श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ रातराणी आणि लतिका…! ☆ श्री संदीप काळे ☆

‘त्या’ दिवशी महाबळेश्वरची सकाळ काहीतरी वेगळंच वातावरण घेऊन आली होती. झाडाझुडपांतून थेंबासारखं सांडणारं धुकं, अंगाला गारवा देणारा मंद वारा आणि त्या शांततेत मिसळलेली निसर्गाची गूढ हाक, असं काहीसं वातावरण होतं. एखाद्या चित्रपटाच्या सेटवर आपण उभे आहोत, असं वाटत होतं. मी शाल अंगावर टाकून, त्या धुक्याला दोन्ही हातांनी अलगद बाजूला सारत एका पायवाटेने पुढे चालत होतो. काही अंतर चालून गेल्यावर एका मोठ्ठ्या दगडावर विसावलो. वाऱ्याच्या झुळुकीसोबत अनपेक्षितपणे आलेला ‘रातराणी’च्या फुलांचा दरवळ मनाला विलक्षण शांती देणारा ठरला. आजूबाजूला नजर फिरवली, तरी झाड कुठेच दिसलं नाही. वातावरण अधिकच गार वाटू लागलं. जणू काळानं क्षणभर थांबावं, असंच काहीसं! 

तितक्यात एका अपरिचित भाषेत एक साद ऐकू आली – गाण्याच्या रूपात. आवाजात काहीशी ओढ, काहीसं दुःख आणि कुठेतरी खोल रुतलेली शांतता होती. मी दबक्या पावलांनी त्या आवाजाच्या दिशेने चालू लागलो. पुढे एका झुडुपाजवळ एक महिला ‘रातराणी’ची फुलं वेचताना दिसली. तिला काही विचारणार, एवढ्यात दुसरी महिला धावत आली आणि म्हणाली, “अगं बघ ना, तो माणूस तुझ्याकडे बघतोय!”

पहिली महिला क्षणभर घाबरली. खाली पडलेला दुपट्टा तिने उचलला. स्वतःला सावरलं आणि तीही शांत उभी राहिली. आम्ही तिघंही –एकमेकांकडे बघत क्षणभर स्तब्ध.

ती शांतता भेदत मीच म्हणालो, “नमस्कार. मी संदीप. मुंबईवरून आलोय. पत्रकार आहे. बाजूच्या हॉटेलमध्ये थांबलो आहे. तुमच्या आवाजाने आणि फुलांच्या सुगंधाने इथवर आलो. कृपया गैरसमज नको. ”

दुसरी महिला म्हणाली, “नाही दादा, काही अडचण नाही. पण जंगलातून अचानक कुणी पुरुष पुढे आला, की धस्स होतं. ”

मी हसत म्हणालो, “ताई, झाडावर फुलं फारशी उरलेली नाहीत. थोडी मिळतील का? ”

ती पहिल्या महिलेनं एक क्षणही न गमावता, माझ्या हातात काही फुलं दिली. तिच्याकडे पाहताना, तिच्या डोळ्यांत न रडता आलेल्या वेदना दिसल्या. तिच्या देण्यातला उदारपणा कमालीचा होता.

मी त्यांना सहज विचारलं, “फुलं विकता का घरी नेताय? ”

ती म्हणाली, “दादा, दुपारपर्यंत फुलं वेचतो आणि हॉटेलमध्ये नेऊन देतो. तेवढ्यावर आमचं पोट चालतं. ”

गप्पांमध्ये दोघींची ओळख झाली. गाणारी महिला होती रजी मार्गो आणि दुसरी होती तिची मैत्रीण लतिका खत्री.

रजी नेपाळवरून लग्न करून महाबळेश्वरला आली होती. पण तिचं लग्न टिकलं नाही. नवरा भांडण करून नेपाळला निघून गेला. आईला शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर आहे. “डॉक्टर म्हणाले होते, तुमच्या आईचे शेवटचे दिवस आहेत. ती केव्हाही जाऊ शकते. या सांगण्याला आता एक वर्ष झालं. पण आईला असं वाटतं की, मी एकटी आहे, म्हणून ती अजूनही जगते माझ्यासाठी. ” रजीचं बोलणं अचानक थांबलं आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

रजी अनेक दिवसांपासून ‘रातराणी’चे फुलं विकण्याचं काम करते. म्हणून सारे तिला ‘रातराणी’ म्हणतात. महाबळेश्वरमध्ये ‘रातराणी’ची फुलं नेमकी कुठे मिळतात, हे रजीला माहिती असतं.

लतिका उत्तर प्रदेशची. तिचा नवरा सफाई कामगार होता. रात्रीच्या कामावरून आल्यावर झाडाखाली झोपलेला असताना ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला.

“नवऱ्याचे नातेवाईक म्हणतात, मीच कोणाला तरी पैसे देऊन नवऱ्याला मारायला लावलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर समाजानं मला वाईट नजरेनं बघायला सुरुवात केली. कोणाचाही आधार नाही, पण टोमणे मारणारे अनेक. नवरा नसलेल्या बाईकडे पाहणाऱ्या नजरा….. त्यावर मी काय बोलावं? ” लतिका सारं काही मला सांगत होती.

लतिकाला मी विचारलं, “मुलं नाहीत का? ”

ती म्हणाली, “दोन मुली होत्या. एके दिवशी दोघींनाही भयंकर ताप आला. आम्ही कामावर होतो. औषधासाठी पैसे नव्हते. माझ्या मुलींच्या डोळ्यांत प्रश्न होता, आई, दवाखान्याला जायचं का नाही? पण माझ्याकडे उत्तर नव्हतं…” या दोन्ही हातांनी पोटच्या मुलीला अग्नी दिलाय.

त्या शब्दांमागे दुःख नव्हतं, ते होतं पछाडलेलं शून्य.

या दोघी, रजी आणि लतिका फक्त मैत्रिणी नव्हेत, तर एकमेकींच्या जगण्याचा आधार होत्या. त्यांच्या बोलण्यात, चालण्यात, फुलं वेचण्यात, गाण्यात जगण्याची एक जिद्द होती.

रजी म्हणाली, “मी सकाळी येते, तेव्हा फुलं पडलेली नसतात. पण झाडाच्या जवळ आले आणि गाऊ लागले की सगळीकडे फुलांचा सडा होतो. हे झाडं, हे फुलं… आता माझा परिवारच झालाय. ”

त्यांच्या सोबत घडलेल्या अनेक घटना मी ऐकत होतो आणि माझ्या अंगावर शहारे येत होते. त्यांच्यासोबत जे काही घडले, ते मी शब्दात मांडू शकत नाही, असे होते.

शेवटी त्या दोघींचा निरोप घेऊन मी निघालो. त्या दोघींनी एक छोटी बॅग माझ्या हातात दिली. त्यात होती ‘रातराणी’ची फुलं. त्या जंगलात फुलणारी विविध फुले. त्या फुलांत एक दुर्मिळ गंध होता. एक होता निसर्गाचा आणि दुसरा मानवतेचा.

त्या दिवशी मला वाटलं… आपल्या भोवती अशा असंख्य ‘रातराणी’ आणि ‘लतिका’ असतात, सामाजिक तिरस्काराच्या सावलीत जगणाऱ्या, पण अंतर्मनाने अत्यंत समृद्ध. त्यांच्या हातांना आधाराची गरज आहे. हातात हात देणाऱ्या माणुसकीची गरज. बरोबर ना?

© श्री संदीप काळे

संस्थापक, व्हाईस ऑफ मेडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted