श्री दिवाकर बुरसे
☆ पाऊणशे वर्षापूर्वीचा ‘वाडा’ संस्कृतीतील आमचा गणेशोत्सव ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
तेव्हा आम्ही पुण्यात कसबा पेठेत सरदार श्रीमंत आबासाहेब मुजुमदार बोळातील एका वाड्यात रहात होतो हे सर्वांनाच माहित आहे.
त्या छोट्या घरातही गौरी-गणपतीचा सण थाटात साजरा व्हायचा. गणेशाच्या आगमनानंतर दोन दिवसांनी गौरींचे आगमन व्हायचे आणि दोघांचे निर्गमन, विसर्जन, बोळवण पाचव्या दिवशी व्हायचे अशी आमच्या घरची प्रथा होती. सामान्यतः सार्वजनिक गणेशोत्सव मात्र दहा दिवस चालायचे. आमच्या वाड्यातही सार्वजनिक गणपती बसवला जायचा.
त्यात तरुण मुलांचा पुढाकार असे. हे तरूण उत्सवाचे सारे नियोजन करीत. ते घरोघर जाऊन वर्गणी गोळा करीत. त्यातून सारा उत्सव संपन्न होई.
भाद्रपद मासातील पुण्याचे वायुमान सुखद असे. तसे पाहिले तर पुण्याचे एकूण वायुमान, उष्ण-शीत-पर्जन्य असे तिन्ही ऋतू अत्यंत सुखद, आल्हाददायकच असते. त्यावेळी उन्हाळ्यात सुद्धा पंख्याची आठवण क्वचितच व्हायची. पावसाळा जीवघेणा कधीच नसे. शीतकाळ सुखद, उत्साह, आरोग्यवर्धक वाटे. भाद्रपदात पावसाचा जोर कमी झालेला दिसे. तरीही आधूनमधून एखादी हलकी फुलकी सर येवून जायची. रात्री शाल, स्वेटरची आवश्यकता भासायची.
गणपतीची शाडूची मूर्ती वडिलांचे मूर्तिकार मित्र श्री पटवर्धन किंवा नातूंच्या वाड्यातले मूर्तिकार श्री गोखले यांच्याकडून आणायचो. आमच्या गौरी अगदी वेगळ्या आणि युनिक आहेत. पंच्चाहत्तर वर्षापूर्वीच्या आहेत. हे गौरींचे मुखवटे श्री शंकरराव चौधरी (बबूआत्याचे यजमान) यांनी दिलेले आहेत. आजही आम्ही त्यांचीच स्थापना करतो. जगात इतरत्र कुठेही असे मुखवटे उपलब्ध नाहीत.
माझी आई हाडाची कलाकार होती. तिच्या अंगी नेतृत्व गुणही उच्च प्रतीचे होते. गौरायांचे हात, विविध दागिने, वस्त्रे, फुले, फुलांच्या वेण्या, हार, मोत्यांच्या जाळ्या इ. सर्व ती स्वहस्ते बनवीत असे.
आमच्या वाड्यातल्या महिला हरतालिका व्रत एकत्र साजरे करीत. माझी आई- सर्वांच्या सिंधुबाई – या पूजेचे आयोजन करीत असे. पूजेसाठी, चौरंग, पाट, ताम्हणे, तांब्या-भांडी, पळ्या-पंचपात्री, फुले- बिल्वदले-पत्री इ. पूजासाहित्य जमवणे, मांडामांड करणे, शिवपिंडींसाठी स्वच्छ धुतलेली वाळू आणणे या सर्व गोष्टी ती वाड्यातल्या तरूण उत्साही मुला-मुलींकडून करवून घेत असे. पूजा सांगायला वाड्यातच राहणाऱ्या थिटे गुरुजींना पाचारण केले जाई.
हरतालिकेच्या दिवशी सर्व महिला, मुली उपवास करीत. रात्रभर जागरण करीत. विविध खेळ खेळत. त्या खेळात पाच ते पंच्यांशी वयाच्या स्त्रियांचा सहभाग असे. मध्यरात्री रुईच्या पानावरील मध चाटून दिवसभर केलेला निर्जळी उपवास सोडला जाई.
चतुर्थीला घरोघर गणेशाचे आगमन व प्रतिष्ठापना होत असे. आसमंत विविध सुगंधाच्या उदबत्त्या, फुले, पाने आणि पक्वान्ने यांच्या संमिश्र सुगंधाने कोंदाटून जायचा. धार्मिक पूजा, पाठ, कर्मे करणे हे घरातील कुटुंबप्रमुखाचे काम असे. वाड्यातील मुले अंगणात सार्वजनिक गणपती बसवीत. वर्षभर प्रतीक्षा केल्यावर येणारा हा त्यांचा मोठा आनंदोत्सव असे.
घरोघरी सकाळ-संध्याकाळ अथर्वशीर्षाची आवर्तने, आरत्या होत. मुले संध्याकाळी प्रत्येकाच्या घरच्या आरतीला आवर्जून जात. त्यामागे हुंदाडायला मिळणारी हक्काची मोकळीक आणि विविध प्रकारच्या खिरापतीं चाखण्याचे आकर्षण असे.
घरगुती आरत्यांनंतर सार्वजनिक गणपतीची आरती होत असे. प्रत्येक दिवसाच्या प्रसादाची जबाबदारी एकेक परिवार वाटून घेत असे. ह्या आरत्या दीर्घकाळ चालत, उत्तरोत्तर रंगत जात. अखेर मंत्रपुष्पांजली आणि गणेशाचा नामगजर झाल्यावर प्रत्येकाच्या हातावर घसघशीत प्रसाद पडे.
ऋषिपंचमीला महिला ऋषिस्मरण, ऋषिपूजन करून विशेष उपवास करीत. या उपवसाठी त्यांच्या अल्पोपहारात ‘ऋषींचे पदार्थ’, म्हणजे माणसाने पशूंचे सहकार्य न घेता स्वतः श्रम करून पिकवलेले धान्य, फळे, भाजीपाला इ. चा समावेश असे.
गणपती आणि गौरींना रंगीबेरंगी कर्दळी, डेलिया, झेनिया, आँस्टर, गुलाब इ. फुलांची आरास केली जायची. ही फुले आम्हाला आमचे एक नातेवाईक पुणे विद्यापीठातून आठवणीने, न चुकता घरपोच आणून देत. अशा प्रकारची दुर्मिळ वैविध्यपूर्ण फुले मंडईत सामान्यांना सहसा उपलब्ध नसत. वडील पाषाणकरांकडून गौरींसाठी केवड्याचे कणीस घेऊन येत. हीच पाने नंतर रेशमी महावस्त्रामधे पुढील वर्षभर ठेवली जात. त्याने वस्त्राना कसर लागत नसे आणि नेसल्यावर केवड्याचा मंद सुगंध दरवळत असे. आघाडा, दूर्वा, तेरड्याची व इतर फुले विकायला दारावर बाया येत. त्यांच्याकडून या वस्तू घेतल्या जात.
गणेश चतुर्थीला गणपतीला एकवीस उकडीच्या मोदकांचा नैवेद्य केला जात असे. पानात पडलेले गरम गरम मोदक आणि वर साजुक तुपाची धार असे तुडुंब जेवल्यावर काय हो, डोळ्यावर पेंग यायची अगदी!
गौरी आगमनाच्या दिवशी, घरोघरच्या महिला, मुली नटून-थटून-सजून या गौरायांचे ‘सोन्या मोत्याच्या पावलांनी’ स्वागत करीत. प्रत्येकीच्या केसात, अंबाड्यावर पांढऱ्या- पिवळ्या शेवंतीच्या, मधे मधे लालभडक रांगांची सुपारीची फुले आणि मयुरपंखाची हिरवीकंच नाजुक पाने, चंदेरी कलाबूत खोचलेल्या जाडसर सुतड्यात गुंफलेल्या ‘वेण्या’ माळलेल्या असंत. (आता सध्या बाजारात या वेण्या दिसतही नाहीत.) दारात सनई चोघडे झडत. मुली देवींना आपल्या घरात हिंडवून घराचा कोपरान् कोपरा दाखवीत. नंतर त्यांची प्राणप्रतिष्ठा व पूजा आरती केली जाई. देवींजवळ नंदादीप लावला जाई. संध्याकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य अर्पिला जाई. नैवेद्याच्या ताटात साधा भात, वरण, ज्वारीची भाकरी आणि शेपूची, मेथीची भाजी असा साधा बेत असे.
गौरींच्या पुढची आरास लक्षवेधी असे. त्यात विविध फळे, फळभाज्या, मिष्टान्ने, पक्वान्ने, पाने-फुले, खेळणी इ. चा समावेष असे. सजावटीत निश्चित असे कल्पनासूत्र क्वचितच असे. गौरायांपुढे कुंची घातलेलं एक बाळ मात्र न विसरता मांडलं जायचं. ते फार गोंडस दिसायचं!
गौरी आगमनानंतरचा दुसऱा दिवस म्हणजे ‘गौरी पूजनाचा’, अत्यंत महत्वाचा दिवस. या दिवशी, दोन दिवस आधीच येवून बसलेले गणपती बाप्पा, आपले आसन सोडून, सरळ या गौरायांच्या जवळ, अगदी मधोमध येवून बसत.
या दिवशी गौरी-गणपतींचे विशेष लाड, कौतुक केले जाई. माहेरवाशिणी म्हणून आलेल्या जेष्ठा-कनिष्ठा आणि त्यांचा भाऊराया गणेश यांच्या कौटुंबिक संम्मेलनात सणाच्या निमित्ताने घरोघरी आलेल्या माहेरवाशिणी आणि भाऊ सहभागी होत असत. सारी भावंडे एकत्र येवून, मिळून मिसळून आनंद उधळत.
माझी आई सुग्रण होती. तिचा नेहमीचा साधा स्वयंपाकही फार रुचकर असे. तिला स्वतः केडगांवच्या सद्गुरु श्री नारायण महाराजांचे आशीर्वाद लाभले होते. तिचे ‘अन्नपूर्णा’ हे नामकरणही त्यांनीच केले होते. ती खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा होती. शेकडो, हजारो माणसे तिच्या हातचे जेऊन संतुष्ट झाली आहेत.
आमच्या दुसऱ्या, म्हणजे भाऊकाकांच्या घरीही स्वतंत्र गौरी असत. इतर मेनू बहुतेक सारखाच असे. माझी कुसुमकाकू रव्याचे लाडू करीत असे. तिच्या हातचे रव्याचे लाडू खाणे हा एक स्वर्गीय आनंद होता. तसे लाडू मी आजपर्यंत अन्यत्र चाखले नाहीत. कौतुक म्हणजे काकू माझ्यासाठी हे लाडू राखून ठेवीत असे. मग पुढचे आठ दहा दिवस मी रोज काकांकडे जात असे.
गौरीं पूजनाच्या दिवशी, म्हणजे गौरी जेवायच्या दिवशी विशेष भोजन, महाप्रसाद केला जात असे. त्यात हिरवी नारळाची चटणी, वाटलेली कोरडी डाळ, पंचामृत, डांगर, मावळी काकडीची कोशिंबीर, मोहरी वाटून लावलेले लाल भोपळ्याचे भरीत, गव्हल्या-नखुल्या-मालत्यांच्या खिरी, साधा भात, मसाले भात, साधे वरण, कुरडया, पापड, पापड्या, घोसाळ्याची भजी आणि पडवळ घालून केलेची ताकाची कढी (ही घोसाळ्याची भजी आणि पडवळाची कढी अत्यावश्यक असे.) पेशवाईतील प्रसिद्ध वैशिष्ठ्यपूर्ण ब्राह्मणी आळूची पातळ भाजी, (हिलाच कोकणात ‘आळूचे फदफदे’ या गलिच्छ नावाने संबोधतात! ) कटाची आमटी, उसळलेल्या मिरच्या, बटाट्याची कोरडी भाजी, श्रावण घेवड्याची भाजी (श्रावण घेवडा हा खास ‘पुणेरी’ शब्द. इतरेजन त्यालाच फरसबी म्हणतात) साखरी भात, पुरण पोळी, श्रीखंड, सुधारस, रव्याचे लाडू आणि पोटात पत्रीसाखर दडवलेले, वेलदोडे घातलेले, वर बेदाणे जडवलेले, साजूक तुपातले बेसनाचे लाडू!
जेवणात साजूक तुपाचा प्रच्छन्न उपयोग होत असे. तूप चमच्याने वाढण्याऐवजी वाटीत वाढले जात असे. (त्या वाट्याही वेगळ्या आकाराच्या असत. त्यांना ‘द्रोण’ म्हणत. राजा केळकर संग्रहालयात आता दिसतात.) मोदक, पुरणपोळी यावर वरून तुपाचे तामले उलटे करण्याचीही प्रथा होती! कलोस्टेरल, कॅलरी कॉन्शसनेस, वर्कआऊट, बॅलन्स डाएट, झीरो फिगर असले अभद्र शब्द अजून जन्माला यायचे होते!
भोजनानंतर गौरी गणपतीला मुखवासार्थे त्रयोदशगुणी नागवल्लीच्या ५-७ पानांचे गोविंदविडे अर्पण केले जात. या दिवशी आम्हा मुलांनाही विडा खाण्याची अनुमती असे. जिभा बाहेर काढून कुणाचा विडा किती रंगलाय हे प्रदर्शित करण्याची स्पर्धा लागे. एखाद्याचा विडा जरा कमी रंगलेला असेल तर तो परत दुसरा विडा खायला धावायचा. एरवी मात्र मुलांसाठी तांबूलभक्षण पूर्णतः निषिद्ध, वर्ज्य असे.
एका वर्षी माझ्या मावशीचे यजमान स्व. श्रीमान सरदार माधवराव पुरंदरे यांनी तर चक्क एकवीस पानांचे भलेमोठे गोविंदविडे बनविल्याचे मला आठवते. मी त्यावेळी तीन-चार वर्षांचा असेन. तो एक विडा उचलण्यासाठी मला माझ्या दोन्ही बालभुजांचा उपयोग करावा लागला होता!
एकावर्षी प्रतिवर्षीप्रमाणे वाड्यात सार्वजनिक गणपती बसला. एक – दोन दिवस आनंदात, उत्साहात गेले. पण तिसऱ्या दिवशी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. अंगणात तळे साठले. सर्वात दुर्दैव म्हणजे गणेश मूर्तीवरील मंडपाच्या छतातून पाणी गळू लागले. रात्रभर त्या पाण्याचा अभिषेक शाडूच्या प्रतिष्ठित मूर्तीच्या माथ्यावर नव्हे पण मांडीवर होत राहिला.
सकाळी एक कार्यकर्ता मूर्तीजवळ जाऊन पाहतो तो काय, संपूर्ण मूर्ती भिजली होतीच, पण मूर्तीच्या मांडीवर पाण्याची संतत धार पडून मांडीला भले मोठे छिद्र पडले होते. शरीराचा काही भागही विरघळून गेलेला!
अशी भंगलेली मूर्ती पूजेत ठेवणे अयोग्य असे जाणकार वरिष्ठ मंडळींनी सांगितले. मग काय लगेच दुसरी मूर्ती आणून, तिची विधिवत स्थापना करून पुढील दिवस पुढील दिवस साजरे केले. अनंत चतुर्दशीला दोन्ही मूर्तींचे विसर्जन केले गेले.
या वर्षीचा (कदाचित१९५२-५५ साल असावे) हा गौरी जेवण्याचा दिवस मात्र अभद्र ठरला!
आमच्या शेजारी शंकरराव व पार्वतीबाई अभ्यंकर हे दाम्पत्य आपला मुलगा काशीनाथ व सून सुमतीसह रहात होते. शंकरराव तथा तात्यांची प्रकृती बरी नव्हती. जलोदराच्या महाव्याधीने ते त्रस्त होते. श्रावण कसाबसा गेला. भाद्रपद उजाडताच त्यांचा रोग बळावला. गणेश चतुर्थी पार पडली. गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
आमच्या दारावरून तात्यांचे कलेवर नेताना घराचे दार लोटावे लागले. अंगणातल्या सार्वजनिक गणेशाला चादरीच्या पडद्याआड झाकावे लागले. तात्यांचा देह ओंकारेश्वर स्मशानात नेला गेला. अंत्यविधी उरकून पुरुषमंडळी परतली. काहींनी वाड्यातल्या नळ कोंडाळ्यावरच स्नाने उरकली तर काहींनी आपापल्या घरी केली. त्या दिवशी गणपतीची सायंपूजा व आरती झाली नाही. पुढील उर्वरित पाच दिवस कोणीतरी पूजा करीत असे. पण ह्या पाच दिवसात सर्वांनीच सुतक पाळले. हा गणेशोत्सव साधेपणाने झाला.
तिसऱ्या दिवशीच्या भोजनाचा मेनू सामान्य असे. पोळी, भाजी, चटणी इ. मिष्टान्न म्हणून पुरणाचे कडबू केले जात. जेवणाच्या अखेरीस दही भात आवश्यक.
दुपारनंतर गौरी गणपतींच्या विसर्जनाची तयारी सुरू व्हायची. गणपती विसर्जनाला वाटलेली कच्ची हरभऱ्याची डाळ, तिला चरचरीत हिंग-जिऱ्याची फोडणी दिलेली असे. इतर जिन्नस मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ, लिंबाचा रस इ. चिमूटभर साखरही घातलेली असे. काही अपवाद वगळता, सर्व तिखट मिठाच्या पदार्थात गूळ किंवा साखर आवश्यक. ते आमच्या पुणेरी ब्राह्मणी खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ठ्य आहे.
सायंकाळची आरती व्हायची. या वेळचे वातावरण भक्तिमय, आनंदमय असे पण त्याला उदासपणाची किनार असे. गौरी गणपतीच्या विरहाच्या कल्पनेने डोळ्यांच्या कडा ओलावल्या जायच्या. आता तब्बल एक वर्ष वाट पहावी लागणार या कल्पनेने सारेच भावुक होत. वडिल मंडळींनाही एका बाजूला तोंड वळवून कोणाला न कळत, धोतराच्या सोग्याने आपले पाणावलेले डोळे टिपताना मी पाहिलं आहे अनेक वेळा!
अखेरची आरती व मंत्रपुष्पांजली झाल्यावर सर्वजण देवांना फुले अक्षता वहात आणि घश्यात आडकलेला उमासा आवरत ‘पुनरागमनायच’ म्हणून देवांना साष्टांग नमन करून अखेरचा निरोप देत. गृहिणी देवांच्या हातावर कानवले आणि चमचाभर कवडीचे दही ठेवी.
गणपती एका ताम्हनात ठेवला जाई. गौरींचे मुखवटे जागेवर किंचित हलवून त्यांचेही लाक्षणिक विसर्जन होई. पुरुष मंडळी आणि मुले गणेशमूर्ती वाजत-गाजत- नाचत नदीवर नेऊन विसर्जित करीत. जाताना ‘गणपतिबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लौकर या’ असा अखंड घोष केला जाई.
घरी राहिलेल्या महिला गौरींचे मुखवटे गादीच्या पिशवीत गुंडाळून अलगद डब्यात ठेवीत. इतर वस्तूंची आवराआवर करून त्या जागच्या जागी जात. घरी पोहोचेपर्यंत सगळी आवराआवर झालेली असे. ‘ होत्याचे नव्हते’ झालेले असे!
नदीवरून घरी परतताना आठवणीने नदीकाठची मुठभर वाळू आणून घरात सर्वत्र टाकली जायची. परतीच्या वाटेवर भेटणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद दिला जायचा. तो प्रसाद भेटेल त्याला आणि वाड्यातील घरोघरी जाऊन दिला जायचा.
गणेश विसर्जन करून परत आलेली मुले मात्र परस्पर घरी जाणे टाळून अंगणातील सार्वजनिक गणपतीच्या रिकाम्या मांडवात उगाचंच रेंगाळत रहात. ती काहीशी शांत, उदास, मलूल, रडवेली, केविलवाणी दिसत!
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






