुगी संपल्यावर पाखरं उडून गेली.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





