सौ. अंजोर चाफेकर
☆ “यशाची गुरुकिल्ली…” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆
प्रसिद्ध टेनिसपटू जोकोविक म्हणतो,
“मी अजून निवृत्त झालो नाही. कारण माझ्यात अजूनही रॅकेट हातात घेऊन खेळण्याची उर्मी आहे, खेळाबद्दल प्रेम आहे. माझ्यात अजूनही ते लहान मूल दडले आहे ज्याला जिंकायची इच्छा आहे.”
जे मला करायची ओढ आहे ते करण्याची माझी मनापासून इच्छा हवी. तीव्र भावना, जिद्द, तळमळ हवी. स्वतःला झोकून द्यायची तयारी हवी.
ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, किंवा आपला चालू व्यवसाय वाढवायचा आहे, कंपनी नावारूपाला आणायची आहे त्यांच्यासाठी मी माझ्या अनुभवातून जे शिकले, ज्यांना मी आदर्श मानले, त्यांच्याकडून जे शिकले ते सांगू इच्छिते.
सर्वात महत्वाचे म्हणजे जे उत्पादन आपल्याला करायचे आहे त्याचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
नसेल तर त्याचा अभ्यास करा. शिकून घ्या. जे आपल्याला येतंय त्यातच शक्यतो हात घालावा.
उदाहरणार्थ जर एखाद्या स्रीला उत्तम स्वयंपाक येत असेल व विविध पाककृती करून बघायची हौस असेल तर तिचा केटरिंगचा व्यवसाय उत्तम चालेल. माझी धाकटी बहीण निशा हिने केटरिंगचा व्यवसाय कसा असावा याचा आदर्श घालून दिला. ग्राहकाची तृप्ती, समाधान हे तिचे उद्देश्य असायचे. त्यामुळे तिच्याकडे बनणारा पदार्थ हा चवीने उत्कृष्ट, दिसायला चांगला आणि आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध असायलाच पाहिजे हा तिचा कटाक्ष असे परंतु मला एखादे विद्युत उपकरण बनवायचे आहे.
माझ्याकडे पुरेसे ज्ञान नाही तर वाचून, अभ्यास करून मी माहिती मिळवू शकते. ज्याला त्याचे ज्ञान आहे अशा व्यक्तीची पगारी नेमणूक करू शकते.
काहीतरी करून दाखविण्याची जिद्द, तळमळ महत्वाची. ती असेल तरच अंतीम ध्येयाचा पाठपुरावा केला जातो. अर्थात ही कळकळ माझ्या एकटीत असून चालणार नाही. मी समूह प्रमुख असेन तर माझ्या सहका-रांमधे सुद्धा तितकीच तीव्र भावना असायला हवी. त्यांच्यात ती निर्माण करण्यासाठी, सतत तो अग्नि जळता ठेवला पाहिजे. त्यांच्यात स्फूर्ती, प्रेरकता निर्माण करता आली पाहिजे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्त.
शिस्त अंगात बाणावी लागते.
उदा. माझे ऑफीस सकाळी नऊ वाजता उघडायचे. मी सकाळी लवकर उठून, घरातली कामे उरकून नऊच्या आधी ऑफीसला पोहचायचे.
मला कुठे मस्टर साईन करायचे होते?
परंतु मी वेळेवर पोचले की सहकर्मचारी वर्ग, मदतनीसांना आपोआप शिस्त लागते.
शिवाय नेमलेली दैनंदिन कामेही झालीच पाहिजेत. उदा. इमेल्स चेक करणे, प्रत्येकाला उत्तर देणे, स्टाॅक चेकिंग, अकाउंट्स, लेजर वगैरे.
तसेच स्टाफचा पगार, सप्लायर्स ची देणी, कर भरणे.. सर्व वेळेवर झालेच पाहिजे. ग्राहकाला दिलेल्या “डेड लाईन्स” सांभाळणे ही जबाबदारी असते. त्यासाठी शिस्त लागते. “हो जायेगा” ही वृत्ती चालत नाही.
अमेरिकेचे प्रेसिडंट ओबामा यांनी त्यांच्या ऑफीसच्या टेबलावर एक पेपरवेट ठेवला होता. त्यावर लिहिले होते,
‘द बक स्टाॅपस् हिअर.’
म्हणजे पासिंग द बक नाही. आपले काम दुसऱ्यावर ढकलून, किंवा आजचे काम उद्यावर ढकलून मोकळे होणे नाही.
तसेच आपण जेव्हा कंपनी चालवतो तेव्हा त्या कंपनीची प्रतिमा निर्माण करावी लागते.
कंपनीची तत्त्वं, आदर्शमूल्ये ही पाळली गेली पाहिजेत.
ही कंपनी फसवणार नाही, यांचे उत्पादन विश्वासार्हच असणार, कंपनीच्या मालाची गुणवत्ताही इतरांपेक्षा चांगलीच असणार याचा ग्राहकाला विश्वास हवा.
जर प्राॅडक्ट डिफेक्टिव निघाला तर तो परत घेतला जाईल ही विश्वासार्हता हवी.
उदा. आज अमॅझाॅन कंपनीतून आपण का शाॅपिंग करतो?कारण वस्तू पसंत नसेल तर ती आपण परत करतो व त्याचा परतावा आपल्याला मिळतो.
आमॅझाॅन कंपनीचा निर्माता जेफ बोझेस याला १९९९ साली टाईम मॅगेझिनने ‘पर्सन ऑफ द इयर ‘, हा किताब दिला. तेव्हा तर त्याची कंपनी नुकतीच उदयास आली होती.
आज तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की त्याचा उपयोग केला पाहिजे. इनफर्मेशन टेक्नाॅलाॅजी मुळे डेटा कलेक्ट करता येतो. त्यामुळे ग्राहकांकडून फीडबॅक घेता येतो.
ग्राहकांना नेमके काय हवे ते समजून आपल्या प्राॅडक्ट मधे सुधारणा करता येते. ग्राहकाला अधिक चांगली वस्तू आपण देऊ शकतो. अॅमॅझाॅन कंपनी इतकी मोठी होण्याचे कारण अधुनिक तंत्रज्ञानाचा कुशल वापर.
आज डिझ्ने वर्ड आणि त्याचे थीम पार्कस् जगात प्रसिद्ध आहेत. पण हाच वाॅल्ट डिस्ने, १९३४साली त्याच्याकडे फक्त एक कॅमेरा होता. त्याच्या काकांच्या गराजमधे त्याने त्याचा स्टुडिओ थाटला. तिथे एक कार्टून फिल्म बनविली. उद्देश एकच, लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले पाहिजे. मग हळूहळू त्याच्या कंपनीचा पसारा वाढत गेला. पण कंपनीचे ध्येय तेच राहिले, मुलांना हसवायचे.
आज टाटा समूह ही इतका मोठा आहे. कंपनीची मूल्ये आहेत, देशाची प्रगती आणि समाजाची सेवा. जमशेटजी टाटा, जे आर डी टाटा, रतन टाटा या सर्वांनी ही मूल्ये जपली.
कंपनी प्रगतीपथावर ठेवायची, कंपनीची प्रतिष्ठा सांभाळायची, म्हणजे पावलोपावली अडचणी तर येणारच.
संघर्ष तर करावाच लागणार. या संघर्षांवर मात करायची एक मानसिकता बाळगावी लागते.
धीरूभाई अंबानी म्हणायचे, ” माझ्यावर संकट आले की मी स्वतःला समजवायचो की ही एक संधी आहे नवीन शिकण्याची. “
या मानसिकतेमुळे व अथक परिश्रमामुळे त्यांच्या कंपनीने इतकी मोठी भरारी घेतली.
अर्थात या सगळ्या गोष्टी झटक्यात होत नाहीत. त्यासाठी धीर लागतो. यश एका रात्रीत मिळत नाही. संशोधक बुद्धी लागते. वरचेवर तपासणी अथवा आपणच आपले परीक्षण करणे जरूरीचे असते तसेच सातत्य आणि गतीशीलता लागते. जी तुम्ही रोजच्या कामातून प्राप्त करता. मोठ्या चाकाला फिरायला वेळ लागतो. मग त्याला जोडलेले लहान चाक मोठ्या गतीने फिरते. पण एकदा गती आली, की पुढे काहीच थांबवू शकत नाही.
याचं नाव – यशाची गुरुकिल्ली.
© सौ.अंजोर चाफेकर
मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





