सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाप-माणूस… — भाग – ३ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(वासंतीकडे तरी कुठून फारसा पैसा असणार? कुटुंबाचा आधार तर बिलकुलच नव्हता. घराचं भाडं, रोजचं दूध, भाजीपाला आणि लहानग्याचं संपूर्ण भविष्यच आ वासून समोर उभं होतं. माझ्या आणि पोलीस स्टेशन मधल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने, तिने ते सर्व सोपस्कार पूर्ण केले. सरकारी कामकाज म्हटलं की त्याची कार्यवाही व्हायला वेळ तर लागणारच. या सगळ्यात तीन महिने असेच निघून गेले.) — 

इथून पुढे – – – 

या मधल्या काळात आणखीही काही घटना घडल्या. माझे वडील गुजरातमध्ये फिरतीवर असताना त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. मी सावत्र आईला सोबत घेऊन सुरतला गेलो. औषध उपचारांसोबतच, त्यांच्या हिंडण्या फिरण्यावर काही निर्बंध आले. शिवाय आहाराचं पथ्यही सांभाळणं गरजेचं होतं. मग त्यांनी सुरतमध्ये घर घेऊन राहण्याचं ठरवलं आणि माझी सावत्र आईही तिथेच राहू लागली. त्यांना कंपनीनं गुजरातमध्येच कमी फिरतीचं काम देण्याचं मान्य केलं. मी काॅलेज आणि नोकरीमुळे डहाणूला परत आलो.

विजयराव गेल्यापासून मी माझ्या घरात.. हाॅलमध्ये झोपायचो. आता पूर्ण घरात मी एकटाच होतो. अभ्यास आणि नोकरी सांभाळून, जमेल तशी वासंतीला मदत करत होतो. तिचे पैसे आॅफिस कडून मिळण्यासाठी, पोलीस स्टेशनला, त्यांच्या हेड ऑफिसला, मंत्रालयात अशा अनेक ठिकाणी बऱ्याच फेऱ्या माराव्या लागल्या.

विजयरावांच्या फंडाचे पैसे मिळायलाही खूप

त्रास झाला. कारण नोकरीला लागताना विजयरावांनी जे फाॅर्म भरले त्यात आईच्या नावाचं नाॅमिनेशन होतं. कायदेशीर वारसाची कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वासंती आणि तिच्या सासूला ते पैसे विभागून मिळाले. काही रक्कम खर्चासाठी ठेवून बाकी देशपांडे सरांच्या सल्ल्यानुसार पोस्टाच्या योजनेत गुंतवले, जेणेकरून वासंतीला दरमहा एक ठराविक रक्कम हातात मिळेल.

माझ्या B. Com. फायनल परिक्षेचं वेळापत्रक आलं, तशी मी देशपांडे सरांकडून सुट्टी मागून घेतली. नेटाने अभ्यास करायला हवा होता. मला नाश्ता, जेवण देण्याची जबाबदारी वासंती निभावत होती. मी जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देत होतो. अधून मधून वासंतीच्या छोट्याला सांभाळत होतो. एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात B. Com. ची परीक्षा एकदाची पार पडली. आता जूनमध्ये ICWA ची फायनल होती… तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं.

मे च्या तिसर्‍या आठवड्यात वासंतीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी मुलाखतीला बोलावण्यात आलं. ठाण्याच्या हेडआॅफिसला त्यासाठी तिला घेऊन गेलो. मग परत एकदा तिच्या कागदपत्रांची पडताळणी म्हणून जावं लागलं. छोट्या लेकराला घेऊन सगळीकडे एकटीनं जाणं अवघडच होतं ना! तिला इतर कोणाचा आधार नसल्याने ती माझीच जबाबदारी झाली होती. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याच्या सिव्हिल हाॅस्पिटलला बोलावण्यात आलं. आणि वासंतीवर अजून एक बाँम्बगोळा पडला. वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचं निष्पन्न झालं. साडेतीन महिने उलटले होते. ही गोष्ट आधी तिच्या लक्षातच आली नव्हती. विजयरावांच्या निधनाने झालेल्या आघातामुळे, तिचं स्वतःच्या तब्येतीकडे लक्षच राहिलं नव्हतं. त्यामुळे तिचे इतर वैद्यकीय अहवालदेखील चांगले नव्हते. लोह आणि इतर जीवनसत्त्वांची कमतरता, वजन आणि उंचीचं प्रमाण इत्यादी गोष्टी योग्य प्रमाणात नव्हत्या. त्यामुळे लगेच नेमणूक होणं शक्य नव्हतं. आता हे सगळं कसं निभावायचं हा फार जटील प्रश्न झाला होता. वासंती खूप निराश झाली होती. तिला डहाणू मधल्या महिला डाॅक्टरकडे घेऊन गेलो. त्यांनी वासंतीला नियमित औषधे, तपासणी आणि आरामाची आवश्यकता असल्याचं सांगितलं.

तिच्या हातात येणाऱ्या मोजक्या पैशांमुळे महिन्याचा खर्च जेमतेम भागत होता. त्यामुळे घरकामाला नोकर ठेवणं परवडणारं नव्हतंच. औषधांचा खर्च करणं तर भागच होतं. गर्भपात करणंही अतिशय जोखमीचं आहे, असं सांगून डाॅक्टरांनी त्याला नकार दिला.

मला मिळणाऱ्या पगारात माझा खर्च कसाबसा भागत होता. जमेल तेवढी मदत मी वासंतीला करत होतो. तिच्या नाजूक तब्येतीमुळे काहीवेळा रात्रीदेखील मला तिच्यासोबत थांबावं लागत होतं. स्त्री-पुरूष नात्याला एकाच दृष्टीने बघणाऱ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये यावरूनही कुजबुज सुरू होती. मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्यांची तोंड कसं धरणार? आम्ही दोघेही यामुळे दुःखी होत होतो. या सर्व तणावपूर्ण वातावरणातच माझी ICWA ची अंतिम परीक्षा पार पडली.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात माझा B. Com. चा रिझल्ट लागला. मी फर्स्ट क्लासने पास झालो. तिसऱ्याच आठवड्यात मला जे. अँड एम. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणं आलं. मी नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज करत होतो. त्यापैकी ही खूप मोठी कंपनी होती. त्यांच्या भारतभर अनेक शाखा होत्याच शिवाय काही शाखा परदेशातही होत्या. त्यांनी अकाउंटंटच्या पदासाठी मुलाखतीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर मला नरिमन पाॅइंटच्या मुख्य आॅफिसात दोन तीन वेळा जावं लागलं… प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी इत्यादी साठी. या साऱ्यात एक महिना कुठे गेला ते कळलंच नाही. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवडय़ात मला कंपनीकडून नेमणुकीचं पत्र आलं. मला प्राथमिक प्रशिक्षणासाठी एक महिना दिल्लीला जावं लागणार होतं, त्यानंतर प्रत्यक्ष कार्यालयात नेमणूक होणार होती.

इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली. वासंतीची परिस्थिती नाजूक होती. तिला एकटीला असं सोडून दिल्लीला जाणं मला अवघड वाटत होतं. पण नोकरीची एवढी चांगली संधी गमावणंदेखील शक्य नव्हतं. अखेर देशपांडे सरांकडे घरकाम करणाऱ्या मावशींच्या ओळखीने एक बाई मिळाली. ती विनापाश विधवा वासंतीकडे राहून तिची काळजी घ्यायला तयार झाली.

या एक महिन्यात वासंतीच्या मुलानं तिला खूपच त्रास दिला. त्याला माझी सवय झाली होती. मी घरात न दिसल्याने तो सारखा रडारड, चिडचिड करून वासंतीच्या मागे लागत होता.

माझं ट्रेनिंग संपण्याच्या आदल्या दिवशीच माझी नेमणूक भोपाळच्या आॅफिसला झाल्याचं पत्र मला मिळालं. एक आॅक्टोबरला म्हणजे तीनच दिवसानंतर मला भोपाळच्या कार्यालयात हजर व्हायचं होतं. कंपनीतर्फे तिथे मला राहायला जागा मिळणार होती.

मी दिल्लीहून डहाणूला आलो. भोपाळला राहण्याच्या दृष्टीने काही सामानही न्यायचं होतं. मी भोपाळला जाणार या कल्पनेनं वासंती कासावीस झाली.

वासंतीला आणि मलाही एकमेकांची सवय झाली होती. त्यामुळे असं वेगळं राहणं दोघांनाही त्रासदायक वाटत होतं. दोघांनाही जीवाभावाचं असं कोणीच नव्हतं. वासंतीचा मुलगा तर मला एक क्षणही एकटं सोडत नव्हता. मलाही त्याचा लळा लागला होताच. मी त्या दोघांना माझ्यासोबत भोपाळला घेऊन जायचं ठरवलं. पुढील आयुष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तशी सूचना विवाह-निबंधक कार्यालयात दिली. मी माझ्या वडिलांनाही फोन करून कळवलं. पण त्यांना हे अजिबात आवडलं नाही आणि यापुढे आपला संबंध संपला, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला.

मी भोपाळला कामावर रूजू झालो. एक महिन्यानंतर नोंदणी पद्धतीने आमचं लग्न झालं. मग पुढच्या आठवड्यात सर्व सामान बांधून आम्ही भोपाळच्या घरात राहायला गेलो. वासंतीची काळजी घेणाऱ्या मावशी मात्र आमच्यासोबत आल्या. त्या मग आपल्या घरातल्याच झाल्या. त्यांचे उपकार आजन्म फिटणार नाहीत.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात वरदाचा जन्म झाला. वडील म्हणून तिच्या जन्म दाखल्यावर माझंच नाव लावायचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यानंतर दोघांत भावंडांच्या नावात फरक असल्याने कोणतीही भावनिक आणि कायदेविषयक समस्या निर्माण होऊ नये, म्हणून मोठ्या मुलाला, म्हणजे तुला, मी दत्तक घेण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. मनाने तर ते नातं आधीच स्वीकारलं होतं. त्यामुळे दत्तक विधानातील अट असली तरी या दत्तक प्रकाराचा उच्चार न करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि तशी कधी गरजही वाटली नाही.

सावत्रपणाचा कटू अनुभव मी घेतला होता, तो तुम्हां दोघां भावंडांच्या वाट्याला कधीही येऊ नये ही मनोमन इच्छा होती माझी!

तुझा आय. पी. एस. चा रिझल्ट लागला आणि वासंती पुन्हा भूतकाळात गेली. त्या सर्व दुःखद घटनांची मनात उजळणी झाली आणि त्या तणावामुळेच तिचा रक्तदाब एकदम कमी झाला आणि तिला अ‍ॅडमिट करायची वेळ आली.

विराजचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते आणि त्यानी श्रीधरला घट्ट मिठी मारली. या बाप-माणसाबद्दल प्रेम, आदर, कृतज्ञता अशा अनेक भावना त्याच्या मनात उचंबळून आल्या होत्या.

– समाप्त – 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments