सुश्री सुनिता गद्रे
मनमंजुषेतून
☆ देव जेव्हा आजारी पडतो… भाग-१ – लेखक : श्री रवि वालेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆
चार – साडेचार वर्षांपूर्वी नोकरी निमित्ताने ओडिशाला आलो, तेव्हा इथल्या प्रत्येक गोष्टीचे अप्रूप वाटायचे. नवे राज्य, वेगळी भाषा, आगळे लोक, अजब चालीरीती, सगळेच हिंदू सण साजरे करण्याचा अट्टाहास, सगळे आकर्षित करणारे होते. माझ्या नोकरीशी संबंधित असलेल्या महाकाय कोळशाच्या खाणी, तिथून कोळसा घेऊन एकामागून एक निघणारे हजारो ट्रक्स, वरून पहिले तर मुंगीपेक्षाही लहान दिसणारी खोदकाम करणारी अजस्त्र यंत्रे, इथली घनदाट जंगले, नितळ नद्या, रस्त्यांवर निर्वेध फिरणारे हत्ती या सगळ्यांमुळे मी हरखून जात होतो. त्यात इथली विरळ लोकसंख्या आणि `ट्रॅफिक जॅम’चा शाप न लाभलेले डोंगरा-डोंगरातून फिरणारे रस्ते. या सर्वांवर मात करणारी गावागावातील असंख्य पुरातन मंदिरे! ओडिशात बंद किंवा ओसाड पडलेले एकही मंदिर मला तरी सापडले नाही. कुठेही अगदी निर्मनुष्य जंगलात एखादे पडझड झालेले पुरातन मंदिर सापडले तरी तिथे पण गाभाऱ्यात दिवा तेवत असलेला दिसतोच दिसतो! कोण लावतो, कधी लावतो, लाऊन कुठे गायब होतो, काही कळत नाही!
दर रविवारी कुठल्या तरी जंगलात फिरायला जा, कधी एखाद्या खेडूताने चहाच्या टपरीवर दिलेल्या माहितीच्या आधारे जंगलातील पुरातन मंदिर धुंडाळ, कधी गुपचूप गाडीत बसून रस्ता ओलांडणाऱ्या हत्तींच्या कळपाचे निरीक्षण कर, कधी जंगलातल्या एखाद्या टेकडीवर चढाई करून शिखरावर चटई पसरून गुलजार ऐकत ढगांचे क्षणाक्षणाला बदलणारे आकार बघत बघत संपूर्ण दिवस घालव, असा मजेचा बहारदार कार्यक्रम चालला होता. या काळात मी रविवारची जेवढ्या आतुरतेने, उत्कटतेने वाट बघायचो, तेवढी शाळेत असतानाही बघितली नसेल!
काही दिवसांनी याला कंटाळलो. ओडिशात येऊन एव्हाना ५ – ६ महिने झाले होते. एकदा रविवारला जोडून एक सुट्टी आली. कुटुंब पुण्यात. मी इकडे एकटाच. दोन दिवस घरात करायचे काय? सहज मनात आले की या वेळी जगन्नाथ पुरीला जाऊन मंदिर बघून यावे. तसेही बायकोने `एकदा जगन्नाथाचे दर्शन करून या, करून या’, असे टुमणे गेले २-३ महिने लावलेच होते. दोन महिन्यांपूर्वी मी कोनार्कला एकदा जाऊन आलो होतो, पण कोनार्क मंदिराच्या अगदी जवळ असूनही जगन्नाथ पुरीला जायला जमले नव्हते. कोनार्क मंदिराने पूर्ण दिवस घेतला आणि दुसऱ्या दिवशी मला ऑफिसला जाणे अतिशय आवश्यक होते.
एका ओडिया सहकर्मचाऱ्याला म्हंटले, `चल रे, उद्या जगन्नाथ पुरीला जाऊ’.
जगन्नाथ म्हणजे ओडिशाचे आराध्य दैवत. घरात, घराबाहेर, गाडीत, भिंतीवर, ऑफिसमध्ये सगळीकडे जगन्नाथाचे चित्र असतेच. जगन्नाथाचा फोटो वा मूर्ती नाही असे घर आणि जगन्नाथाचे मंदिर नाही असे गाव संपूर्ण ओडिशात नसेल. यामुळेच, जगन्नाथ पुरीला जायला मिळतेय म्हणून माझा हा ओडियावासी सहकारी हरखून जाईल, एवढीच माझी अपेक्षा होती. त्याने नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.
पण त्याने चेहरा एकदम गडद दुःखी केला आणि म्हणाला,
“ जाऊन काही उपयोग नाही. महाप्रभू (जगन्नाथ) आजारी आहेत ! “
मला काही समजलेच नाही ! थक्कच झालो. माणसे आजारी पडतात, ते ठिक आहे, पण चक्क भगवान आजारी?
जगन्नाथाच्या वार्षिक यात्रेविषयी माहिती होते. पुण्यात वर्तमानपत्रात दरवर्षी त्या यात्रेचे फोटो बघायचोच. गणेशोत्सवाच्या मोठमोठ्या मिरवणूक पाहिलेल्या डोळयांना त्या `या वर्षी जगन्नाथाच्या यात्रेला मागच्या वर्षीपेक्षा ३ लाख जास्त भाविक आले’ अशा बातम्यांमध्ये काही स्वारस्य नसायचे. जगन्नाथ यात्रेविषयी माझी अक्कल, `दरवर्षी जगन्नाथाची मूर्ती गाभाऱ्याबाहेर काढून मिरवणूक काढतात’ एवढीच मर्यादित होती.
`भगवान आजारी पडलेत? काय झालेय त्यांना?’ मी हसत विचारले.
दक्षिण भारतातील बऱ्याच मंदिरांमध्ये मी दुपारी गेलो असताना, गाभारा बंद असायचा. विचारले, तर तिथले ढेरपोटे पुजारी मख्खपणे सांगायचे, `बगवान सो रहेला है!’
यामुळे भगवान तिथल्या भटजींबुवांसारखेच दुपारची डुलकी काढतात, हे माहिती होते. पण विश्वाचा पालनकर्ता असलेले भगवान विष्णू जगन्नाथ रूपात ओडिशात चक्क आजारी पडत असतील, असे कधी वाटले नव्हते.
`महाप्रभूंना ताप आलाय !’
माझा सहकर्मचारी अतिशय गंभीरपणे मला सांगत होता. खोटेपणाचा लवलेशही त्याच्या बोलण्यात नव्हता.
मी पण गंभीर झालो.
`ताप आलाय म्हणतोस, तर कधी बरे होतील? आपल्याला कधी जाता येईल?’
`रथयात्रा सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी महाप्रभू बरे होतील. ते बरे झाले की रथयात्रा निघेल. तेव्हाच भगवान आपल्याला दर्शन देतील’
मला त्याच्या बोलण्याची गंमत वाटत होती, पण त्याच्या त्या गंभीरपणे दिलेल्या उत्तरांमुळे उत्सुकता अजून चाळवली.
`तू एवढ्या ठामपणे सांगतो आहेस की रथयात्रेच्या आदल्या दिवशी बरे होतील, तर मग काही उपचार चालू आहेत, की असेच आपोआप बरे होतील?’
`छे, छे. राजवैद्य आहेत ना दिमतीला! दररोज उपचार चालू आहेत!’
मी सर्दच झालो! अरे देव आहे ना तो! त्याला माणसाचे उपचार कसे चालतील?
हळू हळू माहिती मिळवत गेलो, माहिती मिळत गेली. माझी उत्सुकता बघून ओडिया सहकारी उत्साहाने स्वतःहून माहिती देत गेले. क्षणोक्षणी अचंबित होत गेलो. चालीरीती, रीती रिवाज वगैरे कळले, पण महत्वाची होती ती या रितीरिवाजांमागची प्रेरणा आणि कारणमीमांसा.
चैत्र – वैशाखाच्या कडकडीत उन्हाच्या तडाख्याने सगळे ओडिशा त्रस्त झालेले असते. समुद्राच्या किनारी असलेले पुरी शहर त्याला कसे अपवाद असणार? या काळात घामाच्या धारा निघत असतात. वातावरणात एक चिडचिडेपणा आलेले असते. गार वाऱ्याची एक झुळूकही सुखाची अनुभूती देऊन जाते. नागरीकांचे आणि भक्तांचे ठीक आहे. ते बाहेर मोकळे फिरत असतात. कधी कधी वाऱ्याची झुळूक अनुभवू शकतात.
बंदिस्त मंदिरातील बंदिस्त गाभाऱ्यात वर्षभरापासून जखडून असलेल्या भगवंताच्या नशिबी मोकळेपणाचे हे सुख नाही!
प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेले महाप्रभू शेवटी पुरीच्या राजाला पुजाऱ्यांकरवी (पंड्यांकरवी) निरोप पाठवतात, `मला थंड पाण्याने स्नान करायची इच्छा आहे!’
(पुरी मध्ये आजही राजा आहे! `गजपती महाराजा दिब्यसिंग देब’ असे भारदस्त नाव असलेले हे महाराज पुरीतच रहातात. अतिशय साधे जीवन जगतात. मंदिराचा सर्व कारभार त्यांच्याच अखत्यारीत आणि हुकूमानुसार चालतो. जगन्नाथाच्या सर्व पूजांमध्ये, विधींमध्ये महाराजांचा मान खूप मोठा असतो. सर्व पूजा करण्याचा पहिला मान त्यांचाच. वर्षभर पुरीच्या रस्त्यांवर सामान्य नागरीकासारखे फिरतात, तेव्हा ओळखू सुद्धा येत नाहीत. मात्र रथयात्रेच्या कालखंडात राजमुकुट वा फेटा, भरजरी राजेशाही भारतीय परिधान यात हा माणूस अतिशय तेजस्वी दिसतो! मुळातच देखणे गृहस्थ आहेत हे. किती साधे असावे हे महाराज? पुरीत एक दुमजली घर हा त्यांचा `राजमहाल’ आहे. त्याच `महालाच्या’अर्ध्या भागात ते शुद्ध शाकाहारी – कांदा, लसूण सुद्धा नाही – उपहारगृह चालवतात! कोणी जाणार असेल आणि महाराजांना भेटायची इच्छा असेल, तर कळवा. पत्ता देतो)
देवाचीच इच्छा ती, राजा कशाला नाही म्हणेल? मग राजाज्ञेप्रमाणे मंदिराच्या आवारातलाच एक उंच चौथरा सजवला जातो, फुलांची तोरणे बांधली जातात. इथे देवांचे स्नान होणार. ही स्नानवेदी! आता ही स्नानवेदी कायमस्वरूपी बनवली आहे. यथावकाश ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला (महाराष्ट्रात वटपौर्णिमा, ओडिशात स्नानपौर्णिमा किंवा देबस्नान पौर्णिमा) या स्नानवेदीवर महाप्रभूंचे स्नान आपल्या जेष्ठ बंधू बलभद्र, धाकटी बहीण सुभद्रा यांच्यासह मंत्र घोषात संपन्न होते…
सगळे उत्साहात चाललेले असताना, एक नवा पेच निर्माण होतो !
– क्रमशः भाग पहिला
लेखक : श्री रवी वाळेकर
प्रस्तुती : सुश्री सुनिता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






