सुश्री संध्या बेडेकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ जबाबदारी… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
“नेहमीपेक्षा शांत दिसणाऱ्या या वादळाचा तडाखा मात्र जबरदस्त होता. “…. _
काल पासून घरात खूपच शांतता आहे. आईचे बोलणे अगदी मोजकेच, व घरातील कामे शांतपणे चालू आहेत. कोणाला काही ‘instructions’ देणे वगैरे नाहीच.
आज ओला टॉवेल पलंगावर टाकल्यावर, आई नेहमी प्रमाणे काही म्हणाली नाही. मी सवयीप्रमाणे आलमरी उघडी टाकली. वर्तमानपत्रातील सर्व पाने इकडे तिकडे पसरलेली होती. सकाळपासूनच मोबाईल वर बोलत होतो. अभ्यास केला नाही. पण आज रोजचे डायलॉग ऐकू येत नव्हते…
आज आई नेहमी सारखी वागत नाहीये. कसल्या तरी विचारात आहे हे सर्वांच्या हळूहळू लक्षात आलं. बाबा, अनघा, अजय, सर्वांचे एकमेकांना विचारून झाले पण काय कारण असावे?? हे कोणाला कळले नाही. वादळ येण्यापुर्वी ची ही शांतता असावी का?? असं म्हणून सर्व वादळ येण्याची वाट बघत होते. आज काही खरं नाही एवढं मात्र नक्की.
शेवटी अनघाने विचारलेच “काय झाले आई?? बरं वाटतं नाही का?? मी काही मदत करू का?? ” पण त्याच शांतपणे आई म्हणाली, “अग, नको. तू कर आपला अभ्यास, मी बघते सर्व. “
आज ‘जागतिक फॅमिली डे’, तेंव्हा आईने प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ केला होता. अगदी एखाद्या सणासाठी असतो ना, तसा पूर्ण स्वयंपाक होता. प्रत्येक जण अचंबित होता. जेवण तर उत्तम, विशेष आहे, पण रोजच्या सारखे वागणे नाही, रागावणे ही नाही. इतकं शांत आईला बघायची सवयच नाही. काही कळत नव्हते.
त्यात भर पडली, जेंव्हा जेवताना आई म्हणाली “आज संध्याकाळी तुमच्या सर्वांचा काय कार्यक्रम आहे.?? मला आज तुमच्या सर्वांचा एक तास हवा आहे. मला तुमच्या सर्वांशी बोलायचे आहे. काळजी करू नका. काही भयंकर असं मी बोलणार नाही. फक्त माझ्या मनातलं सहजच तुमच्या जवळ बोलावे असं मला वाटतंय.
आज ‘फॅमिली डे’ म्हणजे परिवाराकरिता महत्वाचा दिवस. यापेक्षा योग्य दिवस दूसरा नाही. तर आज आपण सर्व येथेच संध्याकाळी सात वाजता भेटतोय. “
असं आईचे म्हणणे ऐकून सर्व म्हणजे, बाबांपासून सर्व वेगळ्याच विश्वात पोचले. आपापली समीकरणं मनातल्या मनात जमवू लागले. जून्या नवीन घटनांचे विचार/ विश्लेषण होऊ लागले. आपल्या काही सांगितलेल्या, काही न सांगितलेल्या चूका डोळ्यासमोर येऊ लागल्या. पण आज बोलायची किंवा आईला प्रश्न विचारायची हिम्मत बाबांना पण झाली नाही. मन मात्र शंका कुशंका आश्चर्याने भरून गेले. अनेक ओळखीचे, अनोळखी चेहरे समोर आले. पण लिंक काही लागत नव्हती. कसातरी सात वाजेपर्यंत चा वेळ काढला. पहिल्यांदाच आपल्याच घरात एवढं चविष्ट जेवण जेवून ही सर्व अस्वस्थ होते.
संध्याकाळी सर्व डायनिंग टेबलावर जमले. आईने बोलायला सुरुवात केली. “माझे बोलणे झाल्यावरच तुम्हाला जे बोलायचे असेल ते बोला. मधे नाही. “
आईने अगदी ‘Professional’ वक्ता असल्यासारखी सुरुवात केली. आई म्हणाली, “मी अनिता देशमुख, श्री आनंद देशमुख यांची पत्नी व अजय आणि अनघा ची आई. ही माझी ओळख म्हणा किंवा अस्तीत्व, किंवा माझं जग म्हणा. माझ्या जगण्याचा उद्देश म्हणा, काही ही समजा. “
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्या पासून होते व दिवस मावळतो ही अशाच काही घरच्या कामाने. मी रोज रात्री दुसऱ्या दिवशीच्या कामाचे ‘Homework’ करते. त्यात रोजचा स्वयंपाक, तुमचे डबे, तुमची घरातील इतर कामे असतात. मी माझ्या सवयीनुसार, तुमच्या आवडीनुसार, माझ्या क्षमतेनुसार, बुध्दीनुसार, प्रामाणिकपणे रोजचा आराखडा तयार करते व आनंदाने सर्व गोष्टी करायचा प्रयत्न असतो माझा. हे सर्व करणे मी माझे कर्तव्य समजते. रोजची कामे खूप आनंदाने पार पडतातच, असं दररोज होत नाहीं. काही अडथळे येतातच.
तुमचे वागणे नेहमीच खूप चूकीचे असते असं नाही. पण खूपदा मला पटणारे नसते. वयाप्रमाणेच वागता तुम्ही. पण मला दिसणाऱ्या काही गोष्टींकडे आज लक्ष देणे गरजेचे आहे असं मला वाटतं. ते बघून काळजी करत बसणे, यापेक्षा तुमच्याशी आज बोलावे असं वाटलं मला. रोज रोज त्याच त्याच गोष्टींवर वाद घालायचा, चर्चा करायची पण प्रगती काहीच नाही. ‘जैसे थे’. मी मात्र काळजी करत बसते. विचार करून करून मला मानसिक थकवा येतो. कधी कधी झोप लागत नाही. माझं काम मी बरोबर करत नाहिये असं वाटतं. मी अस्वस्थ असते. पण याने प्रश्न सुटत नाहीत. माझा त्रास वाढतोय धैर्य संपतं चाललंय. मला मानसिक शांतता हवी आहे. मला यावर उपाय शोधायचा आहे.
मी ‘आई’ म्हणजे माझ्या कामांची एक नियमावली /रूपरेषा पूर्वी पासूनच ठरविण्यात आली आहे. घर, नवरा, मुलं, त्यांची जबाबदारी, त्यांची देखभाल, त्यांना आनंदी ठेवणे हे सर्व त्यात आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायांवर उभे राहात नाही, तोपर्यंत ती माझी जबाबदारी आहे असं मी समजते. पण मी सांगीतलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडतेच असं नाही. तुमची प्रतिक्रिया बघून मला ते समजतं. कुठे तरी राग निघतो. चिडचिड होते. तुमचा व माझा वेळ जात, मन खराब होतं. ताणतणाव वाढतो. आपल्या संबंधांवर ही त्याचा परिणाम होतो. मनात अढी निर्माण होतात. अजून पर्यंत तरी तुम्ही मला दुरत्तरे देत नाही. ते सर्व कसं थांबवायचे?? किंवा कमी करायचे??? हे बदलता येईल का?? यावर मी विचार केला व एक प्रयोग करायचे ठरविले आहे.
फक्त तुम्हीच चूकता असं माझं म्हणणं नाही. माझ्यापण खूप गोष्टी तुम्हाला आवडत नसतील. मी हे शंभर टक्के मान्य करते.
आज मी तुम्हाला एक ‘Homework’ देते. तुम्ही तिघांनी एका कागदावर तुम्हाला माझ्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, त्यात माझे वागणे, बोलणे, स्वयंपाक, ड्रेसिंग सेन्स, तुम्हाला टोकणे, अशा अनेक इतर कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो. किंवा मी अजून काय करणे तुम्हाला अपेक्षित आहे?? हे अगदी बिनधास्त लिहा. एक कागद कमी पडला तर दूसरा घ्या. माझी काही हरकत नाही. मलाही माझ्या चूका सुधारायचा किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण करायची संधी द्या. खरं तर हे काम मी दोन वर्ष आधीच करायला हवं होतं, जेंव्हा तुम्ही दोघेही टीनेजर झालात. म्हणजे परिणामाचा विचार करण्याएवढे मोठे तुम्ही झालात.
चला, काही हरकत नाही. ‘देर आये दुरुस्त आये।’
माझ्या एक लक्षात आलंय, माझे तुमच्या सर्वांवर जीवापाड प्रेम आहे. तुमचे नेहमी चांगलेच व्हावे ही माझी ईच्छा व देवाजवळ प्रार्थनाही असते. पण सर्वच गोष्टी माझ्या हातात नाहीत. तुमचा आनंद, तुमचे पूढचे आयुष्य तुमच्या सवयींवर, तुमच्या निर्णयांवरही अवलंबून आहे.
तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमची पण आहे. तुम्हाला प्रोत्साहन देणे, मदत करणे, सल्ला देणे हे माझे कर्तव्य आहे. तुमच्या चूका दाखविणे हेही माझे काम आहे. पण त्याकडे लक्ष द्यायचे की नाही?? हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. मी हे काम करावे की नाही हे पण तुम्हालाच ठरवायचे आहे.
तुमच्या सवयी, तुमचे निर्णय, त्यामुळे होणारे परिणाम, निर्माण होणाऱ्या समस्या, याकरिता तुम्ही जबाबदार असणार आहात. लक्षात ठेवा, विचार करा. तुमचं नशीब घडविणारे किंवा उद्ध्वस्त करणारे तुमचे विचार व सवयी असतात.
नशीब आकाशातून घडत नाही. किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नाही, तर, केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतः चे नशीब स्वतः घडवत असतो. ‘नशीबात असेल तसे घडेल’ या भ्रमात राहू नका. कारण आपण जे करू, त्याचप्रमाणे नशीब घडेल हे लक्षात असू द्या. यावर विश्वास ठेवा. “
आज आईने घेतलेला हा ‘Stand’ आश्चर्यकारक होता. विचार करण्यासारखा होता. सगळे स्तब्ध होते. म्हणजे एखाद्या कडक मास्तरांनी लाईनीत ‘सरळ उभा रहा’ म्हणून पाठीवर जोरात मारलेल्या धपाट्या सारखाच होता.
प्रत्येकाच्या हातात कागद तर होता, पण कुठून सुरुवात करावी हे कळत नव्हतं. एक मात्र लक्षात आलं, आमच्या आयुष्याची जबाबदारी आईने आमच्यावरच सोपवली आहे. आई मात्र शांत होती. तिचा निर्णय झाला होता. नेहमीपेक्षा शांत दिसणाऱ्या या वादळाचा तडाखा मात्र जबरदस्त होता.
© सुश्री संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





