सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “आलवणीतल्या त्या …” ☆ सुश्री शीला पतकी 

गुरुपौर्णिमेच्या दरम्यान अनेक ग्रुपवरती अनेक शिक्षकांबद्दल, गुरुबद्दल माहिती सांगणाऱ्या बऱ्याच पोस्ट मी वाचत होते आणि मला माझ्याही अनेक शिक्षकांचे स्मरण त्या काळात झाले. काही शिक्षकांबद्दल मी लिहिलेही होते. त्यामध्ये एक शिक्षिका मला त्या दिवशी प्रकर्शाने आठवल्या.. एरवी त्यांच्याबद्दल माझ्या डोक्यात काहीच नसायचे पण आपण जसे जसे मोठे होतो.. परिपक्व होतो …विचाराने आणि वयाने …तसे तसे त्या त्या गोष्टींची जाणीव अधिक प्रकर्षाने होत राहते. अगदी तसेच झाले….. 

मी दुसरीत सेवासदन मध्ये प्रवेश घेतला तेव्हा आठवड्यातून दोन दिवस एक तास आम्हाला शिवण हा विषय शिकवला जाई. शिवण शिकवणाऱ्या बाईंच्या एका खोलीमध्ये आम्ही आमचा वर्ग सोडून तिथे जात असू. शिवण शिकवणाऱ्या बाई एका चौरंगवजा टेबलवर बसलेल्या असत आणि इतर सर्व शिक्षकांपेक्षा त्यांचा पोशाख वेगळा होता. त्या कायम लाल रंगाच्या साडीत असायच्या. साडी नेसल्या म्हणण्यापेक्षा साडी लपेटलेली असायची… फक्त त्यांचा चेहरा आणि हात आम्हाला दिसत. डोक्यावरूनही घट्ट पदर असे. इतर बऱ्याच शिक्षिका त्या काळात नऊवारी साडी नेसत असत. सहावारी साडी नेसणार्‍या कमी होत्या. त्यामध्ये पाठक बाई, दातार बाई, चिंगु ताई कुलकर्णी, बडे बाई, आणि काही तरुण शिक्षिका या सहावारी साडी मध्ये असत. नऊवारी साडीतल्या शिक्षिका आम्हाला गंभीर वाटायच्या . सहावारी साडीतल्या शिक्षिका जरा जवळच्या वाटायच्या. पण या ज्या बाई होत्या यांचं रसायन वेगळंच होतं … एक तर त्या खोलीबाहेर पडत नव्हत्या. आम्ही मुलीच त्यांच्या खोलीत जाऊन शिकत होतो. फार कमी बोलत होत्या आणि आम्ही त्यांच्यासमोर शांतपणे बसत असू. प्रत्येक मुलीला वैयक्तिक हेम, टीप, धावदोरा, रुमालाच्या कडा शिवणे,बटण लावणे, छोटी पिशवी शिवणे, हे टप्प्याटप्प्यानुसार त्या शिकवीत असत. खरं तर मला शिवण या विषयात फारसा रस नव्हता…पण फक्त उत्सुकता होती .. त्या बाई एकाच रंगाचे लुगडे का नेसतात? आणि त्यांचे डोके उघडे का नाही? मग त्याच्यावरच चर्चा. सगळ्याच मुली लहान..कुणीतरी म्हणालं त्यांच्या डोक्यावर केस नसतात, त्यांचे केस कापलेले आहेत कारण त्यांचा नवरा मेलेला आहे … मग पुढे कुणीतरी सांगितलं त्या विधवा आहेत… अशी हळूहळू माहिती आमच्या ज्ञानकोशात भरती होत गेली… पण कोणाला विचारण्याचे धाडस झाले नाही की ह्या बाई अशा वेगळ्या का?

नंतर हळूहळू शिकताना याच्या उत्तरांची आमची गाठ पडली .इतर शिक्षकांच्या वयाबरोबरीच्याच या बाई .. पण त्या फारशा कोणात मिसळत नसत, त्यांचा वर्ग स्वतंत्र .वर्ग म्हणजे काय एक छोटी खोली होती. व्हरांड्यात थोड्या मुली बसायच्या आणि ज्या शिकत असायच्या त्या थोड्या आत बसायच्या. मग त्यांच शिकून झालं की आम्ही व्हरांड्यात बाहेरच्या मुली आत.. अशी ती कसरत होत असे. 

नंतर मी शिक्षीका म्हणून सेवासदन मध्ये लागले तेव्हा त्या खोलीकडे बघून मला नेहमी त्यांची आठवण यायची .आता त्यांच्या आलवणीतले रहस्य मला कळाले होते. नवरा वारल्यामुळे त्यांचे केशवपन केले गेले होते आणि त्या सोवळ्या झाल्या होत्या.. म्हणजे त्यांची जीवनशैलीच टोकाची वेगळी होती. कोणता मोह नाही ..मोह होईल असं वागायचं नाही ..त्या तांबड्या रंगाव्यतिरिक्त कोणत्याही रंगाशी त्यांचे नाते नव्हते …डोक्याला केस नाहीत… म्हणजे केस होते पण ते दर महिन्याला कापायचे पार मुळापासून.. किती भयानक होतं हे! आम्हाला उसवलेल्या कापडाला चार टाके घालून ते सांधावे कसे हे शिकवणाऱ्या त्या बाईंचे अख्खे जीवनच उसवले होते आणि ते सांधण्याचे,ते जोडण्याचे, शिवण्याचे कोणतेही साधन त्यांच्याकडे नव्हते. रमाबाई रानडे यांची कृपा म्हणा की नानासाहेब पाठक.. जे सेवासदनचे सचिव होते त्यांचा समाज- परिवर्तनाचा दृष्टिकोन म्हणा .. त्या बाईला आमच्या शाळेत छोटीशी का होईना पण नोकरी लागली होती. दोन तास चार माणसात मिसळायची तिला मुभा मिळाली होती. दोन पैसे हातात पडत असतील त्यामुळे कदाचित ती थोडीशी स्वावलंबी झाली असेल…. पण आता मला नेहमी वाटतं की सणावाराला नटून येणाऱ्या… डोक्यात फुलं माळणाऱ्या.. गजरे माळणाऱ्या…. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला आपल्या मुलाबाळांना हाताला धरून शाळेत घेऊन येणाऱ्या इतर शिक्षिकांना पाहून त्या बाईला काय वाटत असावे? … तिचे मन अक्रंदून उठत असावे.. ‘ हे सारं माझ्या नशिबालाच का? ? माझा नवरा मेला ह्यात माझा काय दोष आहे? ..’ पण हे म्हणण्याची मुभा त्या वेळेला बायकांना नव्हती. केवढे दुर्दैव ना? …. त्या शिक्षिकेला मी कधी फार बोलताना ऐकलं नव्हतं, त्या कधी हसल्याच मला आठवत नाही. 

अकाली प्रौढत्व आलेली ती तरुण बाई समाजाच्या रितीरिवाजाच्या ओझ्याखाली चेपून गेली होती. त्यांनाही कधी वाटलं असेल केस वाढवावेत ..कदाचित ते खूप सुंदर असतील …छान रंगीबेरंगी फुलाफुलांच्या साड्या नेसाव्यात… स्नो पावडर लावावी.. केसात गजरे माळावेत …जगात अनेक रंग आहेत .. मग फक्त तो लाल आलवणीचा रंगच त्यांच्या वाट्याला का यावा? नेहमी मला हे प्रश्न पडायचे. 

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परवा त्यांची प्रकर्षाने आठवण आली आणि त्या क्षणाला मी राजा राममोहन राय, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, आणि हो .. लोकसंख्येला आळा घालण्याची युक्ती सांगणारे रघुनाथराव कर्वे सुद्धा …या सगळ्यांच्या प्रतिमा डोळ्यासमोर आणल्या आणि मी त्यांचे आभार मानले. ‘ तुम्ही होतात म्हणून आज आम्ही सुंदर जीवन जगतो आहोत ‘ .. मनापासून त्यांना नमस्कार केला.

केवळ परंपरा आणि पुरुषांना स्वतःच्या मोहाला आवर घालता येत नाही म्हणून समोरच्या छोट्या छोट्या विधवा मुलींना अल्वणी नेसवणाऱ्या त्या पुरुष प्रधान संस्कृतीचा विलक्षण तिटकारा आला. आज स्त्रीमुक्त होत आहे हे पाहताना खूप टीका होतात पण आता कोणी त्यांना जुमानत नाही. स्त्रिया थोड्या वरचढही होत आहेत. कदाचित तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीवरचा हा रागही असेल, संतापही असेल… सगळं त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला आठवलं. मनात असंख्य विचार आले .. आणि आलवणीतल्या त्या बाईंना मी मनापासून नमस्कार केला. मनात म्हटलं .. ‘बाई तत्कालीन समाज हा तुमचा मारेकरी ठरला होता .सेवा सदन शाळेने जमेल तेवढा हात तुम्हाला दिला. हेच तर आमच्या शाळेचे कार्य होते ना ….? ‘ 

पुढे कित्येक दिवस अशा अनेक गरजू महिलांना आमच्या या शाळेमध्ये आवर्जून नोकऱ्या दिल्या जात. आता सगळे सरकारीकरण झाले आणि आता त्या गरजाही उरल्या नाहीत. या कथा अजून पंचवीस वर्षांनी कोणाला खऱ्या वाटणार नाहीत. हे सगळे आता कपोल कल्पित वाटावे .. पण तो काळ असाच होता.

– – – शिक्षणाने माणूस घडला की नाही ठाऊक नाही, पण स्त्री मात्र उभी राहिली हे नक्की. आलवणातल्या त्या माझ्या शिवण- शिक्षकेला आज मनापासून माझे अभिवादन आहे.

आजही त्या बाईंचे नाव मला माहित नाही, तेव्हाही नव्हते .. फक्त आम्ही लाल साडीवाल्या बाईंचा तास असे म्हणत असू. 

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Manjiri yedurkar
0

Sundar Anubhav kathan