सुश्री सुनीला वैशंपायन
☆ विसर – – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
“अग, नीतू, मी तेरा वर्षांची असेन बघ! नाना बर्वे घरी आले आणि आई दादा बाहेर गेलेले! मी दडपे पोहे व चहा त्यांना करून दिला. नाना नेहमी सगळ्यांना सांगत.. अलका किती गुणी..
“अग आई, शंभर वेळा सांगितली आहेस ही गोष्ट. ” नीतू तडकून बोलली आणि अलकाताईंचा चेहरा एकदम पडला. आताशा तेच तेच बोलणं फार होतंय आपलं.
त्या उठून त्यांच्या खोलीत गेल्या.. बाहेर सुनबाई नीतूला सांगत होती, “अग, हे हल्ली फार झालंय पण डिमेन्शिया वगैरे काही नाही त्यांना असे डॉक्टर म्हणालेत. “
अलकाताईंच्या निर्धाराला न जुमानता आत कोंडलेल्या सर्व भावना आसवांच्या रूपानं गालावरून खाली ओघळल्या. मुलं नातवंड गप्पा मारत बसली की आपणही बोलावसं वाटायचं पण काहीवेळा जे बोलू त्याचे वेगळेच अर्थ निघायचे तर कधी तिचं गोष्ट पूर्वी दहावेळा बोललेली असायची! त्यापेक्षा आपण घुमेपणाने बसून राहिलेलेच बरं असं वाटायला लागतं होतं..
त्यांचे यजमान, मनोहरराव नेहमी सांगत.. “अगं सगळ्यांचं होतं असं.. तू नको त्रास करून घेऊ.”
दुसरे दिवशी सकाळी त्या चहा घ्यायला किचनमधे गेल्या. सुनबाई भाजी चिरत होती. “आई, नीट झोप लागली का? ” नीतू आईकडे बघत होती.
“नाही लागली.. काल तू मला “ही गोष्ट शंभरवेळा सांगितली आहेस” म्हणालीस ना.. आपलं असं का होतं याचं खूप वाईट वाटत होतं. ” अलकाताई स्पष्टवक्त्या होत्या.
“अग हल्ली फारच झालंय तुझं हे! ऐकणारं कंटाळून जातं. ” नीतू माघार घ्यायला तयार नव्हती. सुनबाईनेही दुजोरा दिला!
अलकाताईनी चहाचा घोट घेतला..
“नीतू, तू पाच वर्षांची होतीस. तू रोज मला सिंड्रेलाची गोष्ट सांगायचीस. तुझी गोष्ट हातातलं काम बाजूला टाकून मी ऐकत असे. नंतर “जादूची अंगठी” ही गोष्ट तू मला जाता येता सांगायचीस! पुढं बारावीची परीक्षा झाल्यावर तुझं.. आई मला पेपर अवघड गेलेत. मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन नाही मिळाली तर? हे वाक्य मी सुट्टीभर रोज ऐकत होते आणि दरवेळी मी तुला प्रेमाने सांगत असे.. नीतू, तू प्रयत्न केलेस ना? आता जे होईल ते होऊदे.. पण तेच तेच का बोलतेस शंभरवेळा असं कधी माझ्या तोंडून आलं नाही. मुलं आई जवळ नाही तर कुणाबरोबर बोलणार? मी तुला कितीवेळा तेच तेच सांगतेस म्हटले असते तर तू कोमेजून गेली असतीस!
वयानं आणि नॉस्टाल्जिया मुळेही पुर्वीचे सुखद क्षण आठवत राहतात आणि ते परत सांगितल जातं.. मी हे मुद्दाम करत नाही. पण ज्या तुटकंपणानं जवळचे मला गप्प करतात ना त्यानं हिरमुसून जातं बघ माणूस.. तुम्हाला त्रास व्हावा म्हणून मी काही करत नाही.. तुझे बाबा म्हणतात नवा श्लोक पाठ कर. मी शब्दकोडे, सुडोकु वगैरे खेळतेच ग पण मेंदूमध्ये वयोपरत्वे झालेले बदल नवीन गोष्टी पुर्वीसारख्या लक्षात ठेवू शकत नाही..
पण नीतू, आज ‘मी आहे म्हणून माझ्या चुका आहेत’.. मी गेल्यावर मला ओरडल्याचा तुला त्रास होऊ नये असं वाटतं म्हणून स्पष्ट बोलतेय. म्हातारं माणूस अन् लहान मुलं सारखंच असतं बघ! आणि तू कितीही मोठी इंजिनीअर अस.. मला मात्र तुझ्यात आजही सिंड्रेलाची गोष्ट रोज मला सांगणारी छोटी नीतूच दिसते व मन मोकळं करावंसं वाटतं! ”
“आई, सॅारी ग.. सांग परत नाना बर्वे काय म्हणाले ते! अगदी पहिल्यापासून! ” नीतू डोळे पुसत होती. आपण गेल्यावर लेकीला आपण तिच्यावर ओरडल्याचा त्रास होऊ नये याचा ही विचार करतेय? यालाच तर आई म्हणायचं..
“जा ग! आलीय मोठी नाना बर्वेंची गोष्ट ऐकणारी.. अलकाताई हसल्या.. ”काल रात्री जागून तुझ्यासारख्या हुश्शार मुलीसाठी हे प्रश्न काढलेत बघ. सिनिअर लोक तेच तेच परत परत बोलतात याबद्दल आमच्या न्युरॅालॅजिस्ट जावईबापूंशी बोल व दे यांची उत्तरं. मी पण चार लोकांना विचारत आहेच पण आई मनातलं लेकीजवळ नाही बोलणार तर आणि कुठं बोलेल सांग बरं? ”अलकाताईंनी प्रश्न लिहलेला कागद नीतूला दिला.
सुनबाईनं स्वत:च्या आईला अचानक फोन केला हे नीतुच्या लक्षात आले होते. आणि मनोहर राव आरामखुर्चीत बसून बायकोकडे कौतुकाने पहात होते!
एकमेकांशी मोकळेपणाने बोललं ना की दहा मधील नऊ प्रॅाब्लेम सुटतात म्हणणारी अलका परत एकदा सगळ्यांना त्याचे प्रात्यक्षिक दाखवत होती! रडत न बसता, न रागावता समोर आलेल्या प्रॅाब्लेमवर उपाय शोधत होती.. मायेने, कळकळीने आणि आपलेपणाने! वयाप्रमाणे आलेले बदल ॲक्सेप्ट करत!
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





