सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ उत्सव म्हणजे … ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“उत्सव म्हणजे एकत्र येणे, उत्साह, आनंद घेणे व देणे दोन्ही. “

काल ताई कडे गेले होते. नुकताच नवरात्रीचा सण झाला होता. म्हंटल ताईला भेटून यावं. ताईला भेटल्यावर एक वेगळीच उर्जा मिळते. आयुष्याचे गणित किती सोपं आहे, हे कळत. काही तरी नवीन शिकायला मिळतं. मी ताईला नेहमी गमतीत म्हणतेही, •••• अग !! सुखी, आनंदी आयुष्य कसं जगायचं? ?  याचे क्लासेस का घेत नाही तू? ?  किती तरी जणांना मदत होईल. आज लोकांजवळ सर्व आहे. परंतु आयुष्यात कशाला, केंव्हा महत्व द्यायचे? ? ?  हेच खूप लोकांना समजत नाही. सुखी सर्वांनाच रहायचे आहे, पण नेमकं सुख कशात आहे? ?  हे कळत नाही. नोकरी, पैसा, नातेवाईक, संबंध, सर्वच आवश्यक.. तरी केंव्हा?  कुठे?  कशासाठी वेळ द्यायचा, हे गणित ज्याला कळते, तो आयुष्य सरळ सोप्या पद्धतीने, आनंदाने सहज जगू शकतो.? ?  हे गणित ताई कडून शिकावे. ••••

ताईचे घर म्हणजे जोशी परिवार उदाहरण देण्यासारखा परिवार. चार भाऊ, दोन बहिणी. आता तर प्रत्येकाकडे सुना, जावई, नातवंडे यांची भर पडली आहे. घरी सर्व सणवार आहेत. प्रत्येकाने हौशी ने आपापल्या घरी एकेक सण घेतला. सर्वांनी तो सण साजरा करायला यायचेच. असा एक अलिखित नियमच आहे त्यांच्या कडे.. असे सर्व घरी एकत्र जमले की तो आकडा वीस पंचवीस सहज होतो. सर्व एकत्र येतात तेंव्हा घर लहान आहे की मोठे हा प्रश्न उद्भवतच नाही. मिडिल क्लास फॅमिली मधे सहजतेने सामावून घेणे. हा एक मोठा गुण असतो. पण तो सर्वांमध्ये दिसतोच असंही म्हणता येणार नाही. म्हणून हे विशेष वाटत. •••

घरातले जेष्ठ आता रिटायर्ड आहेत. नवीन पिढी चांगली शिकलेली व चांगल्या नोकऱ्या करणारी आहे. मुली, सुना जावई म्हंटल तर आपापल्या क्षेत्रात उत्तम यश मिळवून काम करत आहेत. ••••

एकत्र जमले की कोण कोणाचा मुलगा -जावई, सुना -मुली हे नवीन माणसाला कळणार सुद्धा नाही. ओळखताच येणार नाही. ••••

घरच्या जेष्ठांनी काही प्रथा विचारपूर्वक, दूरदृष्टी ठेवून सुरवातीपासून लक्षपूर्वक पाळल्या. व त्या चालू ठेवल्या. वर्षातून तीन पिढ्या चार दिवस तरी एकत्र येतात. मजेत वेळ घालवतात. ••••

ताई कडची एक पध्दत मला खूप आवडते. सर्व मिळुन मिसळून काम करतात. सणवार व्यवस्थित, जास्त अवडंबर न करता साजरे करतात. सर्व कामांमध्ये पुरुषांचा बरोबरीने सहभाग असतो. ••••

मुलांची तर खूप मजा असते. एखादा काका सर्वांसाठी आइस्क्रिम आणतो, तर एखादा त्यांच्या बरोबरीने मस्ती करतो. आजी गोष्ट सांगते. तर आजोबा पार्क मध्ये खेळायला नेतात. ••••

ताईचे म्हणणे बरोबर आहे. आता प्रत्येक परीवारात बहुतेक एकच मूल असल्याने मुलांना जवळचे नातेवाईक, भाऊ बहिण यांचा सहवास असणे गरजेचे आहे. भावाबहिणींचा आधार असला पाहिजे. त्यांच्या मध्ये आपुलकी निर्माण व्हायला त्यांना एकत्र येणे गरजेचे आहे. वर्षातुन तीन चारदा तरी आम्ही सणाच्या निमित्ताने एकत्र येतो. ••••

काही अलिखित नियम पाळतो. असं नाही की सर्वांना सर्वांचे सगळेच खूप पटते. वेगवेगळे विचार असतातच तसे सर्व स्वतंत्रच राहतात.

म्हणतात ना, •••••

” रिश्तों को जोड़े रखने के लिए कभी अंधा, कभी गुंगा, कभी बहरा बनाना पड़ता हैं ।”•••

हे दोन चार दिवस आम्ही सर्व एकत्र मजेत राहतो. सुना मुलींमध्ये काही ही फरक करत नाही. ‘young generation’ एकत्र बसून मनसोक्त गप्पा मारतात. त्यांच्या बिझी लाइफ मध्ये थोडा निवांत वेळ मिळतो त्यांना. आपापसात गप्पा होतात. एकमेकांचे अनुभव शेअर करतात त्यामुळे मन हलकं होतं. बऱेच प्रश्न सहज सुटतात. एकमेकांचा आधार वाटतो. माहेरपण enjoy करून सर्व मुले ताजेतवाने होऊन पुन्हा आपल्याला कामाला लागतात. ••••

सणांचे निमित्त असते ग. !!!

‘एक पंथ दो काज’ ••••

उत्सव उत्साहात साजरा करायची जिम्मेदारी आपली असते. नाही तर असे कितीतरी सण येतात आणि जातात. सर्व एकत्र आले की एकमेकांबद्दल आपुलकी वाटते. भेटीची ओढ असणे आवश्यक आहे. भेटीत दडपण नसावं. उत्साह, आनंद असावा. मनातलं सहज, वेळेवर बोलायचा chance मिळतो म्हणजे मनात साठत नाही. बाहेरच्या लोकांचा आधार शोधण्यापेक्षा घरच्यांचा आधार केंव्हा ही चांगला नाही का? ?  माझ्या पाठीशी कोणी आहे ही भावना खूप आधार देणारी आहे. एकमेकांच्या संपर्कात राहिल्यास हे सहज घडते. आपण जेष्ठ अजून काय करू शकतो.? ? ?  ही अशी मदत करता आली, तर ती करायची. आपलाही वेळ छान जातो. ••••

झुकलेल्या मानेने मोबाईल वर अनेक अनोळखी लोकांशी आपण नातं जोडतो. तर मग खरोखरच्या नात्यांमध्ये मान झुकवायला काय हरकत आहे. उत्तम वेळेची वाट बघायची नसते. हातात असणाऱ्या वेळेला उत्तम बनवायचे असते. वर्तमान छान जगून घ्यायचे. ••••

सणांचे रितीरिवाज तर व्यवस्थित करतोच. त्याहीपेक्षा सर्वांना एकत्र बांधून ठेवणे, जास्त महत्वाचे. ही घरच्या ज्येष्ठांची जबाबदारी आहे. प्रत्येकाला मान दिला, सर्वांच्या छोट्या मोठ्या आवडीनुसार लक्ष दिले, तर प्रत्येक जण आनंदात असतो. ••••

देवीची आराधना करायची. मग घरच्या मुली सुनांच्या रूपात असणाऱ्या देवींना आनंदी ठेवायलाच हवे. आता बघ ना, •••• आपटे, कुलकर्णी, पाटील, आणि अग्रवाल, मिश्रा या घरच्या मुली जोश्यांच्या घरी आल्या आहेत. त्यांचा मान ठेवायलाच हवा. ••••

मधून मधून असे एकत्र येणे म्हणजे मनाला शिस्त लावणेच असते. लहान मुलं घरात नकळत किती तरी गोष्टी सहज शिकतात. ••••घरचे सणवार ही कळतात. मुलं आई बाबा सर्वांना काम करताना बघतात. काही गोष्टी कृतीतून शिकवायच्या असतात•••

काल नेहाने मुलांना छान गोष्ट सांगितली. देवीचे नवरात्र या विषयावर देवी म्हणजे स्त्री. तिचे महत्व, तिचा आदर, तिची शक्ती, पराक्रम, सहनशीलता, त्याग, हिम्मत, बुध्दीमत्ता, अशा अनेक गुणांचे छान वर्णन केले. आजच्या संदर्भात एका स्त्री बरोबर कसे वागायचे? ? ?  मग ती कोणीही असो आई, बहिण, मैत्रीण, घरी कामाला येणाऱ्या मावशी, सहप्रवासी किंवा ऑफिसमध्ये तुमच्या बरोबर काम करणारी स्त्री असेल. तिने छान समजावून सांगितले. ••••

मोठ्यांनी मोठ्यांसारखे वागताना, नवीन पिढी ला आपल्या बरोबर घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करणे. एकमेकांचा मान ठेवणे. ज्याला जे जमतं ते करू देणे. तुलना न करणे. हे म्हणणं सोपं आहे ग. पण ते प्रत्येकाला जमतच असं नाही. पण असं वागायचं ठरवलं तर प्रत्येक जण तसा प्रयत्नही करतो. आज ही काळाची गरज आहे. •••••

म्हणतात ना, •••••

“माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात समाधान व सुख मिळण्यासाठी आपापसातील प्रेम व आपल्या माणसांची साथ असणे गरजेचे असते. नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर ती तुटत नाही. “

“मनुष्य की संपत्ती न धन है, न दौलत.

उसकी संपत्ती तो उसका हसता हुआ परिवार हैं। “

“उत्सव म्हणजे एकत्र येणे, उत्साह, आनंद घेणे व देणे दोन्ही. “

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted