श्री मंगेश मधुकर

??

☆ त ट स्थ… ☆ श्री मंगेश मधुकर

ऑफिसपासून जवळ होता म्हणून नातेवाईकाच्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो. भाडंसुद्धा कमी होतं. चार मजल्याची जुनी सोसायटी. शेजाऱ्याच्या हळूहळू ओळखी होत होत्या. एका संध्याकाळी सोसायटी गेटजवळून जात असताना पुढे असलेल्या आजींच्या हातातली पिशवी खाली पडली. त्यातले कांदे-बटाटे विखुरले. मी पटकन गोळा करून पिशवी आजींकडे देताना चेहरा ओळखीचा वाटला. निरखून पाहील्यावर लक्षात आलं त्या माझ्या शाळेतल्या बाई होत्या. तब्बल तीस वर्षनी भेटत होतो अर्थातच त्यांनी मला ओळखलं नाही. बाईंच्या अचानक झालेल्या भेटीनं खूप आनंद झाला. मी नाव, शाळा, दहावीचं वर्ष सांगीतल्यावर बाई फक्त हसल्या आणि जाऊ लागल्या. वाकून नमस्कार केला पण काहीच प्रतिक्रिया नाही. खूप आश्चर्य आणि वाईटही वाटलं.

कारण…….

माझ्या आठवणीतल्या बाई खूप प्रेमळ, गप्पीष्ट, आपुलकीनं बोलणाऱ्या. छान शिकवणाऱ्या, कधीच न रागावणाऱ्या न मारणाऱ्या अशा होत्या. त्यांची खासीयत म्हणजे खूप गोष्टी सांगायच्या. त्यामुळे सर्वांच्या फेवरेट. इतक्या प्रेमानं वागायच्या की जणूकाही आमची शाळेतली आईचं. त्याच हसतमुख बाई आज फारच वेगळ्या वाटल्या. का? कशामुळे? विचारांच्या गर्दीत हरवलो.

“साहेब, फार मनावर घेऊ नका. आजी तशाच आहेत. ”गेटजवळचा दुकानदार माझ्याकडं पाहत म्हणाला.

“तशाच म्हणजे?? ”

“कायम गप्प. फक्त कामापुरतं बोलतात. बिचाऱ्या… ”एवढं बोलून दुकानदार कामात गुंतला. मी पण जास्त काही विचारलं नाही पण बाईंचं वागणं डोक्यातून जात नव्हतं.

रात्री निवांत पुस्तक वाचत होतो. दहा-साडे दहाची वेळ. पावसाचा, गाड्यांचा आवाज सोडला तर सोसायटीत शांतता. अचानक मोठमोठ्यानं आवाज यायला लागला. खिडकीतून पाहीलं तेव्हा छत्री घेतलेला एकजण डूलत डूलत येत होता. आजूबाजूला कोणीही नव्हतं तरी तंद्रीत बडबडत होता. समोरच्या बिल्डिंगजवळ पोचल्यावर आवाज वाढला. धड उभं राहता येत नव्हतं पण बोलण्याचा आवेश मात्र भलताच आक्रमक.

“कोणाला सोडणार नाही. कापून टाकीन. खलास करीन. मला फसवलंत ना. बदला घेणार”समोर कोणीही नव्हतं तरी बोलत होता. काही वेळानं कमरेला पट्टा लावलेल्या एक आजी काठी टेकवत जिन्यातून खाली आल्या आणि त्याच्यासमोर उभ्या राहील्या. मी नीट पाहिलं तर त्या आजी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर संध्याकाळी भेटलेल्या बाईच होत्या. चेव चढलेला तो तावातावानं हातवारे करत बोलत होता आणि बाईं ऐकत होत्या.

“असं काय बघतीस. कोणाच्या बापाला घाबरत नाही. समजलं का? ”

“झालं की सांग. घरी जाऊ”बाई

“प्रवचन चालूयं का? ”तो खवळला.

“मग दुसरं काय? हे रोजचंच आहे. थकलास की घरी जाऊ”

“तू जा. मी येणार नाही”

“लोकांना त्रास होतोय”

“आणि माझ्या त्रासाचं काय? ”

“ज्यानं केलं तो इथं नाही मग त्यांच्या नावानं शिव्या देऊन काय उपयोग?? . ”

“त्याची प्रतिनीधी तू आहेस की.. ”

“तेच तर सांगतेय. घरी चल. समोर बसते काय उद्धार करायचा तो कर. इतरांना त्रास नको. ”

“का? इथं लाज वाटते. चारचौघात अब्रू जायची भीती वाटते. “

“अजून राहिलीये?? “

“मी एकट्यानं घालवली नाही. तुझ्या लाडक्यानं फसवून सही घेऊन जमीन विकली. भीक म्हणून जुनाट दोन खोल्या आणि थकलेली म्हातारी देऊन स्वतः नवीन जागेत रहायला गेला. ”नशेमध्ये तो बराच वेळ बरळत होता. काही वेळानं आवेश उतरल्यावर त्याला हाताला धरून बाईंनी घरी नेलं. हा सगळा प्रकार पाहून मला खूप वाईट वाटलं परंतु सोसायटीतल्यांसाठी हा प्रकार सवयीचं असला पाहिजे कारण एकही खिडकी उघडली नव्हती आणि कोणी मध्यस्तीसाठी सुद्धा आलं नव्हतं. बाईंची हतबलता पाहून कसंतरीच वाटलं. पोराच्या कानफटात मारावीशी वाटलं. तिरमिरीत ऊठलो पण स्वतःला आवरलं.

दुसऱ्या दिवशी शेजारच्या काकूंकडे चौकशी केली तेव्हा समजलं की बाईंचे मिस्टर दहबारा वर्षपूर्वीच गेले. दोन मुलं, दोघांच्या वेगवेगळ्या तऱ्हा, एक स्वार्थी तर दुसरा व्यसनी. थोरला पक्का मतलबी, कावेबाज. गोड बोलून आई, भावाच्या सह्या घेऊन वडीलोपार्जित जमीन विकली अन सगळा पैसा स्वतः घेतला. आईला जुनं घर आणि दोन लाख दिले आणि अजून जबाबदारी नको म्हणून संबंध तोडले तर धाकटा हूशार पण मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून हताश झालेला. चार पाच ठिकाणी नोकरी केली पण कुठंच टिकला नाही. यश मिळालं नाही. त्यात भावानं फसवलं म्हणजे आगीत तेल. नोकरीचे प्रयत्न सोडून स्वतःचीच किव करू लागला. दारूचा आधार घेतला आणि त्यात गुरफटला. सुधारण्यासाठी बाईंनी बरेच प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. बाईंचे अनेक विद्यार्थी आयुष्यात यशस्वी झाले परंतु त्यांची मुलं मात्र??? मुलांना घडवण्यातलं अपयश खूप मनाला लागलं. स्वाभीमान दुखावला. चांगले संस्कार देऊनही मुलं नाकर्ते निघाली. हा स्वतःचा मोठा पराभव वाटला. चेहऱ्यावरचं हसू संपलं. वागणं एकदम निर्वीकार. तोंड दाखवायची लाज वाटायची म्हणून घरातच थांबायच्या. कामापुरतचं घराबाहेर पडणं. मोजकं बोलणं. कुठं येण-जाणं नाही. कार्यक्रमात सहभाग नाही. भेटीगाठी नाहीत. तोंडाला कायम कूलूप फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायच्या. घर पेन्शनवर चाललेलं. दोन्ही मुलं आपापल्या जगात गुंग. काहीही चूक नसताना शिक्षा बाई भोगत होत्या. साहजीकच तब्येतीवर परिणाम झालाच. बीपीचा त्रास होताच सोबतीला डायबिटीस आला. त्यासाठी औषध होती पण मानसिक त्रास वाढलेला. थोरला असून नसल्यासारखा तर धाकटा बिनकामाचा. कोणाचाच आधार नाही. एकाकी पडल्या मुळे बाई खचल्या. जे समोर येईल सहन करायचं हा मार्ग स्वीकारला.

मैत्रीणीच्या आयुष्याची फरफट सांगताना काकूंचे डोळे भरले अन मी सुद्धा भावुक झालो. काहीतरी करायला पाहिजे असं खूप वाटलं.

— 

दोन-तीन दिवसा नंतर रात्री पुन्हा तोच प्रकार. रहावलं नाही. तडक ऊठलो आणि खाली गेलो. हेलपाटणाऱ्या मुलाची बडबड सुरू आणि बाई समोर उभ्या. मुलाला समजवण्यासाठी पुढं गेलो तेव्हा बाईंनी थांबायची खूण केली आणि स्वतःच्या कपाळावरुन बोटानं आडवी रेघ मारत “नशिबाचे भोग आहेत. तेच फेडतेय. ”बोलताना बाईंचा चेहरा कमालीचा शांत अन डोळे कोरडे होते. मला नमस्कार करून बाई मुलाला घेऊन जिना चढायला लागल्या.

— 

दुःखं, राग, चीड, संताप यापलीकडे गेलेल्या बाई उतारवयात वाट्याला आलेली अवहेलना सहन करत करत तटस्थ झाल्या….. जगण्यातलं एक भयाण वास्तव पाहून खूप वाईट वाटलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted