सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ बाप-माणूस… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
(त्यांचा तो छोटासा व्हरांडा व्यवस्थित बंद करून घेतलेला होता. तिथे त्यांनी एक सेटी ठेवलेली होती. वडिलांच्या परवानगीने मी रात्री तिथे अभ्यासाला बसू लागलो. माझ्या सावत्र आईला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतंच.)
इथून पुढे – –
अभ्यास करता करता मी काही वेळा तिथेच झोपून जायचो. त्यांचा छोटा मुलगा कधी रात्री रडत असला, झोपत नसला तर त्याला खेळवायचो. रोजच्या सहवासाने तोही माझ्याकडे छान राहायचा. त्यामुळे वासंतीला ही जरा मोकळीक मिळायची. दिवसभर ती घरकाम आणि त्या छोट्याला सांभाळताना थकून जायची. विजयची विधवा आई गावाकडे त्याच्या भावासोबत राहायची. क्वचित कधीतरी ४-५ दिवस विजयकडे राहायला यायची. विजय आणि वासंतीला प्रेमविवाह दोन्हीकडच्या घरी मान्य नव्हता. त्यामुळे जवळचे नातेवाईकांचं येणं-जाणं असं नव्हतं च! विजयची पोलीस खात्यात नेमणूक झाली, तेव्हा वासंती सिनियर काॅलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होती. (एफ. वाय. बी. ए.). घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे जमवण्याचा प्रयत्न सुरू केला. म्हणून मग वासंतीला अठरा वर्षे पूर्ण होताच या दोघांनी गुपचूप रजिस्टर लग्न केलं. एक वर्षानंतर मुलाचा जन्म झाला. त्यामुळे वासंतीचं शिक्षण अर्धवटच राहिलं.
नियमित अभ्यास केल्यामुळे मला बारावीत अठ्ठ्याहत्तर टक्के गुण मिळाले. मी बी. काॅम. बरोबरच ICWA ला पण अॅडमिशन घेतली. डहाणूतील अरविंद देशपांडे यांच्या सी. ए. फर्ममध्ये मी नोकरी पण मिळवली. ते बाबांच्या परिचयाचे होते, त्यामुळे मला अभ्यास, परिक्षा सांभाळून, आॅफिसचं काम करायला सवलत द्यायचे.
इकडे विजयरावही खूप धडाडीने काम करत होते. आजूबाजूच्या परिसरातील गुंडांना त्यांनी चांगलाच चाप लावला होता. एकदा त्यांच्या बदलीची आॅर्डर आली, तरी लोकांनी ती रद्द करायला लावली. त्याऐवजी मग फक्त त्यांची डहाणू तालुक्यातल्या दुसर्या पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. एकंदरीत सगळं सुरळीत चालू होतं.
फेब्रुवारीचा महिना होता. माझी फायनल इयरची परीक्षा जवळ आली होती. त्यामुळे मी पण जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवत होतो. खाण्या-पिण्याची देखील शुद्ध नसायची. वासंती जबरदस्तीने मला कधी चहा-नाश्ता तर कधी जेवण घ्यायला लावायची. माझ्या सावत्र आईला माझं काही सोयर-सुतक नव्हतंच. वडील बाहेर दौऱ्यावर असतील तेव्हा ती आपल्या मैत्रिणींना घरी बोलावून मजा करत असायची नाहीतर त्यांच्यासमवेत बाहेर भटकत असायची.
त्या दिवशी देखील मी रात्री उशिरापर्यंत वाचत बसलो होतो. आणि रात्री एक वाजता अचानक कोणीतरी दार ठोठावलं. मी भांबावून गेलो. तेवढ्यात तोआवाज ऐकून बाजूच्या घरातून माझे वडील बाहेर आले. ते नेमके त्या दिवशी घरी होते. मग मीदेखील दार उघडून बाहेर डोकावलो. एव्हाना वासंती देखील जागी होऊन व्हरांड्यात आली होती.
एक पोलीस वडिलांना हळूहळू काहीतरी सांगत होता. ते दोघेही गंभीरपणे वारंवार विजयच्या घराकडे बघत होते.
मी दार उघडलेलं पाहून वडील आणि तो पोलीस तिकडे आले. वडील मग वासंतीला म्हणाले की, विजयरावांना अपघात झाला आहे आणि ते गंभीर जखमी झाले आहेत. तुमच्या घरच्या कोणाचा फोन नंबर असेल तर द्या. हे ऐकून वासंतीला एकदम भोवळच आली. बाळ झोपलेलं होतं. मी पटकन पाणी आणलं आणि वासंतीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. तोवर माझी आईदेखील तिथे येऊन वासंती जवळ बसली. वडिलांनी शेजारच्या वाड्यातल्या कोणाला तरी डाॅक्टरला बोलवायला पाठवले.
मला एकदम आठवलं की विजयरावांची डायरी घरात टेबलच्या ड्राॅवरमध्ये असते. मी डायरी चाळून बघितली, शेवटच्या पानावर त्यांच्या भावाचं नाव आणि एक फोननंबर लिहिलेला होता. तो मी वडिलांना दाखवला.
वडील मग त्या पोलीसासोबत हाॅस्पिटलमध्ये गेले. सारं काही संपलं होतं. विजयरावांचा बाईकला ट्रकची धडक बसल्याने, ते जागेवरच गेले होते. वासंतीला हे कसं सांगायचं हा मोठाच प्रश्न होता.
मी दिलेल्या नंबर वर फोन करून विजयच्या भावाला निरोप दिला गेला. तो फोननंबर गावातल्या – पोलीस स्टेशनचा होता. तेव्हा घरोघरी फोन आलेले नव्हते. मग तिथल्या पोलिसांच्या मदतीने एक जीप मिळवून विजयची आई, भाऊ-भावजय आणि काही गाववाले पहाटे डहाणूला पोचले. वासंतीची आई, भाऊ-वहिनी देखील सकाळी येऊन पोचले.
आल्या आल्या विजयच्या आईने हंबरडा फोडला आणि वासंतीच्या नावाने शिमगा मांडला. हिच्यामुळे माझा मुलगा गेला. तिनंच त्याला माझ्यापासून तोडलं आणि आता कायमचा दूर गेला. त्या तश्या प्रसंगीदेखील या दोन परिवारात तूतू मैमै सुरू होती. या सर्व हल्ल्यामुळे, डाॅक्टरांनी इंजेक्शन दिल्याने जरा शुद्धीवर येत असलेल्या वासंतीची दातखिळीच बसली. डाॅक्टर तिथेच थांबले होते म्हणून बरं! त्यांनी लगेच उपचार केले आणि नंतर मात्र तिला शांत झोपवून ठेवण्यासाठी एक गोळी देऊन गेले.
या प्रसंगाला कसं तोंड द्यावं हे मलाही समजत नव्हतं. विजयच्या घरच्यांनी बाकीचे सगळे सोपस्कार पार पाडले. मी फक्त त्या छोट्याला सांभाळत होतो. कारण माझी सवय असल्याने तो फक्त माझ्याकडेच शांत राहात होता. आपल्या आईला काहीतरी झालंय एवढंच त्या छोट्या जीवाला कळत होतं.
विजयरावांचा अंत्यसंस्कार आटोपल्यावर वासंतीच्या माहेरचे लोक निघून गेले. लोकलाजेस्तव फक्त सासू आणि दीर-जाऊ तेवढी राहिली होती. दिवसकार्य आटोपल्यावर तेही निघून गेले. जाताना दीर अंत्यसंस्कारासाठी आणि दिवसकार्यासाठी खर्च केलेले पैसे मागून घ्यायला विसरला नाही. त्या दहा दिवसांतही सासूच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू होता, वासंतीला शिव्या घालण्यासाठी! आधी प्रेम नव्हतेच, पण आता विजय गेल्यावर त्याच्या बायको-मुलाशी तर त्यांना काहीच संपर्कही ठेवायचा नव्हता, मग जबाबदारी घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.
एवढ्या भयंकर आघाताने वासंती पार कोलमडून गेली होती. शेजारधर्म म्हणून माझी सावत्र आई मात्र तिला दोन घास जबरदस्तीने खायला घालत होती. वासंतीची अवस्था फारच वाईट झाली होती. आपल्या मुलाला कवटाळून ती वारंवार हंबरडा फोडून रडायची आणि तिची शुद्ध हरपायची. मला अभ्यास सुचणं शक्यच नव्हतं. मी त्या छोट्याला घेऊन आत-बाहेर करत राहायचो आणि त्याला भात-खिचडी असं खाऊ घालायचो.
साधारण महिनाभरानंतर वासंती थोडीशी सावरली. आपल्या मुलाला आपणच जेवू-खाऊ घातलं पाहिजे, याची तिला जाणीव झाली. मग ती काहीतरी अन्न रोज शिजवू लागली. पोलीसस्टेशनमधून एक हवालदार काही कागदपत्रं देऊन गेले होते. नोकरीत कामावर असताना विजयरावांचा मृत्यू झाल्यामुळे नियमानुसार जे काही पैसे त्यांच्या कुटुंबाला मिळायला हवे, त्यासाठीचे अर्ज त्यात होते. शिवाय अनुकंपा तत्त्वावर वासंतीला पोलीस खात्यात नोकरी मिळण्यासाठीचा अर्जही त्यात होता.
मरणारा तर निघून जातो, पण मागे राहिलेल्याला जगण्यासाठी सर्व धडपड करावीच लागते. पैशाचं सोंग तर आणता येत नाहीना! वासंतीकडे तरी कुठून फारसा पैसा असणार? कुटुंबाचा आधार तर बिलकुलच नव्हता. घराचं भाडं, रोजचं दूध, भाजीपाला आणि लहानग्याचं संपूर्ण भविष्यच आ वासून समोर उभं होतं. माझ्या आणि पोलीस स्टेशन मधल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने, तिने ते सर्व सोपस्कार पूर्ण केले. सरकारी कामकाज म्हटलं की त्याची कार्यवाही व्हायला वेळ तर लागणारच. या सगळ्यात तीन महिने असेच निघून गेले.
– क्रमशः भाग दुसरा
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




