सुश्री स्वप्नजा घाटगे
मनमंजुषेतून
☆ महालय… ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे ☆
महालय चालू झाला आहे. कावळे आणि त्यांच्यावरचे जोक्स सोशल मिडीयावर फिरु लागलेत.परंपरा, कर्मकांड हा आजचा विषय नाहीच…
सकाळपासून रात्रीपर्यंत भाजी काय करायची,तिथपासून सगळ्यांना आवडेल असं काय करायचं..हेच प्रश्न बाईंच्या भोवती फिरत असतात…
एखादा पदार्थ आवडला की घरातले चाटूनपूसून फस्त करतात…हिला राहिलय की नाही हे कोण पहातही नाही…मग ही पोळी चटणी,लोणचं या तोंडी लावण्याबरोबर संपवते..तिला राग नसतो..,असतं ते समाधान…!!!
पण तिला कळतच नाही या समाधानावर शरीराचे पोषणभरण होत नाही हे तिला कळत नाही…कमी खाणे,शिळं खाणे यामुळं आयुष्याच्या संध्याकाळी तिच्या शरीरात कॕलशियम, लोह, हिमोग्लोबिन अशा कितीतरी आवश्यक घटकांची कमीच भासते.
तिची हाड ठिसूळ होतात.सारे आपआपल्या व्यापात असतात ही निमूटपणे सारं का सहन करते..
अनेक घरातील ती अशीच मूकपणे मरुन जाते….मग समाजातील लोक तिसऱ्या दिवशी अरे तिच्या आवडीचे पदार्थ ठेवायला हवेत म्हणून घरातली लोकांना आग्रह करु लागतात….
आई मेली, तिसऱ्याला लोक म्हणाले,
नैवद्यावर ठेवा तिला काय आवडतं ते….!
नव-याने उडविले खांदे,मी असतो व्यस्त
मला नाही माहित तिला काय आवडतं ते….!
मुलगा म्हणाला, ‘ आमच्याच आवडीनिवडीचं ती शिजवायची.. मला नाही माहित तिला काय आवडतं ते…!! ‘
मुलगी म्हणाली, ‘ मला चालतं ग म्हणून ती उरलंसुरलं खायची.. मलाही नाही माहित तिला काय आवडतं ते….!!!’
काय काय ठेवलं,मेवा न् मिठाई
पिंडाला कावळा शिवलाच नाही
तुम्ही म्हणाल असं नाही घडतं आमच्या घरात…पण कांही घरात हे अजूनही घडतं आहे.तिच्या खाण्यापिण्याची आबाळ होते आहेच.
तिच्या गरजा,तिच्या आवडीनिवडी,इच्छा कुठे कुठे विचारात घेतल्या जात नाहीत.घरातील आर्थिक व्यवहार तिला चोरून केले जातात.
…. जणू ती सासरची इस्टेट माहेरी नेऊन देणार असते….!!!
अशा मूक वेदना कितीतरी घरांच्या भिंतीत चिनून जात असतील….
जिवंतपणी तिची अवहेलना नंतर ह्या परंपरा, कर्मकांड ह्यात खरोखरच अर्थ आहे का….!!!
माझ्या मैत्रिणीचे वडिल…. पत्नी निवर्तली आहे. सुना अक्षरशः शिळं अन्न त्यांना वाढतं असतात.ते निमूटपणे पोटाच्या भुकेसाठी खातही असतात.आपणही म्हातारे होणार आहोत हे माणसं का विसरतात.नंतर कार्यालयं घ्यायची.. थाटात गेलेल्यांची कार्य करायची.. हे सारं दिखाव्यासाठी….!!!
अशांना मनाची तरी लाज वाटते की नाही कुणास ठाऊक?
आपल्याच प्रथांचे आता आत्मपरीक्षण व्हायची गरज आहे.काही नव्याने अधोरेखित व्हायला हवं….!!!
मागे कोरोनामुळे कितीतरी ओळखीचे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले…कर्मकांड नाही झाली म्हणून कांही प्रकोप झालाय असं वाटतं नाही…!!!
माणसं जिवंत आहेत तोवर आपली…त्यांना पोटभर खाऊ घालणं हेच खर प्रेम….!! मातीआड झाली त्यांची राख झाली. त्यानंतर या नैवद्याला काही अर्थ आहे असं मला वाटतं नाही….
तुम्हाला काय वाटतं???
(कविता – मन व्याकूळ व्याकूळ या संग्रहातून-2015)
© सुश्री स्वप्नजा घाटगे
लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या
कोल्हापूर
मो 8888033332
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





संपूर्णपणे सहमत आहे. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य हेच स्त्रीला अशा दुर्दैवातून बाहेर काढू शकेल. तुमचा नंबर कळवा. माझा ह्याच विषयावरील लेख पाठवीन. : विश्वास दाते
9850035362. विश्वास दाते