श्री मयुरेश उमाकांत डंके
☆ “नुसताच टीकाकार की सक्रिय नागरिक : मी कोण? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
सोसायटीच्या गणेशोत्सवात यावर्षी बराच विचारविनिमय, वादविवाद, रुसवेफुगवे असं सगळं पार पडून शेवटी ठरलं की, डीजे मुक्त गणेशोत्सव तर होईलच, शिवाय सोसायटी मधल्या पाच ज्येष्ठ सभासदांची समिती जमाखर्चाचं काम बघेल. झालं.. तिथंच अनेकांचा पापड मोडला. दरवर्षीचे पाच सात स्वयंघोषित अनुभवी कार्यकर्ते, गणेशभक्त, आधारस्तंभ दुसऱ्या दिवसापासून यायचेच बंद झाले. ‘साऊंड सिस्टीम बंद तर मग कसला उत्सव? ‘ असा चेहरा घेऊन पोरं वावरायला लागली.
मागच्या वर्षापर्यंत असं नव्हतं. मुलं जमून गणपती उत्सव करायची. मोठी माणसं फार तपशीलात जायची नाहीत. पण मग असं लक्षात आलं की, रोज रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं आणि भूक लागते म्हणून, झोमॅटो, स्वीगी वापरुन फूड पार्सल्स मागवली गेली आणि त्याची भरमसाठ बिलं उत्सवाच्या खर्चात लावण्यात आली. त्यात पिझ्झा, बर्गर, चायनीज, पावभाजी, मसाला पाव, कोल्ड कॉफी, सँडविचेस अशी यादी तर होतीच. शिवाय अनेकदा सामिष पदार्थ सुद्धा मागवले गेल्याचं लक्षात आलं. या खर्चाची रक्कमच वीस हजाराच्या वर गेली. पूजा खर्चाला पैसे फार लागतात म्हणून, त्या पूजाखर्चात कपात करण्यात आली. “सकाळ संध्याकाळ हार आणि गजरे कशाला लागतात? ” असा युक्तिवाद करुन एकवेळची फुलं बंद केली गेली. नेहमीचे गुरुजी “त्यांचे चार्जेस खूप जास्त आहेत” या नावाखाली थांबवले गेले. पौरोहित्य करणारे चार्जेस घेत नाहीत, त्याला “दक्षिणा” असं म्हणतात, हेही कुणाच्या गावी नव्हतं. पण विसर्जनाच्या आदल्या दिवशी गणपती मंडळाच्या वतीनं सगळ्या रहिवाशांना प्रसाद भोजन असा जंगी कार्यक्रम आखण्यात आला आणि त्यात भोजनाच्या ऐवजी पावभाजी, पुलाव, भेळ पाणीपुरी आणि आइस्क्रीम असा मेनू ठेवला गेला. विसर्जनाची मिरवणूक डॉल्बी साउंड सिस्टीम आणि लेसर लाईट्स लावून निघाली. दररोज मंडळाच्या वतीने एक किलो उत्तम केशरी पेढ्यांचा नैवेद्य असे, विसर्जनाच्या दिवशी असाच माव्याच्या मोठ्या मोदकांचा प्रसाद प्रत्येक घरी दिला जायचा. खर्च फार होतो म्हणून या दोन्ही गोष्टी बंद पाडल्या गेल्या. ही गोष्टसुद्धा अनेकांना खटकली.
हा सगळा प्रकार सगळ्यांनीच पाहिला होता. गणेशोत्सव हा आनंदाचा उत्सव असला तरीही तो आधी धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवच आहे, आणि तो त्याच्या मूळ रूपातच साजरा व्हायला हवा यावर सगळ्या जुन्या पिढीतल्या सभासदांचं एकमत होतं. होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी ही सगळी चर्चा झाली आणि उत्सव योग्य प्रकारे साजरा झाला पाहिजे, असं ठरलं. उत्सवाचा कल बदलतोय, हे लक्षात आल्याक्षणी वेळीच योग्य निर्णय घेऊन चुकीचे पायंडे बंद पाडण्यासाठी माणसं पुढं आली. आता गणेशोत्सवात फक्त “सेलिब्रेशन आणि इव्हेंट” शोधणाऱ्यांना याचं वाईट वाटलं असेलही. वाटू देत बापडं, पण ज्यांना योग्य अयोग्य समजतं, त्यांनी फक्त दोषारोप करत न बसता, स्वतः सक्रीय सहभागी होऊन, पुढाकार घेऊन सकारात्मक कृती केली, हे जास्त महत्त्वाचं.
गणेशोत्सव असो किंवा अन्य कोणताही सार्वजनिक उत्सव असो, आपल्या घरच्या उंबऱ्याबाहेर आपल्याला वाट्टेल तसं वागण्याचं स्वातंत्र्य असतं, असं कुठंय? मला नाचायला मिळेल, धिंगाणा घालायला मिळेल, मंडळाच्या खर्चातून मजा करायला मिळेल, हा खऱ्या कार्यकर्त्याचा स्वभावगुण नव्हे. पण तरीही हा अवगुण गणेशोत्सवात शिरला आहे, हे सत्य तर कुणालाच नाकारता येण्यासारखं नाही.
आमच्यावेळेला काय होतं, कसं होतं, जे होतं ते कित्ती चांगलं होतं, हे आता सांगण्यात काही अर्थ उरलेला नाही. पण अत्यंत सात्विक, कठोर शिस्तशीर आणि उत्सवाची पवित्रता पक्की ठाऊक असणारी मंडळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत, आणि जी विद्यमान आहेत, त्यांना उत्सवात सहभागी करुनच घेतलं जात नाही, ही वास्तविक परिस्थिती आहे.
ही स्थिती केवळ सोसायटीच्या गणेशोत्सवापुरतीच मर्यादित आहे, असं नाही. संपूर्ण गणेशोत्सवातच सगळ्या मंडळांमध्ये थोड्याफार फरकाने असंच दिसतं. “आमचा उत्सव”, “आमचं मंडळ” याऐवजी “आपला उत्सव”, “आपलं मंडळ” असं अजूनही १०० टक्के झालेलं दिसत नाही.
अतिशयोक्तीचा भाग नाही. पण पूर्वी खरोखरच दोन सदस्यांकडे मूर्तीच्या देखभालीची व्यवस्था असे. त्यांच्याकडे सुती कापड, मलमल कापड, मऊ ब्रश असा सगळा सेट असायचा. रोज सकाळ संध्याकाळ मूर्ती हलक्या हातांनी पुसून घ्यायची, तिच्या मुकुटावर, कपाळावर, हातांवर, पायांवर वाहिलेलं गंध, हळद, कुंकू ब्रशनं पुसून काढायचं. तिचा शेला बदलायचा, असं काम असे. रोजच्या पूजेच्या वेळी आधीचे हार, गजरे, माळावस्त्र, फुलं हे सगळं नीट उतरवून नवे हार घालणं हे त्यांचं काम.
गणपतीच्या दोन्ही बाजूस मोठ्या पितळी समया तेवत असत. त्या समयांची आणि पूजेच्या उपकरणांची रोजची स्वच्छता आणि व्यवस्था दोघेजण पाहत. गणपतीपुढे रोजची रांगोळी काढणं, रोजच्या नैवेद्याचं नियोजन करणं, रोजचा प्रसाद आणि खिरापतीची व्यवस्था करणं हा मोठा भाग असे. गणपतीला रोजच्या रोज ताज्या दूर्वा, आघाडा, शमीपत्रे वाहण्यासाठी मिळवून आणणे, दुर्वांच्या जुड्या करणे, नैवेद्यासाठी तुळशीपत्र आठवणीने आणणे, रोजच्या रोज पाच फळांची व्यवस्था करणे, ही अत्यंत आवश्यक गोष्ट होती.
गणपतीचा नैवेद्य हा तर अतिशय जबाबदारीचा भाग. महिनाभर आधीपासून कुठल्या दिवशी कोणत्या कुटुंबाकडून दुपारचा आणि कोणत्या कुटुंबाकडून संध्याकाळचा नैवेद्य यायचा आहे, याची जबाबदारी दोघांकडे असे. ते प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत. सकाळच्या पूजेत फळे, पंचखाद्य, मोदक, दूध, पंचामृत, गूळखोबरं ही व्यवस्था असे. गुरुजींना पूजेपूर्वी किंवा पूजेनंतर दूध आणि फळे असा फराळ असे. मग दुपारी बारा ते एक च्या दरम्यान नैवेद्य. तो ज्या त्या घरातून महिला सदस्य आणत असत. हा पूर्ण चारीठाव मिष्टान्न भोजनाचा साग्रसंगीत नैवेद्य असायचा. संध्याकाळी मात्र वाटली डाळ, लाह्या, बत्तासे, खारका, साखर फुटाणे, साखरदांड्या, दडपे पोहे, पेढे, खोबऱ्याच्या वड्या, राजगिऱ्याचे लाडू, खजुराचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, चुरमुरे, दहीपोहे, केळी, सफरचंदे, चिकू अशी खिरापत येत असे. लहान मुलांसाठी श्रीखंडाच्या गोळ्या आवर्जून असत. आरती झाल्यानंतर तो प्रसाद प्रत्येकाला नीट वाटण्याची जबाबदारी महिलावर्ग घेत असे. समोसे, कचोरी, ढोकळा, सुरळीच्या वड्या, वडे असे पदार्थ संध्याकाळी आरतीनंतर प्रसाद म्हणून वाटण्याची पद्धत नव्हती. प्रसादाची पवित्रता अगदी काटेकोरपणे जपली जायची. “त्याला काय होतंय? ” असा प्रश्न विचारण्याची कुणाची टाप नसे आणि चुकून विचारलाच तर मांडवातून सरळ घरचा रस्ता दाखवून घरी येथेच्छ लाखोली वाहिली जात असे. “आधुनिकतेच्या नावाखाली उंडगेपणा” रेटणाऱ्यांना तिथं कामच दिलं जात नसे. रात्री दूधसाखरेचा नैवेद्य दाखवून समयांच्या वाती बारीक केल्या जात.
त्या सगळ्या चालीरीती पार पाडताना बायका मंडळींचा पिट्ट्या पडे खरा, पण त्यातून जो आनंद मिळे, त्याला तोड नव्हती.
संध्याकाळी आरती मंडळ असे. तालासुरात अकरा अकरा आरत्या खड्या स्वरात म्हटल्या जात. श्लोक असत, देवे होत. रोजच्या वारानुसार आरत्या वेगवेगळ्या होत, पण ज्ञानोबा तुकोबांच्या आरत्या मात्र रोज होत असत. “वाट पाहे सजणा” म्हणणाऱ्याच्या पाठीत तत्क्षणी धपाटा बसत असे. शंकराची आरती, देवीची आरती, पांडुरंगाची आरती, दत्ताची आरती, मारुतीची आरती या अनिवार्य असत. आरती येत नसतानाही नुसतंच “जयदेव जयदेव” म्हणून घसा खरडवणाऱ्याचं श्रीमुख टोमॅटोसारखं लालबुंद होईल असा विशेष प्रसाद दिला जात असे. त्यामुळं, अगोचरपणा, थिल्लरपणा, शाब्दिक कोट्या करणे, निलाजरे विनोद करणे यांना उत्सवात थारा नव्हता. मोठ्यांचा प्रचंड धाक असे.
उत्सवात मूर्ती ठरवणे, ती आणणे, स्थापन करणे, तिला दहा दिवस सांभाळणे, विसर्जन मिरवणुकीत ती नीट नेणे आणि व्यवस्थित पाण्यात उतरवून तिला निरोप देणे हे काम ठरलेले पाच सहा जण करत असत. विसर्जनाच्या वेळी उत्तरपूजा झाल्यावर नारळ वाढवला जाई आणि बाकीचे सगळे बाजूला होत. गणपतीचे वस्त्र, जानवे आणि तळ्यातील थोडीशी माती तबकात आणली जात असे. ती माती मूर्तीच्या जागी टाकत. मगच दुसऱ्या दिवशी सजावट उतरवली जाई.
उत्सवापूर्वी सगळ्या साहित्याची तपासणी करणं आणि उत्सवानंतर देखील सगळ्या वस्तूंचा हिशोब लागणं हेही काम असे. सतरंज्या, पूजा साहित्य, गणपतीचे टेबल, रोषणाई साहित्य, सजावटीचे पडदे, त्यांच्या दांड्या, झांजा, टाळ, घंटा, समया, हुंडी, चौरंग, पाट अशी ती बरीच मोठी यादी असे. त्याची स्वतंत्र वही असे. दरवर्षी त्यात थोडीफार नवी खरेदी होई. ताम्हण, तेलाच्या बरण्या, उदबत्ती घर, नैवेद्याची तबके अशा गोष्टींची भर पडे. त्याच्या मोठ्या ट्रंका असत. उत्सवात वापरलेले सगळे साहित्य नीट स्वच्छ करुनच पॅक केले जाई. सतरंज्या, बेडशीट, पडदे धुवून घेतले जात. आदल्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत मिरविणारा एकही आधारस्तंभ, खंदा कार्यकर्ता, “वाजवणार-गाजवणार” पट्टीतला, “गर्वच नाही तर माज आहे मला मी कार्यकर्ता असल्याचा” असं स्टेटस ठेवणारा एकही पठ्ठ्या या आवराआवरीच्या कामात सहभागी पूर्वीही होत नसे, आजही सहभागी होत नाही.
ही सगळी कामं हा उत्सवाचा अविभाज्य आणि अतिशय जबाबदारीचा भाग होता. तो नीट पार पाडल्यानंतर मिरवणुकीचा विचार असे. ९० टक्के भर उत्सवावर आणि फक्त १० टक्के भर मिरवणुकीवर असायचा. मिरवणारे मिरवत असत आणि काम करणारे काम करत. त्यात या दोघांनाही कधीच बदलावंसं वाटलं नाही. दोन्ही प्रकारची माणसं त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार उत्सवात सहभागी होत राहिली. आजही खरा कार्यकर्ता फोटोजीवी नाहीच. तो मिरवताना दिसत नाहीच. पण त्याच्या समर्पित असण्यामुळेच उत्सव होतोय, हेही त्रिवार सत्य.
एकदा गणपतीसाठी नक्षीचा सागवानी पेशवाई चौरंग करायचं ठरलं तेव्हा “मोठ्ठाला देणगीदार न शोधता” तीन चार वर्षं रक्कम बाजूला काढत काढत चौरंग तयार झाला. भरभक्कम देणगीदारांकडून रकमा घ्यायच्या आणि वरून पुन्हा पावती पुस्तकं घेऊन फिरायचं असा प्रकार कुणी चालू दिला नाही. पैशाच्या जोरावर उत्सवात उन्माद येऊ दिला नाही, हे जाणत्या कार्यकर्त्यांनी जपलेलं भान आहे. “मी चांदीची उपकरणी देतो, पण मी सांगतो तशी मिरवणूक काढा” या असल्या प्रलोभनांना जुनी मंडळी बळी पडली नाहीत, हे किती चांगलं झालं.
उत्सव साजरा करण्यासाठी पैसे लागतात, ही गोष्ट कितीही खरी असली तरीही फक्त पैशाच्याच जोरावर उत्सव साजरा होतो, हे मात्र अजिबात खरं नाही. उत्सव तत्वांवर होतो, भावनेवरच होतो. आधुनिकतेची, करमणुकीची चौकट आखण्यासाठी जाणत्या व्यक्तींचं मार्गदर्शन घेतलं तर बिघडतं कुठं? त्यात कसला इगो? आणि कार्यकर्त्याला तर असा इगो असूच नये.
मूळ रुपाला कसलीही बाधा येऊ नये, उलट त्या उत्सवाचं मांगल्य आणखी वाढावं, अशी समाजाची भावना असेल तर समाजातली सज्जनशक्ती आणि सार्वजनिक गणेशोत्सव यांच्यात एक भक्कम विशाल पूल बांधला गेला पाहिजे. समाजाच्या सर्व क्षेत्रांमधल्या व्यक्तींना मंडळांनी “कार्यकर्ता” म्हणून या उत्सवात सहभागी करुन घेतलं पाहिजे. आणि या विविध क्षेत्रातल्या लोकांनीही या उत्सवात आलं पाहिजे. समाजातली सज्जनशक्ती या उत्सवातल्या त्याज्य गोष्टी समूळ काढून टाकण्यासाठी निश्चित प्रभावी ठरेल. अगदी वैज्ञानिक संशोधकांपासून ते अंगणवाडी शिक्षिकांपर्यंत सगळे या उत्सवात कार्यकर्ता म्हणून आले पाहिजेत. उत्सवातली सकारात्मकता निश्चित वाढेल.
राहता राहिला प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांचा. आपण स्वतःला बदललं पाहिजे, तेव्हाच आपला उत्सव बदलेल. आपण घरात बसून टीव्हीवर मिरवणुका बघून, नंतर टीकेचे बाण सोडून काय होणार? “गणपती बाप्पा स्वतःच त्याचा उत्सव दोषमुक्त करुन घेईल” असं म्हणून घरात बसून टीका करणं पूर्ण थांबवलं पाहिजे. लोकमान्यांनी मोठ्या विश्वासानं हा उत्सव आपणा सर्वांच्या हातात दिला आहे. तो वसा आपण सोडून देऊन कसं चालेल? लावण्या, आयटम साँग्ज, धांगडधिंगा आणि मंगलवाद्य, भक्तिसंगीत, भजन, कीर्तन यांची आपापली अशी वेगळी जागा असते, हे आपल्याला नक्की कळतं ना? मग तो बदल घडवण्यासाठी आपणच पुढं होऊया. महाराष्ट्राच्या राज्यउत्सवात सहभागी होऊया. उत्सवाचं मूळ रुप सुंदर आहेच, त्याला आता श्रवणीय, प्रेक्षणीय आणि आनंददायक करुया..!
|| गणपती बाप्पा मोरया ||
©️ श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






