श्री मयुरेश उमाकांत डंके
☆ “मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
आपण वारीला जाताना कसं जावं? वारकरी जसे जातात तसं जावं. आपलं शिक्षण, आपली सामाजिक ओळख, आपल्या भोवती असलेलं वलय हे सगळं सगळं सोडून निर्मम होऊन वारीला जावं. जाताना आपली मनाची, बुद्धीची झोळी रिकामीच न्यावी अन् वारीच्या वाटेवर ती अपार प्रेमानं, भक्तीनं, जिव्हाळ्यानं गच्च भरुन आणावी. ती अनुभवांची शिदोरी पुढं आयुष्यभर पुरते. “एक तरी ओवी वाचावी आणि एकदा तरी वारी अनुभवावी” असं कुणी उगाचच म्हटलेलं नाही.
कुठल्याही विशेष ओळखीशिवाय केवळ वारकरी म्हणून महिनाभर जगणं, हा मनाचे डोळे उघडणारा अनुभव असतो. आपली ज्ञानेंद्रियं सुद्धा विठ्ठलमय झालेली असतात. डोळ्यांनी संतभार पाहायचा, वाणीतून हरिनामाचा गजर करायचा, कानांनी कीर्तनं- प्रवचनं- हरिजागर ऐकायचे, नाकानं गंध बुक्क्याचा वास साठवून ठेवायचा अन् कुठल्याही अपेक्षेविना पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांचं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. निरपेक्ष भावानं आणि अत्यंत साधेपणानं महिनाभर जगता आलं तर खरोखरच खूप मोठं समाधान आहे.
तरडगाव मुक्कामी पालखी तळापाशी बसलो होतो. कालचं नीरा स्नान डोळ्यांसमोरून हलत नव्हतं. आणि आज उभं रिंगण पाहिलेलं.. डोळ्यांचं पारणं फिटायला याहून वेगळं काही लागत नाही. झाडाखाली बसलो अन् मोबाईल मध्ये ब्रेकिंग न्यूज बघत होतो. ब्रेकिंग न्यूज बहुतांशी नकारात्मकच असतात. शेजारी एक माऊली येऊन बसल्याचं जाणवलं होतं, पण चेहरा पाहिला नव्हता. एक चहावाला आला, तसा माऊलींनी दोन कप चहा सांगितला.
“कसं असतंय माऊली, तुमी कशे पन वागा ओ. फक्त काय पन करन्याआदी एक डाव सोताच्या मनाला इचारा. मी जे काय करतोय ते द्येवाला आवडंल काय? बास.. मग तुमचं उत्तर काय येतंय बगा. जर असा इचार करुन मानुस वागंल तर जग लय सुखात नांदल.. ”
” पण समजा, मी असा विचार केला की, कुणाला आवडो न आवडो, मी मला जे पटेल तेच करणार. तर मग?” मी म्हटलं.
” मग काय.. आता त्येच चाललंय की सगळीकडं. जो तो निस्ता आपलाच इचार करतुय. दुसऱ्याचा इचार कशाला करायचा म्हनत्यात लोकं. त्यामुळंच सगळं बिगडलंय. ”
” अहो पण आपण जरी दुसऱ्याचा विचार केला तरी कुणीतरी आपला विचार करायला नको का? दर वेळी आपणच सगळ्यांचा विचार करायचा का? मग आपलं काय होणार?”
“असं म्हनतासा.. बरं.. ” असं म्हणत त्यांनी मांडी बदलली. अन् मला म्हणाले, ” हाच इचार माऊलींनी अन तुकोबांनी क्येला असता तर ओ?” त्यांचा आवाजातला खर्ज इतका अमोघ होता की, मला बसल्याजागी कंप सुटला.
“मी माजं माजं बगतो असं तुकोबा कदी वागले न्हाईत. घरची सावकारी होती त्येंच्या. तालेवार मंडळी.. गावात लय इभ्रत हुती. वाडा हुता. कामाला गडी मानसं हुती. मोप पैसा अडका, सोनं-नानं हुतं. सोतापुरतं बगायचं ठरिवलं असतं तर कुनाला काय येगळं वाटलं नसतं. ” त्यांचं सडेतोड बोलणं मनाला चरे पाडत होतं.
“सगळं आमचंच हाय, आमीच कमावलेलं हाय, असं ते म्हनले न्हाईत. ”
“अहो पण घरच्यांचं काय? त्यांचा विचार नको का करायला?” मला डोळ्यांसमोर तुकोबांच्या कुटुंबियांचा त्रागा दिसत होता.
“करा की. धा वेळा करा. पन तुमची पिढी इचार करत न्हाई. निस्ता खर्च करती. त्येला तुमी इचार म्हनता. आमी त्येला इचार म्हणीत न्हाई. येडेपना म्हनतो. ” त्यांनी एक भेदक यॉर्कर टाकला.
“असा काय वेडेपणा करतो आम्ही?” विकेट उडायचीच होती, ती उडालीच..
“सांगू म्हनता? बरं.. सांगतो.. ” असं म्हणत त्यांनी पुन्हा मांडी बदलली. माऊली कुणाच्या रूपानं येऊन आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतील, सांगता येत नाही. अन् तुम्ही कितीही सावध असलात तरीही त्याक्षणी ते ओळखता येत नाही.
“आता तुमी वारीला आलासा. आमीबी आलुया. तुमचं एकट्याचं सामान किती अन् माजं किती ? जरा बगा बरं.. ”
मी बघितलं. माझ्याकडं एक हॅवर सॅक, एक छोटी सॅक आणि एक स्लिंग बॅग होती. आजोबांपाशी फक्त एकच धोपटी होती. माझ्याकडं झील आणि डकथलॉन असे दोन रेनकोट होते, एक योगा मॅट होतं, एक हवा भरून वापरायची उशी होती, एक चादर होती, एक पातळ शाल होती. त्यांच्यापाशी फक्त एक पंचा आणि वीस रुपयांत मिळणारं पॉलिथिनचं ईरलं होतं. तेच ईरलं मल्टीपर्पज होतं. पावसात तेच, वाटेत कुठं बसायला तेच अन् रात्री झोपायला तेच.. पंचासुद्धा मल्टीपर्पज.. आंघोळीसाठी, उन्हासाठी, झोपताना पांघरण्यासाठी तोच वापरायचा.. ! माझ्याकडं कपड्यांचे आठ जोड, यांच्याकडं फक्त दोन.. ! माझ्याकडं सँडल वेगळे, शूज वेगळे, स्लिपर्स वेगळ्या, ह्यांच्याकडं एकच चप्पल, तीही प्लॅस्टिकची.. ! माझ्याकडं वारकरी टोप्यासुद्धा चार होत्या, त्यांच्याकडं एकच.. !
मी ओशाळून त्यांच्याकडं पाहिलं. ते हसले. ” कसंय माऊली, तुमी जितके लाड करताल ना, तेवडे सुस्त व्हाल. कशाला येवडे लाड करता शरीराचे ? काई होत न्हाई. मी तीस वर्षं झाली, अशीच वारी करतोय. माजं कुटं काय बिगडलं ओ?” ते हसले. मला हसावंच लागलं.
खरं होतं त्यांचं. आपल्याला नीट जगताच येत नाही. मनात आल्याक्षणी हवी ती वस्तू विकत घेता यायची ऐपत आली की, आपल्याला ते यश वाटतं. घरात ताजं सकस अन्न तयार असतानाही केवळ मूड आला म्हणून आपण बाहेर जाऊन खातो किंवा बाहेरून अन्न घरी मागवतो. मनात आलं की नवे कपडे, मनात आलं की नव्या वस्तू, आणि आजकाल मनात आलं की नवी नातीसुद्धा.. ! सहा सात वर्षं झाली की, आपल्याला घरचं उत्तम इंटिरिअर जुनं वाटायला लागतं, फर्निचर ओल्ड फॅशन्ड वाटायला लागतं. दहा पंधरा लाख रुपये खर्चून घराला नवा लुक देणं ही आपल्याला चैन नसून गरज वाटते. रात्री अपरात्री वाटेल ते मागवून खाणं, वाटेल तेव्हा झोपणं, वाटेल तेव्हा उठणं यात आपल्याला काहीही गैर वाटत नाही. खरंच आपल्याला नीट जगताच येत नाही. एका क्षणात माझ्या मनात किती विचार येऊन थाडथाड थपडा मारुन गेले.. !
“वारी आपल्याला जगाया शिकवती ओ. कसं ऱ्हावं, कसं जगावं, काय खावं, कदी खावं, किती खावं, कदी झोपावं, कदी उटावं सगळं हितंच शिकतोय मानुस. पन तयारी होवी ओ. ”
दरवर्षी नियमितपणे वारी करणारा अगदी साधा माणूस माझ्यासमोर बसला होता. तो काही कीर्तनकार, प्रवचनकार नव्हता. नित्य एकादशी करणारा निष्ठावान माळकरी होता. रोज हरिपाठ म्हणणं आणि उठता बसता ‘राम कृष्ण हरी’ म्हणणं एवढाच काय तो त्याचा सांप्रदायिक अभ्यास. पण प्रभाव मात्र मोठा. आता लहानपणापासून बारा महिने तेरा काळ नाव घेऊन घेऊन त्याची हरिनामाची किती पुरश्र्चरणं झाली असतील, कुणास ठाऊक.. पण हरिनामाच्या सहवासात राहून चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांच्या पल्याड निघून गेलेला एक साधा माणूस किती तत्वनिष्ठ होऊ शकतो, याचं उदाहरण मी समक्ष अनुभवत होतो.
“आपला सोतावर ताबा असला की सगळं बरोबर हुतय. काय पन असो, किती बी आग्रीव झाला तरी दोन भाकरी च्या वर मी जेवीत न्हाई. ठरल्या येळी जेवतो. आज जेवाया काय केलंय म्हनून घरात इचारत न्हाई, समोर वाढलेलं गप खातो. आपन अन्नाचा अव्हेर केला न्हाई तरच पांडुरंगाचा आशीर्वाद. अन्न म्हनू नका, मानुस म्हनू नका, कुनाचाच मान ठेवला न्हाईत अन् दर एकादशीला जरी पंढरपूरला गेलात तरी पांडुरंग भेटनार न्हाई. ” मी जे ऐकत होतो, तोच जगण्याचा खरा नेम होता. भूतदया आणि माणूसधर्म हा माऊलींचा विचारच मला ऐकू येत होता.
पालखी तळावर जाग होती. दिंडी भजन करत होती. बाकी सगळे तंबू, राहुट्या, पाली झोपेच्या अधीन झालेले होते. टाळ मृदंग उशाशी ठेवून वारकरी झोपून गेले होते. कितीतरी दिंड्यांमधून मी फिरून आलो, पण हातात मोबाईल घेऊन बसलेले वारकरी मला जवळपास दिसलेच नाहीत. हरिपाठ, भजन, प्रवचन, भोजन आणि निद्रा.. बास.. ह्यात व्हॉट्स ॲप नसतं, टीव्ही सिरीयल नसतात, ब्रेकिंग न्यूज नसतात, रिॲलिटी शो नसतात. असतं ते फक्त पांडुरंगाचं नामस्मरण.. !
आता हे चालून चालून थकलेले वारकरी पहाटे तीन वाजता उठतील, कुठल्याशा नळावर जाऊन दात घासतील, प्रातर्विधी आटोपतील, त्यांच्या टँकर वर किंवा एखाद्या नळ कोंडाळ्यावर जाऊन आंघोळ करतील आणि गंध बुक्का लावून धावत पळत माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतील. पहाटे पाचाच्या आत दर्शन व्हायला हवं, माऊलींची पहाटपूजा सुरु व्हायच्या आत.. ! हरिनाम अन् हरिदर्शन यांच्याशिवाय तिसरा विचार करायला वेळ आहेच कुणाकडं? ही अशी माणसं जगण्याच्या प्रॅक्टिकल तत्त्वज्ञानाचा ठसा उमटवून जातात.
“दुःख कुनाला चुकलंय व्हय ? आता आमाला काय कमी व्याप हाय काय डोक्याला? थोरला पोरगा सरकारी नोकरीच पायजेल म्हनून पुन्याला गेला, धा वर्षं ऱ्हायला. परीक्षेत नंबर काय आला न्हाई. पन तीस लाख खर्च जाला. दीड एकर शेती इकली. तेवड्या रकमेत गावच्या बाजारात पाच गाळं बांधलं असतं तर वर्षाला पाच लाख तरी मिळालं असतं. पन आता सांगतूय कुनाला ? ज्याचं त्याचं नशीब म्हनायचं अन् पुढं जायाची वाट धरायची. पुढची वाट काय माजा पांडुरंग बंद करीत न्हाय. काई तरी मार्ग दावणारच तो.. !”
“बाकी कोण कोण असतं घरी?”
“हाये तर. धाकटा पोरगा हाय. बारावी शिकून घरात बसलाय. म्हनतोय, तेच्यासाठी दीड एकर काढली, तशी माज्यासाठी पन काढा अन् मला जेसीबी घेऊन द्या, नायतर ट्रॅक्टर घेऊन द्या. आता धा एकरातली दीड एकर आदीच गेली, परत दीड एकर काढली तर कसं होनार ओ? अशी तुकड्या तुकड्यानं जमीन गेली तर पोटाला खायाचं काय?”
पोटातली व्यथा कधीतरी अशी उफाळून वर येतेच. आपण कुणीही असलो तरीही त्रास, कटकटी चुकत नाहीतच. आपण त्यातून तरुन जाण्यासाठी कोणता मार्ग धरतो हे महत्त्वाचं. ज्यांचा मार्ग योग्य असतो, त्यांच्यासमोरचे प्रश्न कितीही कठीण असले तरीही उशिरा का होईना ते सुटतात. ती श्रद्धेची नौका फार भक्कम असते. त्यामुळं, त्या नौकेतली माणसं हिंमत बांधून असतात. ज्ञानोबा- तुकोबांचा खरा पाईक सहसा नैराश्यात अडकलेला दिसत नाही.
“आमची मंडळी टीपं गाळती. पन मी आपला पांडुरंगावर हवाला ठिवून बसलोय बगा. आता जायाचंच असंल तर सगळंच धुवून निगंल अन् ऱ्हायाचंच असंल तर राईल बी. त्येचा इचार तरी किती करायचा ओ.. मी आयुष्यात कदी पांडुरंगाकडं काय मागितलं नई. पैसा नई, अडका नई, जमीन नई, काईच मागितलं न्हाई. तुजा ईसर पडू देऊ नगंस येवडं एकच मागनं हुतं. ते त्यानं नेमकं ऐकलं. बास.. अजून काय पायजेल.. ” प्लास्टिकच्या इरल्याची पथारी पसरलेली होती, त्यावर आडवं होत ते बोलले. अन् रामकृष्ण हरी म्हणत एका मिनिटांत झोपलेसुद्धा.. !
ज्ञानोबा- तुकोबांनी माणसांच्या मनांमध्ये भक्तीचं, श्रद्धेचं आणि निर्मळ भावनेचं जे पीक पेरलेलं आहे, त्याचं माप आजही महाराष्ट्राच्या पदरात किती भरभरून पडतंय, याचा दृष्टांत वारीतल्या मुक्कामी झाला. वारीच्या दिवसांत माऊली कधी ना कधी तरी, कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांचं अस्तित्व दाखवून जातातच. ” माझं चांगलं लक्ष आहे हं तुझ्यावर” असं अगदी स्पष्ट जाणवून देतात. झोप केव्हाच उडाली होती अन् मी दिगमूढ होऊन बसून होतो. पालखी तळावर माऊलींच्या समोरच्या अभंगाचे सूर कानी पडत होते…… ” हेचि दान दे गा देवा.. तुझा विसर न व्हावा “…
©️ श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





