तृप्ती देव

? जीवनरंग ?

☆ “सत्यवान पौर्णिमाएक नवीन क्रांतीचा धागा…तृप्ती देव

जून महिन्याची ती प्रसन्न सकाळ होती.

रात्रीच्या पावसाने धरतीने जणू हिरवागार शालू नेसला होता. अंगणात उभा असलेला वड अधिकच टवटवीत दिसत होता. त्याच्या पानांवर रेंगाळलेले दवबिंदू सकाळच्या कोवळ्या उन्हात मोत्यांसारखे चमकत होते. वाऱ्याच्या मंद झुळुकीसोबत ते थेंब अलगद खाली झेपावत होते, जणू निसर्ग स्वतःच आजच्या दिवसाची आरास करत होता. 

घरात मात्र एका वेगळ्याच उत्सवाची चाहूल लागली होती.

स्वयंपाकघरातून उकळत्या चहाचा सुगंध दरवळत होता. एका बाजूला फुलांची परडी, हळद-कुंकू, अगरबत्ती, फळं आणि वडाला अर्पण करायचा पवित्र दोरा प्रेमाने सजवलेला होता. सुमन नव्या कोऱ्या साडीत नटली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज होतं. वटपौर्णिमा तिच्यासाठी केवळ सण नव्हता; तो आयुष्यभर जपलेल्या नात्याच्या श्रद्धेचा उत्सव होता.

 

तेवढ्यात पंधरा वर्षांची अन्वी डोळे चोळत बाहेर आली.

“आई, एवढ्या सकाळी काय करतेस गं?”

सुमनने हसत तिच्याकडे पाहिलं.

“आज वटपौर्णिमा आहे ना बाळा. वडाची पूजा करायची आहे.”

अन्वीने आळस देत विचारलं,

“म्हणजे आज पुन्हा उपवास?”

“हो.”

“संपूर्ण दिवस?”

“हो.”

“भूक नाही लागणार?”

सुमन हसली… “लागेल की. पण काही गोष्टी प्रेमासाठी केल्या जातात.”

अन्वी काही क्षण शांत राहिली.

“पण आई, तू हा उपवास नक्की कशासाठी करतेस?”

सुमनने सहज उत्तर दिलं, “तुझ्या बाबांना निरोगी, आनंदी आणि दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून.”

– – अन्वीने मान डोलावली. पण तिच्या मनात एक छोटासा प्रश्न घर करून बसला.

थोड्याच वेळात बाबा हॉलमध्ये चहा पीत वर्तमानपत्र वाचत बसले होते. अन्वी जाऊन त्यांच्या शेजारी बसली.

“बाबा, एक विचारू?”

“विचार.”

“आई तुमच्यासाठी उपवास करते ना?”

“हो.”

“मग तुम्ही आईसाठी काय करता?”

वर्तमानपत्रावरून नजर वर आली.– क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला.

“म्हणजे?”

“म्हणजे आई देवाला सांगते की माझ्या बाबांना चांगलं आयुष्य दे. मग तुम्ही आईसाठी देवाला काय सांगता? तुम्ही तिच्यासाठी काय करता?”

अन्वीचा आवाज निरागस होता… ना तक्रार… ना राग… ना वाद.

– फक्त एक प्रश्न.

.. .. पण काही प्रश्न एवढे साधे असतात की ते थेट मनाच्या दारावर येऊन उभे राहतात.

अन्वी शाळेत निघून गेली. पण तिचा प्रश्न बाबांच्या मनात रेंगाळत राहिला.

दुपार झाली. घरात शांतता होती. उपवास असूनही सुमन सगळ्यांचं जेवण वाढत होती. आजीला औषधं देत होती. घर आवरत होती. संध्याकाळच्या पूजेची तयारी करत होती.

.. .. बाबा तिच्याकडे पाहत होते… वर्षानुवर्षे ते हेच पाहत होते.

.. .. पण कदाचित पहिल्यांदाच समजून घेत होते.

त्यांना अचानक जाणवलं—

खरंच…

ती माझ्यासाठी किती काही करते.

आणि मी?

मी तिच्यासाठी काय करतो? …. 

 

सुमन वडाची पूजा करून घरी परतली.

वडाभोवती फेऱ्या मारून, दोरा बांधून आणि मनोभावे प्रार्थना करून ती थोडी दमलेली दिसत होती.

घरात सगळे एकत्र बसले होते.

तेवढ्यात बाबा उठले.

त्यांनी सुमनसमोर एक छोटंसं ताट ठेवलं.

ताटात एक गुलाबाचं फूल होतं.

एक शुभ्र धागा होता.

आणि एक छोटीशी चिठ्ठी.

 

सुमनने आश्चर्याने विचारलं,

“हे काय आहे?”

 

बाबांनी तिचा हात आपल्या हातात घेतला.

“आज तू माझ्यासाठी व्रत केलंस. अनेक वर्षांपासून करते आहेस. पण आज आपल्या अन्वीने मला एक प्रश्न विचारला.”तृप्ती देव

 

घरात शांतता पसरली.

“तू माझ्या आयुष्यासाठी प्रार्थना करतेस… पण मी तुझ्यासाठी काय करतो? याचा मी कधी विचारच केला नव्हता.” .. .. सुमन निःशब्द झाली.

 

बाबा पुढे म्हणाले,

“आजपासून मीही एक व्रत करणार आहे.”

 

अन्वी उत्साहाने म्हणाली,

“म्हणजे बाबांची पण वटपौर्णिमा?”

 

सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

बाबांनी हलकेच मान डोलावली.

“हो… पण थोडी वेगळी.”

.. .. ते म्हणाले,

“आज मी तुझ्या हाताला हा संकल्पधागा बांधतो.”

 

.. .. त्यांनी सुमनच्या मनगटावर तो शुभ्र धागा बांधला.

“तू माझं आयुष्य वाढावं म्हणून देवाला साकडं घालतेस… पण आज मी एक वचन देतो… तुझ्या स्वप्नांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन… तुझ्या आरोग्याची काळजी घेईन… तुझ्या आनंदासाठी वेळ काढीन.

तुझं आयुष्य फक्त संसारात विरघळून जाऊ देणार नाही… तुझा सन्मान, तुझं अस्तित्व आणि तुझी स्वप्नं जपणं हेच माझं व्रत असेल.”

 

सुमनच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

इतक्या वर्षांच्या संसारात तिने अनेक भेटवस्तू पाहिल्या होत्या.

पण तिच्या मनाची, तिच्या कष्टांची आणि तिच्या अस्तित्वाची अशी दखल घेणारी ही पहिलीच भेट होती.

 

अन्वीने उत्सुकतेने विचारलं,

“बाबा, मग या नवीन व्रताचं नाव काय?”

 

बाबा हसले.

“सत्यवान पौर्णिमा.”

 

“का?”

“कारण सावित्रीने सत्यवानासाठी यमाशी झुंज दिली होती.

आता प्रत्येक सत्यवानाने आपल्या सावित्रीच्या आनंदासाठी, तिच्या सन्मानासाठी आणि तिच्या अपूर्ण स्वप्नांसाठी उभं राहायला हवं.”

 

.. त्या रात्री घरात कोणतीही मोठी घोषणा झाली नाही.

.. कोणतीही जुनी परंपरा मोडली नाही.

.. कोणताही नवा धर्म जन्माला आला नाही.

 

.. पण एका लहान मुलीच्या निरागस प्रश्नाने एका पुरुषाला खऱ्या अर्थाने सत्यवान बनवलं होतं.

 

वर्षानुवर्षे वडाच्या झाडाला बांधले जाणारे धागे तसेच होते.

.. पण त्या दिवशी एक नवीन धागा जन्माला आला होता.

.. कृतज्ञतेचा.

.. समानतेचा.

.. आदराचा.

 

खिडकीबाहेर उभा असलेला वडाचा वृक्ष मंद वाऱ्यावर डोलत होता.

त्याच्या पारंब्या जणू काळाच्या साक्षीदाराप्रमाणे या नव्या विचाराचं स्वागत करत होत्या.

 

सुमनने हातात बांधलेल्या त्या शुभ्र धाग्याकडे पुन्हा एकदा पाहिलं… वर्षानुवर्षे ती वडाला दोरा बांधत आली होती….. पण आज पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या मनाला सन्मानाचा धागा बांधला होता.

 

कारण संसार केवळ एका व्यक्तीच्या त्यागावर उभा राहत नाही…

तो परस्परांच्या सन्मानावर, विश्वासावर आणि एकमेकांच्या स्वप्नांना दिलेल्या पंखांवर फुलत असतो.

खरी क्रांती परंपरा मोडण्यात नसते…

.. ती परंपरेला नव्या विचारांची पालवी फुटू देण्यात असते.

.. ती जुन्या श्रद्धा नाकारण्यात नसते…

.. तर त्यांना समानतेचा आणि कृतज्ञतेचा नवा अर्थ देण्यात असते.

 

पिढ्यान् पिढ्या जूनची पौर्णिमा आली की लोक सावित्रीची कथा सांगत आले…

.. यापुढे कदाचित त्या कथेसोबत एक नवीन कथा सांगितली जाईल.

.. .. .. त्या सत्यवानांची… ज्यांनी आपल्या सावित्रीच्या स्वप्नांनाही जगण्याचा अधिकार दिला.

आणि त्या दिवसापासून त्यांच्या घरात एक नवी सुंदर परंपरा सुरू झाली…

.. .. .. “सत्यवान पौर्णिमा”

.. ज्या दिवशी प्रत्येक सत्यवान आपल्या सावित्रीला एक वचन देतो—

“तू माझ्या आयुष्यासाठी प्रार्थना केलीस…

आता मी तुझ्या स्वप्नांसाठी जगण्याचा संकल्प करतो.”

(कथा आवडल्यास नाव न गाळता शेअर करावी ही विनंती.. हे माझे वैयक्तिक विचार आहेत ). 

© तृप्ती देव

भिलाई( छत्तीसगड)

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted