श्री मेघःशाम सोनवणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ नवीन अध्याय… (अनुवादित कथा) – मूळ हिन्दी लेखक : अज्ञात  ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

उज्जैनची कडाक्याची थंडी आणि महाकालेश्वर महादेवांच्या शहरातून वाहणारी थंड हवा अजूनही रूपाच्या मनात एक विचित्र भावना निर्माण करत असते.

रूपा ही एक अतिशय शांत आणि सुसंस्कृत मुलगी होती जिचे लग्न उज्जैनमधील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाले होते. रूपाचा नवरा, केशव, या शहरातील एक मोठा धान्य व्यापारी होता. तो स्वभावाने थोडा कडक होता आणि शिस्त हाच घर चालवण्याचा एकमेव मार्ग आहे असे त्याला वाटत होते. त्याच्यासाठी, फक्त व्यवसायातील नफा महत्वाचा होता व त्याच्या ठायी भावनांची किंमत शुन्य होती.

रूपाची दिनचर्या पहाटे चार वाजता सुरू व्हायची. ती उठायची, क्षिप्रा नदीवरून वहाणाऱ्या थंड बर्फाळ वाऱ्यात आंघोळ करायची आणि नंतर ती मंदिर स्वच्छ करायला लागायची. थंडीमुळे तिचे हात सुन्न पडायचे, पण तिने कधीही तक्रार केली नाही.

केशवची आत्याही त्यांच्याच घरात राहत होती. तिचा स्वभाव फारच कडक होता आणि ती प्रत्येक वाक्यावर तिच्यावर डाफरत असे. रूपा तिचे प्रत्येक शब्दबाण मान खाली घालून झेलत असे आणि तरीही तिची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडत नसे.

त्या डिसेंबरमध्ये धुके इतके दाट होते की अंगणातले तुळशीचे रोपही अस्पष्ट दिसत होते. रूपाला तिच्या आईवडिलांच्या घराची सतत आठवण येत असे, जिथे तिची आई तिला गरम दूध देऊन उठवत असे. इथे तिला सर्वांची काळजी घ्यावी लागत असे.

केशव बऱ्याचदा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जात असायचा. रूपाला घरी अगदी एकटे पडल्यासारखे वाटायचे. आत्यांचे कठोर शब्द आणि केशवची उदासीनता यामुळे तिची अवस्था वाऱ्याच्या झोताबरोबर उडणाऱ्या वाळलेल्या पानासारखी झाली होती.

एकदा त्यांच्या घरी एका उत्सवाची तयारी सुरू होती. रूपा सकाळपासूनच स्वयंपाकघरात स्वयंपाकाला लागली होती. तूप आणि मसाल्यांचा सुगंध घरात दरवळत होता. मग, आत्यांनी एका क्षुल्लक गोष्टीवरून रूपाला सर्वांसमोर खूपच फटकारले.

रूपाचे डोळे अश्रूंनी भरून आले, पण ती काहीच बोलली नाही. शांतपणे, तिने तिच्या साडीच्या पदराने डोळे पुसले आणि परत कामाला लागली. पण त्या दिवशी, तिचं हृदय खुपच दुखावलं गेलं होतं. तिला याचं राहून राहून आश्चर्य वाटत होतं की तिचे अस्तित्व फक्त इतरांची सेवा करण्यापुरतंच मर्यादित आहे का?

त्या संध्याकाळी केशव परत आला तेव्हा त्याला दिसले की रूपाची तब्येत बरी दिसत नाहीये. पण तिच्या प्रकृतीबद्दल विचारण्याऐवजी त्याने फक्त एवढेच म्हटले की उद्या उत्सवासाठी पाहुणे येणार आहेत आणि सर्व तयारी वेळेपूर्वीच झाली पाहिजे. रूपाने फक्त मान हलवली आणि गप्प राहिली.

रात्री, जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपी गेलेले होते, तेव्हा रूपा छतावर एकटी उभी होती. आकाशात धुके पसरले होते आणि थंड वारा तिच्या चेहऱ्याला बोचत होता. तिला राहून राहून असं वाटत होतं की ती तिचे संपूर्ण आयुष्य असेच मुक्या बाहुलीसारखे घालवेल का?

मग तिने मनात एक संकल्प केला. तिला असं जाणवलं की आदर, प्रेम हे मागून मिळणार नाही, ते मिळवावे लागेल. तिला तिचे मौन सोडावे लागेल, पण सन्मानाने, कुणाचं मन न दुखावता.

दुसऱ्या दिवशी सकाळी पाहुणे आले तेव्हा रूपाने तिच्या साधेपणाने, सेवाभाव आणि बुद्धिमत्तेने सर्वांची मनं जिंकली. तिने सहजतेने तिची शालीनता आणि व्यवहारकौशल्य दाखवले. तिने पाहुण्यांकडून कौतुकाची थाप मिळवली. आत्या आणि केशव त्यांच्या ठायी असलेल्या या मुक्या बाहुलीकडे पहातच राहिले. त्यांना पहिल्यांदाच जाणवले की रूपा ही फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाही तर तिचं स्वतःचंही काही अस्तित्व आहे.

जेव्हा आत्याने तिला पुन्हा टोमणे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा रूपाने मोठ्या प्रेमाने आणि आदराने त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. ती म्हणाली, “आत्या, मोठ्यांचे आशीर्वाद तेव्हाच फळ देतात जेव्हा लहानांचा आदर केला जातो. “

संपूर्ण घर स्तब्ध झाले. केशवलाही त्याच्या पत्नीचे एक नवीन रूप दिसले. संपुर्ण घर एकहाती सांभाळत असलेल्या रत्नाच्या अस्तित्वाची त्याला जाणीव झाली. त्या रात्री पहिल्यांदाच केशव रूपासोबत बसला आणि शांतपणे तिचं मनातलं ऐकून घेतलं.

थंडी अजूनही तशीच होती, पण आता रूपाची खोली उबदारपणाने भरलेली होती, हिटरने नाही तर प्रेम आणि आदराच्या उबदारपणाने. आत्यांचा स्वर आता हळूहळू मवाळ होत गेला. तिच्या संयमाने, रूपाने त्या जुन्या घराचे वातावरण बदलून टाकले होते.

आता, जेव्हा जेव्हा रूपा क्षिप्रा नदीच्या काठावर जायची तेव्हा तिला वाऱ्याच्या झुळूकीत संगीत ऐकू येत असे. तिला कळले होते की धुके कितीही दाट असले तरी, सूर्यप्रकाशाचा एक किरण त्याला छेद देण्यासाठी पुरेसा असतो. तो किरण तिचा स्वतःचा आंतरिक आत्मविश्वास होता.

संवादाच्या अभावामुळे अनेकदा नातेसंबंधात कटुता येते. रूपाने ती पोकळी तिच्या गोडव्याने भरून काढली. केशव आता रुपाच्या स्वप्नांमध्ये आणि त्याच्या व्यवसायात अधिक रस घेऊ लागला. त्याने तिला कुटुंबाच्या व्यवसायाच्या कामामध्येही समावून घेतले.

उज्जैनचे रस्ते आता रूपाला परके वाटत नव्हते. तिला असे वाटले की तिने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा जुना भव्य वाडा आता तिला तुरुंगासारखा वाटत नाही, तर आपल्या स्वतःच्या घरासारखा वाटत होता. धुके दूर झाले होते आणि सूर्यप्रकाश आणखी सोनेरी वाटत होता.

आजही, थंडी पडली की रूपा तिच्या सासू आणि आत्यांसाठी आल्याचा चहा बनवते. पण आता तिच्यात मनात भीतीची नाही, तर जवळीकतेची भावना आहे. त्याग आणि संघर्षातून तिने तिचे स्थान मिळवले आहे.

शेवटी, रूपाला जाणवले की प्रत्येक माणसामध्ये एक शक्ती असते; फक्त ती ओळखण्याची गरज आहे. तिने तिचा खरा स्वाभिमान शोधला व आपला सन्मान राखला, हा तिचा सर्वात मोठा विजय होता आणि तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आता सुरु झाला होता.

 

मूळ हिंदी कथालेखक : अज्ञात

मराठी अनुवाद : मेघःशाम सोनवणे

नाशिक.

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments